पॅन्स लॅबिरीन्थ - युद्धवास्तवाचा चक्रव्यूह

>> Thursday, November 30, 2017



चित्रपटात मुलं असली, म्हणजे तो मुलांचा सिनेमा होतो का? उघडच नाही. व्हिटोरिओ डे सिकाच्या बायसिकल थिव्ज पासून ते नागराज मंजुळेच्या फॅन्ड्रीपर्यंत अशी अनेक उदाहरणं देता येतील की ज्यात मुलांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत, पणत्यातला आशय हा प्रामुख्याने मोठ्यांनी पहावा म्हणून, त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून लिहिला गेलेला आहे. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की मोठ्यांचा सिनेमा आणि मुलांचा सिनेमा, म्युचुअली एक्सक्लुजिव प्रकार आहेत? मुलं आणि मोठे यांनाएकत्रितपणे सखोल, आणि तरीही रंजक काही दाखवेल, असे सिनेमे बनणारच नाहीत? तर तसंही म्हणता येणार नाही. तसे सिनेमे आहेत, पण ते मुलांना दाखवायचे तर मोठ्यांनी थोडं उदार धोरण ठेवणं आवश्यक आहे.
मुलांसाठी कोणतीही गोष्ट म्हंटली, की आपण सावरुन बसतो. मग त्यात अमुकच असायला हवे, तमुक चालणार नाही, त्यात करमणूक हवी, शक्यतर गंभीर काही नकोच, पण असेलच, तर ढोबळ संदेश हवा, अशी आपल्या मोठ्यांची बाळबोध मतंआहेत. प्रत्यक्षात, मुलांना चालणार नाही असं काही नसतं. आता इंटरनेट युगात तर ती खरोखरच मोठ्यांच्या नाकावर टिच्चून मनाला येईल ते बघत असतात, पण त्याआधीही, साहित्य, रोजची वर्तमानपत्र किंवा टिव्हीवरच्या बातम्या, ती सरसकटपहात असलेले हिंदी सिनेमा, यातून त्यांचं कितीतरी ‘प्रौढ’ शिक्षण झालेलं असतच. अगदी साध्या परीकथा म्हंटल्या, तरी अलिबाबाने बुधल्यात गरम तेल ओतून चाळीस चोरांना मारणं, हेन्सेल आणि ग्रेटेलनी त्यांना मारु पहाणाऱ्या चेटकीला खलासकरणं, रेड रायडिंग हूडच्या लांडगा मागे लागणं, आणि स्नो व्हाईटला राजपुत्राने चुंबन घेऊन जागं करणं, यासारख्या कथांमधे पुरेसा ‘मच्युअर कन्टेन्ट’ नाही का? त्यामुळे मला वाटतं सर्वांना सर्व पाहू द्यावं. विशेषत: ते तुम्हाला व्यक्तीश: चांगलं वाटतअसेल, तर नक्कीच. या प्रकारचा, मुलांनी पहावा का पाहू नये या प्रकारचा वाद संभवणारा एक चित्रपट माझ्या सर्वोत्कृष्ट जागतिक चित्रपटांच्या शाॅर्ट लिस्ट मधे अनेक वर्ष आहे. पुरेशा वाॅर्निंगसह मी तो वेळोवेळी मुलांना दाखवलेलाही आहे.त्याचाही आशय हा प्रामुख्याने मोठ्या प्रेक्षकाला अधिक प्रमाणात पोचेल असा असला, तरी त्याच्या गोष्टीतली काव्यमयता, फॅन्टसीचा वापर, आणि लहान, दहा बारा वर्षांची त्याची साहसी नायिका आॅफेलिआ, या गोष्टी त्याला मुलांपासून दूरठेवणं अवघड करतात. गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाचा हा स्पॅनिश चित्रपट, पॅन्’स लॅबिरीन्थ (२००६).
गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाचा, मी फार जुना फॅन आहे. करमणूक मूल्य आणि भव्यता, हे त्याच्या चित्रपटांचे ठरलेले विशेष असतात. फॅन्टसी हा त्याचा आवडता चित्रप्रकार. त्याचे स्पेनमधे केलेले क्रोनोस, द डेव्हिल्स बॅकबोन , आणि पॅन्’सलॅबिरीन्थ, हे अमेरिकेत केलेल्या हेलबाॅय ( भाग१/२), ब्लेड २, पॅसिफिक रिम वगैरेहून अधिक अर्थपूर्ण आहेत, पण त्याचा संबंध दिग्दर्शकाच्या गुणवत्तेपेक्षा त्या त्या व्यवसायाच्या आर्थिक आडाख्यांशी आहे. आपल्याकडे एक समज आहे कीआशयघन काही द्यायचं तर ते वास्तववादी चित्रपटांनीच. फॅन्टसीत कसला आला आशय? डेल टोरो हे खोटं ठरवत असला, तरी आपल्याकडे अजूनही तो महत्वाचा दिग्दर्शक मानला जात नाही. पॅन्’स लॅबिरीन्थ गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात दाखवला गेला, तेव्हादेखील आपल्या बऱ्याच चित्रपट अभ्यासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तुलनेने अतिशय सर्वसामान्य चित्रपटांचं भरभरुन कौतुक केलेलं मी पाहिलं आहे. हा एक दृष्टीकोन आहे, तो बदलणं सहजासहजी शक्य होणारनाही. पण आपण शक्यतर अशा थम्ब रुल्सकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा. कोणताही चित्रपट आपल्याला काय देतो हे त्या चित्रपटाकडे देण्यासारखं किती आहे यावर अवलंबून असतच, पण आपल्याकडे त्यातलं काय आणि किती घेण्याचीक्षमता आहे यालाही नक्कीच महत्व आहे.
पॅन्’स लॅबिरीन्थ ही एका बाजूने अगदी ‘ कोणे एके काळी’ प्रकारची मुलांची गोष्ट आहेत. त्यात जादू आहे, पऱ्या आहेत, राजे राण्या आहेत, राजकन्या आहेत आणि मुख्य म्हणजे राक्षसही आहेत. १९४४ च्या युद्धग्रस्त स्पेनमधे वाढणाऱ्या आॅफेलिआया मुलीच्या आयुष्याला अचानक फुटणारा फाटा, आणि त्यातून तिच्यापुढे उलगडलेलं एक नवं विश्व, यांची ही कहाणी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ही कथा आहे ती जुलमी फ्रॅन्कोइस्ट राजवटीने आपल्याला असलेला विरोध मोडून काढण्यासाठीचालवलेल्या प्रयत्नाची, सामान्य माणसांवर होणाऱ्या अत्याचारांची, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या काही मोजक्या लोकांची. फॅन्टसीत ज्या प्रकारे राजे राण्या राक्षस आहेत, तसे आॅफेलिआ ज्या वास्तवात रहाते तिथेही आहेत. आणिचित्रपटातला कळीचा मुद्दा आहे तो हा, की आॅफेलिआ अनुभवत असलेली ही दोन्ही विश्व खरीच आहेत, का वास्तवातली कटूता सहन न होणाऱ्या आॅफेलिआने आपल्यापुरता कल्पनेत जगण्याचा पर्याय शोधून काढलाय? यातलं खरं काय, खोटंकाय, आणि एका विश्वातली घटना ही दुसऱ्यावर किती परिणाम करु शकेल याचा माग हा चित्रपट काढतो.
आॅफेलिआ ( इवाना बकेरो ) आपल्याला पहिल्यांदा भेटते, ती आपल्या गरोदर आईबरोबर ( आरिआड्ना गिल), कॅप्टन विडाल ( सर्गी लोपेज) च्या युद्धछावणीवर जात असताना. विडालशी तिच्या आईने दुसरं लग्न केलं असतं, आणि त्याची इच्छाअसते की मुलाचा जन्म छावणीवरच व्हावा. विडालचं वागणं एखाद्या हुकूमशहासारखं असतं. आपल्या इच्छेपलीकडे त्याला काहीच दिसत नाही. छावणीवर आॅफेलिआची मर्सेडीज ( मेरीबेल वर्दू) हिच्याशी मैत्री होते आणि ती लपून छपून रानातलपलेल्या बंडखोरांना मदत करतेय हे आॅफेलिआ कोणालाच सांगत नाही. छावणीशेजारी एखाद्या चक्रव्यूहासारखी रचना असलेली एक पुरातन वास्तू, एक लॅबिरीन्थ असतो. या जागी आॅफेलिआची गाठ पडते ती फाॅन या निसर्गदैवताशी. फाॅनआॅफेलिआच्या कानावर तिचं जन्मरहस्य घालतो. ती म्हणे मागच्या कोणत्याशा जन्मात भूगर्भातल्या एका राज्याची राजकन्या असते. त्या जगातले तिचे वडील आजही तिच्या प्रतिक्षेत असतात. मात्र त्या जगात जायचं तर पौर्णिमा येण्याच्या आतआॅफेलिआला तिच्यावर सोपवलेली तीन कामं पूरी करावी लागणार असतात. आॅफेलिआ अर्थातच या कामांसाठी तयार होते.
मूळ स्पॅनिशमधे चित्रपटाचं नाव ‘एल लॅबिरीन्तो डेल फाउनो’ किंवा ‘ द लॅबिरीन्थ आॅफ द फाॅन ‘ असं आहे. आता मुळात यात ‘ पॅन’ कुठून आला हे माहीत नाही कारण पॅन आणि फाॅन दोन्ही दैवतं ग्रीक असल्याने उगाचच एकाएेवजी दुसरं घालणंअनावश्यक वाटतं. दोन्हींचा प्रकार निसर्गदेवतांचा पण पॅनची प्रतिमा ही थोडी सेक्शुअल पैलू असलेली आहे, त्यामुळे तर हा बदल अगदीच अतर्क्य वाटतो.
पॅन्’स लॅबिरीन्थमधली जी मध्यवर्ती कल्पना तिला व्हिक्टर एरीसने १९७३ मधे दिग्दर्शीत केलेल्या ‘ द स्पिरीट आॅफ द बीहाईव’ या चित्रपटाचा थोडका, पण लक्षात येण्याजोगा आधार आहे. दोन्ही चित्रपट फ्रॅन्कोइस्ट काळातल्या स्पेनमधे घडणारेआणि राजकीय धोरणावर टिका करणारे आहेत, दोन्हींमधे प्रमुख भूमिकेत लहान मुलगी आहे जी वास्तव आणि कल्पित यांच्या सरमिसळीत सापडलेली आहे. तरीही, लॅबिरीन्थ हा बीहाईव हून खूपच वेगळा आहे. बीहाईव काहीसा संथ, प्रायोगिकआणि प्रश्नांची सरळ उत्तरं देणं टाळणारा आहे. लॅबिरीन्थ सर्वच बाबतीत अधिक आहे. तो अधिक व्यावसायिक आहे, अधिक गुतवणारा आहे. त्यातली कल्पित कथा आणि अराजक ही दोन्ही कथासूत्र तर्कशुद्ध चौकटीत पूर्णत: फुलवलेली आहेत.लॅबिरीन्थचा शेवटही त्यामुळे अधिक भिडणारा आहे. डेल टोरो ने २००१ मधे दिग्दर्शीत केलेला ‘द डेव्हिल्स बॅकबोन’ देखील काही प्रमुख कल्पनांबाबत लॅबिरीन्थ सारखाच आहे. पण तो प्रयत्न याच्याइतका लोकप्रिय होऊ शकला नाही.
पॅन्स लॅबिरीन्थ एकदा बघून आपल्याला पूर्ण तपशीलात कळणं अशक्य आहे. त्यातले मुद्दे कळतील, कथानक कळेल, पण त्यातला तपशील, ज्या विविध पातळ्यांवर तो गोष्ट सांगतो, ते सारं नीट कळायचं तर त्याला पुन्हा पुन्हा पहाण्याची गरजआहे. यातली एखादी साधी कृतीही अर्थाच्या दृष्टीने प्रगल्भ असू शकते. एक उदाहरण घ्यायचं, तर आॅफेलिआच्या पहिल्या प्रवासाचं घेता येईल. आईला बरं वाटत नसल्याने, या प्रवासादरम्यान गाड्या एके ठिकाणी थांबतात. आई आणि आॅफेलिआदोघंही खाली उतरतात. इकडे तिकडे पहाताना आॅफेलिआला एक दगड सापडतो. ती तो उचलते. थोडं पुढे गेल्यावर तिला एक जुनाट शिल्प लागतं . हा एक चेहरा असतो, ज्याच्या डोळ्याच्या जागी भोक पडलेलं असतं. आॅफेलिआला सापडलेलातुकडा या डोळ्याच्या भागाचाच असतो. ती शिल्पावर डोळा बसवते आणि क्षणार्धात शिल्पाच्या तोंडाच्या जागच्या छिद्रातून एक काडीकिड्यासारखा दिसणारा चमत्कारी किडा बाहेर येतो. हा किडा तिला फाॅनकडे नेण्याला पुढे कारणीभूत ठरतो. याप्रसंगातली डोळ्याचा तुकडा मिळण्याची, तो जागेवर बसवण्याची कृती अर्थपूर्ण आहे. खासकरुन आॅफेलिआच्या आयुष्याला तिथे लागणारं वळण लक्षात घेतलं, तर. शिल्पातला डोळा हे दृष्टीचं प्रतीक आहे. तो सापडणं आणि आॅफेलिआला एकनवी नजर प्राप्त होणं हे तर्काला धरुन आहे. पुढे डोळ्याचा असाच पण याहून भयकारी वापर पेल मॅन या व्यक्तिरेखेच्या प्रसंगातही आहे. या प्रकारचे अर्थ शोधण्यासारख्या जागा या सिनेमात अनेक आहे. विडालचं पाॅकेटवाॅच, फाॅनने दिलेल्या मुळीवरटाकण्याचं रक्त, असे अनेक प्रसंग आणि प्रतीकं सांगता येतील. पण यातलं सर्वात महत्वाचं प्रतीक आहे ते विडालच्या व्यक्तीरेखेचच.
विडाल हा स्पेनमधे आलेल्या फॅशिस्ट राजवटीचं प्रातिनिधीत्व करतो. हे आॅफेलिआचे सावत्र वडील हा या चित्रपटातला खलनायक आहे. त्याचं क्रौर्य, त्याचा स्वार्थ, त्याची सत्तेची हाव, ही जागोजाग दिसते. विडाल हा आॅफेलिआच्या वास्तवाचा भागआहे. पण आपण असंदेखील म्हणू शकतो, की फाॅनने सांगितलेल्या दोन कामांमधे आॅफेलिआला भेटणारे राक्षस हे दुसरे तिसरे कोणी नसून विडालच आहेत. केवळ तिथलं त्यांचं अस्तित्व, हे स्पष्ट नं मांडता प्रतिकांमधे लपवलेलं आहे.
विडालच्या दोन बाजू आहेत. आॅफेलिआच्या आईचा हात धरुन, तिला गरोदर करुन , त्याने आॅफेलिआच्या व्यक्तिगत आयुष्यात केलेला प्रवेश ही त्याची पहिली बाजू, तर आंधळ्या सत्तेचा प्रतिनिधी, ही त्याची दुसरी बाजू. फाॅन आॅफेलिआला जीकामं सांगतो, त्यातलं पहिलं आहे, ते रानातल्या एका सुकत चाललेल्या झाडाच्या मुळाशी असलेल्या ढोलीत जाऊन तिथल्या महाकाय बेडकाने गिळंकृत केलेली चावी मिळवणं. या झाडाचा आकार, हा स्पष्टपणे गर्भाशयाच्या आकाराचा आहे.ढोलीचा अर्थ मी वेगळा सांगायची गरज नाही. आणि बेडकाने गिळलेली चावी आणि विडालने आपल्या ताब्यात घेतलेली स्टोअररुमची चावी, या दोघांमधेही साम्य आहे. त्यामुळे आॅफेलिआला थेट त्रास देणारी विडालची वैयक्तिक बाजू, राक्षसीबेडकाच्या प्रतिकात दिसते.
दुसरं प्रतिक आहे ते पेल मॅन या राक्षसाचं. डेल टोरोने एकीकडे म्हंटलय की त्याच्या शेजारी बसून चित्रपट पहात असलेला प्रसिद्ध भयकथाकार स्टीवन किंगदेखील पेल मॅनला पडद्यावर पाहून दचकला. यावरुनही पेल मॅन किती भीतीदायक असेलयाची कल्पना येऊ शकते. इथे आॅफेलिआवर सोपवलेलं काम आहे ते एका ठिकाणून एक धारदार चाकू चोरण्याचं. हा चाकू जिथे ठेवलाय, त्याच्या जवळच एका प्रचंड टेबलावर साधारण माणसासारखाच दिसणारा पेल मॅन बसलाय. पेल मॅन समोरप्रचंड मेजवानी रचलेली आहे, पण ती त्याला दिसत नाही. साहजिक आहे, त्याला दिसण्यासाठी डोळेच नाहीत. किंवा त्याच्या चेहऱ्यावर नाहीत असं म्हणू. त्याचे डोळे त्याच्या समोर, एका बशीत ठेवलेले आहेत. वेळ येताच हा राक्षस ते डोळे उचलतो,आणि तळहातांना असलेल्या दोन खाचांमधे घालतो. आता हात चेहऱ्यापुढे धरुन त्याला सावज हेरणं शक्य होतं. स्वत:पुढे मेजवानी वाढलेली असताना लहान निरुपद्रवी मुलीवर हल्ला करणारा पेल मॅन, हे राजसत्तेचं, धर्मसत्तेचं प्रतीक आहे. म्हणजेविडाल जी बाजू लढवतोय, त्याचं जे राजकीय रुप आहे, तेच या पेल मॅनच्या रुपाने आपल्याला दिसते. ढोलीतला बेडूक आणि पेल मॅन यांना एकत्रितपणे पाहिलं तर विडालची ही वेगळी आवृत्ती आपल्यासमोर येते. आता ही आवृत्ती आॅफेलिआलाका दिसावी? तिच्या एरवीच्या आयुष्याचच तर हे भासमय प्रतिबिंब नाही?
हे भासमय प्रतिबिंब वाटायचं आणखी एक कारण आहे ते घटनांमागच्या दुहेरी स्पष्टीकरणांमधेही. चित्रपटात एका प्रसंगी आॅफेलिआला आईच्या बाळंतपणाची फार काळजी वाटायला लागते, काहीतरी बरं वाईट होईल असं वाटायला लागतं. यावरउपाय म्हणून फाॅन तिला एक मुळी देतो जिचा काही प्रमाणात आईची तब्येत सुधारण्यासाठी उपयोगही होतो. आॅफेलिआ स्वत:पुरता समज करुन घेते तो हाच, की फाॅनचा उपायच लागू पडला. आता या दिवसात तब्येत बिघडण्याला छावणीवरयेतानाचा लांबचा प्रवास, किंवा सुधारण्याला डाॅक्टरची ट्रीटमेन्ट, अशी सोपी, पटण्यासारखी कारणंही चित्रपट देतो, जी वास्तवाला धरुन आहेत.  या दोन्ही उत्तरांच्या असण्यामुळे आपण प्रेक्षकही खरं काय घडतय या ठाम निष्कर्षाकडे येऊ शकतनाही.
माझा अनुभव असा आहे, की जेव्हा चित्रपटाचा अर्थ लावण्याचं काम प्रेक्षकांवर सोपवलं जातं, तेव्हा दिग्दर्शक आपल्या बाजूने काही सूचक जागा अशा ठेवतात, की ते स्वत: कोणत्या बाजूला अधिक झुकतायत हे चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात यावं.इथेही तशा जागा आहेत, आणि स्वत: गिआर्मो डेल टोरोने आपला प्रेफरन्स काही मुलाखतींमधून सांगितलेलाही आहे. तरीही मला विचाराल, तर जी मजा त्यातल्या दोन्ही बाजूंच्या एकत्रित अस्तित्वात आहे, तेवढी कुठलीतरी एक बाजू निवडण्यातनाही.
लॅबिरीन्थचा दृश्य भाग हा उत्तम आहे, पण तो अमेरीकन चित्रपटांमधल्या चकचकाटाहून पुष्कळच वेगळा आहे. दोन बाबतीत. सौंदर्य आणि पाॅलिश. अमेरिकन चित्रपटात पऱ्या, देव वगैरे गोष्टी आल्या की त्या अगदी गोंडस, सुंदर दाखवल्या जातात.इथलं चित्रण त्याच्या उलट आहे.फाॅन हे दैवत मुळातच कमरेखाली बोकडाचं शरीर असणारं आहे, पण इथे तो ज्या प्रकारे दिसतो, ते पाहून हा नायिकेच्या बाजूचा आहे का विरोधी बाजूचा, असा संभ्रम पडावा. फाॅन आणि पेल मॅनची रंगभूषा, वेषभूषायाला जबाबदार आहे, पण त्याबरोबर त्या पात्राचा वावर देखील. अतिशय लवचिक वावरातून अनेक महत्वाच्या भूमिका केलेल्या पण आपल्याला चेहऱ्याने फार परिचित नसणाऱ्या डग जोन्सनेच या (दोन्ही) भूमिका केल्या आहेत. स्टार वाॅर्स सारख्याचित्रपटांमधे अलीकडे जशी पूर्ण अॅनिमेटेड पात्र वापरली जातात, तशी या दोन व्यक्तिरेखांनाही वापरता आली असती, पण डेल टोरो ला संगणकापेक्षा गोष्टी शक्य तितक्या प्रत्यक्ष घडवायला आवडतात. त्याचा हा एकूणच दृष्टीकोन आहे, आणित्यामुळेच चित्रपटात बेडूक, छोट्या पऱ्या वगैरेलाही थेट संगणकातून नं आणता, स्टाॅप मोशन अॅनिमेशन, किंवा अॅनिमेट्राॅनिक्स यासारखे उपाय वापरले आहेत, ज्यात बरोबरच्या कलाकारांना या कल्पित व्यक्तिरेखांबरोबर प्रत्यक्ष काम करता येईल.केवळ रंगीत पडद्यापुढे एकट्याने अभिनय करावा लागणार नाही.
लॅबिरीन्थमधला फॅन्टसीचा भाग इतका स्पष्ट असताना मुलांनी पहायला कोणाचा विरोध का असावा असं एवढा भाग वाचून कोणाला वाटेल. तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की यात दाखवलेला हिंसाचार आणि भीतीचे प्रसंग हे ग्राफीक आहेत. मुलांसाठीसोपे केलेले नाहीत. आता त्यात अनावश्यक रक्तपात टाळलेला आहे, पण तरीही ते चित्रीत करण्याची पद्धत अंगावर येणारी आहे. वेळोवेळी हिंसा थेट नं दाखवता सूचक केली आहे, उदाहरणार्थ डाॅक्टरने पाय अॅम्प्यूट करण्याचा प्रसंग. पण विडालएका गावकऱ्याला बाटलीने मारतो तो प्रसंग, किंवा मर्सेडीज विडालवर उलटते तो प्रसंग, अशा जागा मुलांनाच का, मोठ्यांनाही बघायला त्रासदायक आहेत. पेल मॅनचं दर्शन तर लहान मुलांना नक्कीच घाबरवेल. पण असं सगळं असतानाही मी म्हणेनकी पॅन्’स लॅबिरीन्थ मुलांनी जरुर पहावा, त्यांची ( आणि पालकांची )तयारी असल्यास. त्यातलं सगळच त्यांना कळलं नाही, तरी जे कळेल तेही दूरगामी परिणाम करणारं असेल.
-
गणेश मतकरी



Read more...

मराठी प्रेक्षक आणि वितरणाचं कोडं !

>> Monday, October 23, 2017

नुकताच आपल्याकडे कासव हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. प्रतीकांचा वापर करणारा, गंभीर आशय मांडणारा आणि राष्ट्र्रीय पुरस्कारातलं सर्वोच्च स्थान पटकावत, सुवर्ण कमळ विजेता ठरलेला. सुनील सुकथनकर- सुमीत्रा भावे या गाजलेल्या दिग्दर्शकद्वयीचा हा चित्रपट अत्यंत मोजक्या ठिकाणी लागला. मुंबईत तर एकाच ठिकाणी एकच खेळ अशी त्याची सुरुवात होती. कासव बरोबरच इतर महोत्सवात गाजलेले, पुरस्कार विजेते ठरलेले इतरही दोन चित्रपट होते. गजेंद्र अहिरेंचा द सायलेन्स आणि शिवाजी लोटन पाटील यांचा हलाल. यांना अधिक खेळ मिळाले असले तरी या तिन्ही चित्रपटांना प्रतिसाद अत्यल्प राहिला. त्यांच्याबरोबर इतर चार मराठी लागले होते, त्यांचा तर विचारच नको. कासवच्या आदल्याच आठवड्यात मराठी सिनेमांना नवं वळण देणारे  श्वासकर्ते संदीप सावंत यांचा नदी वाहते, हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो आणि बरोबरचे दोन चित्रपट, यांनाही प्रतिसाद हवा तसा नव्हताच. या सुमारास चित्रपटगृहात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांपैकी दोनच प्रेक्षकांना आपल्याकडे खेचू शकले. विशाल देवरुखकर दिग्दर्शित बाॅईझ आणि निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित बापजन्म. बाॅईझ आणि बापजन्म हे प्रेक्षकांनी बरे चालवले, तर कासव, नदी वाहते सारख्यांकडे दुर्लक्ष केलं, असं चित्र दिसलं. आता याचा अर्थ प्रेक्षक फक्त व्यावसायिक सिनेमांना आपलं म्हणतो असा समजायचा का? आणि तसं असेल, तर ज्या चित्रपटांचं नाव राष्टीय पातळीवर, महोत्सवात गाजतय, त्याचं काय? आणि मग श्वास सारख्या गंभीर चित्रपटाला प्रथम आपलं म्हणून मराठी सिनेमाला पुनरुज्जीवन देणारा प्रेक्षक गेला कुठे?
या आणि या प्रकारच्या प्रश्नांची सोपी उत्तरं काढणं सोपं आहे. व्यावसायिक सिनेमा वाईट, कलात्मक वळणाचा चांगला, किंवा प्रेक्षकांना काय कळतय, वगैरे बोलायला सोप्या गोष्टी आहेत पण  माझ्या मते हा प्रश्न इतका सोपा नाही. जर मराठी प्रेक्षकानेच नवा सिनेमा उचलून धरला तर पुढे त्याकडे त्याने पाठ का फिरवली? आज जो मराठी प्रेक्षक जागतिक चित्रपट पहाण्याच्या गोष्टी करतो, तो महोत्सवात गाजलेल्या, कलात्मक चित्रपटांकडे दुर्लक्ष कसं करु शकतो? चित्रपटसंख्या आणि चित्रपटांचं यशापयश याचा काही संबंध आहे का? असे अनेक पैलू या प्रश्नाला आहेत.
एका आठवड्याला सात चित्रपट हे जरा चमत्कारिकच आहे, आणि अपवादानेच घडणारं, पण दोन तीन चित्रपट, हे गणित हे नेहमीचच झालय. नव्या मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात पाहिले, तर चित्रपटांचं प्रमाण इतकं नव्हतं. वेगळे चित्रपट तर खूपच कमी असायचे. श्वासनंतर, डोंबिवली फास्ट , रेस्टाॅरन्ट, टिंग्या, वळू असे वर्षाला दोन चार चित्रपट वेगळे असायचे, आणि एकूण चित्रपटसंख्याही मर्यादीत होती. त्यामुळे  आठवड्याला भाराभर चित्रपट लागत नसत. आणि काय पहायचं हे ठरवणंही सोपं होतं.  आज आपण वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट प्रदर्शित करतो. सुट्ट्या, परीक्षा, हिंदीचे मोठे रिलीज यामुळे आठ दहा आठवडे तर प्रदर्शनासाठी निरुपयोगी असतात. मग पंचेचाळीस दिवसात शंभरच्यावर चित्रपट प्रदर्शित करायचे, तर दुसरं काय होणार ? आपल्याकडला बराच प्रेक्षकवर्ग म्हणतो की आपल्याला महिन्यातून एक दोन चित्रपटांहून अधिक काही बघणं शक्यच होत नाही. आणि इतक्या प्रचंड चित्रपटसंख्येत पहाण्यायोग्य चित्रपट कसा निवडावा हे त्यालाही कळेनासं होतं.
आजचा प्रेक्षक हा काय पहावं काय नाही, याबद्दल मला अजूनही गोंधळलेला वाटतो. त्याला अजून स्थैर्य आलेलं नाही. या प्रेक्षकवर्गाची चाचपणी सोशल नेटवर्क, कॉलेजमधल्या पहाण्या वा इतर आधुनिक मार्गांनी केली, तर दिसतं की  प्रेक्षक नवं काही पहायला तयार आहे, त्याला पारंपरिक करमणुकीचा कंटाळा आलाय. नवं काही देणाऱ्या चित्रपटांसाठी तो आज मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, एवढच नाही, तर  इन्टरनेट क्रांतीने आणलेल्या सुविधांमुळे तो जागतिक चित्रपटांचा चाहता बनलेला आहे. मनोरंजन हे त्याच्या सिनेमा पहाण्यामागचं अंतिम ध्येय नाही. हे सारं एका आदर्श प्रेक्षकाचं चित्र तयार करणारं असलं, तरी प्रत्यक्षात जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा या प्रेक्षकांमुळे तो चाललाय असं पाहाण्यात येत नाही. चित्रपट चालतो वा पडतो, तो पारंपारिक वळणाचे चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांमुळेच. अशा प्रेक्षकांमुळे , ज्यांना चित्रपटाच्या दर्जाविषयी देणंघेणं नसून केवळ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात त्याचं असणं आणि टिव्हीवरून दर अर्ध्या तासाला त्याची जाहीरात दिसत रहाणं, किंवा ' चला हवा येऊ द्या ' सारख्या कार्यक्रमात चित्रपटताऱ्यांची हजेरी लागणं या गोष्टी महत्वाच्या आहेत.
असं का व्हावं हे नक्की माहीत नाही, मात्र अशी शक्यता आहे, की हा नवा प्रेक्षकवर्ग खूपच तरुण आणि शिक्षण वा करिअरमधे गुंतलेला असल्याने, आणि ज्या वेगळ्या प्रकारच्या सिनेमाची त्याला वरकरणी ओढ आहे, त्याचं मर्यादित वितरण होत असल्याने, योग्य वेळी योग्य चित्रपटांपर्यंत पोचू शकत नसावा. त्यातल्यात्यात चांगली गोष्ट ही , की जेव्हा व्यावसायिक वितरणाच्या साथीने नवे चित्रप्रकार सादर होतात, तेव्हा हा प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतो आणि चित्रपट यशस्वी करुन दाखवतो.
हा नवा प्रेक्षक आज जर काही कारणाने चित्रपटगृहापर्यंत पोचू शकत नसेल, तर चित्रपटाने त्याच्यापर्यंत पोचण्याची काही व्यवस्था होऊ शकते का हे पहावं, या दृष्टीने आज थोडेफार प्रयत्न चालू झालेले आहेत. टिव्ही हा या बाबतीतला खरा राजमार्ग, कारण त्याचा पल्ला सर्वात मोठा, आणि प्रेक्षकांनाही दर चित्रपट पहाण्यासाठी वेगळे पैसे पडत नसल्याने, सर्वसामान्य प्रेक्षकाकडून त्यावर दिसणारा चित्रपट सहजपणे पाहिला जाण्याची शक्यताही मोठी. यातला सरकारी टेलिव्हिजनचा मार्ग आज मोठ्या प्रमाणात खुला आहे, पण शहरी भागात अधिक पाहिल्या जाणाऱ्या प्रायव्हेट चॅनल्सची आवड निवड पहाता, त्यांच्याकडून विशिष्ट चित्रपटांनाच प्रतिसाद मिळालेला दिसतो. यावर उपाय आहे तो सध्या सर्वात लोकप्रिय असणारं माध्यम , म्हणजे इन्टरनेट वापरण्याचा. आज खेड्यापाड्यातही या माध्यमाचं पोचणं आणि वेब चॅनल्सनी चित्रपट डाउनलोड करण्याबरोबरच स्ट्रीमिंगचीही केलेली सोय, या दृष्टीने उपयुक्त ठरेलशी. जागतिक चित्रपट पहाणाऱ्या हौशी प्रेक्षकाला ती आधीपासूनच परिचित. इन्टरनेटवर भरवसा ठेऊन, 'पे पर व्ह्यू' मार्गाने तिकीटाप्रमाणे पैसे भरून चित्रपट दाखवणं, किंवा 'आय ट्यून्स' सारख्या माध्यमातून डाऊनलोडची सोय ठेवणं या गोष्टी हळूहळू होतायत. मात्र यात अडचण अशी की डाऊनलोडींगला पैसे मोजण्याची मानसिकता अजून आपल्याकडे नाही आणि एरवीच पायरसी एवढी जोरात असताना ती तयार व्हायलाही वेळ लागेल. ती होण्यासाठी प्रेक्षकाने अधिक जागरुक आणि अधिक प्रामाणिक असायला, व्हायला हवं. पुढल्या पिढ्यांमधे ती शिस्त येऊ शकते, जर आपणच त्यांना या मार्गांच्या योग्यायोग्यतेबद्दल मार्गदर्शन केलं.
 कोणत्या का मार्गाने होईना, पण नव्याने तयार होणाऱ्या प्रेक्षकापर्यंत जर असा वेगवेगळा सिनेमा पोचत राहिला तर चित्रपटगृहातल्या  प्रतिसादावरही  पुढेमागे परिणाम होऊ शकेल आणि या प्रेक्षकांची मागणी ही निर्मितीसंस्थांना आपण काय प्रकारचे चित्रपट करतो आहोत, करायला हवेत, याचा फेरविचार करायला भाग पाडेल.निर्मिती आणि वितरणाचं गणित मग कदाचित आज इतकं कठीण उरणार नाही.
- गणेश मतकरी

Read more...

लिपस्टीक आणि मुक्तीची गरज

>> Friday, July 28, 2017




अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शीत लिपस्टीक अंडर माय बुरखा हा चित्रपट मी पहायला गेलो, तेव्हा रात्री पावणेअकराचा शो असूनही बऱ्यापैकी गर्दी होती. फिल्म सुरु होताहोताच, साताठ तरुणांचा एक ग्रुप आला आणि मोठमोठ्याने बडबड करत आमच्या रांगेत शिरला. चित्रपट सुरु झाला आणि लक्षात आलं, की या ग्रुपच्या चित्रपटाबद्दल काही वेगळ्याच कल्पना असाव्यात. झालेले वाद, काहिशी सेन्सेशनल म्हणण्यासारखी ट्रेलर, आणि आपल्या दिव्य बोर्ड आॅफ सर्टिफिकेशनने दिलेलं ‘ फक्त प्रौढांसाठी,’ हे सर्टिफिकेट, यावरुन त्यांनी सिनेमाला यायचं ठरवलं असावं.

सिनेमा भोपालमधल्या एका जुन्या हवेलीत रहाणाऱ्या, विविध वयाच्या , कौटुंबिक परिस्थितीतल्या चार महिलांची, त्यांच्या अवेकनिंगची , जागं होण्याची गोष्ट सांगतो. यात सेक्शुअल अवेकनिंग हा एक भाग झाला, मात्र प्रामुख्याने जाग्या होणाऱ्या जाणीवा आहेत त्या स्त्रीत्वाच्या , स्वातंत्र्याच्या, त्यांच्यावर आजवर लादल्या गेलेल्या भूमिकांमधून बाहेर पडणं आवश्यक वाटण्यासंबंधातल्या. यातली बुवाजी ( रत्ना पाठक शाह ) ही हवेलीच्या मालकांच्या कुटुंबातली ज्येष्ठ महिला आहे. भोपाळ गॅस हल्ल्यानंतर वाचलेल्या कुटुंबातल्या लहान मुलांना वाढवताना, ती पुऱ्या हवेलीचीच बुवाजी होऊन बसलेली आहे. इतकी, की बुवाजी या नावापलीकडे आपली ओळख आहे, हेच ती विसरलेली. ( आपलं उषा हे नाव तिला आठवतं, आणि आपण बुवाजीपलीकडे कोणीतरी आहोत याची आठवण होते , तो प्रसंग अभिनयासाठी खास उल्लेखनीय) . बुवाजी लपूनछपून वाचत असलेली ‘लिपस्टीक वाले सपने’, ही खोटी खोटी ग्लॅमरस, सेक्सी, रोमॅंटीक कादंबरी , आपल्याला चित्रपटभर सतत एेकवली जाते. रोजी, हे या कादंबरीतल्या प्रमुख पात्राचं नाव.

या चित्रपटातली इतर पात्र काहीशी अशी. शिरीन ( कोंकणा सेनशर्मा ) ही डोअर टु डोअर सेल्सगर्ल आदर्श पत्नीच्या भूमिकेत अडकलेली, तर काॅलेज विद्यार्थिनी रिहाना ( प्लबिता बोरठाकूर) ही आदर्श मुलीच्या. शिरीनचा गल्फला येऊन जाऊन असलेला नवरा ( सुशांत सिंग) तिला मुलं, प्रेग्नन्सी आणि गर्भपात यांच्या चक्रात अडकवून स्वत: हवं ते करायला मोकळा आहे. रिहाना आपल्या मुक्त विचारांना काॅलेजमधे शोधण्याचा प्रयत्न करत, आपल्या कडक शिस्तीच्या घरात कशीबशी जगतेय. चौघीतली त्यातल्यात्यात मुक्त आहे ती ब्युटीशीअन लीला ( आहाना कुम्रा ) पण तिचं स्वातंत्र्य हे फसवं आहे. ती प्रियकर ( विक्रांत मासी ) आणि होणारा नवरा ( वैभव तत्ववादी ) या दोन पुरुषांमधे अडकलीय. तिचं शरीर हवं ते करायला स्वतंत्र असलं, तरी या दोघांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा या तिला बांधून ठेवतायत. चित्रपट या चौघींचा मुक्तीच्या संकल्पनेपर्यंत येण्याचा प्रवास मांडतो. त्या खरच मुक्त होऊ शकतील का,हा सोप्या सुखांत सिनेमांना पडणारा  प्रश्न बाजूला ठेऊन, मुक्तीची गरज लक्षात येणं म्हणजेच मुक्ती, असं लिपस्टीक म्हणतो.
सिनेमा जसा पुढेपुढे जायला लागला तेव्हा माझ्या रांगेतला तरुणांचा ग्रुप अस्वस्थ झाला. सिनेमात सेक्शुअल संदर्भ असणारे प्रसंग होते, पण साध्या ,यू सर्टिफिकेटवाल्या हिंदी सिनेमांमधूनही ज्या आकर्षक आणि प्रेक्षकाला चाळवणाऱ्या पद्धतीने स्त्रियांना सादर केलं जातं ते इथे होत नव्हतं. इथे स्त्रीदेहाचं प्रदर्शन नव्हतं. इथला सेक्स हा त्या स्त्रीयांच्या जीवनाचा भाग होता. कधी त्यांनी निवडलेला, तर कधी त्यांच्यावर लादला गेलेला. एरवी आपण जे स्वप्नरंजन पसंत करतो ते इथे नव्हतं, तर इथे होती घुसमट. परिस्थितीतून, नात्यांमधून, स्त्री पुरुषांना आपापली जागा ठरवून देणाऱ्या समाजरचनेतून आलेली.

जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला अडचणीची वाटते अस्वस्थ करते, तेव्हा आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात पडतो. प्रेक्षक जेव्हा संभ्रमात पडतात, तेव्हा हमखास येणारी प्रतिक्रिया असते ती हसणं आणि टिंगल करणं ही. या ग्रुपनेही ही टिंगल सुरु केली. मधे शेरेबाजी करायची. सेक्सचा उल्लेख आला की हसायचं, असले प्रकार सुरु केले. मध्यंतरापर्यंत त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या सिनेमाच्या अपेक्षेने आलो, तो हा नाही. मग त्यांना वेगळाच प्रश्न पडला. ‘ बाकी सब तो ठीक है भई, मगर ये रोजी कौन है?’ एकजण म्हणाला, आणि चर्चा रंगली.
ही ‘रोजी’ आपल्याला चित्रपटात पहिल्यांदा भेटते तेव्हा पडद्यावर रिहाना असते. तीही बुरख्यासह. आपण सेकंदभर विचार करतो की या मुस्लीम पात्राचं नाव रोजी कसं? पण मग आपल्या लक्षात येतं, की रोजीचा उल्लेख चारातली कोणतीही व्यक्तीरेखा समोर असताना येतोय. रोजी हे पात्र बुवाजी वाचत असलेल्या कादंबरीतलं आहे, हे आपल्याला कळायला थोडा वेळ जातो. पण हळूहळू लक्षात येतं की या पात्राचा, या निवेदनाचा, सगळ्याच व्यक्तीरेखांशी अप्रत्यक्ष पण महत्वाचा संबंध आहे. रोजीचं पात्र चित्रपटातल्या व्यक्तीरेखांच्या आयुष्यातल्या विसंगती दाखवून देत  , स्वप्न आणि वास्तव यातला फरक अधोरेखित करत रहातं. रोजीचं आयुष्य, वागणं, हे स्वप्नवत आहे, सुंदर आहे, तसं खऱ्या आयुष्यात होत नाही , हे सांगतं, पण चित्रपटाच्या अखेरीला हे स्पष्ट करतं, की शेवटी ही स्वप्नच आपल्याला जगायची प्रेरणा देत असतात. खोट्या रोमॅंटीक प्रेमकथा, किंवा  चित्रपट यांना आपण खरं समजत नाही, पण त्यातल्या नायक- नायिकांच्या जागी मनातल्या मनात स्वत:ला पाहू शकतो. ही स्वप्नांची दुनिया, ही आपल्या आजूबाजूच्या कंटाळवाण्या वास्तवाला पर्याय असते. ते आपलं आयुष्य नसलं, तरी आपल्या आयुष्यात रंग भरण्याचं काम या गोष्टी करतात. एका परीने लिपस्टीक अंडर माय बुरखामधली कोणतीच व्यक्तीरेखा रोजी नाही, पण दुसऱ्या बाजूने असंही म्हणता येईल, की यातली प्रत्येक व्यक्तीरेखाच रोजी आहे. निदान तिच्यापुरती, तिच्या नजरेतून का असेना.
चित्रपटाचं लिपस्टीक अंडर माय बुरखा हे नाव त्यातल्या लिपस्टीक आणि बुरखा या परस्पर विरोधी भासणाऱ्या प्रतिमांनी , तसच बुरखा या  मुस्लिम समाजाशी जोडलेल्या वेशामुळे निव्वळ सेन्सेशनल वाटावं म्हणून देण्यात आलंय असं वाटू शकतं, मात्र प्रत्यक्षात हे नाव प्रतीकात्मक आणि अगदीच अर्थपूर्ण आहे. स्त्रीयांची वरवर दिसणारी, अनेकदा सामाजिक बंधनांखाली झाकलेली  प्रतिमा आणि त्यांचं स्वत:च्या नजरेतलं व्यक्तिमत्व , हा विरोधाभास हे प्रतीक सहजपणे मांडतं.
हा चित्रपट मामी चित्रपट महोत्सवात दाखवला गेला तेव्हाच तो टाकाऊ नसणार हे लक्षात आलं होतं, पण बरेचदा या प्रकारचे चित्रपट पटकन गायब होतात. कधी आले कधी गेले कळत नाही. लिपस्टीक अंडर माय बुरखाला अनेक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याबद्दल आपण श्री पहलाज निहलानी आणि त्यांचं फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड यांचे आभारच मानायला हवेत. अर्थात अशा प्रसिद्धीचा एक तोटाही असतो.  अशा चित्रपटाबद्दल लोकांच्या ज्या टोकाच्या अपेक्षा तयार होतात, ज्या प्रत्यक्ष आस्वादात अडचण ठरण्याची शक्यता असते. बुरखाचंही काही प्रमाणात तसं झालय. त्याला स्त्रीवादी म्हणून डोक्यावर घेणारे काही जण आहेत, तसेच त्यात फार दम नाही म्हणणारे काही जण आहेत. भलत्या अपेक्षांनी चित्रपट पाहून त्यात ‘ तसं ‘ काही नव्हतं यामुळे निराश होणारेही अनेक जण आहेत. मला या चित्रपटात काय आहे असं विचारलं तर मी म्हणेन की तो खरा आहे. तो स्त्रीवादावरला लास्ट वर्ड आहे का? तर खचितच नाही. सर्वसाधारण आयुष्य जगू पहाणाऱ्या पण त्यातही अनंत अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या सामान्य स्त्रीयांची ही गोष्ट आहे. पण बेगडी सिनेमांच्या जगात ती आपल्यापुढे समाजाचं खरं प्रतीबिंब मांडू पहाते. ते पूर्ण समाजाचं नसेल, एका वर्गाचं, एका स्तराचं असेल, पण म्हणून ते चुकीचं ठरत नाही. त्यात पुरुषांच्या केवळ नकारात्मक छटा आल्यात असं कोणी म्हणेल आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र आलेल्या छटा समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात यावर कोणाचं दुमत नसावं. तुमचं आयुष्य या चित्रपटातल्या व्यक्तीरेखांच्या तुलनेत खूप मोकळं असेल तर आनंद आहे, पण असलं तरीही आजूबाजूला डोळे उघडून पहा, यातलं कोणी ना कोणी तुम्हाला जरुर दिसेल. कदाचित अनपेक्षितपणे, तुमच्या अगदी जवळचच कोणीतरी.


-गणेश मतकरी


Read more...

प्रेक्षक आणि पुरस्कार

>> Saturday, June 3, 2017


 



आनंद नाडकर्णींच्या संस्थेतर्फे ठाण्यात वर्षाआड एक वीकेन्ड फिल्म फेस्टीवल घेतला जातो, मनतरंग नावाचा. गेल्या वर्षी तो सिंघानिया शाळेत भरला होता. मानसशास्त्रीय विषयावर फिल्म्स आणि त्यावर चर्चा असं या फेस्टीवलचं स्वरुप असतं. मीही एका पॅनलवर होतं. तिथे गेलो तर सुनील सुकथनकरांची भेट झाली आणि अनपेक्षितपणे कळलं की भावे-सुकथनकरांची नवी निर्मिती असलेली फिल्म ' कासव ' त्याच संध्याकाळी त्या महोत्सवात दाखवली जाणार आहे. मी लगोलग फोन करुन वेळा जमवल्या आणि आमच्या पॅनल डिस्कशननंतरही थांबलो आणि फिल्म पाहिली

फिल्म कशी वाटली याबद्दल या लेखात फार तपशीलात जाणार नाही, पण एवढच म्हणेन, की मला आवडली आणि भावे-सुकथनकरांच्या आजवरच्या लौकिकाला साजेशी होती. डिप्रेशन हा कासवचा विषय होता, आणि देवराई आणि अस्तुनंतर मनोविकाराला महत्व देणारा हा त्यांचा तिसरा चित्रपट होता. चित्रपटात इरावती हर्षे आणि आलोक राजवाडे यांची उत्तम कामं होती. माझ्याबरोबर गंमत म्हणून एक तद्दन व्यावसायिक चित्रपट पहाणारा मित्र आला होता. मी फिल्मला थांबणार वगैरे त्याला माहीत नव्हतं, पण मी थांबतोय म्हणाल्यावर तोही थांबला. त्याने फिल्म पाहिली आणि त्यालाही ती खूप आवडली. इतकी, की पुढे एकदा त्याला आलोक राजवाडे दिसला, तेव्हा त्याला गाठून  त्याने हे सांगितलंसुद्धा. हे मला छान वाटलं. माझा नेहमीचाच समज असा आहे, की सर्वसाधारण प्रेक्षक हा विशिष्ट चित्रपट पहातो वा टाळतो, ते एक प्रकारच्या पूर्वग्रहातून, आणि तो जे हटकून पहातो त्यातले व्यावसायिक सिनेमेही त्याला सरसकट आवडतात असं नाहीच. याउलट वेगळ्या प्रकारचे चित्रपट जर पाहिले तर अनेकदा त्याला सहज आवडून जातात. या मित्राच्या उदाहरणाने माझा हा समज पक्का केला. कासवमधे अशी सरसकट सर्वाना आवडण्याच्या शक्यता दिसल्याने नुकतच त्याला राष्टीय चित्रपट पुरस्कारांमधला सर्वोच्च पुरस्कार, सुवर्णकमळ घोषित झाला हेही मला आवडलच

तर राष्ट्रीय पुरस्कारात यावेळी मराठी चित्रपटांचं निर्विवाद वर्चस्व दिसलं. मुख्य चित्रपटाचा पुरस्कार तर त्यांना गेलाच, त्याबरोबर व्हेन्टीलेटरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ( राजेश मापुसकर) , संकलन( रामेश्वर) आणि ध्वनी पुनर्मुद्रण( आलोक दे) , आणि दशक्रियाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट( दिग्दर्शन संदीप भालचंद्र पाटील) , आधारीत पटकथा( संजय कृष्णा पाटील ) आणि सहाय्यक भूमिका( मनोज जोशी), तसच सायकल या चित्रपटाला वेषभूषेसाठी( सचिन लोवलेकर), ही पारितोषिकं मिळाली. बरेचदा असं होतं की पारितोषिक विजेते मराठी चित्रपट आपल्याकडे प्रदर्शितच झालेले नसतात. यंदा व्हेन्टीलेटर प्रदर्शित झालेला असल्याने नेहमीइतका विरोधी आवाज उठला नाही, तरीही कुरबुर झालीच. आपल्या प्रेक्षकांमधे असा एक गट आहे, ज्याला गेल्या वर्षी बाहुबलीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळाल्याचा भयंकर आनंद झाला होता आणि आतापासून लोकप्रिय चित्रपटच पुरस्कार घेऊन जातील असा ज्यांनी समज करुन घेतला होता, त्यांना मात्र हे एक पाउल पुन्हा मागे गेल्यासारखं वाटलं

अशा वादाला तोंड फोडणाऱ्या निकालांच्या प्रसंगी काही प्रश्नांचा मुळातच विचार करण्यासारखा असतो. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय पुरस्काराचे निकष काय, त्यांची निवड कशाच्या जोरावर होते? राष्ट्रीय पुरस्कार फिक्स्ड असल्याची चर्चाही अधेमधे सुरु असते, त्यात कितपत तथ्य आहे? त्याशिवाय  राष्ट्रीय पारितोषिकासारखा महत्वाचा पुरस्कार चाललेल्या सोडा, पण प्रदर्शितही झालेल्या चित्रपटाना मिळणं योग्य आहे, की हा कोणावर होणारा अन्याय आहे?यातली बरीचशी उत्तरं हा काॅमन सेन्सचा भाग आहेत. ती मी दिली नाहीत, तरीही राष्ट्रीय पुरस्कार चालवणाऱ्या डिरेक्टोरेट आॅफ फिल्म फेस्टीवल्सची वेबसाईट कोणीही  उघडून पाहिली, तरी त्यातली बरीच उत्तरं सापडतील, कारण ती पब्लिक इन्फर्मेशनचाच भाग आहेत. पण एवढा वेळ कोण फुकट घालवेल? त्यापेक्षा त्यावर नुसतच मत मांडणं अधिक सोपं, नव्हे, सोशल नेटवर्कच्या काळात आवश्यकच म्हणण्यासारखं !

राष्ट्रीय पुरस्कारांचे निकष काय, याचं उत्तर खरं तर आपल्याला डिरेक्टोरेटच्या वेब साईट वरच्या नॅशनल अवाॅर्ड संबंधीच्या पहिल्या ओळीतच सापडेल. ती ओळ अशी -

नॅशनल अवाॅर्ड्स फाॅर फिल्म्स, विच वर स्टार्टेड अॅज अॅन अॅन्युअल इन्सेन्टीव बाय गव्हर्मेन्ट आॅफ इंडीआ, फाॅर मेकींग आॅफ आर्टिस्टीक, काॅम्पिटन्ट अॅन्ड मिनींगफुल फिल्म्स हॅव कम लाॅन्ग वे, टु कव्हर एन्टायर नॅशनल स्पेक्ट्रम आॅफ इंडिअन सिनेमा, टु जज मेरीट बाय हायेस्ट पाॅसिबल यार्डस्टिक अॅन्ड टु बिकम मोस्ट कव्हेटेड अॅन्ड प्रेस्टिजिअस अवाॅर्ड इन कन्ट्री

हे वाक्य पुरेसं स्पष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कारांचा हेतू , त्यांनी वापरायचा निकष हा चित्रपटांतल्या कलात्मकतेला आणि त्यांच्या आशयघनतेला उत्तेजन मिळावं हा आहे. त्यामुळे बाहुबलीसारख्या लोकप्रिय, आणि करमणूकप्रधान चित्रपटाला गेल्या वर्षीचा पुरस्कार देणं आणि इतर पुरस्कारांवरही व्यावसायिक चित्रपटांचं वर्चस्व दिसू देणं हे चुकच म्हणावं लागेल. आता या निर्णयाच्या बाजूने बोलणारे निश्चितच व्यावसायिकतेत कला नसते का, अशा युक्तीवादावर उतरतील, पण इथे 'कला' या शब्दाकडून निरपेक्ष कलादृष्टीची अपेक्षा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. व्यावसायिक चित्रपट हे निरपेक्ष भावनेने काहीही करत नाहीत, तर त्यांचा एक डोळा हा नेहमीच प्रेक्षकांकडे असतो. त्यात काही गैर आहे का, तर निश्चितच नाही. व्यावसायिकतेच्या व्याख्येनुसारच ते व्यवसायाचा विचार टाळू शकत नाहीत. आपल्या प्रेक्षकाला अमुक गोष्ट आवडेल तर तमुक गोष्ट आवडणार नाही, हा विचार तशा निर्मितीसाठी प्रथम आहे, आणि त्यामुळेच चित्रपटातल्या शुद्ध कलेचा विचार करताना यातले बहुतेक चित्रपट, बाहुबलीसारखे तर खासच, बाजूला टाकणं आवश्यक आहे. व्यावसायिक चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा पुरस्कार आणि भरघोस नफा, हा त्यांच्यासाठी पुरस्कारासारखाच आहे, त्याशिवायही, दर चित्रपटसृष्टीत असे अनेक पुरस्कार असतात ज्यात व्यावसायिक सिनेमाचा प्रामुख्याने विचार होतो, आणि समांतर सिनेमाची जुरी प्राईज/ क्रिटीक्स अवाॅर्ड वगैरेच्या नावाखाली बोळवण होते. या पुरस्कारांवर आणि यशावर व्यावसायिक चित्रपटांचं समाधान व्हायला काहीच हरकत नाही. त्यांनी, सरकारने एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाचा सन्मान करण्यासाठी, आणि त्यांना उत्तेजन देताना आपल्या चित्रपटांमधला करमणूक प्रधान सिनेमाबरोबरच आशयघन सिनेमाचा समतोल टिकून रहाण्यासाठी जाहीर केलेल्या पुरस्कारांमधेही, आपलाच वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न करणं  हे रास्त मानता येणार नाही

या वर्षीच्या निकालाचा विशेष हा, की गेल्या वर्षी व्यावसायिक सिनेमाने हायजॅक केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्रियदर्शन चेअरमन असलेल्या जुरी कमिटीने पुन्हा मूळ निकषांवर आणून सोपवला. आता या वेळचे निकाल शंभर टक्के पटण्यासारखे आहेत का? तर नाहीत. आपण काही सर्व प्रादेशिक चित्रपट पहात नाही पण जे काही पहातो, आणि जे हिंदी- मराठी सिनेमे पहातो, त्यातही काही गोष्टी दिसतातच. पहिल्या, उघड दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे अक्षय कुमारला मिळालेला सर्वोत्कृष्ट नटाचा पुरस्कार. जनथा गराज या मल्याळम सिनेमातलं मोहनलालचं काम या पुरस्काराला अधिक लायक होतं असं म्हणतात. मी काही जनथा गराज पाहिलेला नाही आणि मोहनलालला त्याची कामं एकत्र करुन  वेगळं जुरी प्राईज देण्यात आलं हेही खरं, पण हिंदीतही अलिगढ़ मधलं मनोज बाजपेयीचं काम, किंवा दंगलमधला आमीर खान हे निश्चितच अक्षय कुमारच्या रुस्तम पेक्षा उजवं होतं. अगदी स्वत: अक्षय कुमारचच एअर लिफ्टमधलं कामही वेगळं आणि पुरस्काराला रुस्तमपेक्षा अधिक लायक होतं. याबरोबरच सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरवतानाही अलिगढ किंवा दंगलसमोर नीरजाचा विचार होणं हे आश्चर्यकारक आहे

मला स्वत:ला , मराठीतल्या एका चित्रपटाचा निश्चित विचार होईल असं वाटत होतं, आणि तो म्हणजे मंगेश जोशी दिग्दर्शित 'लेथ जोशी'. मी काही दशक्रिया पाहिलेला नाही आणि कदाचित सर्वोत्कृष्ट मराठी म्हणून तो अधिक लायक असेलही, पण चित्रभाषा, आशयाची खोली, अभिनय, दिग्दर्शकीय नियंत्रण, समाजाचं अचूक भान असलेली पटकथा, अशा अनेक बाबतीत लेथ जोशी हा उत्तम चित्रपट होता. मात्र मराठीचा इतक्या पुरस्कारांसाठी विचार होऊन त्याचा कुठेच विचार झाला नाही हे अनाकलनीय आहे. यातूनच आपण आपल्या पुढल्या प्रश्नाकडे येतो, आणि तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार फिक्स्ड असू शकतात काय? काही व्यक्ती, काही दबावगट हे निकाल आपल्याला हवे तसे वळवू शकतात काय?

कासव, कोर्ट  यासारख्या लाॅबी मागे नसलेल्या चित्रपटाची सुवर्णकमळासाठी निवड तो फिक्स्ड नसल्याचं सांगते, पण त्याबरोबरच बाहुबलीसारखे निकाल आपल्या मनात संशय उत्पन्न करतात. याविषयीचं माझं मत काय आहे, ते सांगतो

काही वर्षांपूर्वीपासून राष्ट्रीय पारितोषिकांनी निकाल लावताना दोन टप्प्यांमधे तो लावायला सुरुवात केली आहे, आणि ही प्रक्रिया बरीच पारदर्शक मानावी अशी आहे. प्रादेशिक जुरीचं काम हे मुख्यत: चित्रपट शाॅर्टलिस्ट करण्याचं, चाळणी लावण्याचं असतं, आणि त्याबरोबरच त्यांना आवडलेल्या चित्रपटांविषयी सूचना देण्याचंही. प्रादेशिक कमिट्या पाच असतात , पूर्व, पश्चिम, उत्तर विभागासाठी एकेक आणि दक्षिण विभागातल्या मुबलक भाषा आणि मुबलक चित्रपटांमुळे दोन . दर कमिटी पाच जणांची असते. आता विशिष्ट प्रदेशातले पाच जण असले, तर संगनमताने ते निकाल एका बाजूला वळवू शकतील, पण हे टाळण्यासाठी पाचातले तीन जण त्या विभागातले ( तेही शक्यतर भिन्नभाषिक ) असतात, तर कमिटी चेअरमनसह दोघं विभागाबाहेरचे. यांच्यातलेही अनेक मेम्बर्स हे राष्ट्रीय पातळीवर सन्मान झालेले असतात, आणि त्यांच्याकडून एका निरपेक्ष कारभाराची अपेक्षा ठेवली जाते. रिजनल कमिटीचं काम संपल्यावर, या पाच कमिट्यांचे चेअरमन हे आपापल्या कमिटीचं प्रतिनिधित्व करत मुख्य जुरीला सामील होतात. ही जुरी आता प्रादेशिक कमिटीने निवडलेले सिनेमे पहाते, त्यांच्या सूचना एेकते आणि मग विचारविनिमय करुन स्वतंत्रपणे निकाल देते. ही प्रक्रिया पाहिली तर वाटतं, की थेट दबाव आणणं अशक्य आहे. मी स्वत: २०११ मधे पूर्व विभागाच्या प्रादेशिक जुरीवर होतो आणि माझा अनुभवही हेच सांगतो. तरीही काही वेळा मतं विशिष्ट बाजूला झुकण्याची शक्यता असते, जर कमिटीतले अनेक जण विशिष्ट प्रकारच्या सिनेमासाठी काम करत असतील तर. त्यांचा स्वत:च्या कारकिर्दीचा अनुभव, आणि वैयक्तिक आवडीनिवडी, या त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमधे नैसर्गिकपणेच येणं अपेक्षित आहे. त्या तशाच ठेवूनही जुरीने त्रयस्थपणे निकाल देणं अपेक्षित आहे. पण दरवेळी तो तसा असतोच असं नाही.

हा निकाल जेव्हा जाहीर झाला तेव्हा , आणि दरवर्षीच जेव्हा तो जाहीर होतो तेव्हाहे कुठले चित्रपट ? ' , अशी विचारणा सर्वसाधारण प्रेक्षकाकडून होते आणि या निवडीने आदल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या - त्यांना स्वत:ला आवडलेल्या चित्रपटावर घोर अन्याय केल्याचं चित्र सोशल मिडीआत उभं रहातं. हे चित्र उभं करताना हे लक्षात घेतलं जात नाही की अखेर ही स्पर्धा आहे, आणि दर स्पर्धेचेच काही नियम असतात

आॅस्कर पात्रतेचा नियम असा आहे की आदल्या वर्षी जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळात जे चित्रपट लाॅस एंजेलिसमधे आठवडाभरासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित केले गेले, ते आॅस्कर पुरस्कारासाठी आपलं नाव देऊ शकतात. ( या नियमाचा आधार घेऊन दर वर्षी अनेक सटरफटर मराठी/ हिंदी चित्रपट आम्ही ओपन कॅटेगरीत निवडलो गेलो असा दावा करतात आणि पात्रता हाच विजय असल्याचं आपल्या भाबड्या प्रेक्षकांना वाटवून देतात, पण तो विषय वेगळ्या लेखाचा.इथे मुद्दा एवढाच, की आॅस्करलाही पात्रतेचा विशिष्ट नियम असतो. ) या प्रमाणेच राष्ट्रीय पुरस्काराच्या पात्रतेचा महत्वाचा नियम आहे, तो गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट हवा, असा नसून गेल्या वर्षी सेन्साॅर झालेला चित्रपट हवा , असा आहे. या नियमाला सामान्य प्रेक्षकाने विरोध करण्याचं काहीच कारण नाही, कारण हा प्रेक्षक पुरस्कार नाही. तसा जर तो असता, आणि प्रेक्षकांच्या मतावर जर विजेते घोषित होणार असते, तर चित्रपट प्रदर्शित झालेला असणं उघडच आवश्यक होतं. मात्र ' निकाल देणारी जुरी ही चित्रपट क्षेत्राशी संबंधित आणि सारे चित्रपट पाहून निकाल देत असल्याने चित्रपट प्रदर्शित झाला होता का नव्हता, याला अजिबातच महत्व नाही

दुसरी गोष्ट ही आहे, की राष्ट्रीय पुरस्कारांना शोध आहे, तो कलात्मक जाणीवा असलेल्या चित्रपटांचा. केवळ आपल्या मराठी  चित्रपटसृष्टीतच नाही, तर बहुतेक सगळ्या प्रादेशिक चित्रपटसृष्टींमधे बाॅलिवुड शैलीच्या जवळ जाणारा व्यावसायिक चित्रपट अस्तित्वात आहे, आणि प्रेक्षकांची मागणीही याच चित्रपटाला अधिक प्रमाणात आहे. मी अनेक राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या दिग्दर्शकांना याविषयी कळकळीने बोलताना एेकलेलं आहे. अनेकदा परिस्थिती अशी असते, की प्रेक्षकांच्या प्रतिसादालाच महत्व देणारे वितरक चित्रपटाचा दर्जा बाजूला टाकतात ( किंवा अनेकदा त्यांना तो कळतही नाही ) आणि त्यामुळे अनेक गुणवत्ता असलेल्या चित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठीही प्रचंड अडचणी येतात. जर राष्ट्रीय पारितोषिकांसाठीच्या पात्रतेचा नियम केवळ प्रदर्शनाशी जोडला, तर अनेक चांगले चित्रपट यासाठी पात्रच ठरु शकणार नाहीत, आणि कलात्मक निकषाचा शोध हा पूर्णच होऊ शकणार नाही. याउलट आताच्या नियमाचा एक फायदा असा आहे, की पारितोषिक मिळालेल्या चित्रपटांची नावं लोकांपर्यंत पोचतात आणि जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित होतील, तेव्हा ते पहाण्यासाठी काही एक प्रेक्षकवर्ग तयार होण्याची शक्यता वाढते. त्यांना थोड्या प्रमाणात आधार मिळतो. मात्र सध्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट, म्हणजे तो सामान्य प्रेक्षकासाठी नाहीच ही भावना इतकी खोल रुजायला लागलीय, की परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे

मागे एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मल्याळम दिग्दर्शकाशी बोलत असताना तो म्हणाला होता, की आमच्याकडे चॅनलवाले सांगतात की ,' तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय ना, मग तुमचा चित्रपट चांगला असेल पण आम्हाला नको. त्यामुळे आमच्याकडे बरेच दिग्दर्शक नॅशनल अवाॅर्ड म्हंटलं की कपाळावर हात मारतात.' आपली परिस्थिती ही त्यांच्यापेक्षा फार वेगळी नाही. आमच्या इन्वेस्टमेन्ट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर याच प्रकारची प्रतिक्रिया एका मोठ्या मराठी चॅनलकडून आली होती

काही वर्षांपूर्वी आपल्याकडे एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे वेगळ्या प्रकारचे चित्रपट करणाऱ्यांना प्रदर्शनादरम्यान फार नफा मिळाला नाही, तरी सॅटेलाईट राईट्सची काही रक्कम त्यांना ब्रेक इव्हन पाॅईन्ट पर्यंत घेऊन जायची. प्रेक्षकांची उदासीनता तर आजही आहेच, मात्र त्याबरोबरच आज चॅनल्सनीही सॅटेलाईट राईट्सचे इतके भाव पाडले आहेत की पुढल्या काळात व्यावसायिक मार्ग सोडून नवं काही सांगू पहाणारे चित्रपट करणं अशक्यच व्हावं. जेव्हा निर्मात्यांना असा वेगळा चित्रपट सपोर्ट करणच कठीण होईल , आणि तो बनणच थांबेल, तेव्हाच बहुधा आपल्याला या चित्रपटांचं महत्व कळू शकेल. आपल्याला म्हणजे प्रेक्षकांनाच.चॅनल्सना ते कळेलसं मला आजतरी वाटत नाही. ते चवीला पाच व्यावसायिक सिनेमांबरोबर एखादा वेगळा सिनेमा करत रहातीलही, पण त्यातून मराठीचं राष्ट्रीय पातळीवर आज जे नाव आहे, ते टिकून राहिलसं वाटत नाही

यावर उपाय काय, तर अगदी सोपा ! प्रेक्षकांनी निदान नजिकच्या काही वर्षात अजिबात सबबी नं सांगता सर्व प्रकारचे सिनेमा पहाणं हाच. मल्टीप्लेक्सेस काय किंवा मुव्हीचॅनल्स काय, त्यांना काही विशिष्ट चित्रपटांबद्दल वैयक्तिक वैर नाही. त्यांना मतलब आहे तो नफ्यातोट्याशी , त्यामुळे वेगळ्या सिनेमाला प्रेक्षक असेल, तर ते त्याला जरुर स्थान देतील. त्यामुळे सवाल आहे तो आपण एक प्रेक्षक म्हणून आपली मर्यादित दृष्टी, पूर्वग्रह आणि सांकेतिक अपेक्षा बाजूला ठेवून  सर्व प्रकारच्या सिनेमालाच अधिक मोकळेपणाने स्वीकारु शकतो का, हा आणि इतकाच. आपण हे करु शकतो का, यावर आपली पुढल्या राष्ट्रीय पुरस्कारांमधली कामगिरी अवलंबून राहील

गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP