आँखो देखी- सत्याचे प्रयोग

>> Monday, April 28, 2014


जुन्या दिल्लीतल्या एका दाट वस्तीतल्या घराची गच्ची. इथे वाढदिवसाची पार्टी सुरु आहे. ही फिल्म हिंदी असली, तरी पार्टी हिंदी चित्रपटातल्या पारंपारिक पार्ट्यांसारखी नाही. किंबहुना , सामान्यतः नाट्यमय चित्रपटात जसे प्रमुख व्यक्तिरेखांचेच वाढदिवस साजरे होतात, तसंही या चित्रपटात होत नाही. भल्या मोठ्या कुटुंबातल्या एका मुलाचा हा वाढदिवस. हा मुलगा अनेक पात्रांतला एक, प्रमुख वगैरे काही नाही.

पार्टी होतेय ती गच्ची प्रेक्षणीय. म्हणजे नेत्रसुखद या अर्थी नाही, तर ती अचूकपणे या कुटुंबाचा आर्थिक , सामाजिक स्तर , त्यांची जीवनपध्दती, त्यांची आवडनिवड मांडते, त्यामुळे आशयाचं अचूक रुप दाखवणारी, म्हणून प्रेक्षणीय. ही गच्ची असलेली इमारत आणि आजूबाजूच्या इमारतीही छोट्या, बैठ्या, जवळजवळ गर्दी करुन बांधलेल्या, दर शाॅटमधे पार्श्वभूमीला दिसणारी भिंती, तारा, अँटेनांची गर्दी, पॅरापिटवर कोणी हौसेने लावलेल्या कुंड्या, घाईघाईत दिसेल तिथे फुगे आणि झिरमिळ्या लावून केलेलं डेकोरेशन.

पार्टीत एक पन्नाशीतला गृहस्थ. सामान्य. बहुधा या मोठ्या कुटुंबातला वयाने सर्वात मोठा. पार्टीत त्याचे भाऊ, बहीण , इतर नातेवाईक, मित्र, सार््यांची पोरं बाळं यांचा समावेश. या गृहस्थाला कोणीतरी विचारतं, की ,' इतर काही सोडा, पण भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत, यावर तरी तुमचा विश्वास आहे की नाही?'
गृहस्थ शांतपणे पण नाॅनकमिटली म्हणतो, ' असतील ना !'
सगळे हसतात, टिंगल करतात, पण गृहस्थ आपला हेका सोडायला तयार होत नाही. इतर सांगण्याचा प्रयत्न करतात, की सारेच जण म्हणताहेत, पेपरात टिव्हीवर येतं, तर त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? पण गृहस्थाच्या म्हणण्यानुसार ही विश्वास ठेवण्याची पध्दत हाच मुळी एक संकेत आहे. सोयीसाठी केलेला, आणि केवळ त्या संकेतावर विसंबून त्याच्या स्वत:च्या अनुभवाचा भाग नसलेलं काही त्याने खरं कसं मानावं?
टिंगल सुरुच राहाते.

रजत कपूरच्या आंखो देखी चित्रपटातला हा सुरुवातीकडला एक प्रसंग. एका परीने प्रातिनिधिक म्हणावा असा. चित्रपटातलं गांभीर्य आणि विनोद याचं मिश्रण, वास्तववादी शैली, दिग्दर्शकांची व्यक्तिरेखांवरली श्रध्दा, प्रामाणिक दृश्यात्मकता हे सगळं या दृश्यात प्रत्यक्ष दिसतं. व्यावसायिक चित्रपटांना दर प्रसंगात काही घडवायचं असतं, घटनांना कन्क्लूजनच्या दिशेने पुढे रेटायचं असतं. यासारख्या चित्रपटांना ती गरज वाटत नाही. मग ते रेंगाळतात, आणि सर्वसामान्य जगण्याच्या अनुभवात, प्रेक्षकाला सहभागी करुन घेतात.

रजत कपूर हा आपल्या नवसमांतर चित्रपटांमधला एक महत्वाचा दिग्दर्शक. अनुराग कश्यप एवढा हाय एन्ड नाही, पण चांगला. रघू रोमिओ,मिक्स्ड डबल्स, मिथ्या असे चांगले, वेगळ्या प्रकारचे चित्रपट देणारा. त्याची निर्मिती ( आणि भूमिका)  असणारा, पण दिग्दर्शन नसणारा ' भेजा फ्राय'  चिकार चालला आणि केवळ लोकप्रिय चित्रपट पाहाणार््याला रजत कपूर म्हणजे कोण हे सांगायची सोय झाली, तरीही जे लोक वेगळा चित्रपट पाहातात, त्यांना हे नाव आधीपासून परिचित आहे. त्याच्या चमूतली विनय पाठक आणि रणवीर शौरी, ही दोन नावं अलीकडे खूप प्रकाशात आली आहेत. या चित्रपटात ती (शौरीचा एक सूक्ष्म कॅमिओ सोडल्यास) नाहीत. किंबहुना यात व्यावसायिक वा नवसमांतर मधलं कोणतंच मोठं नाव नाही. तो स्वत: आणि  विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाणारा उत्तम अभिनेता संजय मिश्रा हे त्यातल्यात्यात नेहमीचे लोक. पण तसंच असण्याचा चित्रपटाला फायदा आहे . इथे स्वत:ची प्रतिमा असणार््या , ओळखीच्या लोकांची गरज नाही, तर सर्वसामान्य दिसणार््या चांगल्या अभिनेत्यांची आहे. स्वत: कपूर आणि मिश्रा देखील त्यातलेच आहेत.

आँखो देखीची कल्पना सोपी, पण म्हंटलं तर थोडी वैचारिक. एके दिवशी, दिल्लीतल्या छोट्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात राहाणारा अन एका ट्रॅवल एजन्सीत नोकरी करणारा एक माणूस, राजे बाउजी ( मिश्रा) ठरवतो, की आपलं सत्य हे आपण जे अनुभवू ते आणि तेवढ्यापुरतं मर्यादित असलं पाहिजे. जे त्यापलीकडलं, जे आपण पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही, ते सत्य कशावरुन? मग सत्य म्हणावं तरी कशाला हे एक, आणि आपल्या अनुभवाची पातळी आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकते हे दुसरं, तो पडताळून पाहायला लागतो. समोर येणारी सत्य ही अधिकाधिक घोटाळ्यात पाडत जातात आणि राजे त्या शोधात भरकटत जातो.

राजे बाउजीचा हा शोध कधी खर््या जगाशी नातं ठेवणारा, कधी तात्विक, तर कधी अध्यात्मिक आहे. दिवसेंदिवस तो व्यक्ती म्हणून भोवतालच्या जगापासून तुटत जातो कारण आपलं सत्य हे आपल्या असणार््या बाहेरच्या जगाच्या संदर्भापलीकडे अस्तित्वातच नाही हे त्याच्या लक्षात येतं. पृथ्वी गोल का सपाट या साध्या गोष्टीपासून आपण कामाचा भाग म्हणून क्लायन्ट्सना  देत असलेल्या परदेश प्रवासाच्या तपशीलापर्यंत काहीच आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही हे दिसून आल्यावर बाउजींचं जग संकुचित व्हायला लागतं. तो आतल्या आत, आपल्या अवकाशात गुंतत राहातो.

आँखो देखी हा काहीसा विक्षिप्त चित्रपट आहे. तो आपल्या गतीने पुढे सरकतो. त्याचा प्रवास एका निश्चित दिशेलाच जाईल असं नाही. मध्यांतरापर्यंत त्यातली सत्यशोधनाची थीम सुरळीत चालते, पुढे मात्र तो थोडा विस्कळीत होतो. कदाचित चित्रपटाच्या पूर्ण लांबीला ही लघुकथेसारखी कल्पना थोडी कमी पडली असावी. असं असतानाही चित्रपट आपल्याला गुंतवतो. मात्र हे गुंतवणं केवळ त्यातल्या आशयसूत्रामुळे होत नाही, तर त्यात रेखाटलेल्या दिल्लीकर कुटुंबाच्या अस्सल चित्रणामुळेही होतं. हे कुटुंब काही वेळातच आपण जवळून ओळखायला लागतो. राजे आणि ऋषी (रजत कपूर) या दोन भावांची कुटुंब आणि त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्र यातल्या अनेकांशी आपला थोडक्यात परिचय करुन दिला जातो. त्यांचे स्वभाव, समजुती, सवयी हे सर्व आपण जवळून पाहातो आणि हे कोणताही आव नं आणता, वा नाट्यपूर्ण कलाटण्या नं देता उभं केलेलं कुटुंबाचं चित्र आपल्याला आवडून जातं. जेव्हा त्यातला वैचारिक धागा सैल पडतो, तेव्हा या कुटुंबाचं भावविश्व आपली नजर हलू देत नाही. चित्रपटातच ठेवते. चित्रपटाचा शेवट मात्र पुन्हा आपली पकड घेतो आणि त्याला योग्य त्या उंचीवर नेऊन ठेवतो. अपेक्षेप्रमाणेच.

आज आपल्याकडे 'बाॅलिवुड'च्या दिखाऊ आकर्षक जगाबरोबर वास्तवदर्शी चित्रण आणि आशय मांडण्याची ताकद आहे. अनेकदा या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमधे त्याच तंत्रज्ञांचा, कलावंतांचा सहभाग असतो, पण दोन्हीकडे त्यांच्यावर ( खासकरुन कलावंतांवर) सोपवण्यात आलेल्या जबाबदार््या वेगळ्या असतात. या चित्रपटांमधले प्रमुख  भूमिकातले चेहरे मोठ्या तथाकथित रंजनपटात छोट्या थॅन्कलेस भूमिका करताना पाहून बरं वाटत नाही. पण सुदैवाने हल्ली या वेगळ्या चित्रपटांनाही एक प्रेक्षक वर्ग तयार होतोय. अशा प्रयत्नांमधूनच तो टिकेल, वाढत जाईल. आँखो देखी चित्रपटगृहात किती चालला माहित नाही, पण चांगले चित्रपट त्यांच्या प्रदर्शन काळानंतरही छोट्या पडद्यांवर पाहिले जातात, टिकतात. हा देखील तसाच टिकेलसं वाटतं.
- गणेश मतकरी

Read more...

राष्ट्रीय पुरस्कार : निकष आणि दिशा

>> Monday, April 21, 2014


प्रत्येक पारितोषिकाचे स्वत:चे असे काही निकष असतात. चित्रपटक्षेत्रातली पारितोषिकंही त्याला अपवाद नाहीत. काही पारितोषिकं ही व्यावसायिक चित्रपटांचं कौतुक करण्यासाठी असतात, काही नव्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी, तर काही आशयघन चित्रपटांना वर आणण्यासाठी. जेव्हा आपण अमुक एका पारितोषिकासंदर्भातला निकाल पाहतो, तेव्हा त्यांच्यामागचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक असतं. तो न घेता आपण केवळ आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीच्या संदर्भातूनच या चित्रपटांकडे पाहिलं, तर आपण गोंधळात पडू शकतो.
राष्ट्रीय पुरस्कारांचा हेतू हा मनोरंजनापलीकडे जाऊन काही तरी सांगू पाहणाऱ्या चित्रपटांना उचलून धरणं, हा आहे. देशभरातला चित्रपट उद्योग हा व्यावसायिकतेच्या नादात प्रेक्षकशरण ठरू नये, यासाठी विचारपूर्वक केलेला हा प्रयत्न असतो. अर्थात, हे करतानाही व्यावसायिक सिनेमामध्येही कोणी काही नवं करून पाहिलं, तर त्याचा विचार जरूर केला जातो. ही पारितोषिकं ठरवण्याची प्रादेशिक आणि मध्यवर्ती अशा दोन पातळ्यांवरली योजना असते आणि प्रादेशिक ज्युरींमधेही केवळ त्या त्या प्रदेशातले लोक नसून, देशभराचं प्रतिनिधित्व असतं. या ज्युरींमध्ये सिनेमाक्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर असतात, तसाच अनेक पूर्वपारितोषिक विजेत्यांचाही त्यात सहभाग असतो. हे सांगायचा मुद्दा एवढाच की या पुरस्कारांची योजना ही शक्य तितकी न्याय्य ठेवली जाते. निकालावर काही मोजक्या व्यक्ती वा संस्थांचा प्रभाव राहणार नाही, हे निश्चित पाहिलं जातं. त्यामुळेच या निकालांवर गेल्या काही वर्षांत दिसणारा मराठी सिनेमाचा जाणवण्यासारखा प्रभाव हा महत्त्वाचा आहे.
गेल्या वर्षी ज्या मराठी चित्रपटांची या पारितोषिकासाठी पात्रता होती ती यादी आणि अंतिम निकालातला सहभाग पाहिला तर लक्षात येईल, की हा निकाल मराठीसाठी चांगला आहे. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या चित्रपटांतली पाच महत्त्वाची नावं इथे आहेत. हेही कौतुकास्पद आहे की यातले तीन दिग्दर्शक हे नव्याने दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरले आहेत. नागराज मंजुळे (फॅण्ड्री) आणि महेश लिमये (यलो) या दोघांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. नागराजच्या 'पिस्तुल्या' या लघुपटाला याआधी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे, आणि महेश हा गेली अनेक वर्षे उत्तम छायालेखक म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघांबरोबर सतीश मनवरचाही (तुहय़ा धर्म कोंचा) हा 'गाभ्रीचा पाऊस'नंतरचा दुसराच चित्रपट आहे. या तिघांचंही, असं करिअरच्या सुरुवातीच्या काळात झालेलं कौतुक हे त्यांना आणि आज मराठी चित्रपटांत काही नव्याने करू पाहण्याची इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांना प्रोत्साहन देणारं आहे यात शंकाच नाही. संदीप सावंत, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, रवी जाधव, परेश मोकाशी, सुजय डहाके या पहिल्या-दुसऱ्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या मराठी चित्रकर्मीच्या परंपरेलाही ते साजेसं आहे. उरलेले दोन चित्रपट करणारी नावं, म्हणजे सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर (अस्तु) आणि चंद्रकांत कुलकर्णी (आजचा दिवस माझा) ही तशी जुनीजाणती आहेत आणि तिघांनीही गेली अनेक वर्षे चांगला मराठी चित्रपट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
मला माझ्यापुरतं जर गेल्या वर्षीतल्या एकाच महत्त्वाच्या चित्रपटाचं नाव घ्यायला सांगितलं तर मी 'फॅण्ड्री'चं घेतलं असतं. ते नाव या पुरस्कारांत असेल अशी अपेक्षा होतीच. नागराज मंजुळे दिग्दíशत या चित्रपटात लक्षवेधी अशा अनेक गोष्टी होत्या, ज्या जागतिक चित्रपटांशी नातं सांगणाऱ्या आहेत. फॉम्र्युला टाळून प्रामाणिकपणे जे डोक्यात आहे ते मांडणं, गुंतागुंतीचं खरंखुरं व्यक्तिचित्रण, प्रखर वास्तववाद, नॉनअ‍ॅक्टर्सचा (आणि अ‍ॅक्टर्सचाही) उत्तम वापर असं बरंच काही सांगता येईल. जातिभेद आणि सामाजिक विसंवादाला त्यात स्थान जरूर होतं, पण चित्रपट त्याच्या आहारी गेला नव्हता. दिग्दर्शकीय प्रथम प्रयत्नाचं आणि सोमनाथ अवघडेसाठी बालकलाकाराचं पारितोषिक मिळवणारा हा चित्रपट माझ्यापुरता सर्वात महत्त्वाचा असला तरी सन्मानप्राप्त इतर चित्रपटांमध्येही कौतुक करण्यासारखं बरंच काही होतं. अनंत अडचणींवर मात करणाऱ्या डाऊन्स सिन्ड्रोमग्रस्त मुलीची यशोगाथा सांगणारा आणि प्रत्यक्ष त्या मुलीच्या-म्हणजे गौरी गाडगीळच्या कामाने वेगळं परिमाण मिळालेला 'यलो', तत्त्वज्ञानाची झालर असणारा 'अस्तु', आपल्या मातीतला असून फार परिचित नसणाऱ्या धर्मातरासारख्या विषयावरला 'तुहय़ा धर्म कोंचा' आणि व्यावसायिक पठडीतला असतानाही लोकप्रिय संकेतांना थारा न देणारा 'आजचा दिवस माझा' या चित्रपटांचं महत्त्व हे की त्यांनी सोपे मार्ग नाकारले. मराठी चित्रपटांकडे आज देशभरात 'काही नवं करून पाहणारी चित्रपटसृष्टी' म्हणून पाहिलं जातं. ते विधान या चित्रपटांनी सार्थ ठरवलं.
ऑस्कर पुरस्कारांच्या वेळी आपण सारे चित्रपट मिळवून पाहू शकतो आणि त्यावर निश्चितपणे विचार मांडू शकतो. दुर्दैवाने आपल्याकडे आंतरप्रदेशीय वितरण असा प्रकारच नसल्याने राष्ट्रीय पुरस्कारांमधले बरेच चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तरीही काही चित्रपटांबद्दल बोलणं आवश्यक. खासकरून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालेला आनंद गांधी दिग्दíशत 'शिप ऑफ थिसिअस' आणि दिग्दर्शनाचं (हन्सल मेहता) व अभिनयाचं (राजकुमार राव) पारितोषिक पटकावणारा 'शाहीद.' हे दोन्ही चित्रपट नि:संशय गेल्या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांत होते.
'थिसिअस हा एकमेकांशी आशयसूत्राने जोडलेल्या, पण बऱ्याचशा स्वतंत्र तीन कथा मांडतो. त्या कथाही घटनाक्रमाला प्राधान्य न देता तात्त्विक चच्रेवर आधारलेल्या. पुन्हा मूळ संकल्पनाही 'स्वत्व' म्हणजे काय, अशी सहज शब्दात न मांडता येणारी. थिसिअसचं २०१२ च्या 'मामी' महोत्सवात कौतुक झालं आणि गेल्या वर्षी तो प्रदíशत झाला तेव्हाही त्यावर चांगलं लिहून आलं. प्रेक्षक प्रतिसाद मात्र त्याला फार मिळाला नाही. यंदा ऑस्करला 'द गुड रोड' हा गुजरातचा मूर्ख सिनेमा पाठवून आपण जी घोडचूक केली तेव्हाही 'थिसिअस' किंवा 'लंच बॉक्स' ही दोन नावं अधिक योग्य असल्याची चर्चा झाली होती. कदाचित या पुरस्कारानंतर तो अधिक लोक पाहतील.
'शाहीद' त्यामानाने स्ट्रेट फॉरवर्ड, पण भावनिकदृष्टय़ा प्रेक्षकाला खूप गुंतवणारा. शाहीद आजमी या वकिलाच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट अनेक महोत्सवांत गाजला होता. आपल्याकडेही त्याला दर्दी प्रेक्षकांनी आधार दिला. या दोन चित्रपटांबाबत आणि मराठी चित्रपटांबाबत चांगला निकाल देणाऱ्या ज्युरीने िहदी चित्रपटासाठी निवड केलेला 'जॉली एलएलबी' चित्रपट म्हणून चांगला, पण निकषांच्या दृष्टीने सामान्य वाटतो. 'मद्रास कॅफे', 'लंच बॉक्स', 'आँखो देखी' किंवा 'बी ए पास' यांसारख्या अधिक अर्थपूर्ण चित्रपटांमधली ही निवड थोडी आश्चर्यकारक. अर्थात, निवड समितीमधल्या सभासदांची भिन्नता ही जशी वेगळा निकाल लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, तशीच ती एखाद्या प्रसंगी अनपेक्षितपणे पारंपरिकही होऊ शकते. कथाविषयातल्या वैयक्तिक आवडीनिवडी, बाजू लढवण्याची ताकद, तत्कालीन मतप्रवाह अशा गोष्टी वेळोवेळी या निकालांवर परिणाम करू शकतातच. तरीही या वेळचा एकूण निकाल हा या पारितोषिकांकडून असणाऱ्या अपेक्षेला साजेसा मानता येईल.
यंदा पाचांतल्या तीन मराठी चित्रपटांना, म्हणजे 'फॅण्ड्री, 'आजचा दिवस माझा' आणि 'यलो' यांना चांगला प्रेक्षक प्रतिसाद लाभला. हे लक्षण जरी प्रेक्षकांच्या सरसकट आवडीनिवडीचा आढावा घेणारं नसलं, तरी योग्य वाटेवरचं पाऊल म्हणता येईल. कारण पुरस्कार महत्त्वाचे असले, तरी चित्रपट तगवतात ते प्रेक्षक, पुरस्कार नाही. चित्रपट बनतात ते लोकांनी पाहावेत म्हणून, पुरस्कारांसाठी नाही. या तीन चित्रपटांबाबत आज प्रेक्षकांनी दाखवलेली समज यापुढे अधिकाधिक विस्तारली जावी, अशी अपेक्षा आहे. तर मराठी चित्रपट आपला वेगळेपणा, नवं काही करण्याची वृत्ती शाबूत ठेवू शकतील. आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना साजेशी कामगिरी करून दाखवू शकतील.
- गणेश मतकरी 
           

Read more...

यलो- स्पेशल चित्रपट

>> Saturday, April 5, 2014



चित्रपट हा मूलत: दोन प्रकारात मोडतो. चांगला आणि वाईट.
तांत्रिकदृष्ट्या पाहायचं तर मात्र त्याचे असंख्य उपप्रकार पडू शकतात. चित्रप्रकारांमधलं, अर्थात जान््रं मधलं त्याचं स्थान, तो व्यावसायिक आहे का समांतर,  विषयवार वर्गीकरणात तो कुठे बसतो, त्यातले निवेदनशैलीतले प्रयोग आणि यासारख्या बर््याच इतर गोष्टींवर हे उपप्रकार आधारित असतात. मात्रं अनेकदा अशा  फूटपट्ट्या लावल्याने या चित्रपटांची जात कळायला मदत होत असली , तरी त्यांच्याकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाला मर्यादा पडण्याची शक्यता असते. कारण मग त्यांची गुणवत्ता ही एकूण चित्रपटांमधे पाहिली न जाता त्यांच्याच जातीच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत पाहिली जाते.
महेश लिमये या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तम काम केलेल्या सिनेमॅटाेग्राफरचा दिग्दर्शकाच्या भूमिकेतला पहिलाच चित्रपट 'यलो' - याची जात, जर अशी तपशीलात जाऊन पाहायची, तर दोन चित्रप्रकार समोर येतील. पहिला म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर आपल्यातल्या नैसर्गिक दोषासह मात करणार््या प्रमुख व्यक्तिरेखेचे चित्रपट ( उदाहरणं मुबलक, 'रेन मॅन' ते 'माय लेफ्ट फूट' आणि 'चिल्ड्रन आॅफ ए लेसर गाॅड' ते 'तारें जमीं पर' ) आणि दुसरा अर्थातच खेळाला प्राधान्य देणारा सिनेमा( पुन्हा उदाहरणं मुबलक, 'बेन्ड इट लाइक बेकहम' पासून 'द प्राईड' आणि 'चक दे, इंडिआ!' पर्यंत) . सामान्यत: हे प्रकार म्युच्यूअली एक्स्लुजिव असतात, ते एकत्र येणं संभवत नाही. ते इथे शक्य होतं , हा यलोचा एक वेगळेपणा तर  त्यातल्या प्रमुख भूमिकेत, जिच्या खर््या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवला आहे त्या डाउन्स सिन्ड्रोम असलेल्या गौरी गाडगीळचा आणि लहानपणच्या गौरीच्या भूमिकेत संजना रायचा प्रत्यक्ष सहभाग , हा  दुसरा. आता चित्रपटाकडे त्रयस्थपणे पाहाण्याचा हा अप्रोच कितीही तर्कशुध्द असला तरी  मुळात या प्रकारच्या हिशेबी नजरेने 'यलो' कडे पाहावं का, हा माझ्यापुढला खरा प्रश्न आहे. कारण काही कलाकृती अशा असतात, की त्यांचं असणं हे कोणत्याही गणितापलीकडे, फाॅर्म्युलापलीकडे असतं. त्यांचं त्या जातीतल्या इतरांशी असणारं साम्य, वा वेगळेपणा हा वरवरचा असतो. खरं तर त्या कलाकृती या केवळ त्यांच्या स्वत:सारख्याच असतात. 'यलो' हा असाच सार््या हिशेबांपलीकडे जाणारा चित्रपट आहे. तुलना अनावश्यक ठरवणारा.
सेट अपचा भाग हा कोणत्याही चित्रपटात महत्वाचा असतो. अनेक वेळा हा भाग खूपसा एक्सायटिंग नसला तरीही आवश्यक असतो. तो आपल्याला जितका या व्यक्तिरेखांबरोबर गुंतवेल तितका नंतरचा चित्रपट आपल्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. यलोमधेही हा सुरुवातीचा भाग असाच महत्वाचा आहे कारण तो यातल्या व्यक्तिरेखा कोण आहेत, त्यांच्या या चित्रपटाशी निगडीत मुद्द्यांबद्द्ल काय भूमिका आहेत, हे स्पष्ट करतो. चित्रपटाच्या नायिकेला , गौरीला,  पोहण्याची आवड तयार झाल्यानंतरचा भाग हा बरंचसं फोकस्ड निवेदन करणारा आहे, जो कमी कालावधीत घडतो आणि संघर्षावर भर देतो. याउलट सुरुवातीचा भाग हा अधिकतर गौरीच्या    आजारामुळे तयार होणार््या कौटुंबिक आणि इतर अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्याचे तिच्या आईचे ( मृणाल कुलकर्णी) आणि मामाचे ( ऋषिकेश जोशी) मूलभूत स्वरुपाचे प्रयत्न यांवर भर देतो.
या भागात किंचित अडखळायला लावणार््या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ गौरीच्या वडिलांची टोकाची भूमिका, किंवा शाळेच्या भागात डोकावणारा संदेश, मात्र यातला कोणताच भाग त्रासदायक होण्याइतका  लांबत नाही. साध्या चित्रपटांमधे वरवर आेढूनताणून आणलेला संदेशाचा भाग हा नेहमीच खटकतो कारण तो बहुधा चिकटवलेला असतो. मात्र हा विषयच असा आहे, की या मुलांचं पूर्ण चित्रण हे त्यांच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी आणि त्यात काय प्रकारचा बदल आवश्यक आहे हे आेझरतं का होईना , पण सुचवल्याशिवाय पूर्णच होणार नाही. अॅक्सेप्टन्स हा यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. पालक असोत , शेजारी पाजारी वा शिक्षक, जोपर्यंत ते वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न करतात, तोवर या प्रश्नाला उत्तर नाही, असंच आपल्याला दिसतं. मात्र तुम्ही ती स्वीकारणं, हे तुम्हाला उत्तराच्या बरंच जवळ घेऊन जातं.
चित्रपटातल्या बहुतेक प्रमुख पात्रांचा दृष्टीकोन, हा या स्वीकाराचंच कोणतं ना कोणतं रुप आहे. आईने गौरीची काळजी वाटत असतानाही घर सोडण्याचा घेतलेला निर्णय, मामाने गौरीच्या  खोडकर स्वभावाला, व्यक्तिमत्व विकासाला दिलेलं प्रोत्साहन, गौरीचा स्विमिंग कोच प्रताप सरदेशमुख ( उपेंद्र लिमये) याने तिला कोणतीही खास वागणूक न देता काटेकोरपणे शिस्त लावण्याचा केलेला प्रयत्न, या सार््यातून समाजाकडून अपेक्षित असणारा अॅक्सेप्टन्स दिसतो. हा विश्वास या मुलांना मोकळं करेल, त्यांची उमेद जागवेल असं सुचवतो.
या प्रकारच्या बहुतेक चित्रपटांत , प्रमुख भूमिकेत अनेक चांगले अभिनेते दिसले, तरीही या कन्डीशनमधल्या मुलीने प्रत्यक्ष भूमिका करणं हे यलोला  वेगळ्या उंचीवर नेतं. ( सर्वात तरुण वयात , म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी 'चिल्ड्रन आॅफ ए लेसर गाॅड'  या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं आॅस्कर पटकावणार््या मार्ली मॅटलिन या कर्णबधीर अभिनेत्रीच्या कामाची आठवण इथे होणं साहजिक आहे) . गौरीच्या असण्याने चित्रपट केवळ मनोरंजक चित्रपट राहात नाही, तर एक वेगळा इन्स्पिरेशनल अनुभव बनतो. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत पोहण्याच्या क्षेत्रात पराक्रम दाखवून वर कलाक्षेत्रात निपुण अभिनेत्यांच्या संचाबरोबर इतकं सहजपणे काम करुन दाखवणं भल्याभल्यांना शक्य होणार नाही. आपण मनात आणलं तर काहीही करु शकतो याचा याहून मोठा पुरावा तो कोणता?
गौरीबरोबर आणि या चित्रपटातल्या अनेक ' स्पेशल ' मुलांबरोबर काम करणं सोपं नसणार हे उघड आहे. आणि ते आव्हान या टीमने एकत्रितपणे पेललं आहे. महेश लिमयेने दिग्दर्शन आणि छायाचित्रण या एरवीच अवघड पण या केसमधे तर खासच कठीण जबाबदार््या स्वीकारल्या आहेत, पण नटसंचासमोरची कामगिरी म्हणा किंवा इतर क्रूची वाढलेली जबाबदारी पाहाता कोणासाठीच हे काम सोपं नसणार हे उघड आहे. केवळ सिनेमा करायचाय हा व्यावसायिक हेतू , या प्रकारचं काम घडवून आणू शकत नाही. ते प्रेमानेही करावं लागतं. आपलं वाटून करावं लागतं. हा आपलेपणा यलो पाहाताना आपल्यापर्यंत पोचतो. आपणही त्यात गुंतून जातो.
एवढं असूनही, मला कोणी विचारलं की हा चित्रपट कोणत्या वर्गात बसतो? तो इन्स्पिरेशनल सिनेमा आहे का? तो प्रेरणा देणारा सिनेमा आहे का? आपण तो एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहायला हवा का? तर या सार््या प्रश्नांची उत्तरं देणं मी टाळेन. याचा अर्थ ती नकारार्थी असतील असं नाही, पण ती या चित्रपटाला एका चौकटीत बसवतील. मग त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा चित्रपट म्हणून लेबल लावून पाहिलं जाईल. त्याच्याकडे बिग पिक्चरचा एक भाग म्हणून पाहिलं जाणार नाही. आणि हा त्याच्यावर अन्याय ठरेल.
तरीही काही बोलायचं तर मी इतकंच म्हणेन, की चित्रपट हा मूलत: दोन प्रकारात मोडतो. चांगला आणि वाईट. 'यलो' हा नि:संशय एक चांगला चित्रपट आहे.
- ganesh matkari

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP