विद्यार्थी आणि हिंसा

>> Monday, September 29, 2008


गोष्ट सांगणारे चित्रपट खूप असतात. प्रेक्षकांनाही बहुधा तेच पाहण्याचा सराव असतो, आणि त्यात एकदा का गुंतलं की बाहेरच्या दुनियेला तात्पुरता विसरता येतं. त्यामुळे चित्रपटाच्या वास्तव विसरायला लावणारा ड्रग म्हणून पाहणा-यांना ते सेफ वाटतात. एकदा का चित्रपटांनी सांकेतिक कथनशैली (किंवा निवेदनशैली) सोडली की मग त्यांच्याकडून अपेक्षा कोणती करायची, हे कळेनासं होतं.
कथाप्रधान नसणा-य़ा चित्रपटांमध्ये लक्ष वेधून घेणाऱा, आणि आपल्या चित्रपटांमध्ये जवळजवळ पाहायलाच न मिळणारा प्रकार म्हणजे व्यक्तिप्रधान चित्रपट. व्यक्तिप्रधान म्हणजे कुणा थोर माणासाचं चरित्र मानणारे नव्हेत.पण आपल्या चार चाैघांसारख्याच कुणा व्यक्तिरेखांकडे अधिक बारकाव्याने पाहाणारे, त्यांच्या प्रेरणांचा अर्थ लावून बघणारे,त्यांना समजून घेणारे, या चित्रपटांना सतत प्रेक्षकांना बांधून घालण्याची आणी त्यांना पुढे काय? या उत्कंठावर्धक प्रश्नाला वेसण घालण्याची गरजच भासत नसल्याने त्यांना या इतर गोष्टी करायला भरपूर वेळ असतो. अनेकदा असे चित्रपट हे नेहमीच्या करमणुकीला वाहून घेणा-या सिनेमाहून वेगळे, अधिक प्रगल्भ असतात. २००३चा मॅथ्यू यमन होगने दिग्दर्शित केलेला युनायटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड याच प्रकारात मोडतो.
हल्ली आपल्याकडे शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेली हिंसक प्रवृत्ती पाहायला मिळाली असली, तरी अमेरिका या समस्येची जन्मदात्री म्हणावी लागेल. आर्थिक सुबत्ता,वाढता एकलकोंडेपणा, स्वातंत्र्याच्या स्वैर कल्पना आणि हत्यारांची सहज उपलब्धता यामुळे इथे ही वृत्ती वाढली आहे. कोलम्बाईन शाळेत दोन मुलांनी केलेल्या गोळीबाराला या प्रकारातलं सर्वात ठळक उदाहरण म्हणून आठवावं लागेल. कोलम्बाईनचे पडसादही अनेक चित्रपटांमध्ये उमटले. मायकेल मूरचा बोलिंग फॉर कोलम्बाईन हा या प्रकरणाकडे तिरकसपणे पाहणारा गनकन्ट्रोल कायद्याबद्दलचा माहितीपट, गस व्हान सांतचा शाळेतल्या हिंसाचाराच्या उद्रेकाआधीची वीसेक मिनिटे वेगवेगळ्या विद्यार्थांच्या नजरेतून दाखविणारा एलिफन्ट (पाहा मार्च महिन्यातील या चित्रपटाची पोस्ट)
किंवा अशीच एक घटना आणि त्यापुढे पंधरा वर्षानंतरची संबंधित व्यक्तिंची आयुष्य चितारणारा वादिम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला लाईफ बिफोर हर आर्टस ही सर्व उदाहरणं आपल्या परीने लक्षवेधी आहेत.
युनाईटेड स्टेट्स ऑफ लेलन्डचा संबंध थेटपणे कोलम्बाईनशी लागू शकत नाही, जरी त्यात गुंतलेले अनेक विषय, हे त्या प्रकरणाची आठवण करून देणारे आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थी दशेतल्या लेलन्डने (रायन गोंसलिंग) वरकरणी कोणत्याही कारणाशिवाय केलेली, आपल्या मैत्रिणीच्या मतिमंद भावाची हत्या. लेलन्ड केवळ एकच खून करतो, आणि त्यामागे असलेलं तत्व हे या प्रकारच्या इतर चित्रपटांपेक्षा पुष्कळ वेगळं आहे, हे मान्य. तरीही त्यांची आठवण होणं स्वाभाविक आहे.
लेलन्ड हा हुशार,संवेदनशील आहे, जरी काहीसा विक्षिप्त, स्वतःसकट सर्वांकडे त्रयस्थपणे न गुंतता पाहाणारा,तो एका प्रसिद्ध लेखकाचा (केवीन स्पेसी) मुलगा आहे. मात्र आई-वडील विभक्त झालेले. लेलन्ड आईकडे राहतो. फ्रान्समधल्या वडिलांशी तो वर्षोनुवर्षे बोललेलादेखील नाही. गुन्हा घडण्याच्याआधीचा लेलन्ड आणि नंतरचा लेलन्ड यात फरक नाही. आपल्या हातून वाईट गोष्ट घडली हे तो समजू शकतो, पण त्याला सांकेतिक स्पष्टीकरण शोधणा-या समाजाचा उपहास त्याला कळत नाही. तुरुंगात त्याचा शिक्षक असतो होतकरू लेखक पर्ल. (ड़ॉन चिआडल) पर्ल या प्रकरणात रस घेतो, तो पुस्तकासाठी विषय मिळेल या आशेने, आणि तसा तो मिळतोही. हळूहळू लेलन्डची पर्लशी मैत्री होते, दोघे एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला लागतात. मात्र लेलन्डच्या वागण्याचं कारण मात्र पर्लला हुलकावण्या देत राहतं.
एलिफन्टसारखा चित्रपट आणि युनायटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड काही समान मुद्यांना स्पर्श करतात. पालक आणि मुलांमधला कम्युनिकेशन ब्रेकडाऊन, मुलांचं स्वतंत्र जग आणि त्यातले चढउतार अशा जागा दोन्ही ठिकाणी आहेत. मात्र दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. एलिफन्ट प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं भाष्य न करता आणि बाजू न घेता केवळ एक दिवसाचं त्रयस्थपणे चित्रण करून या घटनांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करतो. याउलट लेलन्डमध्ये त्याच प्रकारची सामाजिक परिस्थिती दिसून आली, तरी लेलन्डच्याच युक्तिवादानुसार या परिस्थितीचा त्याच्या वागण्याशी थेट संबंध लागू शकणार नाही. एलिफन्टमधली मुलं ज्याप्रकारे डिस्कनेक्ट आहेत, त्याप्रकारे लेलन्ड डिस्कनेक्ट नाही. उलट त्याची भूमिका वाजवीपेक्षा अधिक कनवाळू आहे.
अखेर परिणामाच्या दृष्टीने पाहायचं तर युनाईटेड स्टेट्स ऑफ लेलन्ड हा सर्वांवर एकसारखा परिणाम करणार नाही. वेगवेगळ्या प्रेक्षकांना त्याची वेगवेगळी बाजू आवडू शकते. किंवा नावडूही शकते. मला स्वतःला यातल्या लेलन्डपेक्षा पर्ल आणि लेलन्डच्या वडिलांच्या भूमिका पटल्या. गुन्ह्याचं स्पष्टीकरण विचार करायला लावणारं होतं. पण पूर्ण चित्रपट पेलेल या वजनाचं नव्हतं.
शिवाय चित्रपटाचा शेवटही अधिक प्रगल्भ काही न सुचल्याने सोपा मार्ग निवडल्यासारखा वाटला.
मात्र असं असूनही चित्रपट जरूर पाहण्यासारखा आहे. यातलं वर्तमान अजून आपल्यापर्यंत पूर्णपणे पोचलेलं नसलं, तरी पोचण्याच्या वाटेवर आहे. त्या वर्तमानाची ही एक नांदीच आहे म्हणा ना!
-गणेश मतकरी

Read more...

भीती,विनोद आणि समाजचित्रण

>> Friday, September 26, 2008


समाजात वाढत चाललेली कृत्रिमता,सर्वांनी आपली स्वतंत्र ओळख विसरून चाकोरीत फिरत राहणं आणि आणि आयुष्याला यंत्रवत सामोरं जाणं याचा धिक्कार फाइट क्लब या चित्रपटाने रहस्यमिश्रित थ्रिलरच्या आवरणाखाली केला, तर एडगर राइट या ब्रिटिश दिग्दर्शकाच्या शॉन ऑफ द डेड (२००४) चित्रपटाने तो, भयपट आणि विनोद यांचं बेमालूम मिश्रण बनवून केला. भीती आणि विनोद यांचं क्वचित जमलेलं दिसतं आणि स्केअरी मूव्ही मालिकेसारख्या गल्लाभरू चित्रपटात जेव्हा हे यशस्वी झाल्याचं दिसतं तेव्हा ते चुटके आणि चावट विनोद यांच्या प्रमुख आधाराभवर उभं असतं. शॉन..मध्ये असला थिल्लरपणा नाही. झोम्बीपट या भयपटांच्या उपप्रकाराचं विडंबन आणि भयपट म्हणून टिकवलेलं वेगळं अस्तित्त्व, असा त्याचा प्रकार आहे. अमेरिकन भयपटांनी लोकप्रिय केलेला भुतांचा मठ्ठात मठ्ठ प्रकार म्हणजे झोम्बी. शून्यात पाहणारे डोळे,त्राण हरवलेली चाल आणि आत्माहीन शरीर वागवणा-या या अमानवी आविष्काराला जॉर्ज रोमरोने आपल्या चित्रपटांतून मोठीच प्रसिद्धी दिली. (शॉन ऑफ द डेड) हे नावही रोमरोच्या डॉन ऑफ द डेडवरून सुचलेलं) प्रत्यक्षात झोम्बीच्या दिसण्यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही. पण त्याची लागण एखाद्या रोगाप्रमाणे पसरत असल्याने प्रचंड प्रमाणात वाढणारी संख्या,जराही न थकता आपल्या बळींचा पाठपुरावा करण्याची शक्ती आणि माणसं मारून त्यांची चव पाहण्याची आवड, हे या मंडळींचे विशेष गुणधर्म. शॉन आजच्या विक्रेता आणि गि-हाइक या दोनच संस्थांनी झपाटलेल्या समाजातल्या घटकांची तुलना या झोम्बींशी करतो आणि एक अतिशय चलाख चित्रपट आकाराला येतो.
शॉन (सायमन पेग) हा कसलीच महत्त्वाकांक्षा नसलेला एक सेल्समन. लिझ (केट अँशफिल्ड) त्यांची मैत्रिण, एड (निक फ्रॉस्ट) त्यांचा मित्र. रोज संध्याकाळी विन्चेस्टर पबमध्ये जाऊन बसण्याचा उद्योग सहन न झाल्याने शॉनशी संबंध तोडायला निघालेली लिझची समजूत कशी काढावी, हा शॉनपुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न.पण त्यांचं उत्तर मिळण्याआधीच झोम्बींची साथ सुरू होते. मेलेले उठून बसतात. जिवंत माणसांवर हल्ले करतात. एकदा का झोम्बी चावला की मग तुमचं खरं नाही. तुम्ही लवकरच त्यांच्यातले होणार. स्वतः ए़ड,लिझ आणि आपली आई (सावत्र बाप मरायला शॉनची हरकत नसते.) यांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं, अशी महत्त्वाकांक्षी योजना शॉन बनवतो. आता शहरभर पसरलेल्या या झोम्बींपासून सुरक्षित जागा कोणती? अर्थात विन्चेस्टर पब.
शॉन विनोदी असला, तरी विनोद काही एका विचारांमधून पुढे येतो आणि केवळ सतत हसवत ठेवण्याचा त्याचा हेतू नाही. सामाजिक टीकाटिप्पणी हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. एव्हर फेल्ट लाइक यू आर सराऊन्डेड बाय झोम्बीज? ही त्याची टँगलाइनसुद्धा बुद्धीभ्रष्टपणे ज्या त्या गोष्टीचं अंधानुकरण करणा-या समाजाला दिलेला टोला आहे. चित्रपट सुरू होतानाच आपल्या रोजच्या पाहण्याऐवजी समूहाला महत्त्व देणा-या आणि जाणिवेपेक्षा सवयीने गोष्ट करणा-या आजच्या जीवनपद्धतीचं उदाहरण म्हणून दाखवली जातात. नायकही यातलाच एक असल्याचंही दाखवून दिलं जातं. साहजिकच प्रत्यक्षात जेव्हा अघटिताला सुरुवात होते. तेव्हा बराच काळ शॉनच्या ते लक्षातच येत नाही. भिका-याला सुटे नाही सांगणं किंवा कोक विकत घेण्यासारख्या गोष्टी करताना आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे तो स्पष्टपणे पाहतच नाहीच, वर टीव्हीदेखील सवयीने चॅनेल बदलत राहताना त्याला खरी बातमी लक्षातच येत नाही.
सामान्य माणसाला ओळखीचे मार्ग सोडून पलीकडे पाहायचं नसतं आणि छोट्या सरावाच्या गोष्टींपायी तो अधिक महत्त्वाच्या गोष्टीही सहजपणे टाळतो, हे इथे फार गमतीदार पद्धतीने मांडलं जातं. आपल्यावर काय संकट येऊन पडलं आहे आणि त्यातून काय मार्ग काढावा, यावर विचार करतानाही शॉनचा पहिला विचार आपण आहोत तिथे बरे आहोत, हाच असतो. पुढे घरात शिरलेल्या झोम्बींना मारताना कोणती रेकॉर्ड फुटली तरी चालेल आणि कोणती आपण नेहमी ऐकतो? घराबाहेर पडताना कोणती गाडी कोणी चालवावी ? लपायला जागा शोधताना आपला नेहमीचाच पब हीच जागा कशी सर्वात योग्य आहे? असेच प्रश्न त्याला पडतात. एरवीच्या चित्रपटातल्या नायकाप्रमाणे तो जग वाचविण्याची चिंता करत नाही. आपल्या शर्टाला पडलेला डाग त्याला अधिक अस्वस्थ करतो आणि पबमध्ये अंधारात शेंगदाणे खात राहण्यापलीकडे आपल्या योजनेची मजल जात नाही, याचं त्याला दुःख वाटत नाही.
रोमरोच्या चित्रपटाचं विडंबन हा शॉनमधला महत्त्वाचा भाग असला, तरी दिग्दर्शकाला हे चित्रपट आवडत असावेत. आधी सखोल अभ्यास आणि मूळ कलाकृतीबद्दल जिव्हाळा असल्याशिवाय उत्तम विडंबन होत नाही. पण शॉन पाहण्यासाठी मात्र झोम्बीपट पाहिले पाहिजेत असं नाही. त्यातली गंमत आणि त्यामागची सबटेक्स्ट तशीही सहजपणे कळू शकेल.
-गणेश मतकरी

Read more...

गावाकडची गोष्ट

>> Wednesday, September 24, 2008


रोमँटिक कॉमेडीमध्ये नित्य पाहायला मिळणारी सिच्युएशन. तरुण-तरुणीची पहिली भेट. ती दुकानातील सेल्सगर्ल,तो बहुदा काहीतरी विकत घ्यायला आलेला. बोलण्यातून बोलणं निघतं. दोघांचे क्लोज अप्स, वाढती जवळीक दाखविणारे.अशा प्रेमळ संवादातले सगळे ओळखीचे टप्पे घेत तो तिला आपण कदाचित तिच्या जन्मांतरीचा साथी असल्याची ओळख करून देतो. तिचाही आता त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला. या प्रेमसंवादानंतर मात्र तो थांबतो.म्हणतो किंवा कदाचित असंही असेल, की मी नुसता भुरटा चोर असेन. दुकान रिकामं होण्याची वाट पाहत थांबलेला. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिच्या ध्यानात यायच्या आधीच तो फाडकन तिच्या थोबाडीत मारतो,ती कोप-यात जाऊन पडते. तोंड रक्ताळलेलं.आता लेहीफ (कॉलीन फारेल) शांतपणे कॅश रजिस्टर उघडून पैसे काढतो. आणि दुकानातून काढता पाय घेतो. रोमँटिक प्रसंगाचा आभास देत दिग्दर्शक जॉन क्रॉलीने प्रेक्षकांना गुगली टाकलेली असते.तीही चित्रपटाच्या पहिल्याच प्रसंगात.या अनपेक्षित धक्क्याने आपण गार होतो, पण चित्रपटात आणि दिग्दर्शकातही दम असल्याचं आपल्या लक्षात येतं.
इन्टरमिशन चित्रपट असा वाकड्या वळणाने सुरू होतो आणि अशी अनेक वळणे घेत सुरू राहतो. एका छोटेखानी आयरिश गावातल्या अवलियांची गोष्ट सांगत, खरं तर याला गोष्ट म्हणणंही कठीण. कारण इथे खरं तर गोष्ट थांबलेली आहे. उगाच नाही चित्रपटाचं नावच मध्यांतर आहे.
तर थांबलेली ही गोष्ट आहे जॉन (सिलिअन मर्फी) आणि त्याची मैत्रिण डायेडू (केली मॅक्डोनाल्ड) यांच्या प्रेमकथेची. दोघांमध्ये अचानक विसंवाद तयार झालेला. खरं तर जॉनच याला जबाबदार. कारण सर्व सुरळीत चालू असताना मैत्रिणीच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरता त्यानेच मध्ये ब्रेक घेण्याची कल्पना काढली. हेतू हा की तिने नको म्हणावं. झालं मात्र उलटच. ती एका विवाहित बँकरबरोबर संबंध ठेवती झाली आणि जॉन बसला आपल्या नशिबाला दोष देत. इन्टरमिशनचा कालावधी हा साधारण या लव्ह स्टोरीच्या इन्टरमिशन एवढा आहे.मात्र ही कल्पना केवळ दोन व्यक्तीरेखांपुरती मर्यादित नाही. चित्रपटात किमान दहा बारा प्रमुख पात्रं आहेत.आणि त्या सर्वांची स्थिती कमी अधिक प्रमाणात या दोघांसारखीच आहे. त्यांचा जीवन प्रवाह थंड पडलेला आहे, आणि तो पुढे सरकण्याची ते वाट पाहताहेत.
यात सेक्स लाईफ बिकट परिस्थितीत असलेला जॉनचा मित्र आँस्कर (डेव्हिड विल्मॉट) आहे, प्रेमभंगानंतर कोषात गेलेली डायडूची मिशीवाली बहीण सॅली (शर्ली हॅन्डरसन) आहे. रिऍलिटी शोसाठी विषय शोधून थकलेला टीव्ही निर्माता आहे, आणि स्वतःला स्टार मटेरियल समजणारा पोलीस जेरी (कोम मीनी) आहे. पहिल्याच प्रसंगात आपला हिसका दाखविणारा लेहीफ तर आहेच आहे. छोट्याशा गावात जसे सगळे एकमेकांना ओळखतात, तसा यातला प्रत्येक जण दुस-याला ओळखतो. गोष्टी सुट्या रहातच नाहीत. सर्वांची मिळून एक गोष्ट होते.
इन्टरमिशन हे रसायन नक्की कशामुळे यशस्वी होतं हे सांगणं कठीण आहे. कारण दर्जाहीन चित्रपटांमध्ये शोभण्यासारख्या अनेक प्रसंगांना यातली पात्र सामोरी जातात. अश्लील आणि हिंसक प्रसंगांची इथे कमी नाही. मात्र या सगळ्यात गल्लाभरूपणा कुठेच दिसत नाही. पहिली काही मिनिटं बिचकण्यात गेली की हळूहळू आपली या मंडळींशी ओळख व्हायला लागते. अन् शेवटापर्यंत तर बहुतेकांशी चांगली मैत्री होते. पल्प फिक्शन किंवा ट्रेनस्पॉटिंग या दोन्ही चित्रपटांशी इन्टरमिशनची तुलना होणं स्वाभाविक आहे. अनेक पात्रांच्या आयुष्याचा कोलाज असल्यासारखं कथानक,ब्लॅक ह्यूमर,पात्रांमधल्या नकारात्मक छटा, गुन्हेगारीचं खुलं चित्रण या सर्व विशेषांना इथे स्थान आहे. तरीही ते दोघे आणि हा, यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे त्या दोन चित्रपटांकडे आपण स्मार्ट/स्टायलिश म्हणून पाहतो. मात्र त्यातल्या कोणत्याही पात्राबरोबर समरस होत नाही, ती खोटी आहेत हे आपल्याला जाणवत राहतं. इन्टरमिशन मध्ये अशी सांगून सवरून केलेली हुशारी नाही. पटकथेवर आणि दिग्दर्शनात केलेलं काम अदृश्य आहे. आपल्या हुशारीकडे ते लक्ष वेधताना दिसत नाही.
ओघवत्या कथेत घटना सुचत जाणं स्वाभाविक असतं. मात्र इथल्या घटना या ओघाचा अभाव दाखविण्यासाठी रचलेल्या आहेत, आणि तरीही त्यात पुनरावृत्ती येत नाही. किंवा कंटाळाही. दिग्दर्शकाचा तर हा प्रथम प्रयत्न असल्याचं सांगूनही खरं वाटू नये. अर्थात हा दिग्दर्शक पूर्ण नवखा नाही. रंगभूमीचा चिकार आणि टीव्हीचा थोडा अनुभव त्याच्या गाठीला तेव्हाही होता. तरीही या प्रकारची गुंतागुत आणि त्यातून साधणारा एकसंघ परिणाम हे सराईत दिग्दर्शकालाही कठीणच. अर्थात काहीवेळा सराईत नसणं हेच कामगिरी अधिक उत्स्फुर्त, अधिक लोकांपर्यंत पोचणारी व्हायला कारणीभूत होऊ शकतं. इथे तसंच झालं असणं सहज शक्य आहे.
-गणेश मतकरी

Read more...

शहरी समाज आणि दहशत

>> Sunday, September 21, 2008


"मुंबई मेरी जान' हा ११ जुलैला मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा चित्रपट. शहरी समाज आणि दहशतवाद, एकूणच आजूबाजूचं स्फोटक, असुरक्षित वातावरण याची मांडणी या चित्रपटात आढळते. अर्थात असं असलं तरी हा चित्रपट नकारात्मक नाही. मुंबईनं या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी उचललेलं पाऊल याकडे लक्ष वेधणारा सकारात्मक सूर इथं आहे. एक स्तुत्य प्रयत्न असंच या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. .......

बऱ्याचदा असं होतं, की एखादी हिंसक घटना ही ज्याप्रमाणे सामान्य माणसांना हादरवून सोडते, तशी फिल्ममेकर्सनादेखील. मग ही घटना घडल्यावर नजीकच्या काळात तिच्याकडे एक विषय म्हणून पाहण्यापेक्षा ते ती विसरून जाण्याच्या मागे लागतात. याला प्रामुख्यानं दोन कारणं संभवतात. पहिलं म्हणजे त्या घटनेची प्रॉक्‍झिमिटी. या घटनेच्या, त्या स्थलकालाच्या, संबंधित व्यक्तींच्या ते इतके जवळ असतात, की चित्रपट बांधण्यासाठी जो त्रयस्थपणा लागतो, तो त्यांना मिळू शकत नाही. दुसरं कारण असतं ते या माध्यमांचं व्यावसायिक स्वरूप. चित्रपट चालायचा, तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आवश्‍यक आहे आणि बहुधा अशा घटनेनंतर प्रेक्षकाचं घटनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेलं असणं त्यांना त्या विषयावरच्या चित्रपटाकडे आणणार नाही, तर बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे अधिक पलायनवादी करमणुकीकडे घेऊन जाईल, अशी शक्‍यता असते. या दोन्ही कारणांमुळे घटनांना प्रामाणिक स्वरूपात मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही एक काळ जावा लागतो. आश्‍चर्य म्हणजे युद्धासारख्या घटना या अधिक मोठ्या प्रमाणात हिंसेशी संबंधित असूनही त्या सामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत नसल्यानं पडद्यावर लवकर स्वीकारल्या जाऊ शकतात; मात्र रोजच्या आयुष्यात असं काही घडलं तर मात्र ते पडद्यावर पाहणं सोपं ठरत नाही.
याचं सर्वांत मोठं उदाहरण आपल्याला अमेरिकन चित्रपटात मिळू शकतं. २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर हॉलिवूड झपाट्यानं आपल्या चित्रपटातून "वर्ल्ड ट्रेड सेंटर', "विमानतळ' आणि "दहशतवाद' पुसून टाकायला लागलं. "कोलॅटस्प डॅमेज'सारखे दहशतवादी कारवाया असणारे चित्रपट प्रदर्शित न करता पुढे ढकलण्यात आले, नव्या चित्रपटांच्या पटकथा बदलण्यात आल्या. "स्पायडरमॅन'सारख्या चित्रपटाची पूर्ण पब्लिसिटी कॅम्पेन बदलण्यात आली, कारण त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरचा वापर होता. कालांतरानं मात्र चित्रकर्ते अधिक धीट झाले, प्रेक्षकही आपल्या जखमा विसरून वर्तमानाला सामोरं जाण्याच्या तयारीला लागले. २००६ मध्ये ९/११ च्या घटनांना सरळपणे पडद्यावर आणणारे दोन चित्रपट आले आणि त्यांनी उत्तम प्रतिसाद मिळवला. पॉल ग्रीनग्रासचा "युनायटेड ९३' हा हल्ल्यासाठी पळवण्यात आलेल्या; पण प्रवाशांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्यानं हत्यार म्हणून वापरण्यात न येऊ शकलेल्या विमानाच्या अखेरच्या प्रवासाला चित्रित करणारा होता, तर ऑलिव्हर स्टोनचा "वर्ल्ड ट्रेंड सेंटर' प्रत्यक्ष घटनेविषयीच होता. या चित्रपटांचं स्वीकारलं जाणं हे काळानं जखमांवर फुंकर घातल्याचं लक्षण आहे.
हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्या नावात जरी बेतीव साम्य असलं तरी फॉर्म्युला चित्रपटांचं प्रमाण हे आपल्याकडे अधिक आहे, हे आपण जाणतोच. हॉलिवूडमध्येही फॉर्म्युला चित्रपट असले तरी त्यामध्ये असणारी विविधता, फॉर्म्युला मोडणारे अन्‌ अधिक गंभीर आशय मांडणारे चित्रपट अन्‌ जवळच असलेलं इंडिपेंडंट सिनेमाचं वास्तव्य, यामुळे अमेरिकन सिनेमा हा आपल्यापेक्षा अधिक धाडसानं निर्मिती करतो. आपला धंदा हा जवळजवळ पूर्णपणे पलायनवादी असल्यानं त्यात अधूनमधून डोकावणारे प्रामाणिक प्रयोग अधिक ठळकपणे लक्षात येतात. दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेवर आधारित निशिकांत कामतचा "मुंबई मेरी जान'देखील असाच उठून वेगळा दिसतो.
२००४ मध्ये जेव्हा अनुराग कश्‍यपचा "ब्लॅक फ्रायडे' आला होता, तेव्हा मला एक गोष्ट खटकली होती. १९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोट मालिकेवर त्याचं आधारित असणं आणि नावातल्या "ब्लॅक'वरून माझी कल्पना झाली होती की तो मुंबईच्या भावनिक धक्‍क्‍यालाही प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न करेल; प्रत्यक्षात मात्र तो होता केवळ "पोलिस प्रोसिजरल' प्रकारचा चित्रपट, म्हणजे गुन्हेगार आणि मागावरचे पोलिस यांनाच प्राधान्य देणारा. अर्थात हादेखील एक रास्त चित्रप्रकार आहे. मात्र त्यामुळे घटनेच्या एका अंगाकडे चित्रपटाचं पूर्ण दुर्लक्ष झालं, हेदेखील तितकंच खरं. या दुर्लक्षित बाजूला "मुंबई मेरी जान'पुढे आणतो. त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांपैकी दोन पोलिसांतल्या असूनही चित्रपट प्रत्यक्ष तपासाला गाळून टाकतो अन्‌ मुंबईला बसलेला धक्का अन्‌ त्यातून सावरण्यासाठी तिनं उचललेलं पहिलं पाऊल यावरच आपलं लक्ष केंद्रित करतो.
निशिकांतच्या "डोंबिवली फास्ट'मध्ये "मुंबई मेरी जान'मध्ये असणारे काही घटक जरूर पाहायला मिळाले होते. ट्रेनचं मुंबईशी असणारं घट्ट नातं, शहरी समाजाचे विविध पैलू आणि हिंसा ही तिन्ही सूत्रं तिथं कमी-अधिक प्रमाणात होती. मात्र त्या पलीकडे जाऊन या दोन्ही चित्रपटांत काही साम्य नाही, निदान आशयाच्या दृष्टीनं. उलट तिथला काहीसा बोचरा नकारात्मक सूर इथं अधिक सकारात्मक झाल्याचं दिसून येतं.
म्हणून आपल्याकडे ७/११ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या लोकल्समध्ये घडवण्यात आलेल्या बॉंबस्फोट मालिकेकडे "मुंबई मेरी जान' पाच वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहतो. या प्रकारच्या घटनेचा उगम असणारं हिंदू-मुस्लिम वैर, घटनेनं स्कॅनरखाली येणारे पोलिस, घटनेचा कधी योग्य, तर कधी गैरवापर करणारी मीडिया, अन्‌ समाजाची दोन टोकं, म्हणजे झोपड्यांत राहणारा मुंबईकर आणि परदेशी जाण्याला केवळ तात्त्विक विरोध असणारा श्रीमंती इन्टेलिजन्शीआ ही इथली पाच प्रातिनिधिक कथासूत्रं.
चित्रपट नमनाला घडाभर तेल घालत नाही आणि थोडक्‍या प्रस्तावनेनंतर लगेचच स्फोट घडवून आणून मूळ विषयाकडे वळतो. स्फोटानंतर आपल्याला आधी भेटलेल्या व्यक्तिरेखा अधिक स्पष्ट व्हायला लागतात आणि चित्रपटाची दिशादेखील. आठवड्याभरात निवृत्त होणारा एएसआय तुकाराम पाटील (परेश रावल) आणि त्याचा तरुण चेला (विजय मौर्य) यांची गोष्ट, हे इथलं सर्वांत महत्त्वाचं कथानक. पाटील हा जवळजवळ सूत्रधार आणि चित्रपटाचं कथानकही त्याच्या निवृत्तीबरोबर संपणारं. (ही जोडी बहुधा फिन्चरच्या "सेव्हन'मधल्या मॉर्गन फ्रीमन/ ब्रॅड पिट जोडीची दूरची नातलग असावी. तिथल्या फ्रीमनच्या निवृत्तीच्या अखेरच्या सात दिवसांतच कथानक घडणं, हा योगायोग नसावा) पाटील हा भ्रष्ट आहे; मात्र स्वतःच्या भ्रष्ट असण्याची त्याला खंत आहे. त्याला आशा आहे ती त्याच्या चेल्यासारख्या तरुणांकडून, ज्यांच्यात उसळणारा राग हा कदाचित सिस्टिममध्ये काही बदल घडवून आणू शकेल. मीडियाची प्रतिनिधी आहे रूपाली (सोहा अली खान, सुधारित आवृत्ती) जिच्या प्रियकराचा मृत्यू तिला आपल्या भूमिकेबद्दलच साशंक करून सोडतो. मुस्लिमद्वेष्टा सुरेश (के.के.) आणि त्याचं मित्रमंडळ एका संशयिताच्या मागावर आहे. सुरेशची या संशयिताच्या आईशी झालेली भेट हा इथला एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग. थॉमस (इरफान) चहावाला आणि निखिल (माधवन) हा मुंबईतल्या असुरक्षिततेला कंटाळून परदेशी जाण्याचा विचार करणारा बुद्धिजीवी, ही दोन्ही कथानकं त्यातल्या त्यात कमी डेव्हलप होणारी. थॉमसचं कथानक तर मला चित्रपटाच्या इतर बाजूंशी फटक्‌न वागणारं वाटलं, तर निखिलचं योग्य मार्गावरलं, पण इतरांच्या तुलनेत मागे पडणारं.
"मुंबई मेरी जान'मधली चांगली गोष्ट ही, की तो कथानकांना पूर्णपणे वेगळं ठेवूनही केवळ थीमॅटिक पातळीवर त्यांची सांगड घालू शकतो. सर्व पात्रांच्या आयुष्याकडे पाहत त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या तपशिलांना जिवंत करू शकतो. तो सोपी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत नाही. अर्थात, जेव्हा तो सोपी उत्तरं शोधत नाही, असं आपण म्हणतो, तेव्हा तो खूप स्वतंत्र विचार करतो, असं मात्र नाही. कारण यातल्या प्रत्येक एपिसोडचा शेवट हा त्या मानानं ओळखीचा आणि अंदाज बांधण्याजोगा आहे. चित्रपट हा मध्यंतरापर्यंत चढता आणि विशिष्ट आलेख असणारा आहे. पुढे मात्र त्याचं काय करायचं हे ठरत नाही, आणि पुनरावृत्ती वाढत जाते. अपवाद पाटील आणि सुरेशच्या गोष्टीचा. त्यांना पुरेसा आकार आहे.

चित्रपटाचा शेवट सकारात्मक करण्यानं ज्याला त्यातली एक गोष्ट गमवावी किंवा अंडरप्ले करावी लागते, ती म्हणजे त्यात येऊ पाहणारं (खास करून निखिलच्या कथानकात) खरोखरच्या असुरक्षिततेचं, दहशतीचं वातावरण. ही असुरक्षितता केवळ निखिल या व्यक्तिरेखेच्या डोक्‍यातली नाही, ती प्रत्यक्ष आहे. आजही मुंबईतले अनेक जण प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहतात. वातावरणातला बदल खराच नाही, तर गरजेचाही आहे. अनेकांचं आयुष्य हे या सावधपणावर अवलंबून आहे. शेवटामुळे हे वातावरण काहीसं विसरलं जातं, मागे पडतं. मुंबईकरांचं कौतुक करणं हे योग्यच आहे; पण त्यासाठी या चित्रणातला तीव्रपणा बोथट करण्याची गरज नाही.
निशिकांत कामतच्या दिग्दर्शनातली सफाई "ंडोंबिवली फास्ट'च्या वेळीच लक्षात आली होती. इथंही ती तितक्‍याच प्रकर्षानं जाणवते. मात्र आता ती मराठी चित्रपटाकडे वळणं कठीण, ही एक दुर्दैवाची बाब.
यू.टीव्ही ही आजच्या सर्वांत महत्त्वाच्या चित्रनिर्मिती संस्थांमधली एक आहे. दर्जामध्ये तडजोड न करता ती प्रथितयश तसंच नवशिक्‍या, बिग बजेट तसंच लो बजेट चित्रपटांमध्ये सारख्याच प्रकारे गुंतलेली दिसते. मुंबई बॉंबस्फोटांवर आधारलेले त्यांचे दोन चित्रपट "आमीर' आणि "मुंबई मेरी जान' नुकतेच आले आहेत, तर "वेनस्डे' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. एका निर्मिती संस्थेच्या डोक्‍यातून आलेली ही चित्रत्रयी म्हणावी का? असल्यास हा एक स्तुत्य प्रयत्न म्हणावा लागेल- व्यावसायिक गणितात न सापडता, डोळे उघडे ठेवून वर्तमानाकडे पाहण्याचा.

- गणेश मतकरी

Read more...

सिरीआना

>> Monday, September 15, 2008


आपला देश हा एक "मर्यादित लोकशाही असलेला देश आहे' असं म्हणावसं वाटतं ते इथल्या कलाविष्कारांवर पडणाऱ्या बंधनांमधून. काही प्रमाणात साहित्यकृती सोडल्या तर इतर सर्वच कलाप्रकार म्हणजे नाटकं, चित्रपट, चित्रकला वगैरेंना आपली मतं मांडताना नको इतकं सावध रहावं लागतं. धर्म, जात, राजकीय पक्ष, सरकारी यंत्रणा यातलं कोणीही कशावरही आक्षेप घेऊ शकतं आणि अशा वेळी या तथाकथित आविष्कार स्वातंत्र्य असलेल्या कलाकाराला वाचवण्यासाठी आपली लोकशाही बिलकूल पुढे सरसावत नाही. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, हे बहुधा कोणाला माहीत तरी नसावं किंवा आपल्या संपूर्ण समाजानेच हे एक पुस्तकी विधान मानून त्याकडे दुर्लक्ष केलं असावं. "रंग दे बसंती'ला पास करताना सेन्सॉर बोर्डाने सैन्यातल्या अधिकाऱ्यांना पाचारण करणं हे झालं यातलंच एक उदाहरण. पण गेली अनेक वर्षं आपल्याकडे अनेक गोष्टींना अनेक पातळ्यांवर विरोध होतो आहे. शेवटी तो कलाविष्कार आहे. चला तर पाहा, नाही तर सोडून द्या, असं म्हणणं जणू आपल्या रक्तातच नाही.
अमेरिकेसारख्या देशाच्या कलाविष्काराकडे पाहण्याच्या उदार धोरणाचं महत्त्व पटतं ते अशा वेळी. मायकेल मूर ने त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात केलेला ...फॅरेनाईट आणि तेलाच्या राजकारणावर एक पटेलशी थिअरी सादर करणारा "सिरीआना' हे केवळ त्यांच्यासारख्या देशातच होऊ शकतात. अर्थात ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेसचं धोरण मात्र फारसं उदात्त नसल्याने ऑस्कर नामांकनात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी या दोघांचाही विचार झाला नाही. फॅरेनाईटचा.... होण्याची गरजही नव्हती. मात्र सिरीआन या नामांकनात जरूर चालला असता. तो अगदीच दुर्लक्षित वाटू नये म्हणून सहायक भूमिकेतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक जॉर्ज क्लूनीला दिलं गेलं.
"सिरिआना' हा काही वर्षांपूर्वी ऑस्कर मिळवणाऱ्या "ट्रॅफिक' चित्रपटाच्या लेखकाने लिहिलाय आणि दिग्दर्शनही केलाय. ज्यांनी ट्रॅफिक पाहिलाय, त्यांना यातला गोष्ट सांगण्याचा प्रकार ओळखीचा वाटेल. अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित "ट्रॅफिक'मध्येही तीन-चार सुट्या गोष्टी होत्या, ज्या कधी एकमेकांशी थेट जोडल्या जात, तर कधी नाही. मात्र या सर्व घटकांना जोडून ड्रग ट्रॅफिकिंगचं संपूर्ण चित्र उभं करण्यात चित्रपट यशस्वी ठरला होता.
इथला विषय आहे जागतिक राजकारण. आपल्याला या राजकारणाच्या सुट्या सुट्या बाजू दिसतात; मात्र या सर्व एकमेकांशी संबंधित आहेत अथवा नाहीत हे स्पष्ट होत नाही. गल्फमधली तेलाचा साठा असणारी राष्ट्रं आणि अमेरिकेचे त्यांच्याशी असलेले राजकीय संबंध, तेल विकत घेणाऱ्या अमेरिकन ऑईल कंपन्या, अमेरिकेत हेरखात्यांनी चालवलेला दहशतवाद्यांचा शोध, अरब दहशतवाद्यांच्या कारवाया या सर्वांना एकत्र जोडणारा धागा शोधण्याचा सिरीआनाचा प्रयत्न आहे. या सर्व जागतिक घडामोडींना एकत्र आणणारा मोठा कॅनव्हास हे सिरीआनाचं वैशिष्ट्य आहे. पण त्यामुळे एरवीच्या हॉलिवूड फिल्म पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट थोडा जड जाण्याची शक्यता आहे. उघड करमणुकीपेक्षा एखाद्या बातमीचा पाठपुरावा केल्याचा सिरीआनाचा रोख आहे. आणि आपणही तो तितक्याच गंभीरपणे पाहावा अशी अपेक्षा आहे. त्यातले सर्व तपशील कळण्याची गरज नाही, पण मूळ धाग्याकडे दुर्लक्ष झालं तर प्रभाव निश्चितच कमी वाटेल.
सिरीआना 100 टक्के सत्य सांगितल्याचा आव आणत नाही. रॉबर्ट बेट यांच्या "सी नो इव्हिल ः द ट्रू स्टोरी ऑफ ए ग्राऊंड सोल्जर इन द सीआयएज वॉर ऑन टेररिझम' या पुस्तकाने प्रेरीत आहे, पण त्यावर आधारित नाही. मात्र तो सत्याच्या जवळ असावा हे जाणवतं. त्याचं कथानक चार तुकड्यांत विभागलं आहे आणि हे चारही तुकडे केवळ शेवटच्या काही वेळात एकमेकांशी सांधले जातात.
पहिला आहे बॉब बार्नसच्या बाल्फमधल्या कारवायांचा कथाभाग. बॉब सी.आय.ए.चा माणूस आहे. उघड न सांगण्याजोग्या गुप्त कामगिऱ्या त्याच्यावर सोपवल्या जातात. अशातच एक कामगिरी फसते आणि त्याच्यावरच उलटते. या परिस्थितीत त्याला मदत करायचं बाजूला ठेवून सरकार त्यालाच बळीचा बकरा करतं.
दुसरा भाग आहे दोन अमेरिकन ऑईल कंपन्यांच्या मर्जरचा आणि संबंधित राजकारणाचा. तिसऱ्या भागात गोष्ट आहे ती नासिर या गल्फमधल्याच एका राजपुत्राची. त्याला तेलाचा पैसा वापरायचा आहे तो आपल्या देशात सुधारणा करण्यासाठी. मात्र नासिरची दूरदृष्टी अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी नाही. म्हणून ते नासीरला डावलून त्याच्या मूर्ख धाकट्या भावाला राज्यावर आणण्याची योजना आखतात.
आणि चौथ्या भागात आहेत ते दोन बेकार. (म्हणजे नोकरी नसलेले या अर्थी) पाकिस्तानी, ज्यांना अरब देशातच राहायचंय. मिळणाऱ्या कटू वागणुकीने हे निराश होतात आणि अखेर सहानुभूती मिळेल तिथे आसरा घेतात.
काही चित्रपटांचा भर हा करमणुकीवर नसून आशयाच्या गांभीर्यावर असतो. सिरीआना अशातलाच एक आहे. मुलांना तर तो समजण्याची फारच कमी शक्यता असल्याने प्रौढ आणि विचार करणारा प्रेक्षक ही त्याची गरज आहे.
- गणेश मतकरी

Read more...

भडक, सुमार आणि बाळबोध गॉड तुस्सी ग्रेट हो

>> Thursday, September 11, 2008


आपल्याकडे रुमी जाफ्री या लेखक दिग्दर्शकाने "गॉड तुस्सी ग्रेट हो' या नावाने "ब्रूस ऑलमायटी'ची भेसळ करून केलेली रूपांतरित नक्कल सध्या चित्रपटगृहात सुरू आहे. रूपांतर करताना काय गोष्टी करू नयेत, याचे अनेक धडे या चित्रपटातून घेण्यासारखे आहेत. .......
मध्यंतरीचा काळ हा आपल्याकडल्या हिंदी चित्रपटासाठी चांगला काळ होता. "रंग दे बसंती'सारखे स्वतंत्र म्हणण्याजोगे चित्रपट येत होते, त्याचबरोबर आपल्या अतिशय आवडत्या "इन्स्पायर्ड बाय' या वर्गात बसणाऱ्या चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ- मुन्नाभाई मालिका) किंवा रिमेक प्रांतातही (उदाहरणार्थ- डॉन) बऱ्यापैकी प्रायोगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांचा मेळ दिसून आला. डेव्हिड धवन/ प्रियदर्शन वगैरे मंडळींची विनोदाची लाट या सर्वांना समांतर असल्यासारखी सुरूच होती; पण या लाटेचं पाणी नाकातोंडात जाऊन बुडण्याची पाळी तरी प्रेक्षकांवर आली नव्हती. मात्र या वर्षाच्या सुरवातीपासूनच परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होण्याची चिन्हं आहेत. भडक आणि सुमार विनोद, इन्स्पिरेशनच्या नावाखाली काढलेल्या वाईट कॉप्या आणि बाळबोध पटकथांचे तितकेच बाळबोध आविष्कार पडद्यावर येण्यासाठी रांगा लावून आहेत. चोप्रा किंवा वर्मांसारख्या एके काळच्या यशस्वी कॅम्पांनीही नकारात्मक सूर लावला आहे आणि आमिर खानसारखे काही निर्माते-दिग्दर्शक दर्जेदार निर्मितीमागं असले तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे.

आता खरं सांगायचं तर २००३ च्या "ब्रूस ऑलमायटी' चित्रपटाचं रूपांतर वाईट होण्याची काहीच गरज नाही. आता हा चित्रपट मुळातच फार लोकप्रिय अन्‌ आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पाहिला गेला असल्यानं, एकूणच ते करावं का नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण करायचं झाल्यास ते चांगलं का होऊ शकत नाही, याला पटण्यासारखं स्पष्टीकरण नाही. "जिम कॅरी'चे चित्रपट हे खासकरून त्याच्या प्रतिमेला न्याय देत लिहिले जातात आणि "ब्रूस' त्याला अपवाद नाही. अर्थातच पटकथा त्याच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, हेदेखील आलंच. मात्र असं असूनही ही पटकथा छोटेखानी आणि बंदिस्त आहे. जिम कॅरीला वेडाचार करण्यासाठी ती वाव देते; मात्र त्यासाठी महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांना बगल देत नाही. तिची रचनाही स्पष्ट आहे. ब्रूसला सतत असणारी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना अन्‌ त्यासाठी त्यानं देवाला जबाबदार धरणं, देवानं ब्रूसला आपल्या शक्ती बहाल करणं, ब्रूसला आधी वाटणारी गंमत, मग त्यानं निष्काळजीपणे स्वतःच्या फायद्यासाठी या शक्तींचा वापर करणं, पुढे इतरांच्या भल्यासाठी केलेल्या गोष्टींचाही उलटा परिणाम होणं, आणि अखेर आपली चूक ब्रूसला उमगणं, या पटकथेचं लक्षात येण्यासारखे टप्पे होते, आणि प्रत्येक टप्पा हा आधीच्याहून चढत जाईल, अशी मांडणी होती.

आपल्याकडे रुमी जाफ्री या लेखक-दिग्दर्शकानं "गॉड तुस्सी ग्रेट हो' या नावानं "ब्रूस ऑलमायटी'चं केलेलं भजं, सध्या चित्रपटगृहात लागलेलं आहे. रूपांतर करताना काय गोष्टी करू नयेत याचे अनेक धडे या चित्रपटातून घेण्यासारखे आहेत. त्यातले काही पुढीलप्रमाणे-

धडा १ -
"एखादी गोष्ट बिघडली नसल्यास ती दुरुस्त करण्याच्या फंदात पडू नये' या अर्थाचा एक वाक्‍प्रचार इंग्रजीत आहे आणि आपल्याकडल्या सर्व रूपांतरकारांना तो घोकून पाठ करण्याची गरज आहे. मूळ पटकथेची प्रमाणबद्धता आणि आकार हा विषयाचा अवाका किती वाढवावा याचा अंदाज घेऊन बांधण्यात आला आहे. कारण नसताना त्याच्या आकाराला धक्का देण्याची मुळातच गरज नाही. "ब्रूस'मध्ये आपण कथा सुरवातीला त्रयस्थपणे पाहतो अन्‌ हळूहळू नायकाच्या दृष्टिकोनाशी एकरूप होत जातो. त्यातल्या विनोदाचा प्रकारही आपल्या लक्षात यायला लागतो. "गॉड'मध्ये कथेला प्रास्ताविक देतो तो देव स्वतः- तेही ग्रहताऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर. देव आपल्याला नायक अरुण प्रजापतीच्या (सलमान) नाराज असण्याची कल्पना देतो. म्हणजे प्रजापतीची भावना ही त्याच्यावर ओढवणाऱ्या प्रसंगातून स्पष्ट न होता निवेदनातून होते, अन्‌ पुढे मध्यंतरापर्यंत हॅमर केली जाते. प्रजापतीला शक्ती मिळण्यात अर्धा चित्रपट खर्ची पडतो, तर उरलेल्याचा पाऊण भाग त्याच्या स्वार्थीपणावर. मग शेवटाकडे चटकन उरलेले टप्पे उरकले जातात, अन्‌ देव पुन्हा प्रेक्षकांना मार्गदर्शन करायला अवतरतो.

ज्याप्रमाणे मला कथानकांच्या टप्प्यांच्या विभागणीमधला कमी जास्तपणा खटकतो, तसाच ज्या त्या गोष्टींना शब्दांतून मांडण्यातला ढिसाळपणाही. इथली सर्व पात्रं आपण काय करणार आहोत याविषयी बोलतात; नंतर प्रत्यक्ष प्रसंग घडतो. आपल्या चुकाही ती बोलून दाखवतात. देव प्रत्यक्ष संदेश देतो. ही सर्व अनावश्‍यक बडबड कशाला? प्रत्यक्ष प्रसंगातून जर एखादी गोष्ट कळत नसेल, तर तो पटकथेचा दोष आहे. ती संवादातून मांडण्यानं तो लपणार नाही.

धडा २ -
प्रत्येक पटकथेचा स्वतःचा सूर असतो, शैली असते. जेव्हा चित्रकर्त्यांना एखादा चित्रपट आवडतो, अन्‌ तो आपल्याकडे आणावासा वाटतो, तेव्हा त्यांना हा सूर आवडलेला असतो. मग तो जसाच्या तसा ठेवण्यातच रूपांतरित चित्रपटाचं यश आहे, हे उघड आहे. जिम कॅरीच्या चित्रपटाला संयत म्हणणं, हे तसं धाडसी विधान आहे; पण दोन चित्रपटांची तुलना करता हेच सत्य आहे. "ब्रूस'चा विनोद हा पटकथेला अनुरूप आहे, अन्‌ तिथं उपस्थित होणाऱ्या मुद्‌द्‌यांना अधोरेखित करणारा आहे. "गॉड'चा विनोद हा स्वतंत्र ट्रॅकवर जाणारा अन्‌ चित्रकर्त्यांच्या दृष्टीनं प्रेक्षकांना काय आवडेल याचे रॅंडम अंदाज बांधणारा आहे. उदाहरणार्थ शक्ती मिळाल्यावर टीव्ही अँकरचं काम करणारा ब्रूस आपल्या अँकरपणाला वाव मिळेल अशाच रीतीनं एका बातमीचं रिपोर्टिंग करून आपली नोकरी परत मिळवतो अन्‌ भरपूर प्रसिद्धीही. प्रसंगातला विनोद येतो, तो पोलिस कुत्र्यांनी "जिमी हॉफा'च्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासारख्या ऍब्सर्डिटीमधून, जी मुळात ब्रूसच्या व्यवसायाशी अन्‌ या व्यावसायिकांच्या "सनसनीखेज' बातम्यांच्या सतत शोधात असण्याशी संबंधित आहे. "गॉड तुस्सी'मधला प्रजापती जेव्हा शक्ती मिळवतो, तेव्हा मुलांना दहशतवाद्यांकडून सोडवण्यासारखी सांकेतिक धाडसी कामगिरी तो करतो, जी प्रत्यक्षात प्रजापतीच्या व्यक्तिरेखेबरोबर जात नाही. शिवाय इथला विनोद येतो तो मुलांनी आकाशात उडून गुंडांना मारण्यासारख्या जुन्यापुराण्या स्पेशल इफेक्‍ट्‌समधून. "मिस्टर इंडिया'च्या काळातला विनोद आजही प्रेक्षकाला हवा आहे का? चित्रकर्त्यांना काही नवीन सुचत नाही का?

धडा ३ -
व्यक्तिरेखांना मिळणाऱ्या महत्त्वाचा अन्‌ त्यांच्या भूमिकांच्या लांबीचा काही एक विचार यशस्वी पटकथांमध्ये केलेला असतो. "ब्रूस ऑलमायटी'मध्येही तो आहे. रूपांतरांमध्ये तो बदलणं शक्‍य असतं; पण त्याला तितकंच महत्त्वाचं कारण असण्याची गरज असते. केवळ नायिकेला अमुक गाणी हवीत किंवा दुय्यम भूमिकेतला सोहेल खान, सलमानचा भाऊ असल्यानं त्याची भूमिका वाढवायला हवी, हे पटकथेच्या दृष्टीनं मूर्खपणाचं आहे. "ब्रूस'मधला देव मॉर्गन फ्रीमननं अत्यंत साधेपणानं उभा केला आहे, अन्‌ दृश्‍य भागांमध्ये पटकथा त्यातल्या साधेपणालाच अधिक ठसवण्याचा प्रयत्न करते. रिकाम्या इमारतीतला जेनीटर (जेनीटरला मराठीत योग्य प्रतिशब्द असलाच तर मला माहीत नाही) म्हणून जमीन पुसताना देव तेथे पहिल्यांदा दिसतो. जेनीटरच्याच गणवेषात पुढे सूट घालूनही त्याचा नम्रपणा कमी होत नाही. त्याचे चमत्कार हे फायलिंग कॅबिनेटच्या ड्रॉवरची लांबी वाढवण्याइतके अन्‌ ब्रूसने मागे धरलेली बोटं किती आहेत, हे ओळखण्याइतके सोपे असतात. "गॉड तुस्सी..' मधला देव प्रजापतीला हॉटेलमध्ये बोलवण्याइतपत कल्पना "ब्रूस'मधून (किंवा त्याहून पूर्वीच्या "ओह गॉड'मधून) उचलतो; पण देवाला समोर आणण्यासाठी या हॉटेल रूमचं रूपांतर एका संगणकीय लो बजेट इफेक्‍ट असलेल्या स्वर्गात केलं जातं. जर स्वर्ग आणायचा तर मुळातच हॉटेलमध्ये बोलावण्याची गरज काय? या योजनेत मूळ पटकथाकारांचा काही विचार असेल, हे "गॉड तुस्सी..'च्या चित्रकर्त्यांना माहीत नसावं.

जी गोष्ट व्यक्तिचित्रणाची, तीच आलेखाची. ब्रूसची व्यक्तिरेखा ही प्रसंगागणिक अधिक आत्मकेंद्री होत जाते अन्‌ इतरांच्या तथाकथित भल्याचे त्याचे निर्णयही अखेर स्वतःभोवती फिरणारे असतात. ब्रूसमध्ये होणारा हा बदल चित्रपटातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे, जे रूपांतरात गायब आहे.

धडा ४ -
प्रत्येक चित्रपटाला दोन प्रकारची तर्कशास्त्रं लागू होतात. प्रसंग खरे वाटण्यासाठी प्रेक्षकांना पटणारं लॉजिक आणि कथेचं स्वतःचं लॉजिक, जे अगदी वास्तव नसलं, तरी चित्रपटाच्या प्रवृत्तीशी सुसंगत आहे. फॅन्टसी चित्रपटांना या दोन्ही प्रकारच्या लॉजिकची गरज असते, जी "गॉड तुस्सी...'मध्ये अदृश्‍य आहे. इथं प्रजापती ऍन्कर आहे. तो कोणत्याशा चॅनेलवर (का स्वतंत्र निर्मिती संस्थेत?) अँकर आहे. पण तो अँकरबरोबर प्रोड्यूसरही आहे. त्याचबरोबर तो संशोधकही असावा; कारण तो लाय डिटेक्‍टर असणारी खुर्चीही डिझाईन करतो, जी संगणकावर डिझाईन होते, त्याच दिवशी ऑफिसमध्ये बनलेली असते. मात्र ही लाय डिटेक्‍टर खुर्ची चालण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर असलेली डीव्हीडी तो कोणीही चोरेल अशा जागी, कॉपीही न बनवता ठेवतो. या चॅनलचे वा निर्मितिसंस्थेचे कार्यक्रम मुद्रित केलेच जात नाहीत, थेट टेलिकास्ट होतात. कारण डीव्हीडी न मिळण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीनं चॅनेलची जाहीर नाचक्की होते. उघडच कार्यक्रम लोकांना लाईव्ह दिसत असल्यानं कथानकातल्या या सर्व घटकांना वास्तवाचा कोणताही आधार नाही. असं होणं शक्‍य नाही, अन्‌ ते होणार नाही हे चित्रकर्त्यांनाच नव्हे, तर नव्वद टक्के प्रेक्षकांनाही माहीत आहे.

फक्त भेसळ
कथेचं तर्कशास्त्र हे देवाला अन्‌ चमत्कारांना मान्यता देत असलं तरी या चमत्कारांनाही काही नियम आहेत, जे पाळले जायला हवेत. उदाहरणार्थ जेव्हा प्रजापती देव म्हणून सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद देतो, तेव्हा काहीच जणांच्या इच्छा पूर्ण होताना दिसतात. सर्व कैद्यांना मुक्ती मिळते अन्‌ ते रस्त्यावर उतरतात. म्हणजे कैदी जेलमध्ये राहावेत अशी इच्छा कोणीच प्रकट करत नाही का? प्रजापतीच्या मोलकरणीला लॉटरी लागते, म्हणजे ही लॉटरी लागावी अशी इच्छा तिनं एकटीनंच व्यक्त केलेली असते का? ("ब्रूस ऑलमायटी'मध्ये ही लॉटरी सर्वांना लागते अन्‌ बक्षिसाची रक्कम विभागली जाऊन अत्यल्प रक्कम प्रत्येकाच्या पदरी पडते) एका भिकाऱ्यानं कुत्रा होण्याची इच्छा पूर्ण होताना, तो माणूसच राहतो अन्‌ केवळ भुंकायला लागतो. देव त्याला पूर्ण कुत्रा करू शकणार नाही का? असो.

"गॉड तुस्सी ग्रेट हो'चा गोंधळ हाच आहे, की तो एकाच वेळी शब्दशः आणि पुनर्रचित रूपांतर करायला जातो. शब्दशः रूपांतर आंग्लाळलेलं वाटलं तरीही अमुक एका प्रमाणात यशस्वी होऊ शकतं. केवळ कल्पनेचा आधार घेऊन, तिला आपल्या वास्तवाशी अनुरूप बनवणं हे बऱ्याचदा अधिक प्रमाणात योग्य ठरतं. दुर्दैवानं बहुतेकदा आपल्याकडे यातला कोणताही एक मार्ग न स्वीकारता भेसळ केली जाते. "गॉड तुस्सी' या भेसळीचं ताजं उदाहरण आहे.

- गणेश मतकरी

Read more...

भग्न वसुंधरेकाठी...

>> Thursday, September 4, 2008


तुमचं वय कितीही असो, तुमची आवड-अभिरुची काहीही असो, तुम्हाला चित्रपट हे माध्यम आवडो अगर नावडो, तुम्ही "वॉल-ई'ला भेटलंच पाहिजे. निदान माणूस नावाचा प्राणी पृथ्वीतलावर शिल्लक राहावा, असं तुम्हाला वाटत असेल, पृथ्वीचं डंपिंग ग्राऊंड होऊ नये अशी तुमची तळमळ असेल, पृथ्वीचा विनाश कुठंतरी थांबायला हवा यासाठी तुमची तगमग होत असेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांचा भविष्यकाळ अंधःकारमय दिसत असेल तर वॉल-ई आणि ईव्हची ही हळुवार, तरल, काळजाला हात घालणारी आणि विध्वंसाकडे निघालेल्या, यंत्राचा गुलाम बनू पाहणाऱ्या माणसाला ताळ्यावर आणणारी, वास्तवाला थेट भिडणारी प्रेमकहाणी तुम्ही पाहायलाच हवी.

तुम्ही "फाईंडिंग निमो' पाहिलाय? दिग्दर्शक ऍण्ड्य्रू स्टॅण्टनने या ऍनिमेशनपटातून एका माशाच्या सुटकेचं नाट्य रंगविलं आणि समुद्रसफरीतून पाण्याखालील विश्‍वाचं अफलातून दर्शन घडवलं. "वॉल-ईम'मध्ये तो आपल्याला भग्न वसुंधरेवरून अवकाश पोकळीत घेऊन जातो. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवलं नाही, तर शेकडो वर्षे अवकाशात राहणारे आणि सर्व दैनंदिन क्रिया "रोबो'च्या मदतीनं करणारे निव्वळ मांसाचे गोळे म्हणजे आपणच असू, असा धोक्‍याचा इशारा तो देतो. अर्थात हा इशारा कोरडा नाही, त्याला जोड आहे ती एका नितांत सुंदर प्रेमकथेची. "वॉल-ई'ची पटकथा स्टॅण्टन आणि जिम रेर्डनने लिहिली आहे. ती इतकी सरळ, बांधेसूद आणि अनेक नजाकतींनी नटलेली आहे की ती आपल्याला सहजपणे गुंतवत नेते आणि चित्रपट संपला आहे, श्रेयनामावली सुरू झाली आहे याची जाणीव होऊनही आपण त्याच्या प्रभावाखाली त्याच अवस्थेतच राहतो.

विध्वंसानंतर तब्बल 700 वर्षे लोटली आहेत. पृथ्वीवर फक्त डेब्रिस, माती आणि धुळीचं साम्राज्य सोडलं तर आता काहीही शिल्लक नाही. आपल्या अतिप्रगत मेंदूचा वापर करून माणसाने हे विश्‍व घडवलं आणि बिघडवलंही. त्यानेच वसुंधरेला भग्नावस्थेत ढकललं. आता उरलेत ते केवळ ढिगारे, इमारतींचे भग्नावशेष; इथे पूर्वी माणसं राहत होती असं सांगणारे. पृथ्वीवर राहण्यालायक वातावरणच उरलं नाही. त्यामुळे सगळी मानवजात अवकाश पोकळीतील अवाढव्य आणि सुसज्ज अशा अवकाशयानात पाच वर्षांच्या बोलीवर राहावयास गेली आहे; पण पाचपन्नास नव्हे, तर 700 वर्षे झाली, पृथ्वीवर परत जाण्यायोग्य परिस्थितीच निर्माण होऊ शकली नाही. वॉल-ईचे हजारो वंशज पृथ्वीवरील प्रदूषण हटविता-हटविता जागेवर बसले. बिचारा वॉल-ई एकटाच उरला आहे. न थकता पृथ्वीवरची घाण साफ करतो आहे. त्याला सोबत आहे ती एका निरुपयोगी झुरळाची. माणसाने स्वतःच्या चुकीमुळे उद्या पृथ्वीवरची सजीवसृष्टी नष्ट केलीच तर एक सजीव मात्र तो नष्ट करू शकणार नाही, तो म्हणजे झुरळ, हे वैज्ञानिक सत्य तो अधोरेखित करतो. स्वतःच्या मुळावर उठलेल्या माणसाला वाकुल्या दाखवणारा हा कीटक क्षुल्लक असला तरी माणूसच त्याच्यापुढे क्षुल्लक ठरतो, असं सांगण्यासाठी झुरळाचा केलेला प्रतीकात्मक वापर अप्रतिम.

हा वॉल-ई म्हणजे माणूस असणं अशक्‍य. मग आहे तरी कोण? (थअङङ-ए अर्थात थरीींश अश्रश्रेलरींळेप ङेरव ङळषींशी- एरीींह उश्ररीी) संगणकावर ऍनिमेशनच्या तंत्राने निर्माण केलेलं एक अफालातून पात्र. एरवी पटकथेत व्यक्तिचित्रणाच्या नावाने बोंब असली तर एकूण सिनेमाचा शिमगा होतो. इथे तर मुख्य पात्र मनुष्येत्तर आहे. तरीही त्याच्या हालचाली यांत्रिकपणे होत नाहीत, हीच तर गंमत आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची लय, समन्वय आहे. त्या इतक्‍या कल्पक, रंजक आणि अस्सल आहेत की त्यांतून कधी हास्याचे फवारे उडतात, तर कधी धबधबे कोसळतात आणि आपल्याला अंतर्मुखही करतात.
वर्षानुवर्षे एकाकी असलेऱ्या "वॉल-ई'च्या रखरखीत जीवनात "इव्ह' येते. या प्रेमकथेत प्रथम पाहिल्यानंतर कलिजा खल्लास होणं, नजरानजर, घालमेल, हसणं, लाजणं, मुरडणं, नजरेनं बोलणं वगैरे भावना आणि धुळीच्या वादळातून, जीवारच्या संकटातून इव्हला वाचविण्यासाठीची या प्रेमविराची धडपड, तगमग, ऍण्ड्य्रू स्टॅण्टन यांनी साधलेली ही किमया अचंबित करते.
"इव्ह'च्या काळजीने तिला घेऊन जाणाऱ्या स्पेस शटलला पकडून वॉल-ई अवकाशयानात प्रवेश करतो. तेथील मांसाचे गोळे होऊन पडलेली माणसे, त्यांची "सेवा' करणारे रोबो हे सगळं पाहिल्यावर वॉल-ई बावरून जातो. त्याची त्रेधा, त्याचं बुजरेपण यातून जी धमाल उडते तीही मस्तच. मानवी भावभावनांचा इतका संमिश्र आणि गुंतागुंतीचा आविष्कार घडविणे एखाद्या कसलेल्या नटालाही अशक्‍य व्हावं.

चित्रपटाचा शेवट सुखान्त आणि शोकात्मही आहे. पण तो तसा असण्यामागे मोठी गुंतागुंत आहे. पृथ्वीवरील अवशेषांमध्ये वॉल-ईला सापडलेला एक बीजांकुर म्हणजे मनुष्य जातीसाठी आशेचा किरण आणि इव्ह व "वॉल-ई'मधील प्रेमांकुर. पृथ्वी ते अवकाश आणि अवकाश ते पुन्हा पृथ्वी असा त्याचा नाट्यमय आणि संघर्षमय प्रवास हा मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने या सिनेमाला टाळणं म्हणजे स्वतःची फसवणूक.

- सिद्धार्थ ताराबाई

Read more...

कोरियन सूड

>> Monday, September 1, 2008


सूड हा विषय एक कथासूत्र म्हणून आपल्याला नवीन नाही. काही इंग्रजी आणि अक्षरशः शेकडो हिंदी चित्रपटांतून हा आपण पाहत आलो आहोत. सध्या आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे चित्रपट जरूर येताहेत; पण केवळ सूड आणि ताटातूट, या दोनच कथासूत्रांवर चित्रपटांमागून चित्रपट येण्याचा काळ फार जुना नाही. अमिताभ बच्चनची नायक म्हणून असलेली संपूर्ण कारकीर्दच, या प्रकारच्या चित्रपटांनी भरली होती, असं म्हणणं अतिशयोक्त ठरणार नाही. यामध्ये सूड हे प्रामुख्याने बाळबोध स्वरूपाचे असत. म्हणजे एका विशिष्ट प्रकारे चित्रित केलेला खलनायक, हा नायकाच्या जवळच्या व्यक्तीला मारणार आणि तेव्हा लहान असलेला नायक मोठा झाल्यावर हिरोगिरी आणि प्रेमप्रकरणं यांमधून वेळात वेळ काढून खलनायकाचा बदला घेणार, हे ठराविक कथानक यात पाहायला मिळे; पण या प्रकारची कथा रचताना सूड या अतिशय आदिम संकल्पनेचा खोलात जाऊन कोणी विचार केला असल्याचं जाणवत नाही किंवा संभवतही नाही. ना लेखकाने, ना दिग्दर्शकाने. त्यामुळेच जेव्हा एखादा दिग्दर्शक सूडपटाला अतिशय गंभीरपणे घेतो आणि त्यातल्या पात्रांच्या प्रेरणेपासून, त्यांच्या वागण्यातल्या तपशिलापर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो, तेव्हा ते उल्लेखनीय ठरतं.
हा दिग्दर्शक आहे चॅन-वूक पार्क नावाचा कोरियन, ज्याचे व्हेन्जन्स ट्रायलॉजी नावाने ओळखले जाणारे चित्रपट कोरियाबरोबरच जगभरच्या समीक्षकांच्या कौतुकाला प्राप्त ठरले आहेत. या मालिकेतले पहिले दोन, म्हणजे "सिम्पथी फॉर व्हेन्जन्स' (2002) आणि "ओल्डबॉय' मात्र चांगल्या लायब्रऱ्यांमध्ये उपलब्ध आहेत. ओल्डबॉय तर संजय दत्तच्या जिंदाद्वारे हिंदीतदेखील लागून झाला आहे.
ओल्डबॉयला "कान्स'मध्ये ग्रान प्री पारितोषिक मिळालं. त्यामुळे अधिक प्रमाणात रसिकांच्या लक्षात आला आणि त्याचा आशयही अधिक धक्कादायक होता हेही खरं; पण कथेच्या एकूण परिणामाच्या दृष्टीने मला तरी "सिम्पथी फॉर मि. व्हेन्जन्स' अधिक मुद्देसूद आणि प्रभावी वाटला.
रक्तरंजित हिंसाचार
एक गोष्ट स्पष्ट आहे, की हे चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना पाहवतील असे नाहीत. भारतात तर ते सेन्सॉरच होऊ शकणार नाहीत. याचं कारण म्हणजे त्यातला रक्तरंजित हिंसाचार आणि त्याच तुलनेने वास्तववादी असलेलं चित्रीकरण. तुलना टेरेन्टीनोशी, कारण त्याचेही चित्रपट असेच रक्तबंबाळ असतात; पण टेरेन्टीनोची दृश्यभाषा ही अधिक फॅशनेबल असते किंवा हिंसाचार हा त्याच्या अतिरेकाने कार्टून व्हायलन्स झालेला असतो. इथे तसं होत नाही. चॅन-वूक पार्कच्या चित्रपटांतली दृश्यं आपल्याला अस्वस्थ करतात. क्वचित प्रसंगी नजर पडद्यावरून बाजूला फिरवायलाही उद्युक्त करतात.
सिम्पथीचा आशय धक्कादायक नसला, तरी विचार करायला लावणारा आहे. ही एक शोकांतिका आहे यातल्या एकूण एका पात्राची- मग ते कितीही लहान-मोठं, श्रीमंत-गरीब असो. कोरिया गेली काही वर्षं मोठ्या आर्थिक संकटाच्या काठावर आहे आणि या मंदीचीच पार्श्žवभूमी या चित्रपटाला आहे.
मुक्žया, बहिऱ्या रयु (हा-क्यु शीन)ची बहीण खूप आजारी आहे. तिला ताबडतोब किडनी मिळण्याची गरज आहे; पण पैशांचा बंदोबस्त करूनही तिला चालणारी किडनी मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून तो काळ्या बाजाराचा आश्रय घेतो; पण तिथले चोर त्याचे पैसे तर घेतातच, वर त्याची किडनीही घेऊन पळ काढतात. लवकरच इस्पितळातर्फे किडनीची व्यवस्था होते; पण आता ती विकत घ्यायला रयुकडे पैसे नसतात. कारण एव्हाना त्याची नोकरीही गेलेली असते. निराश झालेल्या रयुला त्याची बिनधास्त मैत्रीण चा (बु - ना बे) सल्ला देते, की उद्योगपती पार्क (कांग - हो सॉंग)च्या छोट्या मुलीचं अपहरण कर आणि पैसे घे. आता हा एकच मार्ग उरल्याने रयुला तो स्वीकारावा लागतो. पार्कचं आपल्या मुलीवर अतिशय प्रेम असतं. तो ताबडतोब पैसे द्यायला तयार होतो; पण पैसे दिल्यावर सर्वांचंच दुर्दैव आड येतं. पार्कची मुलगी बुडून मरते. इकडे रयुच्या बहिणीचा मृत्यू ओढवतो आणि सूडनाट्याला सुरवात होते. पार्क आपल्या मुलीच्या अपहरणकर्त्यांना सोडणार नसतो, तर रयुच्या दृष्टीने खरे गुन्हेगार असतात काळ्या बाजारातले अवयवविक्रेते, ज्यांचा नायनाट करण्याची तो शपथ घेतो.
अभिजात शोकांतिकांमध्ये दिसणारं एक वैशिष्ट्य सिम्पथीमध्ये आहे आणि ते म्हणजे सर्व पात्रं ही मुळात सज्जन आहेत. जे घडतं त्याला त्यांचा इलाज नसतो. बहुतेक घटनांना लागणाऱ्या गडद वळणाला जबाबदार नशीबच असतं.
दिग्दर्शकाची विसंगतीची आवड, हेही आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाच्या तणावपूर्ण शेवटाला सुरवात होण्याआधी अनेक जागी दिग्दर्शक आयुष्यातल्या विसंगती, विरोधाभास शोधताना दिसतो, ज्याने सहज विनोदनिर्मिती होते. चाने रयुला अपहरणासंबंधी दिलेली शिकवणी किंवा तिचं काळ्या बाजारातल्या चोरांना पत्रकं वाटणं, इथे हा विनोद तसा निरागस आहे; पण कामावरून काढलेल्या बेरोजगार इंजिनिअरने पार्कसमोर पेननाईफने हाराकिरी करण्याचा प्रयत्न करण्यासारख्या प्रसंगात हाच विनोद गडद छटा धारण करताना दिसतो.
चित्रपटाला एक सामाजिक बाजूही मांडायचीय, जी मांडण्याकरताच आपल्याला दिग्दर्शकाने घटनांमागली मंदीची पार्श्žवभूमी सांगितली आहे. चित्रपटातल्या नावात अभिप्रेत असणारा मि. व्हेन्जन्स म्हणजे कोण? तो रयु असू शकतो किंवा पार्कदेखील असू शकतो. रयु हा वाढत चाललेल्या बेरोजगारीने संकटात आलेल्यांपैकी आहे. त्याच्याकडे पुरेसा पैसा नाही आणि तो ज्यांच्याकडे आहे, त्यांची त्याला चीड आहे. रयु हा समाजवादी संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. पार्क श्रीमंत आहे. त्याच्याकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे. हाताखालच्या लोकांना क्षणात काढण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तो भांडवलशाहीचा प्रतिनिधी आहे. यातल्या कोणत्या मि. व्हेन्जन्सला आपली सिम्पथी जाते, असं दिग्दर्शक विचारतो. याचं उत्तर ज्याचं त्याला द्यायचंय आणि त्यामागचं कारणही ज्याचं त्यालाच शोधायचंय. मात्र या प्रश्नाला दिग्दर्शकाने थोडं अधिक अवघड केलंय ते पार्कबद्दल थोडी अधिक माहिती देऊन. पार्ककडला पैसा हा त्याला बापजाद्यांकडून मिळालेला नाही. तोदेखील मुळात इतरांसारखाच इंजिनिअर आहे आणि त्यानं आपल्या मेहनतीनं कंपनी उभी केलीय. मंदीची झळ त्यालाही लागलीय, कारण आर्थिक संकटं येताच त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे यातल्या दोन्ही प्रमुख पात्रांच्या अडचणी या खऱ्या आहेत. यातल्या कोणाही एकाला आपलं म्हणताना आपण दुसऱ्यावर अन्याय करू, हे नक्की.
ही पात्रं जेव्हा इतकी जिवंत होतात तेव्हा त्यांचा बदलाही तितकाच खरा होतो. मग हा केवळ व्यक्तिगत प्रश्žन उरत नाही, तर त्याचे सामाजिक पडसादही जाणवायला लागतात. चॅन-वुक पार्कला एका मुलाखतीत विचारलं होतं, की तुमच्या चित्रपटात सूडाची संकल्पना वारंवार येण्यामागचं कारण काय? यावर त्यानं दिलेलं उत्तर पुरेसं बोलकं आहे.
तो म्हणाला, ""संस्कृतीच्या विकासामुळे आणि शैक्षणिक पातळी उंचावल्यामुळे आपल्या मनात खोलवर लपलेला संताप, द्वेष, आकस इत्यादींना दडवून ठेवणं लोकांना भाग पडलं; पण याचा अर्थ त्या भावना नाहीशा झाल्या, असा नाही. मानवी नाती जसजशी गुंतागुंतीची होत गेली तसतसा हा क्रोधही अधिकाधिक वाढत गेला. एकीकडं आधुनिक समाज हा या वाढत्या क्रोधाचं ओझं व्यक्तीवर लादत असताना या क्रोधाला मोकळं करण्याच्या वाटा मात्र आकुंचन पावताहेत. ही परिस्थिती मोठीशी हिताची नाही म्हणूनच बहुधा कला अस्तित्वात आली. प्रत्यक्षात माझ्या चित्रपटात दाखवले गेलेले सूड हे सूड नसतात; ते नुसतं एकानं आपली अपराधी भावना दुसऱ्याच्या हवाली करणं असतं. माझे चित्रपट स्वतःच्या दोषांची जबाबदारी नाकारून ती दुसऱ्याच्या गळ्यात घालणाऱ्या लोकांचे असतात. म्हणूनच त्यांना सूडपट म्हणण्यापेक्षा नैतिकतेवर भर देणारे आणि अपराधभावना हाच मुख्य विषय असणारे चित्रपट म्हणणं अधिक योग्य ठरेल. माझ्या व्यक्तिरेखा ही मूलतः चांगली माणसं असतात. कारण त्यांना आपण आयुष्यात केलेल्या चुकांची सतत जाणीव किंबहुना टोचणीच असते. आपल्या मनातली मूळची अपराधभावना दडपण्यासाठी या माणसांना आणखी एका वेगळ्या प्रकारच्या हिंसेचा आधार घ्यायला लागतो, हाच माझ्या आजवरच्या चित्रपटांतल्या शोकांतिकेचा मूलभूत आशय आहे.''
जेव्हा एखादा दिग्दर्शक आपल्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असलेल्या कल्पनांबाबत एवढा जागरूक असतो, तेव्हा त्याची ही जागरुकता आपोआप कलाकृतींमध्ये उतरते. त्यामुळेच या दिग्दर्शकाचे चित्रपट त्यातल्या पात्रांच्या दुर्वर्तनाला प्रेक्षकांसमोर आणूनही ना त्यांची बाजू घेत, ना त्यांना एखादा उदात्त हेतू देऊन सावरण्याचा प्रयत्न करत. ते फक्त त्यांना सहानुभूती देताना दिसतात.
निव्वळ बाजारू सूडपटांपेक्षा ते वेगळे होण्याचंही तेच कारण असावं.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP