बाबांची इन्व्हेस्टमेन्ट

>> Saturday, September 21, 2013




लेखाआधी-

मी इन्व्हेस्टमेन्टबद्दल लिहू नये अशा फ्रेन्डली ( आणि अर्थात वेल मीनींग) अॅडव्हाईस ला न जुमानता मी जे काही लेख लिहीले त्यातला हा एक. न जुमानण्याची कारणं अशी. एक म्हणजे मला चित्रपटाच्या गुणवत्तेविषयी लिहायचं नव्हतं जे करण्यात फार मुद्दा नव्हताच, कारण माझा वाचक काही मूर्ख नाही. मीच माझ्या चित्रपटाची तारीफ करणं कोणी एेकून घेतलं नसतंच. दुसरं म्हणजे मला यातला एक महत्वाचा, काहीसा सैध्दांतिक मुद्दा मांडायचा होता, जो सर्वांच्या सहजपणे लक्षात येईलसं नाही. तो म्हणजे त्यातला वास्तवदर्शन आणि वृत्तीदर्शन यांमधल्या सरमिसळीचा मुद्दा. जो मी आधीच्या आणि या,अशा दोन्ही लेखांत नोंदवला आहे. हा मुद्दा लक्षात येणं आशयाच्यादृष्टीने आवश्यक नाही पण मांडणीच्या दृष्टीने नक्कीच असू शकतं. त्यापलीकडे जाऊन तुम्हाला ही सरमिसळ पटू वा न पटू शकते, पण तिचं असणं अपघाती नाही, हे महत्वाचं.
तुम्हाला माहीतच आहे, की इन्व्हेस्टमेन्ट मागे कोणी गाॅडफादर नाही. कोणा हिंदी स्टारची ही निर्मिती नाही, कोणत्या चॅनलचा त्याला आधार नाही, काही नाही. ही खरोखर एक इन्डिपेन्डन्ट स्वरुपाची प्रामुख्याने एका कुटुंबाने केलेली आणि त्यांच्या मित्रमंडळाने सहाय्य केलेली निर्मिती आहे. या प्रकारची, पर्सनल स्टेटमेन्ट म्हणण्याजोगी, आणि व्यावसायिक गणितांच्या आहारी न जाणारी निर्मिती ही नेहमीच दुर्मिळ असते. ती पाहाणं हे एका परीने तिला आधार देण्यासारखं आहे. त्यामुळे नियमित वाचकांना हे माझं वैयक्तिक आवाहन आहे,की शुक्रवारी, २० सप्टेम्बर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वांनी जरुर बघा. त्याच्या गुणदोषांची चर्चा आपण करुच पण त्यामुळे या निर्मितीमागचा विचार बदलत नाही. जो महत्वाचा आहे.





आमच्या घरात अनेक वर्षांपूर्वीपासून एक रिचुअल आहे. वाचनाचं, बाबांनी घरच्यांसाठी केलेल्या.  नव्या साहित्याच्या, बाबांनी लिहिलेल्या. साहित्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं. मग ती भाषणं असतील, लेख असतील, कथा असतील, नाटकं आणि पटकथाही. नाटकांची/ पटकथांची वाचनं अर्थात पुढे इतरांसमोरही होतात. दिग्दर्शकांसमोर, निर्मात्यांसमोर, नटसंचासमोर. पण हे वाचन त्याआधीचं. पूर्वीपासून या वाचनाला आम्ही चौघं असणं गृहीत. आई, मी, सुप्रिया आणि अर्थात ते स्वतः. एकदा का वाचन झालं की मग चर्चा/ गप्पा. काही वेळा या वाचनाच्या आधी आईसाठी एक खास वाचनही होत असे , पण नेहमीच नाही. मी शाळेत असल्यापासून यात फार बदल झाल्याचं आठवत नाही. एक्स्टेन्डेड फॅमिलीचा, म्हणजे पल्लवी आणि मिलिंदचा शक्य तेव्हा सहभाग  हा एक बदल, आणि हल्ली सर्वाच्या वेळांच्या अडचणीमुळे काही वेळा आम्हाला बाबांकडून एेकायला न मिळता स्वतः वाचायला लागणं हा दुसरा. हे आमच्या कोणाचं फार आवडतं आॅप्शन नाही. हा नाईलाज. इन्व्हेस्टमेन्ट ही कथा, माझ्या  आठवणीप्रमाणे, मी वाचली, एेकली नाही. त्यामागे कारण काय हे आता आठवत नाही, वेळा जमणं ही बहुधा नित्याची अडचण असावी, पण पटकथेचं वाचन चांगलं स्मरणात आहे.

बाबांची वाचनाची पध्दत उत्तम ( नाटकउद्योगातल्या अनेकांना आधीच माहित असल्याप्रमाणे) आहे. व्हाॅइस माॅड्यूलेशन्समधून व्यक्तिरेखा डोळंयांपुढे उभ्या करणं त्यांना अचूक साधतं. त्यामुळे आणि कथेची पारायणं झाल्यामुळेही चित्रपट कसा होणार हे आम्हाला तेव्हाच दिसायला लागलं. चित्र थोडं अस्वस्थ करणारच होतं, नाही असं नाही, पण ओळखीचं. व्यक्तिरेखा आमच्या पाहाण्यातल्याच होत्या ,मैत्रीतल्याही म्हणता येतील. परिणाम त्यामुळेही अधिक टोकाचा. आणि त्या व्यक्तिरेखा तशाच्या तशा उभ्या राहाणं हे चित्रपट पोचण्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. पण कथावाचन आणि पटकथा वाचन यांत एक मोठा फरक असतो, जो इथेही होता. कथेचं वाचन हे शांतपणे केवळ रसास्वादाच्या नजरेने पाहाता येतं. पटकथेच्या वाचनात, 'चला ,कामाला लागा' अशी एक अनुच्चारित सूचना असते.

'कामाला लागणं' हे काही आम्हाला नवीन नाही. वेळोवेळी बाबांच्या डोक्यातून नव्या नव्या योजना येत असतात ,आणि त्या आल्या की त्यादृष्टीने सगळं घरच पावलं उचलतं. मग  ती बालनाट्य जोरात होती त्या काळातली सुटीतली मुलांची नाटकं असोत, कार्यशाळा असोत, सूत्रधारने केलेली राज्य नाट्य स्पर्धेतली नाटकं असोत, गहीरे पाणी सारखी मालिका असो वा इन्व्हेस्टमेन्ट सारखा चित्रपट.  अर्थात इथे एरवीपेक्षा एक मोठा फरक होता, की नाटकं, मालिकांप्रमाणे चित्रपटाचा अवाका आमच्या हातात राहाण्याएवढा छोटा नव्हता. मात्र तरीही तो व्हायला हवा हे बाबांनी पक्कं डोक्यात घेतलं . त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीची ती तर्कशुध्द पुढची पायरी होती. आणि ती गाठता येणार नसेल तर इतर काही करण्यातही फार मुद्दा नव्हता.

२००६/७ ते साधारण २०११ पर्यंतचा काळ हा साधारणपणे त्यांच्यासाठी तरी या एकाच गोष्टीवर केंद्रीत झाला होता. फिल्म करणं हे खूपच महत्वाचं बनलं. तीही कुठलीही नाही, तर इन्व्हेस्टमेन्टची फिल्म. खरं तर इन्व्हेस्टमेन्टचं कथारुप इतकं स्ट्राँग होतं, की इतर निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनीही या गोष्टीला चित्रपटरुप देण्यात स्वारस्य दाखवलं होतं. पण बाबांचा त्याला तत्वतः विरोध होता. आणि आम्हा सर्वांना तो मान्यही होता. ' चित्रपट दिग्दर्शकाचं माध्यम आहे' हे वाक्य आपण नेहमी एेकतो. खरं तर ते पूर्णपणे योग्य नाही कारण लेखकाचा/ पटकथाकाराचा त्यातला सहभाग हा अतिशय मोलाचा असतो. मात्र या वाक्याचा मतितार्थ हा की दिग्दर्शकाचं या माध्यमावर नियंत्रण असतं. त्याचा निर्णय हा अंतिम असतो.

इन्व्हेस्टमेन्टच्या आशयाचा तोल हा नाजुक होता. एकतर ते बाबांचं, आजच्या समाजाविषयी, त्यातल्या प्रवृत्तींविषयी असणारं स्टेटमेन्ट होतं, निरीक्षण होतं. वरवर पाहाता ती एका ( अपवर्डली मोबाईल) उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि त्यांच्या आयुष्यातल्या एका क्रायसिसची गोष्ट असली, तरी त्याचा आशय हा या कुटंुबापुरता मर्यादित नव्हता. त्यात मांडलेले दृष्टीकोन महत्वाचे होते. संस्कार -पारंपारिक आणि आधुनिक, व्यक्तिगत प्रगतीच्या बदलत्या कल्पना, मुलं आणि पालक यांमधलं आजचं नातं, समाज घेत असलेली नवी दिशा अशा बर््याच गोष्टींंविषयी त्यात बोललं जात होतं, तेही कोणत्याही संदेशाचा अविर्भाव न आणता. गोष्टीला प्रमुखस्थान देत. हा तोल जरा इकडेतिकडे होता तर चित्रपटच बदलला असता. त्यामुळे तो कोणादुसर््या दिग्दर्शकाकडे सोपवणं अवघड होतं.

काही लोकं विशिष्ट आेळखींमधे अडकतात. बाबा बर््याच वेगवेगळ्या ओळखींमधे अडकले आहेत. कोणी त्यांना आपण लहानपणी पाहिलेल्या बालनाट्याशी जोडलय, कोणी मोठ्या वयात पाहिलेल्या व्यावसायिक नाटकांशी, कोणी गूढकथांशी वगैरे वगैरे. या लेखक म्हणून असलेल्या ओळखीत अनेक नाटकं, मालिका दिग्दर्शित करुनही त्यांची दिग्दर्शक ही ओळख दुय्यम राहिली आहे. पण आम्हाला ही ओळख आहेच. त्यामुळे निर्माता शोधताना वेळ गेला तरी चित्रपट दुसर््या कोणाला देण्याचा विचार आमच्या कोणाच्याच डोक्यात आला नाही. पण हा तिढा सुटणार कसा हा प्रश्न होताच. तो अचानक सुटला, तो २०११ च्या उत्तरार्धात, बाबांच्या सतत या चित्रपटाविषयी चाललेल्या विचारांमधूनच.

डिजीटल तंत्रज्ञानाचा या निर्मितीला काहीतरी फायदा होईल असं त्यांनी मनात धरलं होतं. बहुधा इन्स्टीन्क्टीवलीच, कारण तोवर आम्ही एेकलेली दर गोष्ट ही या तंत्रज्ञानाच्या विरोधात जाणारीच होती. या तंत्रज्ञानाबद्दल चांगलं बोलणारा, पारंपारिक छायाचित्रणाच्या फापटपसार््यापासून वाढीव बजेटपर्यंत अनेक गोष्टींत आशादायक बदल दाखवणारा एक लेख बाबांच्या पाहाण्यात आला आणि त्या लेखामुळेच आमची गाठ सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेशी पडली. ही गाठ एका परीने या निर्मितीसाठी उत्प्रेरकासारखी ठरली. इथून मार्ग दिसत गेला, अडचणी सुटत गेल्या. अनपेक्षितपणेच.

बाबांच्या या पिछा पुरवण्याच्या स्वभावाची मला नेहमी गंमत वाटते. काही वेळा यातून मार्ग निघतातही, पण अनेकदा मनस्तापही होतो. त्याची त्यांना विशेष पर्वा नसते. त्यांनी आजवर केलेल्या प्रचंड कामामागेही त्यांची ही भूमिकाच आहे असं मी म्हणेन. इन्व्हेस्टमेन्ट होण्यामागेही हीच भूमिका होती.

कोणी म्हणेल की दिग्दर्शन ( चित्रपटच नव्हे, कुठलही दिग्दर्शन) हे तंत्र आहे, मी म्हणेन की तो माइन्डसेट आहे. काही वेळा चमत्कृती ,तंत्रज्ञानाचे चमत्कार, तर््हेतर््हेच्या युक्त्या करणारे चित्रपटही प्रेक्षकाला अडकवू शकत नाहीत, याउलट काही वेळा साधेपणाने, कोणताही अभिनिवेष न बाळगता सांगितलेल्या गोष्टीही चटकन परिणाम करुन जातात. अर्थात प्रत्येक कलाकृती ही संकल्पनेतच आपली नैसर्गिक गरज आणि स्वरुप सुचवते हे तर खरच आहे, पण ती उभी करणारा दिग्दर्शक या कलाकृतीचं कितपत एेकू शकतो यावर तिचा अंतिम परिणाम ठरत जातो. इन्व्हेस्टमेन्टची मूळ प्रवृत्ती ही काहीशी दुभंगलेली आहे. तिला दोन बाजू आहेत. वास्तवदर्शन ही एक तर वृत्तीदर्शन ही दुसरी. तिची पार्श्वभूमी ही पूर्णपणे वास्तव आहे. त्यातल्या व्यक्तींची पार्श्वभूमी, त्यांच्या राहाण्यावागण्याचे तपशील खर््यासारखे आहेत. याउलट त्यात घडणार््या गोष्टी या प्रातिनिधिक स्वरुपाच्या आहेत. त्यांची मांडणी ही काही विशिष्ट दृष्टीकोनांचं प्रातिनिधित्व करते. ही विभागणी ठरवली कोणी, तर अर्थातच बाबांमधल्या लेखकाने. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी ती काय पध्दतीने वापरली यावर चित्रपटाचा परिणाम ठरतो.

इन्व्हेस्टमेन्टचा विषय आजच्या काळाशी अतिशय जवळून जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याविषयी आमची बोलणी कायमच होत असत. आधी संहितेच्या पातळीवर, तसंच चित्रीकरणाच्या वेळी देखील. सेटचं वातावरण मोकळं होतं. युनिट छोटं होतं. त्यामुळे करुन पाहायला ,चर्चेला वाव होता. बाबांच्या दृष्टीने डिजीटल तंत्राचा सर्वात मोठा फायदा होता, तो चित्रीकरणाचं अवडंबर कमी करुन उस्फूर्ततेला वाव देण्यासाठी आणि समाजाचा जो स्तर आम्हाला दाखवायचा होता त्याच्या अचूक चित्रणासाठी. विशिष्ट प्रकाशयोजनेसाठी तासंतास लायटिंग करावं लागत असेल आणि अभिनेत्यांना ताटकळत बसावं लागत असेल, तर त्यांच्या कामात ती सहजता कशी येणार ? डिजीटल माध्यमाची गती, छोट्या हॅन्डहेल्ड कॅमेरातून मिळणारा लवचिकपणा, मर्यादित प्रकाशयोजना आणि मेकअपचा अतिशय कमी वापर यातून चित्रपटाला ज्या वास्तव चौकटीची गरज होती ती मिळाली आणि चित्रपट आजचा बनवता आलं.

तुम्ही म्हणाल, की चित्रपट बाबांना हवा तसा झाला, लोकांना आवडला, अनेक देशीविदेशी चित्रपटमहोत्सवात दाखवला गेला, त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून  राष्ट्रीय पारितोषिक मिळालं,वयाच्या चौराहत्तराव्या वर्षीही डोक्यात आलं ते जिद्दीने करुन दाखवल्याचा आनंद बाबांना मिळाला, याचा अर्थ ते समाधानी असतील. पण छे! त्यांचा स्वभाव हा असा समाधान मानणार््यांतला किंवा झाल्या गोष्टीत आनंद वाटण्याचा नाही. त्यांना केलेल्या गोष्टी, गाठलेले टप्पे हे त्यांच्या अचिव्हमेन्ट्सची आठवण करुन देत नाहीत, तर काय करायचं राहिलय याची जाणीव करुन देतात. ही यादी बिलकुल लहान नाही, अन रोजच अधिक वाढणारी आहे. मात्र त्यांचा तो स्वभावच आहे.आणि एका परीने त्यांची उर्जाही.

आताही, ही उर्जा त्यांना एका इन्व्हेस्टमेन्टवर गप्प बसू देणार नाही, याची खात्री वाटते.
-गणेश मतकरी.

Read more...

इन्व्हेस्टमेन्टच्या निमित्ताने -

>> Monday, September 16, 2013



अमोल (डिरेक्टर आॅफ फोटोग्रफी अमोल गोळे) 'इन्व्हेस्टमेन्ट'विषयी बोलताना एक गोष्ट नेहमी सांगतो, जी खरी आहे. त्याने जेव्हा चित्रपटाची पटकथा एेकली, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग बाबांना म्हणाला, ' काका, जगात खरोखर कोणी चांगलं नसतंच का?' यावर मला  वाटतं बाबा नुसते हसले असावेत.
इनव्हेस्टमेन्ट अनेक चित्रपट महोत्सवांमधून झाला, इथल्या तसंच न्यू याॅर्क, जर्मनीच्याही. त्या निमित्ताने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या , वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या तेव्हा लक्षात आलं, की अमोलची प्रतिक्रिया ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रीया म्हणता येईल.
मला स्वतःला ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. कारण इन्व्हेस्टमेन्टमधे केवळ वाईट माणसं दिसतात असं नाही. त्यात आपल्या आजुबाजुला दिसतात तशी सर्वच प्रकारची माणसं आहेत. काही अतिशय भली, काही तडजोडी करणारी, काही सुखवस्तू, काही स्वार्थी, काही वैयक्तिक प्रगतीचा विचार करणारी, तर काही त्या प्रगतीपलीकडे काहीच पाहु न शकणारी. किंबहुना मी तर असं म्हणेन, की टिपिकली त्यातल्या ज्या व्यक्तिरेखेच्या पदरात बराचसा वाईटपणा घातला जातो, तीदेखील पारंपारिक अर्थाने वाईट नाही. तिचा दोष म्हणायचा तर एवढाच, की ती आजच्या काळाशी सर्वार्थाने बांधलेली आहे. तिला मागे पडायचं नाही. तिची नजर पुढे लागलेली आहे. अधिक चांगल्या परिस्थितीकडे, अधिक उज्वल भविष्याकडे. पण मला सांगा, आजच्या महत्वाकांक्षी तरुण पिढीतल्या कोणाची नजर तशी नाही?
मी जेव्हा २००३ मधे इन्व्हेस्टमेन्ट कथा एेकली, तेव्हा मला सगळ्यात अधिक जाणवलं ते तिचं हे आजचं असणं. अर्थात, ही गोष्ट आजपासून दहा वर्षांपूर्वीची आहे, अन या दहा वर्षांत परिस्थिती रॅडीकली बदललेली तर नाहीच, वर ती कथेच्या अधिक जवळ गेलेली आहे. मी स्वतःही तेव्हा होतो त्याहून या कथेच्या अधिक जवळ आहे. यातलं कुटुंब हे माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या  कुटुंबापेक्षा फार वेगळं नाही. आणि या जवळच्या अंतरावरून मी निश्चितच म्हणू शकतो की ही गोष्ट वाईट माणसांची नाही, साध्या माणसांची आहे. कदाचित थोड्या अधिक हुशार, अधिक एफिशियन्ट माणसांची, जी आल्या प्रसंगासमोर हताश होऊन न राहाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निर्णयाला विशिष्ट अर्थ देऊ करते ती ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीची चौकट. या चौकटीकडे लक्ष वेधणं, ती तिथे आहे याची जाणीव करुन देणं, हा या कथेमागचा किंवा चित्रपटामागचाही हेतू आहे.
हा लेख लिहिण्यापुरती मी माझी समीक्षकाची भूमिका बाजूला ठेवली आहे असं आपण समजू कारण माझा या चित्रपटाशी इतका जवळचा संबंध आहे, की मी त्याच्या गुणवत्तेची चिकित्सा करण्यात मुद्दा नाही. ती तो पाहाणार््यांनी करावी. मला केवळ काही निरीक्षणं मांडण्यात रस आहे. या निरीक्षणातून कदाचित त्याच्याकडे पाहाण्याची दिशा मात्र मिळू शकते.
बर््याचदा आम्हाला चर्चांमधून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे हा चित्रपट कोणा सत्य घटनेवर आधारीत आहे का? याचं उत्तर टेक्निकली 'नाही' असं आहे पण तेही तितकसं योग्य नाही. कारण ही घटना सलग, जशी कथेत आहे, जशी चित्रपटात दाखवली जाते, तशी घडलेली नाही, मात्र त्यामुळे ती सत्य नाही असंही म्हणता येणार नाही. या कथेचे सरसकट सर्व पैलू, बरीचशी पात्र, त्यांचे दृष्टीकोन आणि सामाजिक पार्श्वभूमी आणि काही महत्वाच्या घटना या थेट आपल्या आजच्या वास्तवाचा भाग आहेत. त्यातला आशय हा जराही काल्पनिक वा अतिरंजित नाही. संकल्पना , निरीक्षण आणि निष्कर्ष या तिन्ही पातळ्यांवर, इन्व्हेस्टमेन्ट ही सत्यकथाच म्हणायला हवी. 
इन्व्हेस्टमेन्ट कथेतच तिची पटकथा दडलेली आहे. बाबा त्यांच्या विपुल लिखाणात अनेकदा साहित्यप्रकार काहीशा प्रायोगिक पध्दतीने मिसळून टाकतात. कधीकधी त्यात सोयीचा भाग असतो, म्हणजे विषय सुचला आणि अधिक तपशीलात काम करायला वेळ नसेल, तर तो एखाद््या सोप्या ( म्हणजे त्यांच्यासाठी सोप्या, हे जनरल स्टेटमेन्ट नाही) फाॅर्ममधे नोंदवून मग फुरसतीत त्याकडे पुन्हा वळायचं. उदाहरण द्यायचं, तर त्यांचं दादाची गर्लफ्रेन्ड नाटक, हे असं आधी कथारुपात केलेल्या टिपणावर आधारीत आहे. ( याची नोंद घेणं आवश्यक, की मूळ कथा सोय म्हणून लिहिलेली असली, तरी ती  कुठेही डफरावलेली नाही, हे ती पाहून कोणीही सांगू शकेल). किंवा कधीकधी ही साहित्यप्रकाराची मिसळ हा योजनेचा भाग असतो. लोककथा ७८ची हिशेबापलीकडे कलावंत असणारी आणि नाटकाचा सहा सात प्रसंगांचा फाॅरमॅट मोडीत काढून पटकथेसारखी दर चार पाच मिनिटाला प्रसंग आणि नेपथ्ययोजना बदलणारी तरीही प्रयोगात अत्यंत बंदिस्तपणे उभी राहू शकणारी संहिता , हे उदाहरण. इन्व्हेस्टमेन्टही अशी पटकथा म्हणून दिसलेली, पण मुळात कथारुपात लिहीलेली गोष्ट आहे. कथेचं निवेदन प्राची करते, त्यामुळे तिचा दृष्टीकोन वाचकाला फस्ट हॅन्ड कळतो, मात्र त्यामुळे आई आणि आशिष हे इतर दोन दृष्टीकोन लपत मात्र नाहीत. उलट तिच्या बोलण्याच्या शैलीतच  ते स्पष्ट होतात. हे तीन दृष्टीकोन इन्व्हेस्टमेन्टच्या केंद्रस्थानी आहेत. खरी गोष्ट ही या दृष्टीकोनांचीच आहे.
आशिष आणि प्राची हे स्वतःच्या प्रगतीची स्वप्नं पाहाणारं आधुनिक जोडपं, त्यांच्या तालमीत तयार झालेला त्यांचा मुलगा सोहेल आणि आशिषची जुन्या पारंपारिक विचारांना मानणारी आई या यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा. मी जेव्हा मूळ कथा  एेकली ,तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते हे की यातला सोहेल हा इन्सिडेन्टल आहे. त्याची योजना एखाद्या कॅटॅलिस्ट सारखी आहे. तो जे काही करतो, ते महत्वाचं नाही, तर त्याच्या वागण्यामुळे जे दृष्टीकोन समोर येतात तेच खरे महत्वाचे. ( हे माझं मत कथा एेकल्यावर होतं!  आजच्या वर्तमानपत्रांना वाचून ते बदललं नाही तरच नवल ! आज मी सोहेलच्या पात्राला केवळ कॅटॅलिस्ट मानत नाही, तर बाबांना तेव्हा भविष्याची चाहूल लागली होती, असं मानतो!) .
गोष्ट दिवाळी अंकात आली आणि त्या वर्षीच्या महत्वाच्या कथांमधे ती गणली गेली. बाबांना जसे अभिनंदनाचे फोन आले, तसेच कथेवर काही करु पाहाणार््या चित्रपट दिग्दर्शकांचेही आले. मात्र ती बाहेर द्यायची नाही हे आधीच ठरलेलं होतं. काही विषय हे फार संवेदनशील असतात. ते मांडणार््या कथा-पटकथांचा तोल हा अतिशय महत्वाचा असतो, जो ढळला तर सारच निरर्थक वाटू शकतं. आणि हा तोल ठरवतो तो दिग्दर्शक. एकदा कथा/पटकथा त्याच्या हवाली केली की लेखकाचं त्यावरचं नियंत्रण संपतं. त्यामुळे यावर चित्रपट करायचा तर आपणच करायचा हे ठरवलेलच होतं.  बाबांनी लवकरच पटकथा लिहून ठेवली, आणि आम्हाला वाचूनही दाखवली.
इन्व्हेस्टमेन्टची कथा आणि पटकथा यात एक छोटा पण महत्वाचा फरक आहे. कथेची निवेदक प्राची आहे, त्यामुळे वाचक तिच्या चष्म्यातून सारं बघतो. चित्रपटात मात्र प्रेक्षकांची प्रतिनिधी प्राची नाही. आशिष आहे. यातल्या तीन प्रमुख वैचारिक भूमिकांत खूपच फरक आहे. प्राचीचा व्यक्तीगत प्रगतीवर विश्वास आहे. म्हणजे तिची अन तिच्या जवळच्या माणसांची प्रगती. या प्रगतीच्या आड कोणी येणं तिला मान्य होणार नाही. कोणत्याही नाॅर्मल कुटुंबातल्या जबाबदार पत्नीसारखं तिचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि ते सुरक्षित ठेवणं तिला सगळ्यात महत्वाचं वाटतं.अॅट एनी काॅस्ट. तिच्या उलट बाजूला आहे ती आशिषची आई. ती जुन्या रूढी आणि संस्कारांना धरुन आहे. आपल्या नितीमत्तेच्या कल्पना ती सोयीस्करपणे बदलू शकत नाही. आशिष या दोघींच्या मधला आहे. तो दोघींनाही समजू शकतो. तो प्रगतीचं मूल्यही आेळखतो आणि संस्कारांची किंमतही जाणतो. पण त्यामुळेच त्याच्यापुढले निर्णय अधिक कठीण आहेत. या दुहेरी जबाबदारीत त्याची थोडी फरफटही होते कधीकधी. पटकथेत त्याला असलेलं महत्व चित्रपटाचा तोल ठेवण्यासाठी योजलेलं आहे.
या चित्रपटाबद्दल एक गंमत अशी की त्यात दोन वेगळ्या शैली एकत्र येतात. एका बाजूने तो खूप वास्तववादी तपशीलांना एकत्र करतो. अगदी आपल्या सर्वांच्या वागण्या बोलण्यातले तपशील, संवादातले तपशील . दृश्यभागातही हेच . घरापासून स्मशानापर्यंत प्रत्येक प्रसंग लोकेशनवर चित्रीत केला आहे , आणि खरेपणा टिकवण्यासाठी मेक अप पासून प्रकाशयोजनेपर्यंत दर ठिकाणी विचार केलेला आहे. त्यामुळे हे रिअॅलिझमचं स्कूल इथे काही अंशी जरुर आहे. याउलट आशयात मात्र पटकथा तशी थेट वास्तववादी नाही. ती सीलेक्टीव आहे. ती मघा सांगितलेल्या दृष्टीकोनांना प्रामाणिक राहून त्यांच्यातल्या संघर्षाला समोर आणते. यासाठी एक साधी योजना आहे. अनावश्यक गोष्टी, प्रसंग दाखवायचेच नाहीत, जे या दृष्टीकोनाना डायल्यूट करतील. वास्तववाद म्हणून नाही वा इतर कोणत्या कारणासाठीही नाही. पटकथेला जे म्हणायचय ते अतिशय स्पष्ट आहे. हा स्पष्टपणा काॅम्प्रोमाईज करेल किंवा प्रेक्षकाला उगाच संभ्रमात पाडेल असं काही (वास्तववादाच्या किंवा व्यक्तिरेखांना ढोबळ खोली देण्याच्या नावाखाली) वापरायचं नाही. यामुळे हा  चित्रपट वास्तववाद आणि 'सिनेमा विथ अॅन अजेन्डा', यांच्या मध्यावर आहे. हे निरीक्षण आउट आॅफ द हॅट केलेलं नाही. पटकथा हा त्याचा पुरावा आहे. ते पडताळून घेणं सहज शक्य आहे.
मला आणि सुप्रियाला कधीकधी कोणी विचारतं की बाबांबरोबर काम करण्याचा काय अनुभव, तर यात काही नवीन सांगण्यासारखं नाही कारण आम्ही कायमच त्यांच्याबरोबर काम करत आलो आहोत. वेगवेगळ्या टोप्या बदलत. सुप्रिया प्रामुख्याने अभिनेत्री आणि नंतर वेशभूषाकार म्हणून, मी मुलांच्या नाटकात अभिनेता म्हणून, नंतर काॅलेजपासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून , ( साटं लोटं नाटकाच्या १९९५ मधल्या अमेरिका दौर््याला म्युझिक आॅपरेटर म्हणूनही) गहिरे पाणी मालिकेच्या काही भागांना त्याच्या संहितांचा दिग्दर्शक म्हणून आणि इन्व्हेस्टमेन्टला सहदिग्दर्शक म्हणून. खरं तर आमचा बराचसा घरातला वेळही एकत्र काम करण्याचा असतो असं म्हणता येईल, कारण काही ना काही कामं ही चालूच असतात. आई बाबांचे नवे प्राॅजेक्ट्स असतात ,नवं लिखाण वाचून दाखवलं जातं त्यावर चर्चा होतात, त्यांच्याहून खूपच कमी प्रमाणात माझं़ आणि सुप्रियाचं लिखाणही चर्चेला पडतं. या चर्चांमधे आई, आणि पल्लवी (माझी पत्नी)चाही सहभाग असतो. या घरातल्या इन्टरॅक्शनचच एक्स्टेन्शन म्हणूनच चित्रपटाकडेही पाहाता येईल.
इन्व्हस्टमेन्टची संहिता खूप आधी तयार होती. त्यामुळे कामाला लागण्याआधीच बहुतेक सगळं ठरलेलं होतं.  कास्टमधल्या अनेकांबरोबर आम्ही आधी काम केलेलं होतं. अमोलबरोबर काम करण्याचा अनुभव नवा होता पण तो इतक्या चटकन ग्रुपमधे सामील झाला की तो आधीपासूनच आमच्याबरोबर काम करत असावा असं वाटावं. स्क्रिप्टवर आधी काम झालेलं होतं, पण आम्हाला ते पेपरवर शंभर टक्के ठरवायला आवडत नाही. तशानं त्याची उस्फूर्तता कमी होऊ शकते आणि सिनेमॅटोग्राफर च्या सहभागालाही मर्यादा पडते. त्यामुळे आधी ठरवलेले आराखडे बेस म्हणून वापरणं, रिहर्सल्स, करुन पाहाताना काही नव्या गोष्टींची भर पडू शकते का पाहाणं, अमोलशी डिस्कशन या सगळ्याचा चित्रीकरणात भाग होता. कलावंतांपैकी सारे, म्हणजे तुषार दळवी ,सुप्रियापासून लहान पण लक्षात राहाणार््या भूमिकेतल्या भाग्यश्री पाणेपर्यंत सारेच कलावंत स्टेजचे होते, त्यांना प्रयत्नाचं गांभीर्य होतं आणि तयारीही.
इन्व्हेस्टमेन्ट बनवताना आम्हाला जराही त्रास झाला नाही. यानिमित्ताने आमच्या टीममधे मोलाची भरच पडली. सहनिर्माते म्हणून उभे राहाणारे मंदार वैद्य आणि अनिश जोशी, आमच्याबरोबर आधी काम न केलेला पण बारीक सारीक गोष्टींचा सतत विचार करणारा संकलक सागर वंजारी, साउंड डिझाईन साठी पुष्कळ कष्ट घेणारे दिनेश उचील आणि शंतनू अकेरकर यांच्याशी आमची छान मैत्री झाली. संगीताची बाजू सांभाळणारा माधव विजय ( आजगावकर ) तर आमच्या नात्यातला आणि गहीरे पाणी पासून आमच्याबरोबर काम करत असलेला आहे. आमच्या चित्रपटात गाणी नसल्याने त्याच्या स्कोपला मर्यादा होत्या पण तसं असतानाही प्रेक्षक 'म्युझिक कोणाचं आहे?' असं विचारतात ते त्याच्या कामामुळेच. या सगळ्यात ओढले गेले, ते पल्लवी आणि  आमचा मित्र नितीन कुंभारे. त्यांचं निर्मितीदरम्यान सुरू झालेलं काम अजूनही चालू आहे.
इन्व्हेस्टमेन्टला पहिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तो त्याची प्रिव्ह्यू आवृत्ती मुंबई चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीकडे पाठवली तेव्हा आणि त्यानंतर अनेक ठिकाणी तो फिरुन आला. असं एक कन्व्हेन्शन आहे, की चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षकांना आवडणारा चित्रपट काही वेगळा असतो. हे का, कोणाला माहीत ! मी स्वतः अनेक महोत्सवांना हजेरी लावली आहे आणि या मंडळींची आवड काही खास वेगळी असेल तर मला तरी ती दिसली नाही. मला या महोत्सवांमधे सर्व प्रकारचे लोक भेटलेले आहेत. आधीही आणि इन्व्हेस्टमेन्टच्या निमित्तानेही. ही सारी आपल्या नेहमीच्या पाहाण्यात असतात तशीच माणसं होती. आमच्या चित्रपटाबद्दल बोलताना या सार््यांची रिअॅक्शन कम्पेअरेबल होती, असं म्हणता येईल. न्यू याॅर्क इंडिअन फिल्म फेस्टीवलच्या डिरेक्टरपासून , चेन्नई महोत्सवातल्या थिएटरच्या डोअरकीपरपर्यंत बहुतेकांची.
इन्व्हेस्टमेन्ट हा काही मसाला चित्रपट नाही हे उघड आहे. हे लपवण्याचा आम्ही कुठेही प्रयत्न केलेला नाही. मात्र मसाला चित्रपट ही करमणुकीची व्याख्या आहे असं किती दिवस म्हणत राहाणार? शेवटी करमणुक म्हणजे काय, तर कलावस्तूने, मग ते नाटक असो वा चित्रपट, प्रेक्षकांना धरुन ठेवणं, त्यांना गुंतवणं, विचार करायला लावणं. हे इन्व्हेस्टमेन्ट करु शकतो हे त्याने छोट्या पातळीवर सिध्द केलेलं आहे. आम्ही २० सप्टेम्बरला चित्रपट प्रदर्शित करतो आहोत खरे, मात्र वितरणाचा आम्हाला तसा प्रत्यक्ष अनुभव नाही. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळूनही या प्रांतात आम्हाला मदत करण्यासाठी कोणी पुढे झालेलं नाही. आम्ही जे काही करतो आहोत ते पिकल एन्टरटेनमेन्टच्या सहाय्याने पण आमच्या जिवावर. चित्रपट प्रदर्शित करण्यामागे हेतू तो महोत्सवांपुरता मर्यादित न राहाता सर्वांपर्यंत पोचावा , त्याला त्याचा प्रेक्षक मिळावा हा आहे. तसा तो मिळतो का हे मात्र आमच्या प्रयत्नांइतकच प्रेक्षकांच्या प्रतिसादावरही अवलंबून आहे.
-गणेश मतकरी

Read more...

द वर्ल्डस एन्ड- काॅर्नेटो चित्रत्रयीची जमलेली अखेर

>> Monday, September 9, 2013







स्वतंत्र, स्टँड अलोन असली, तरी 'द वर्ल्डस एन्ड' ही ' थ्री फ्लेवर्स काॅर्नेटो चित्रत्रयी' पाहाण्याची सुरूवात म्हणून योग्य फिल्म ठरणार नाही.



हे वाक्य ज्यांना गोंधळात पाडेल, आणि ते पुष्कळांना, अगदी जागतिक चित्रपटांत मुरलेल्या रसिकांनाही गोंधळात पाडू शकतं. या मंडळींसाठी थोडं स्पष्टीकरण. किसलोव्स्कीची 'थ्री कलर्स चित्रत्रयी' अनेकांनी पाहिलीय, निदान त्याबद्दल एेकलय. पण थ्री फ्लेवर्स? तेही काॅर्नेटो आईस्क्रीमचे? पण आहे! या नावाची चित्रत्रयी आहे. एडगर राईट दिग्दर्शित आणि सायमन पेग/ निक फ्राॅस्ट यांना प्रमुख भूमिकेत योजणारे हे तीन चित्रपट म्हणजे तीन पारंपारिक चित्रप्रकारांची विडंबन आहेत. चित्रत्रयीचा पहिला भाग ' शाॅन आॅफ द डेड' हा माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांमधला एक, झाॅम्बीपटांचं विडंबन करता करता आपल्याला आजच्या वास्तवाबद्दल विचारात पाडणारा होता. दुसर््या ' हाॅट फज' ने पारंपारिक बडी-काॅप चित्रप्रकाराची यथेच्छ टिंगल केली, तर तिसरा 'द वर्ल्डस एन्ड' वैज्ञानिक पार्श्वभूमी असणार््या भयपटांना (उदाहरणार्थ ' इन्व्हेजन आॅफ दि बाॅडी स्नॅचर्स' ) तिरक्या नजरेने पाहातो. या चित्रत्रयीतला आईस्क्रीमचा संदर्भ तसा अपघाती आहे. यात पहिल्या दोन भागांमधे अनुक्रमे स्ट्राॅबेरी अाणि ब्लू ओरिजिनल काॅर्नेटो फ्लेवर्स वापरण्यात आले होते, ज्यांचा दूरान्वयाने आशयाशी संबंध लावणं शक्य होतं. ज्या त्या गोष्टीकडे विनोदाने पाहाणार््या चित्रकर्त्यांना ही गोष्ट कोणीतरी लक्षात आणून दिली. लगेचच चित्रत्रयीचं बारसं झालं आणि थ्री कलर्सची आठवण करुन देणारी थ्री फ्लेवर्स तयार झाली. तिसर््या भागातला फ्लेवर आहे 'ग्रीन मिन्ट चाॅकलेट चिप' . म्हणा, तसा हा संबंध नावापुरताच आहे. असो! आता मूळ मुद्द्यावर येऊ.

या चित्रत्रयीच्या भागात क्रमवार एक गोष्ट पुढे नेली जात नाही, तर ' ट्रीटमेन्ट ' हे यांमधलं खरं साम्य आहे. मात्र शक्यता अशीही आहे की 'शाॅन' करताना , असे तीन चित्रपट करण्याचं ठरलेलं नसावं. पहिल्याचं यश ,हे उरलेल्या चित्रपटांना कारणीभूत ठरलं असावं. त्यामुळे पहिला भाग घडतो अधिक उस्फूर्तपणे, पण अधिक साधेपणाने. त्यात हे विडंबन काय प्रकारचं असावं याचे काही नियम हलकेच ठरताना दिसतात. ज्या चित्रप्रकाराचं विडंबन करायचं त्याबद्दल प्रेम आणि आदर यांचं दर्शन कितपत असावं, साधा विनोद आणि टिंगल याचं प्रमाण काय आणि चित्रप्रकारातला बदल गृहीत धरून प्रेक्षकांकडून ' विलिंग सस्पेन्शन आॅफ डिसबिलीफ' ची अपेक्षा किती असावी, यांचा या नियमांशी संबंध आहे. उदाहरण घ्यायचं, तर सामान्यतः झाॅम्बीपटात नायकाने संकटावर मात करण्यासाठी काढलेला तोडगा आणि 'शाॅन आॅफ द डेड' मधे शाॅनने काढलेला तोडगा, यांची तुलना होऊ शकत नाही. प्रेक्षकाने शाॅनचा तोडगा हा खरोखरच्या संकटावरला तोडगा म्हणून न पाहाता विडंबनाच्या चौकटीत पाहिला तरच तो त्यातली गंमत समजून घेणार. नाहीतर, 'हा कसला बावळटपणा', असंच त्याला वाटू शकतं. तर हे चित्रपटाचे म्हणा, पटकथेचे म्हणा, नियम, चित्रत्रयी पहिल्या भागात ठळकपणे एस्टॅब्लिश करते. नंतरच्या चित्रपटांच्या प्रेक्षकांना पेग/ राईट रसायन आणि या चित्रपटांची शैली माहित असेलशी अपेक्षा आहे. त्यामुळे नवख्या प्रेक्षकाला योग्य इन पाॅईन्ट आहे तो पहिल्या चित्रपटातच. याचा अर्थ मी कोणाला थेट 'वर्ल्डस एन्ड' पाहूच नका असं सांगत नाही, पण पाहिलात तर मन अधिक मोकळं ठेवायला मात्र विसरु नका, हे जरुर सांगेन.

नेहमीप्रमाणेच इथे प्रमुख भूमिकेत सायमन पेग आहे. हा आहे गॅरी किंग, हाय स्कूलच्या काळातला डॅशिंग हिरोसारखा मुलगा, पण आता काळाने त्याची बर््यापैकी वाट लावलेली. व्यसनापायी वाया गेलेला, धड काही काम धंदा न करणारा, एकटा. त्याचं जुन्या दिवसातलं एक स्वप्न अर्धवट राहिलेलं. त्यांच्या गावच्या बाराच्या बारा पब्जमधे एका दिवसात हजेरी लावण्याची त्याची अन त्याच्या खास मित्रांची मोहीम तेव्हा अर्धवट राहिली होती. आता इतर सर्व बाजूंवर हार मानायला लागलेला गॅरी , आपलं ते स्वप्नं आता तरी पूर्ण करण्याचा निश्चय करतो. मग तो आपली जुनी टीम ,अँडी ( पेगचा जुना पार्टनर इन क्राईम, निक फ्राॅस्ट), स्टीवन ( पॅडी काॅन्सीडाईन), आॅलिवर ( आर्थर डेन्ट, बिलबो बॅगिन्स आणि डाॅक्टर वाॅटसन या भूमिकांमुळे अचानक स्टार झालेला मार्टीन फ्रीमन) आणि पीटर ( एडी मार्सन) यांना जमवतो आणि पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरतो. हे सारे गॅरीपेक्षा यशस्वी, पण आपल्या मित्राची हाक आणि थोड्या थापा एेकून ते गॅरीच्या मोहीमेत सामील होतात. पहिल्या काही पब्जनंतर गॅरी आणि कंपनीच्या लक्षात येतं की गाव बदललाय.. आणि बदललाय तोही नेहमीसारखा नाही, तर अधिक भीतीदायक पध्दतीने. आजूबाजूला दिसणारी माणसं या कोणा वेगळ्या शक्तीने चालवलेल्या कळसूत्री बाहुल्या आहेत आणि आपल्याला सत्य समजल्याचं कोणाला कळू न देणं हा एकच जीवानिशी सुटण्याचा उपाय आहे.

वरवर पाहाता वर्ल्डस एन्ड आणि शाॅन आॅफ द डेड मधे बरीच साम्य आहेत.झाॅम्बी काय किंवा कळसूत्री माणसं काय, त्यांच्या संकल्पना बर््याच एकसारख्या आहेत, वर नायकाने काही रॅडीकल उपाय न शोधता परिचित जागांमधे सुरक्षितता शोधणं हेदेखील दोन्ही चित्रपटात आहे. दोन्हीकडला एपिलाॅगही त्याच जातीचा आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांमागला मुद्दा वेगळा आहे. शाॅनची टिका होती ती बधीर ,एकसारख्या विचारांच्या, परस्परांचं अनुकरण करणार््या समाजावरची, तर वर्ल्डस एन्ड विविध गोष्टींना लक्ष्य करतो. काळानुरूप आपल्यात होणारा बदल आणि भूतकाळाशी तुटत चाललेलं नातं, हे यातलं एक सूत्र. गॅरी आणि कंपनीचा तरुणपणचा फसलेला फेरा हा गावात व्हायला लागलेल्या बदलाशी जवळजवळ समांतर आहे. इथे प्रत्यक्ष गाव बदलत असलं तरी चित्रपट सुचवतो तो आपल्यात होणारा बदल, जो आपलं होऊन गेलेल्या गोष्टींबरोबरचं नातं पूर्णपणे तोडतो. केवळ जुन्या पब्जवरली चक्कर ही तुम्हाला तुमचं तारुण्य मिळवून देत नाही, गेलेली गोष्ट परत येत नाही. इथले परग्रहवासी, हे आजकालच्या काॅर्पोरेट्सची भाषा बोलतात. ते या आक्रमणाला हल्ला समजत नाहीत, मर्जर समजतात. त्यांच्या दृष्टीने ते आपल्या भल्याचाच विचार करतायत आणि आपण तो़ समजू शकत नाही, हा आपलाच करंटेपणा. आजच्या नोकरदार माणसांना ,ही भाषा चांगलीच ओळखीची आहे.

या चित्रपटाचा तथाकथित क्लायमॅक्स हा इतर दोन चित्रपटांपेक्षा थोडा अधिक गोंधळाचा आहे. त्या प्रसंगातला युक्तीवाद, नायकांचं पलायन वगैरे थोडं समजून घ््यावं लागतं ( मात्र तुम्ही आधीचे दोन चित्रपट पाहिले असल्यास , याकडे फार लक्ष देणार नाही) एपिलाॅगमधला मुद्दा 'शाॅन'च्या जवळ जाणारा असला तरी अधिक विचार करायला लावणारा आणि गमतीदारही आहे. त्याची योजना, ही शेवटाचा कमकुवतपणा लपवू शकते.

इथे विडंबनाच्या हुकूमी जागा आणि एकूण गंमती व्यवस्थित जागच्या जागी असणार हे पेग/ राईट च्या चाहत्यांना सांगायला नको. तशा त्या आहेतच. बोलण्यात येणार््या कॅची जागा 'बॅन्डसाठी चांगलं नाव आहे' म्हणून सर्वांनी शोधत राहाणं, चित्रत्रयीतल्या सर्व चित्रपटाप्रमाणे इथेही दिसणार््या कुंपणांच्या गंमती, सांकेतिक माॅब कोरिओग्राफीचा वापर, कितीही बिकट प्रसंगात गॅरीचा बिअर पिण्याचा प्रयत्न, कळसूत्री माणसांचे वेगवेगळे प्रकार, त्यांचं संकल्पनेला जरा अधिकच अनुसरुन खरंच बाहुल्यांप्रमाणे असणं, असं बरच काही इथे पाहाण्यासारखं आहे. ही सारी मंडळी हुशार आहेत, त्यामुळे जागा तुम्ही शोधाल तितक्या सापडतील.

थ्री फ्लेवर्स चित्रत्रयीच्या विनोदाचा प्रकार पाहाता, त्यांनी दर्जा सांभाळून ती पूर्ण करणं हे कठीण काम होतं, आशा आहे की पेग/ राईट यापुढेही एकत्र काम करत राहातील. राईटला प्रश्न येणार नाही , पण बिचार््या सायमन पेगला इतर चित्रपटांमधे ( एम आय पासून स्टार ट्रेक पर्यंत) जी काय फुटकळ कामं करावी लागतायत ,ती पाहाता त्याने राईटला चिकटून राहाणं त्याच्या नक्कीच फायद्याचं ठरेल.

-गणेश मतकरी



Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP