वेटींग- न घडण्यातलं नाट्य

>> Saturday, May 28, 2016


चित्रपटातला कथाभाग, त्यात सतत काहितरी घडवत ठेवणं हे किती ओव्हररेटेड आहे याची जाणीव आपल्याला वेटिंग पहाताना होते. आपण सुरुवात-मध्य-शेवटाच्या अॅरिस्टोटेलियन स्ट्रक्चरबद्दल एेकलेलं असतं, त्याच्या भारतीय व्हेरीएशनबद्दलही, शिवाय प्लाॅट पाॅइन्ट्सबद्दल, सिड फील्डच्या सांगण्यानुसार मिन्टाला एक पान या हिशेबाच्या पटकथेच्या गणितात  मोठे बदल कुठे आले पाहिजेत याबद्द्ल, आणि उत्तम संहितेच्या इतर गुणधर्मांबद्दलही. 'वेटींग' ते सारे फोल ठरवतो.
पुढे काय घडणार याचं कुतुहल  प्रेक्षकाला कथेत अडकवून ठेवतं, हा एक परिचित सिद्धांत, पण ज्याची कल्पना इतकी साधी आणि ट्रेलर पाहूनही स्पष्ट होणारी आहे, त्यात घडणार तरी काय आणि त्याबद्दल वेगळं कुतूहल तरी कसलं ? दोन पात्र, एक तरुण आणि एक वृद्ध, आपापल्या प्रिय व्यक्तीच्या अनिश्चित भविष्याची वाट पहात एकमेकांमधे आधार शोधतात. आता या कल्पनेवर आधारित चित्रपटाचा शेवट काय असणार, वा काय प्रकारचा असणार याचा अंदाज आपण आधीच बांधू शकतो ( चित्रपट तो काही प्रमाणात, निदान टोनमधे चुकवतो ही गोष्ट वेगळी) , पण त्यामुळे  चित्रपटाची जबाबदारी अधिक वाढते.
केवळ वाट पहाणं या कल्पनेशी संपूर्ण प्रामाणिक असलेला वेटींग उघड घटनांमधून येणाऱ्या नाट्यपूर्णतेच्या शक्यता डेलिबरेटली टाळतो. इथे घडायचं , ते चित्रपट सुरु होण्याआधी घडून गेलय. ते कसं घडलं हे निवेदनात येतं, दाखवलं जात नाही. रिटायर्ड प्रोफेसर शिव नटराज ( नासीरुद्दीन शाह) ची पत्नी सिव्हीअर हार्ट अटॅकनंतर आठ महिन्यांपासूनच कोमा मधे आहे, कोची मधल्या एका इस्पितळात. त्याच्यासाठी हाॅस्पिटल हे दुसरं घरच झालेलं. वरवर अतिशय शांत, रॅशनल अशी ही व्यक्ती. त्याचं रुटीन ठरुन गेलय. कर्मचाऱ्यांना तो नावाने ओळखतो. तेही त्याला आदराने वागवतात. तिची केस पहाणाऱ्या डाॅक्टर निरुपमना ( रजत कपूर)  मात्र तो टाळतो. कारण त्याची व्हेन्टीलेटरवर असलेली पत्नी ( सुहासिनी मणीरत्नम) रिकव्हर होण्याची त्याला स्वत:ला  कितीही आशा असली तरी तसं होणार नाही हे शिव मनातून जाणतो. डाॅक्टरांना तशी खात्रीच आहे, त्यामुळे ते त्याचे शत्रू.
तारा देशपांडेला ( कलकी ) तिच्या नवऱ्याचा , रजतचा ( अर्जुन माथूर) अपघात झाल्याचं कळताच ती ताबडतोब मुंबईहून निघून कोचीला पोचते पण त्याची अवस्थाही बिकट असते. ताराला जवळचं कोणी नसतं, आणि वाट पहाण्यावाचून करण्यासारखं काही नसतं. तिच्या आणि शिवच्या वयात फरक असला, तरी त्यांचं समदु:खी असणं त्यांना एका पातळीवर आणतं. त्यांची मैत्री होते आणि एकदुसऱ्याला आधार देत त्यांची नवी वाटचाल सुरु होते.
वेटींग हा पटकथा ( अनु मेनन/ जेम्स रुझिका) आणि दिग्दर्शन ( अनु मेनन)  या दोन्ही पातळ्यांवर करायला कठीण सिनेमा आहे. दोन प्रमुख पात्रांची मैत्री प्लेटोनिक असल्याने रोमान्सचा सोपा मार्ग निवडणं शक्य नाही. विषयाचं गांभीर्य खाली न आणता, कुठेही डिप्रेसिंग होणार नाही पण खोटी सकारात्मकताही येणार नाही हे पहाण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे. शिव नटराजचंही कोचीत राहूनही शहराला परकं असणं , आणि ताराने घरच्यांशी संबंध तोडलेला असणं आपल्याला काही मोजक्या जागांमधून सुचवलं जातं आणि ते या दोन व्यक्तिरेखांना एका पातळीवर आणण्यात उपयोगी ठरतं. शिवच्या बोलण्यात सुरुवातीला आलेला ' फाईव स्टेजेस आॅफ ग्रीफ' चा उल्लेखही आवश्यक. कारण तो प्रेक्षकाला या पात्रांपर्यंत, त्यांच्या मनस्थितीपर्यंत पोचण्यासाठी मदत करतो.
वेटींगने निवडलेला टोन हा प्लेझन्ट आणि गंभीर यांच्या मधला आहे, आणि कधी तो किंचित एका बाजूला झुकतो, तर कधी दुसऱ्या. मध्यंतरापर्यंतचा भाग हा अधिक उजळ आहे, तर नंतरचा भाग अधिक गडद. पण तो उथळ, किंवा सोपी उत्तरं शोधणारा मात्र कुठेही नाही. संवादात विनोदाचा लक्षणीय वापर आहे, पण तो काळजीपूर्वक केलेला. कधी कधी तो पात्रांच्या असहाय्यतेतून आलेलाही आहे. ( उदा - पहिले ४८ तास क्रूशल असण्याबद्दलच्या वाक्यावरली टिका ) या वाक्यांना प्रेक्षक हसतो पण त्या हसण्याला गांभीर्याची किनार असते . तो पात्रांवर हसत नाही, परिस्थितीतून आलेल्या विसंगतीला हसतो. तो सतत विनोदाच्या वळणानेही जात नाही. वेळ आली की गंभीरही होतो.
चित्रपटाचा मोठा भर शिव आणि तारावर आहे हे खरं असलं तरी इतर लहान भूमिकातल्या पात्रांना तो लक्षवेधी पद्धतीने पण तरीही भूमिकांची लांबी नं वाढवता वापरतो. दोन व्यक्तीरेखांचे जोडीदार तर त्यात येतातच, वर रजतच्या आॅफिसमधला ताराला वेळोवेळी मदत करणारा सहकारी ( राजीव रविंद्रनाथन) , शिवला घरी जेवणाचा डबा पोचवणारी मुलगी , हाॅस्पिटलमधले काहीजण, हे सारे लक्षात रहातात.
डाॅक्टर निरुपमची व्यक्तिरेखा अधिक गुंतागुंतीची आहे, कारण तिला दुहेरी महत्व आहे. एका बाजूने ती या दोन व्यक्तिरेखांबरोबर कथा पुढे नेते ( दोघांना विरुद्ध प्रकारचे सल्ले देऊन) आणि दुसरं म्हणजे ती अशा प्रसंगांमधली डाॅक्टरची आदर्श भूमिका कशी असावी यावर कमेन्ट करते. निरुपमशी ही सारी लोकं वाद घालतात, टिका करतात, त्याला शिव्या देतात, पण तो काय करतो आणि त्याने काय करणं अपेक्षित आहे, हे चित्रपट वास्तवाचं भान ठेवत , काळजीपूर्वक आपल्यासमोर मांडतो. यातली सारी पात्र एका पटण्यासारख्या तर्कशास्त्राच्या आधाराने वागतात. त्यामुळे चित्रपट अधिक जवळचा वाटतो, जिवंत होतो. प्रेक्षक यातल्या व्यक्तिरेखांच्या सुखदु:खाशी, खरंतर दु:ख आणि आशा यांमधल्या भावनांशी समरस होतो. नासीर आणि कलकी यांच्या कामावर चित्रपटाचा मोठा भर आहे, त्यामुळे त्यांची कामं उत्तम हे वेगळं सांगायला नकोच. कलकीचा आपले टिपिकल नायिकांच्या शोधातले चित्रपट अजिबात योग्य वापर करुन घेत नाहीत, याबद्दल हे काम पहाताना वाईट वाटतं हे आणखी एक.
वेटींगचा शेवट हा खास उल्लेखनीय आहे. मी आधी म्हणाल्याप्रमाणेच आपण त्याचा अंदाज बांधू शकतो असं आपल्याला सुरुवातीपासून वाटतं. बहुधा एक पेशन्ट जगेल, दुसरा नाही हा आॅब्विअस अंदाज, पण चित्रपट त्यापलीकडे जातो. त्याविषयी तपशीलात सांगणं हे चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य होणार नाही, पण एवढं म्हणता येईल की तो कथानकाच्या एकूण स्पिरिटशी प्रामाणिक रहातो आणि अचूक, योग्य क्षणावर चित्रपट संपवतो. पहाणाऱ्यांनी त्याचा अधिक विचार करुन पाहिला, तर तो किती नाजूक गोष्टींवर तोलला आहे हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल. आशा आहे, की मध्यंतरी आलेल्या एका चित्रपटाप्रमाणे, याचा शेवट पटकन उघड केला जाणार नाही. वेटींग पहाताना टाॅक टू हर पासून आमोर पर्यंत विविध चित्रपटांची आठवण होत रहाते हे खरं. पण तो असा एखादी टेम्प्लेट घेऊन येत नाही. तो पूर्णत: स्वतंत्र आहे की नाही हा मुद्दा नाही, आपल्यापर्यंत तो पोचतो की नाही , इतकच लक्षात घ्यायचं.
चित्रपट पहाण्याच्या थोडा वेळ आधी मी थिएटरबाहेर एका मुलाला पाहिलं. त्याच्या टीशर्टवर दोन शब्द लिहिले होते. वर ' होप' असं लिहून त्यावर काट मारली होती आणि त्याखाली ' बिलीव्ह ' असं लिहीलं होतं. वेटींग पाहून परतताना मला त्या टी शर्टची आठवण वारंवार होत राहिली. आशावाद, हा या चित्रपटाच्या मुळाशी आहेच पण एक पाऊल पुढे जाऊन तो आपल्याला श्रद्धा ठेवायला सांगतो. मात्र ती ठेवताना आपण वास्तव विसरुन किंवा धीर सोडून चालत नाही, याचीही तो नोंद घेतो. मृत्यू जवळ असला तरी आपण जगणं विसरुन चालत नाही, हा त्याचा खरा संदेश आहे.
-- गणेश मतकरी

Read more...

स्वप्न आणि सत्याचं पॅकेज डील

>> Sunday, May 1, 2016

 
 गेल्या लेखातच मराठी चित्रपटांना असणाऱ्या दोन प्रकारच्या प्रेक्षकांबद्दल मी बोललो होतो. एक असा प्रेक्षक, जो केवळ मनोरंजनापलीकडे काही पहाण्याची तयारी ठेवत नाही. चित्रपट यशस्वी व्हायला ज्याचा सहभाग अपेक्षित आहे, आवश्यक आहे , पण पैसे वसूल होण्याची खात्री असल्याशिवाय हा मुळात चित्रपटाला हजेरीच लावत नाही. दुसरा, अधिक व्यासंगी  प्रेक्षक, जो  वेगळ्या प्रकारचे सिनेम पहायला तयार असतो, पण अशा चित्रपटांची वितरणाची पोच अनेकदा मर्यादित असते आणि हा प्रेक्षक दर वेळी त्या चित्रपटांपर्यंत पोचू शकतोच असं नाही. या दोन्ही प्रकारचे प्रेक्षक मराठीत मुबलक आहेत, पण सामान्यत: चित्रपट यातल्या कोणत्यातरी एका प्रकारच्या प्रेक्षकाला डोळ्यांसमोर ठेवून बनवला जातो. या प्रेक्षकांच्या आवडी एकमेकांपेक्षा संपूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आणि एका चित्रपटाचा प्रेक्षक दुसऱ्याला हजेरी लावण्याची शक्यताही कमीच. नागराज मंजुळेचा सैराट अनपेक्षित ठरतो, तो या पार्श्वभूमीमुळे.

या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट 'फॅंड्री' चित्रपटगृहात लागण्याआधी चोखंदळ प्रेक्षकांनी महोत्सवांमधून बघून त्याची दखल घेतली होती. समाजाच्या खालच्या स्तरातल्या एका मुलाचं तपशीलात आणि अस्सल व्यक्तिचित्र असलेला हा चित्रपट प्रदर्शित होताना, त्याच्या प्रसिद्धीसाठी जी ट्रेलर दाखवण्यात आली, ती मात्र तो एखादी प्रेमकथा असल्याचा इफेक्ट आणणारी. या ट्रेलरमुळे चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला ( आणि व्यावसायिक दृष्ट्या हे योग्य पाऊल असल्याचं सिद्ध झालं), तरी अनेक प्रेक्षकांनी त्यांची दिशाभूल झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याचीच उलट बाजू ही, की वेगळ्या अपेक्षेने जाउनही अनेक प्रेक्षकाना त्यांच्या परिचिताबाहेरचं काही पहायला मिळालं आणि चित्रपट आवडूनही गेला. तरीही हे मान्य करायलाच हवं, की फॅंड्री उत्तम असतानाही, तो जे आहे ते सोडून वेगळा असल्याचा आभास, त्याची प्रसिद्धी निर्माण करुन गेली. सैराट बद्दल लिहीताना हे आठवायचं कारण हे, की सैराटची ट्रेलर देखील एखाद्या प्रेमकथेसारखी आहे. ती फॅंड्रीप्रमाणे संपूर्ण दिशाभूल करणारी मात्र अजिबातच नाही, कारण सैराट ही खरोखरच प्रेमकथा आहे. आपल्याला प्रसिद्धीसाठी वापरण्यात आलेल्या गाण्यांमधून आणि आता आठवडाभर आधी रिलीज झालेल्या ट्रेलरमधून जो भाग दाखवण्यात आला, तो   त्याच स्पिरीटमधे चित्रपटात वापरलेला आहे. असं असतानाही एक गंमत आहे. या पहायला मिळालेल्या भागातून दिसणारं सैराटचं चित्र अपुरं आहे.

आपल्या व्यावसायिक सिनेमांची प्रेम या विषयाकडे पहाण्याची पद्धत ही नायक नायिकेचं एकत्र येणं यालाच महत्व देणारी असते, आणि ते घडणं, हाच चित्रपटाचा सुखांत मानला जातो. त्यांच्या मते हे प्रेम जमताना ज्या लटपटी खटपटी होतात त्यातूनच प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, होऊ शकतं. मिलन हा त्याचा उत्कर्षबिंदू. यानंतर काय होतं हे बिनमहत्वाचं. समांतर वळणाच्या काही चित्रपटांनी नायकनायिकेचं नातं सुखांतापलीकडे नेण्याचा प्रयत्न करुन पाहिला आहे, पण सर्वसाधारण रसिकाचा इन्टरेस्ट सतत काही नाट्यपूर्ण घडत असल्याशिवाय टिकत नाही, आणि तो टिकवण्यासाठी सतत काही घडवत रहाणं , हे नात्याच्या प्रामाणिक चित्रणावर कृत्रिमता लादल्यासारखं होतं जे समांतर वळणाच्या चित्रपटांना नको वाटतं. सैराट चित्रपट आपली प्रेमकथा मांडताना तद्द्न व्यावसायिक आणि अस्सल समांतर हे दोन्ही दृष्टीकोन वापरुन पहातो. त्याचा परिणाम म्हणून हा चित्रपट जवळजवळ दोन स्वतंत्र भागात विभागला जातो. एक भाग हा अधिक पारंपरिक पद्धतीने प्रेम जमण्याच्या, नायक नायिका जवळ येण्याच्या प्रक्रियेकडे पहातो. तर दुसरा भाग या प्रेमाला वास्तवाच्या चौकटीत आणून बसवण्याचा प्रयत्न करतो.

सैराट मधला अवखळ प्रेमाचा भाग हा कोणालाही आवडेल असाच आहे. सैराटची जाहिरात करण्यात आलीय ती याच भागाला केंद्रस्थानी ठेवून, आणि त्यामुळे ती अपूर्ण असली, तरी फसवणारी म्हणता येणार नाही. हा कथाभाग पाहिला तर तो फारसा नवीन नाही. आर्ची ( रिंकु राजगुरु) आणि पर्श्या (आकाश ठोसर) या दोघांचं प्रेम जुळतं. दोघांच्या परिस्थितीत मात्र बराच फरक. ती गावच्या पुढाऱ्याची मुलगी, तर तो गरीब घरातला. दोघं चोरुन भेटायला लागतात, पण दिवस जातात तसतसे अधिक धीटही होतात. मित्र मैत्रिणींचे धोक्याचे इशारे मनावर न घेता प्रकरण वाढत जातं. आणि मग एक दिवस....एनी वे ! मुद्दा इतकाच, की या भागात येणारी कथा तशी ओळखीचीच आहे, पण ती सजवण्याची पद्धत विशेष आहे. दिग्दर्शकाने हे सारं सुंदर, स्वप्नवत, रोमॅंटीक करण्यासाठी, ' एव्हरी ट्रिक इन द बुक ' वापरली आहे. नाॅस्टॅल्जिक वळणाचे प्रसंग, छायाचित्रणातल्या करामती, उत्तम संगीत, लोकप्रिय गाणी , नवे चेहरे या सगळ्यातून सैराट भरधाव पुढे जात रहातो. बाॅलिवुड वळणाची फॅन्टसी डोळ्यासमोर ठेवून हा संपूर्ण भाग आकाराला आला आहे. याचं एक कारण प्रेक्षकाला गुंतवणं नक्कीच आहे, पण दुसरं असही असू शकतं, की जितके आपण या कल्पनाविलासात अडकतो, तितका आपल्याला जमिनीवर आणणारा वास्तववादी भाग अधिक त्रास देतो. हा त्रास होणं अपेक्षित आहे, तो टाळून चालणार नाही. पण सैराट त्याशिवाय पूर्ण होणार नाही. हे एक पॅकेज डील आहे म्हंटलं तरी चालेल. स्वप्न आणि सत्य याचं.


गेल्या काही दिवसात आपल्याकडे दाक्षिणात्य चित्रपटांवरून स्फूर्ती घेऊन काहीबाही करण्याची अनिष्ट फॅशन आली आहे. मात्र बहुतेक वेळा ही नक्कल फार ढोबळ गोष्टींची असते. मेलोड्रामा, भडक दृश्ययोजना, अनावश्यक विनोद, स्लो मोशन हाणामाऱ्या, या प्रकारचं काहीतरी दाक्षिणात्य नावाखाली आलेलं आपल्याला दिसतं. पण दाक्षिणात्य चित्रपट काही केवळ याच प्रकारचे नसतात. प्रादेशिक पार्श्वभूमीवर हळूवार प्रेमकथा मांडणारे आणि त्यांना वास्तवाची चौकट देणारे चित्रपट आपल्या पहाण्यात आहेतच. मणीरत्नमचे 'रोजा', 'बाॅम्बे' यासारखे चित्रपट आठवले, तर आपल्याला या प्रकारचच गणित दिसून येईल. तेलुगु चित्रपटाचाच रिमेक असलेल्या 'एक दुजे के लिए'चं रुपही याच प्रकारचं होतं, म्हणजे पहिला भाग अतिशय रंजक वळणाची हळवी प्रेमकथा, आणि त्यानंतर त्यावर होणारं वास्तवाच आक्रमण. सैराटपुढे या प्रकारचे काही थेट संदर्भ आहेत का हे कळायला मार्ग नाही, पण असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात, संदर्भ जर योग्य रीतीने वापरण्यात आले, तर ते वापरण्यात गैर काहीच नाही. हे दाक्षिणात्य चित्रपट आणि सैराट यात एक फरक मात्र आहे, तो म्हणजे त्यातलं एका प्रकारच्या निवेदनातून दुसऱ्यात बदलत जाणं, हे त्यामानाने हलकेच आहे. सैराटमधला स्विचओव्हर हा निश्चित कळण्यासारखा आहे, ज्यामुळे तो अदृश्य राहू शकत नाही. प्रेक्षकाला तो लगेच जाणवतो.

हे लिहून देतेवेळी प्रेक्षकांनी सैराटला कसा रिस्पाॅन्स दिलाय याची मला कल्पना नाही. रिस्पाॅन्स म्हणजे तिकिट खिडकीवर नाही, कारण झीची निर्मिती असल्याने, नागराज मंजुळेचं नाव, बर्लिन महोत्सव वारी इतरही  पुरेशी प्रसिद्धी झाल्याने तो पहायला प्रेक्षक येणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही.मला कुतूहल आहे, ते तो पाहिल्यावर आलेल्या प्रतिक्रियेचं. मला वाटतं, अलीकडे आपल्या प्रेक्षकाना प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते. तो नि:संशय त्यांचा हक्कच आहे. मात्र पटकन निष्कर्षावर येण्याआधी थोडा विचार केला, तर अनेकदा  चित्रपट काय म्हणतोय हे त्यांच्याच अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येउ शकतं. बहुतेक चित्रपटांचा आपल्यावर झालेला परिणाम हा एका सोप्या गोष्टीवरुन कळण्यासारखा असतो. आणि ती म्हणजे, तुमची त्या चित्रपटातल्या पात्रांबरोबर होणारी भावनिक गुंतवणूक. एखाद्या चित्रपटातली पात्र तुम्हाला आवडली, तर त्यांचं काय होणार याची काळजी तुम्हाला सतावते, त्यांचं शेवटी चांगलंच व्हावं या विचारात तुम्ही असता. सैराट मधे हे होतं का? तुम्ही आर्ची आणि पर्श्याच्या प्रेमात पडता का?
तुम्ही स्वत:च या प्रश्नाचं उत्तर शोधून पहा !




- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP