आजचा मराठी सिनेमा २ - निर्मितीची गणितं

>> Saturday, March 26, 2016





समीक्षक म्हणून, किंवा प्रेक्षक म्हणूनही विचार करायचा , तर चित्रपटाचा प्रमुख म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागेल, तर उघडच दिग्दर्शकाचं, पण प्रत्यक्षात मराठी चित्रपटांमधे, दिग्दर्शकाचं स्थान सर्वोच्च आहे का ?


खरं सांगायचं तर कोणत्याही प्रतिथयश, वा तशा होऊ पहाणाऱ्या चित्रपट उद्योगात दिग्दर्शकाला महत्व असलं, तरी प्रत्यक्षात तो एकटा काही निर्णायक स्थानावर बसलेला नसतो. बहुतेक वेळा हे स्थान, दिग्दर्शक आणि निर्माता या दोघांच्या सहयोगातून एकत्रितपणे तयार होतं. अगदी पूर्वीच्या , म्हणजे दादासाहेब फाळके, प्रभात फिल्म कंपनी सारख्या उदाहरणांकडे पाहिलं तर लक्षात येईल, की सर्जनशीलतेला त्यांच्या डोक्यात प्रमुख स्थान असलं, तरी केवळ ती असून पुरेशी नाही, हे या साऱ्यांच्याही लक्षात आलेलं होतच. केवळ क्रिएटिव दृष्टिकोन चित्रपटाला एक व्यवसाय म्हणून उभा करायला पुरेसा नाही, आणि चित्रपटात होणारा खर्च, त्याच्या निर्मितीप्रक्रियेतली गुंतागुंत, तयार चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेणं, या सगळ्याचा विचार झाल्याशिवाय इंडस्ट्री तरणार नाही, हे तेव्हाही माहित होतच. त्यामुळेच या लोकांनी निर्मितीच्या जबाबदारीलाही आवश्यक मानलं. आजही दिग्दर्शन आणि निर्मिती, या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे घेणाऱ्या व्यक्ती आणि संस्था अस्तित्वात जरुर आहेत, ज्या प्रत्यक्ष चित्रपट तयार होईपर्यतचा भार स्वत: उचलतात, आणि त्यानंतर इतर निर्माता, वितरक, यांच्या सहाय्याने, तो प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. पण हे कमी, आणि दिग्दर्शनात सातत्याने यशस्वी ठरलेल्या नावांमधे अधिक प्रमाणात दिसून येतं. ज्या दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटाच्या व्यावसायिक मूल्याची खात्री आहे, आणि ते मूल्य टिकवण्यासाठीच ज्यांना इतर निर्मात्यांचा वरचष्मा नको वाटतो, ते दिग्दर्शकच या प्रकारची रिस्क घेऊ शकतात.

सर्वसाधारणपणे मात्र निर्माता आणि दिग्दर्शक या भूमिका आज एकमेकांपेक्षा वेगळ्या राहिलेल्या दिसतात, आणि त्यांच्यातला कोण चित्रपट बनवण्यात पुढाकार घेतो यावर त्या त्या चित्रपटाचा दर्जा आणि बहुतांशी त्याचं भवितव्यदेखील अवलंबून असल्याचं दिसून येतं. आज जेव्हा दिग्दर्शक पुढाकार घेतो, तेव्हा दोन मार्गाने चित्रपटाचा प्रवास संभाव्य आहे. पहिला आहे, तो व्यावसायिकतेचे निकष न लावता कल्पनेला प्राधान्य देणारा आणि अव्यावसायिक निर्माते वा समविचारी आप्तांच्या सहाय्याने बनवला जाणारा चित्रपट.  आपल्याकडे मराठी चित्रपटांचं नवं वळण घेऊन येणारा पहिला चित्रपट श्वास, हाच मुळात या प्रकारचा होता. संदीप सावंत हा तरुण दिग्दर्शक आणि अनेक समविचारी निर्माते यांचं हे जाॅइन्ट व्हेन्चर कमालीचं यशस्वी ठरलं, आणि मराठी चित्रपटांचं पुनरुज्जीवन झालं. हे झालं तेव्हा अर्थात मराठी चित्रपट संपूर्ण हौसेची बाब होती, त्याच्याकडे व्यवसाय म्हणून मुळातच कोणी पहात नव्हतं. त्याच्या व्यावसायिक शक्यता लक्षात यायला बराच वेळ लागला, आणि या काळात विषय-आशय-दृष्टी यांना प्रमुख स्थान देणारे बरेच दिग्दर्शक पुढे आले. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, मंगेश हाडवळे आणि अशी इतर बरीच नावं या काळात पुढे आली. त्याआधीपासूनच या वळणाचं काम करत रहाणाऱ्या सुमित्रा भावे - सुनिल सुकथनकर, अमोल पालेकर या सारख्या दिग्दर्शकांनाही या नव्या प्रवाहात सामील होता आलं.

त्यांच्यातल्या काहींच्या चित्रपटांना मोठ्या वितरणसंस्थांनी ( वळू हा उमेश कुलकर्णीचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बहुधा मुक्ता आर्ट्सने वितरणाला घेतला, तर परेश मोकाशीच्या हरिश्चंद्राची फॅक्टरीमधे युटिवीने रस घेतला) सहाय्य केलं, पण ते तसं करतील, या भरवशावर या चित्रपटांची निर्मिती झाली नव्हती. आजही या प्रकारचं काम होतं, आणि काहीशा आदर्शवादी धोरणाचे दिग्दर्शकही आहेत. मात्र मराठी सिनेमाच्या व्यावसायिक पोटेन्शिअलचा पत्ता लागल्यावर चांगलं व्यावसायिक प्रपोजल म्हणून चित्रपटाकडे पहाणाऱ्या दिग्दर्शकांचा एक वेगळा गट हळूहळू तयार झाला.

व्यावसायिक म्हणून या चित्रपटांना आणि कलामूल्याबरोबरच प्रेक्षक पसंतीचा विचार जागृत ठेवणाऱ्या या दिग्दर्शकांना कमी लेखता येणार नाही, कारण चित्रपटउद्योगाचं अस्तित्व टिकून रहायचं, तर त्यात बनलेले चित्रपट चालण्याची गरज ही ओघानेच आली. हा विचार जसा दिग्दर्शकांकडून व्हायला लागला, तसतसं मराठी व्यवसायाचं अर्थकारण ठरत गेलं. रवी जाधव आता निर्मितीत उतरला असला, तरी त्याने दिग्दर्शित बरचसं सुरुवातीचं काम या प्रकारचं असावं. नटरंग, बालगंधर्व, बीपी या चित्रपटांमधे कलात्मक अंगाला जागा आहे, पण त्याबरोबरच त्याच्याकडे एक प्रोडक्ट म्हणून पहाण्याची दृष्टी देखील आहे. या प्रकारे काम करणारा अर्थातच हा एकटा दिग्दर्शक नाही. कल्पनेचा वेगळेपणा आणि तिची मार्केटॅबिलिटी यांचा एकत्रित विचार करणारं हे एक महत्वाचं नाव, एवढच.

जसजसं मराठी चित्रपट कोण पहातं आणि ते पहाणारा प्रेक्षक काय आवडीने पाहिल याची प्रचिती येत गेली, तसतशी निर्मात्यांची बाजू ही अधिकाधिक मजबूत होत गेली. आज झी/इराॅस/एवरेस्ट/ व्हायकाॅम यासारख्या संस्था यात पुढे आहेत. दिग्दर्शकाने आपल्या कल्पना घेऊन त्यांच्याकडे येणं हे काही प्रमाणात सुरु आहेच, मात्र त्याबरोबरच आपल्या पसंतीचे आपल्या टीमने योजलेले प्राॅजेक्ट्स घेऊन पुढे येणं या संस्थांना अधिक फायद्याचं वाटतय. यासाठी ते जी टीम निवडतील, त्यात त्यांना या चित्रपटाकरता कोणता दिग्दर्शक योग्य वाटतो याला महत्व असेल. यापूर्वी दिग्दर्शकाने चांगली कल्पना आणल्यास तो बाय डिफाॅल्ट दिग्दर्शक ठरणं आता या मोठ्या संस्थांमधून कमी कमी होत जाईल आणि त्यांचं निर्मितीवरलं नियंत्रण हे त्याच प्रमाणात वाढत जाईल.

हे कलादृष्टी आणि व्यवहार यांचं काही प्रमाणात स्वतंत्रपणे तर काही प्रमाणात एकत्र येउन काम करणं सोडलं तर मराठी चित्रपटांची निर्मिती हा नुसता गोंधळ आहे. यात जे निर्माते म्हणून नव्याने उतरतात, त्यांना या व्यवसायाची किती कल्पना असते, आणि दिग्दर्शक ती किती प्रमाणात करुन देतात, हा प्रश्नच आहे. मी मघा म्हणालो, तसं काय सांगायचंय, कसं सांगायचय याची पूर्ण कल्पना असणाऱ्या वेगळ्या पठडीतल्या चित्रपटांना निर्माता मिळणं , आणि त्या निर्मात्याने दिग्दर्शकावर श्रध्दा ठेवून त्याला योग्य वाटेल ते करु देणं, हे मी रास्त मानेन, पण अशा दिग्दर्शकांचं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या निर्मात्यांचं प्रमाण फार मर्यादीत आहे. बऱ्याच निर्मात्यांना चित्रपट एक हौस म्हणून करायचा असतो.तो बनवण्याइतका पैसा त्यातल्या अनेकांकडे असतो, पण तो पुरा झाला की त्याचं काय करायचं, याचा त्यांनी, आणि अनेकदा त्यांच्या दिग्दर्शकांनी विचारही केलेला नसतो. या चित्रपटांचं भवितव्य अनेकदा काळजी वाटण्यासारखं असतं. बऱ्याचदा या निर्मात्यांचा कमाई नं होण्यालाही आक्षेप नसतो. त्यांचं चित्रपटावर नाव झळकलं याचा त्यांना आनंद असतो. दिग्दर्शकांना मीटर चालू राहिल्याचा आणि नावावर आणखी एक चित्रपट जमा झाल्याचा आनंद असतो.

आता कोणी असंही म्हणेल, की जर त्या निर्मात्या/ दिग्दर्शकाला जर स्वत:च्याच चित्रपटाची पर्वा नसेल, तर तुम्हाला काय फरक पडतो? पडतो ! मलाच का ,पण मराठी चित्रपटसृष्टी टिकावी, असं वाटणाऱ्या  प्रत्येकालाच फरक पडायला हवा. कारण पूर्ण विचारांती न काढलेल्या चित्रपटांचे अप्रत्यक्ष  दुष्परिणाम अनेक असतात.

पहिला म्हणजे या चित्रपटांच्या असण्यामुळे चित्रपटसृष्टीला आलेला खोटा फुगवटा. या फुगवट्यामुळे सृष्टीबद्दलचं एक चुकीचं चित्र उभं रहातं , त्याचबरोबर हे चित्रपट दर्जा/ नफ्याची शक्यता असण्यानसण्याची पर्वा न करता चित्रपटगृहात लावले जातात, ज्याचा परिणाम म्हणून काही एक विचार ज्यांमधे गेला आहे, अशा चित्रपटांची जागा अडवली जाते. एका आठवड्याला आम्ही एकच चित्रपट पाहू शकतो असं मानणाऱ्या बहुतेक मराठी प्रेक्षकांकडे पाहिलं की किती नुकसान होत असेल याची कल्पना यावी. मी मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे वर्षाकाठी येणाऱ्या सव्वाशेच्या आसपास चित्रपटाच बारा पंधराच चांगले असतात. उरलेल्यातही काही वर्थव्हाईल प्रयत्न, किंवा काही एक बेनिफिट आॅफ डाऊट देऊनही असं म्हणता येईल की निदान पन्नासेक चित्रपट तरी सरळ अनावश्यक आणि दर्जाहीन या वर्गात मोडतात. आता यांच्या निर्मिती आणि वितरणात प्रत्येकी एक ते अडीच कोटी या रेंजमधे पैसा जातो, मोठ्या प्रमाणात अभिनेते, कलावंत , तंत्रज्ञ यांचा सहभाग वाया जातो. ही सगळी नासाडीच नाही का?

आता कोणी म्हणेल, की या चित्रपटातून जो रोजगार उपलब्ध होतो त्याचं काय? हा रोजगार अमुक इतकी घरं चालती ठेवू शकत नसेल काय? निश्चितच असेल. पण चित्रपटसंख्या याहून कमी केली आणि निर्मितीतली विविधता वाढवली, दर्जा सुधारत नेला तर होणारा फायदा हा एकूण मराठी सिनेमाला अधिक चांगल्या भविष्याकडे नेणार नाही का? क्षणिक नफ्यासाठी आपल्या एकूण उद्योगाच्या खोलाच चाललेल्या पावलाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत?
- गणेश मतकरी

Read more...

आजचा मराठी सिनेमा -१

>> Sunday, March 20, 2016





मध्यंतरी , काळा घोडा महोत्सवादरम्यान, मी एका चर्चेत भाग घेतला होता. विषय जनरल होता. चित्रपट समीक्षेत गेल्या काही वर्षात होत गेलेल बदल, या प्रकारचा. मात्र उपस्थित समीक्षकांपैकी अधिक जण वृत्तसमीक्षा, किंवा त्याला इक्वीवॅलन्ट म्हणावीशी आठवड्याला वेबसाईट्स/ ब्लाॅग या माध्यमातून लिहित असल्याने तिचं स्वरुप हे प्रामुख्याने त्या प्रकारच्या समीक्षेवर केंद्रीत राहिलं. मी सोडता बाकीचे बहुतेकजण हिंदी चित्रपटांवर लिहीणारे होते. मी मराठी चित्रपटांवरही गेली दोनेक वर्ष नेमाने लिहीत असल्याने सत्र संपल्यावर जी अमौपचारिक चर्चा झाली, त्यात मराठी चित्रपटांचा आवर्जून उल्लेख झाला. मराठी चित्रपटांत कसं काही नवीन घडतय, आणि एक्साईटमेन्टचं वातावरण आहे, वगैरे, बहुधा अमराठी लोकांकडून मराठी सिनेमाविषयी नित्य बोलले जाणारे मुद्दे त्यातही होतेच. मी अर्थातच त्यांना विरोध केला नाही, पण त्यानिमित्ताने नंतर थोडा विचार जरुर केला.

मराठी सिनेमामधे गेल्या काही वर्षात बदल झालाय का? झाला असल्यास किती? त्याबद्दल उत्साह वाटावा का ? पुढल्या काळाबद्दल काय वाटतं? हे आणि या प्रकारचे प्रश्न मला अनेक वेळा पडतात, काही वेळा विचारलेही जातात. त्यांची उत्तरं काही प्रमाणात स्पष्ट आणि काही प्रमाणात सकारात्मक आहेत. मात्र पूर्ण चित्र आशादायक आहे किंवा नाही, याबद्दल माझी उत्तरं बदलत राहिलेली आहेत.

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट बदललाय का ? याचं उत्तर खरं तर स्टॅटिस्टिक्सच देईल. २००० साली शून्यवत असलेल्या सिनेमात आज १५ वर्षात, श्वास हे ग्राउंड झीरो धरायचं तर खरं तर दहाच, निदान दहा बारा नावं घेण्यासारखे आणि काम लक्षात येण्याजोगे दिग्दर्शक सातत्याने काम करताना दिसतात, २००४ नंतर मिळालेल्या तीन सुवर्णकमळांसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार आपल्याकडे नेमाने येतायत, परभाषिक निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आपल्याकडे काम करु इच्छितात आणि आपल्या लोकांनाही बाहेर कामाची आमंत्रणं मिळणं रुटीन आहे. त्यामुळे परिस्थिती निश्चितच आधीपेक्षा बरी आहे. यात वादच नाही. बदलाचं प्रमाण, हा मात्र विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

आज आपल्याकडे वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट बनताना दिसतात. हा आकडा वरवर उत्साहवर्धक वाटला, तरी प्रत्यक्षात काळजी  वाटायला लावणारा आहे. कारण यातले किती चित्रपट चालतात आणि किती खरोखर दर्जेदार असतात हे पाहिलं तर लक्षात येईल, की हे प्रमाण दहा-पंधरा टक्क्यांहून अधिक नाही. त्याहूनही आपल्या प्रेक्षकांचा उत्साह , समज आणि वितरणव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेतल्यावर हेदेखील समजतं, की चालतो, तो साराच चित्रपट दर्जेदार नाही आणि दर्जेदार असलेला सर्वच चित्रपट चालतो असंही नाही. (आता इथे मी दर्जा, हा एलीटिस्ट दृष्टीने, समीक्षकाच्या चष्म्यातून पाहिलेला दर्जा म्हणत नाही, तर सर्वसाधारण प्रेक्षकाला आवडण्यासारखा चित्रपटही या कसोटीत धरलेला आहे.) तर असा चांगला आणि चाललेला चित्रपट शोधायचा तर मूळची दहा-पंधराची टक्केवारी किमान चारपाच टक्के तरी खाली घसरेल. त्यामुळे बिग पिक्चर पहायचं तर आठवड्याला निदान दोनतीन चित्रपट तरी प्रदर्शित करत असलेल्या या उद्योगात सर्व कसोट्यांना उतरणारे जेमतेम साताठ चित्रपट वर्षाकाठी तयार होताना दिसतात. दहा म्हणजे डोक्यावरुन पाणी. हे प्रमाण पुरेसं आहे का?

आता यावर एक चतुर उत्तर हे आहे, की त्यात काय ! कोणत्याही उद्योगात चांगले चित्रपट हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच असतात. हे खरं तर उत्तर नाही. कारण इतर ठिकाणी जे घडतं ते आपल्याकडेही घडण्याची काय गरज आहे? आपला उद्योग छोटा आहे, नुकताच त्याला एक पुनर्जन्म मिळालेला आहे, त्याची किर्तीही निदान देशभरात तरी चांगलीच आहे. काही प्रमाणात त्याला देशाबाहेरही मान आहे. मराठीला- महाराष्ट्राला कला, रंगभूमी, साहित्य यांची पार्श्वभूमी आहे. त्यांमधून चित्रपटात वैचारिक देवाणघेवाण शक्य आहे. काही प्रमाणात सुजाण प्रेक्षक आहे ( ज्याची क्षमता टिव्ही चॅनल्स पाहून दिवसेंदिवस अधिक घसरत चालली आहे, पण अजून परिस्थिती हाताबाहेर नाही.) हे सारं असलं, तरी मराठी सिनेमा अजून चिंतामुक्त नाही.

अाज काय प्रकारचा चित्रपट पहायला मिळतो याविषयी थोडं बोलणं गरजेचं आहे. या चित्रपटाचे काही निश्चित प्रकार आहेत. पहिला आहे तो मोठ्या मार्केटिंग आणि वितरणसंस्थांचा पाठिंबा असणारा, बहुधा नावाजलेल्या ( रीड व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी उदा - रवी जाधव, संजय जाधव ) दिग्दर्शकांनी केलेला सिनेमा. हा 'सेफ' सिनेमा असतो. त्यात सर्जनशीलतेचं प्रमाण निश्चित असतं, पण बऱ्याच हुशार लोकांचे व्यावसायिक आडाखे, महत्वाकांक्षी विषय, जोरदार स्टार्स ( वा विषयाला त्यांची गरज नसल्यास लक्षात येईलसा, पुरेसा वेगळ्या प्रकारचा विषय) समाधानकारक बजेट,  मार्केटींगसाठी स्ट्रॅटिजी आणि चित्रपटाहून अधिक बजेट, प्राॅडक्ट म्हणून तो लोकांच्या गळी उतवण्यासाठी लागणारा माध्यमांचा आधार, वितरणाच्या चांगल्या योजना, असं सगळं त्याच्याकडे असतं. आशय असो वा नसो, यांची निर्मितीमूल्य चांगली असतातच आणि हे सिनेमे नक्की चालतात. झीची निर्मिती वा वितरण असणारा गेल्या दोनेक वर्षातला (लोकमान्य पासून नटसम्राट पर्यंत) कोणताही सिनेमा याचं उदाहरण म्हणून घेता येईल.

दुसऱ्या प्रकारचा सिनेमा असतो, तो याचाच धाकटा भाऊ शोभावासा. याच्याकडे प्रेक्षकाला पसंत पडावेतसे अनेक गुणधर्म असतात, पण बहुधा दिग्दर्शक नवे असतात, विषय अपरिचित/अनपेक्षित असतात, नावं नवी असतात. यांना जर योग्य तो आधार मिळाला, आणि मार्केटींग जमलं तर हे चित्रपट उत्तम चालू शकतात. ते नाही मिळालं, तर मात्र त्यांची शाश्वती देता येत नाही. रवी जाधवने प्रेझेन्ट केलेले 'रेगे' ( दि. अभिजीत पानसे) किंवा 'काॅफी आणि बरच काही' ( दि. प्रकाश कुंटे) , किंवा झीने पुढे वितरणासाठी घेतलेला 'किल्ला' ( दि. अविनाश अरुण) , ही या प्रकारच्या नशीबवान सिनेमांची उदाहरणं, जे सुरु होताना त्यांचं भविष्य अनिश्चित असलं, तरी ते सुस्थळी पडले, आणि प्रेक्षकांपर्यंतही पोचले.

यानंतरचा प्रकार आहे, तो समांतर वळणाच्या सिनेमांचा. या चित्रपटांना आशय असतो, विचार असतो, मात्र दिग्दर्शकांना रस असतो, तो आपल्या दृष्टीला त्यातल्यात्यात शुध्द स्वरुपात पडद्यावर आणण्यात. त्यामुळे प्रेक्षकांचा विचारच इथे दुय्य्म ठरतो. चित्रपट चालला तर छानच, पण चालणं न चालणं, हा तो चित्रपट बनवण्याच्या गणिताचा भाग नसतो.  गेल्या वर्षभरातली अशी दोन उदाहरणं म्हणजे उमेश कुलकर्णीचा 'हायवे - एक सेल्फी आरपार' आणि चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट. यातला हायवे अजिबात चालला नाही, आणि कोर्ट सुवर्ण कमळ मिळाल्याने आणि महोत्सवांमधून झालेल्या नावाने काही प्रमाणात चालला. पण त्यालाही हिट म्हणता येणार नाही.

वरचे तिन्ही प्रकार ही रिस्पेक्टेबल मराठी चित्रपटांची उदाहरणं आहेत. या चित्रपटांचं नाव कधी त्यातल्या कलेसाठी होतं किंवा कधी प्रेक्षकप्रियतेसाठी , तर कधीकधी दोन्हीसाठीही. यातलेच काही बाॅक्स आॅफिस गाजवतात तर काही चित्रपट महोत्सव, काहींच्या कल्ट फिल्म्स होतात तर काही तेवढ्यापुरते गाजून विस्मृतीत जातात. काहींवर फेसबुक चर्चा घडतात. ते बरे, थोर का सामान्य यावर हिरीरीने बाजू घेतल्या जातात , आणि त्यातून त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं. तरीही, एकूण संख्या पहाता या तिन्ही प्रकारात मिळून वर्षाकाठी बारा पंधरा चित्रपट असतात , मग बाकीचे शंभरेक चित्रपट? त्यांचं काय?

बाकीच्या चित्रपटातही एक मोठी रेंज असते. चांगल्या दिग्दर्शका कलावंतांचे काही चित्रपट असतात, काही चांगल्या कल्पना घेउन आलेले असतात, तर काही एखाद्या लोकप्रिय विषयाचा आधार घेऊन पुढे आलेले चित्रपट असतात. पण यातही बहुसंख्य चित्रपट मध्यम ते कनिष्ठ दर्जाचे असतात. मराठीत सतत उतरणारे नवे निर्माते आणि नवे दिग्दर्शक, यांनी यातले बहुतेक चित्रपट बनवलेले असतात. आजकाल यात परभाषिक निर्माते, दिग्दर्शक यांचाही भरणा असतो. हे चित्रपट बनतात खरे, पण त्यांचं सांगण्यासारखं काहीही होत नाही. ते कधी येतात, जातात काही कळत नाही, अनेकदा तर ते का काढले असावेत यावर चर्चा करावी अशी परिस्थिती असते. प्रेक्षक यांच्या वाट्याला फार कमी प्रमाणात जातो. हे चित्रपट चॅनलवर दिसल्यावर पहाण्याची त्याची अधिक तयारी असते, पण चित्रपटगृहांपासून तो लांबच रहातो.

प्रेक्षकाचं गणित साधं असतं. त्याला चॅरिटीमधे रस नसतो. चित्रपटांनी पैसे वसूल रिझल्ट द्यावा अशी त्याची इच्छा असते. मराठीचा अभिमान वगैरे त्याला ( किमान या बाबतीत)  नसतोच. चित्रपट उद्योग तरावा, आपल्या चित्रपटांना देशोदेशी पाहिलं जावं, त्याला पुरस्कार मिळावेत, असं त्याला वाटलं, तरी तेवढ्यासाठी तो अधिक करमणुकीची शक्यता असणाऱ्या हिंदी चित्रपटाला बाजूला सारुन मराठीकडे येणार नसतो. त्याची तयारी ही आठवड्याला एक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहाण्याची तयारी असते. त्यामुळे मुळातच आठवड्याला एकापेक्षा  अधिक चांगले चित्रपट प्रदर्शित झालेले त्याला आवडत नाहीत. त्यामुळे मराठीतही, दोन तीन चित्रपटातल्या कोणातरी एकालाच अधिक प्रतिसाद मिळणार हे निश्चित असतं. त्याशिवाय दुसऱ्या - तिसऱ्या आठवड्यात चालू असलेले आधीचे चित्रपट, चांगले हिंदी/इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होतात ते आठवडे, परीक्षा सणवार यांचे भाकड आठवडे, अशा सर्वांशी स्पर्धा ही या सर्वसाधारण चित्रपटांना महागच ठरते. आपण जाहीरातीत ते प्रचंड गर्दीत चालल्याचं वाचत असलो, तरी प्रत्यक्षात ही गर्दी क्वचितच कुणाला मिळते.

आता या परिस्थितीत मराठी चित्रपटांनी टिकाव धरण्याची अपेक्षा आपण करु शकतो का?
-गणेश मतकरी

Read more...

भयोमर्यादा

>> Saturday, March 12, 2016


भयपट, हा एक अतिशय कठीण चित्रप्रकार आहे, असं म्हंटलं तर विश्वास बसणं कठीण. कारण गेली बरीच वर्ष सोप्या आणि मध्यम ताकदीच्या भयपटांची रेलचेल झालेली आहे. पण चांगला भयपट करणं कठीणच असतं. आता इथे मला जी भीती अपेक्षित आहे, ती रक्तामांसाचा चिखल दाखवून किळस वाटायला लावणारी, वा तर्काला सोडून केवळ व्हिजुअल इफेक्ट्सच्या जोरावर बाजी मारणारी, किंवा दचकवणाऱ्या जागा शोधत कॅमेरा तंत्राचा जोर लावणारी भीती नाही, तर काही खरेखुरे प्रश्न उत्पन्न करणारी , आपल्या भोवतालच्या वास्तवाच्या पलीकडे असणारं- नजरेच्या कोपऱ्यातून डोकावणारं काही वेगळच जग तर अस्तित्वात नाही ना, असा प्रश्न विचारायला लावणारी भीती मला अपेक्षित आहे. अशी भीती कधीमधी साहित्यात दिसते. शर्ली जॅक्सनच्या द लाॅटरी मधलं वरवर नाॅर्मल वाटणारं पण एका अघोरी प्रथेला पाळणारं गाव, ब्रॅडबरीच्या फेल्ट मधली आधुनिक तंत्रज्ञानाच्या करामतीपुढे पालकांना अनावश्यक समजणारी मुलं, विल्यम पीटर ब्लॅटीच्या द एक्झाॅर्सिस्टमधे पछाडण्याच्या घटनेचं त्रयस्थपणे केलेलं चित्रण, आयरा लेविनच्या रोजमेरीज बेबीमधलं एरवी आनंददायी मानल्या जाणाऱ्या गरोदर मातेच्या मनस्थितीचं अस्वस्थ करणारं चित्रण आणि लास्ट बट नाॅट द लीस्ट, एच पी लवक्राफ्टच्या विज्ञान आणि भयकथेच्या सीमेवरल्या साहित्यातली अनाकलनीय भीती अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील.
चित्रपटीय भय हे बरचसं या कथा/कादंबऱ्यांमधल्या आशयातल्या विदारक सूचकतेला आणि तिच्या अनेक पातळ्यांवर दिसणाऱ्या अर्थपूर्णतेला बाजूला टाकणारं राहिलं आहे. धक्का, हाच त्याचा फोकस राहिला आणि इतर गोष्टी दुय्यम ठरल्या. वर सांगितलेल्या काही साहित्यकृतींची चांगली चित्रपट रुपांतरं झाली पण सगळ्याच नाही. संयत हाताळणी आणि मोजक्या धक्क्यांच्या सहाय्याने केलेले काही चित्रपट आठवता येतील. लाॅटरी नाही, पण शर्ली जॅक्सनच्याच हाॅन्टींग आॅफ द हिल हाऊस वर राॅबर्ट वाईजने केलेला 'द हाॅन्टींग' (१९६३) हे असंच एक उदाहरण, ज्यात प्रेक्षकाला गोष्टी प्रत्यक्ष न दाखवता केवळ सुचवून त्या त्याच्या कल्पनेत घडवण्यावर भर होता. १९९९ मधला हाॅन्टींगचा रीमेक फसला तो तांत्रिक चमत्कारांमुळेच. आम्ही कायकाय दाखवू शकतो पहा, हा उत्साह त्या चित्रपटाला नडला. समोर दिसणारं काहीही हे आपल्या कल्पनेतल्या भयापेक्षा कमी घाबरवतं. हेच का? आम्हाला वाटलं याहून अधिक भयंकर काही असेल, असं आपल्याला हमखास वाटतं. पोलान्स्कीचा 'रोजमेरीज बेबी' याच मनातली भीती जागवण्याच्या प्रकारातला होता. इतरही काही उदाहरणं आहेत. अपेक्षेप्रमाणेच, आपली तंत्र आणि तंत्रज्ञान यांवरची पकड जशी वाढतेय, तशी ही उदाहरणं अधिकाधिक दुर्मिळ होतायत. अगदी कालपरवाच, मी या प्रकारचे जमलेले दोन चित्रपट पाहिले. एक होता टाय वेस्टचा २०११ मधे केलेला 'द इनकीपर्स', तर दुसरं होतं एच पी लवक्राफ्टच्या ' द काॅल आॅफ कथुलू' या सुप्रसिध्द कथेचं अॅन्ड्रू लेमान ने त्याच नावाने केलेलं रुपांतर. दोघांचा प्रकार अगदीच वेगळा होता, पण दोघांनीही आपल्याला कथानक अधिकाधिक प्रभावी पध्दतीने, आणि नेहमीच्या दृश्य सापळ्यात नं अडकता कसं मांडता येईल याचा पूर्ण विचार केला होता.
इनकीपर्सचा विषय पारंपारिक वळणाचा आहे. म्हणजे झपाटलेलं होटेल, आणि तिथल्या लोकांना येणारे अनुभव वगैरे. त्यात भूतंही खरीखुरीच आहेत, पण त्याचा वेगळेपणा हा प्रामुख्याने दोन गोष्टीत आहे. पहिली म्हणजे, तो भूतांना कसा वापरतो ही. यातली भूतं काय करतात वा करत नाहीत, याकडे आपण दोन पध्दतीने पाहू शकतो. यात दोन वेगळे दृष्टीकोन आहेत. एक आहे तो या बंद पडायच्या बेतात असलेल्या होटेलमधे रिसेप्शनवर काम करणाऱ्या क्लेअरचा( केली मॅकगिलीस) ,तर दुसरा तिचा सहकारी लूक ( पॅट हिली) अाणि इतरांचा. फार वर्षांपूर्वी एका मुलीने या होटेलमध्ये आत्महत्या केली होती आणि ती अजून दिसते असं म्हंटलं जातं. पॅट आणि क्लेअरला या प्रकरणाचा छडा लावण्यात रस आहे. पण अखेर शेवटी जे घडतं, त्याला दोन अर्थ असू शकतात. एक अर्थ त्यातल्या भीतीचं प्रमाण वाढवतो, तर दुसरा झाल्या प्रकाराकडे अधिक सहानुभूतीपूर्वक पहातो.
वेगळेपणा दाखवणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या व्यक्तिरेखांचं अस्सल आणि तपशिलवार चित्रण. सामान्यत: हाॅरर चित्रप्रकारातल्या व्यक्तिरेखा या बळींची संख्या वाढवण्याकरता भरती केलेल्या असतात. त्यांना रंगवलं जातं, ते चमकदार पण ब्राॅड स्ट्रोक्समधे. एकदा ही माफक रंगरंगोटी झाली, की पात्रं जी कमी कमी व्हायला लागतात, ती शेवटी एखादं नायिकेचं पात्रं सोडता बाकी सारे खलास होईपर्यंत. इनकीपर्स मधले क्लेअर आणि पॅट हे शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात, त्यांना केवळ सोप्या छटांमधे नाही , तर अस्सल वाटतीलसं उभं केलं जातं,आणि त्यामुळेच जे घडतं, ते खरोखरच त्रास देणारं असतं.
इनकीपर्सचं मला कौतुक वाटलं, पण काॅल आॅफ कथुलू हून किंचित कमीच. याला कारण आहे. इनकीपर्स मधली कल्पना तशी परीचयाची , दृश्यात मांडण्याजोगी आहे. कथुलू हा आताआता पर्यंत अनफिल्मेबल मानला जायचा. एच पी लवक्राफ्टच्या कामावर अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्याच्या कल्पनाशक्तीला न्याय देणारे फार कमी अाहेत. बहुतेक चित्रपटांनी त्याने संदिग्ध ठेवलेल्या गोष्टींना आपापल्या परीने भडक आणि ढोबळ पध्दतीने मांडलं, आणि त्यांचा प्रभाव कमी केला. त्या पार्श्वभूमीवर हे नवीन प्रकरण खास वाटतं हे नक्की.
लवक्राफ्ट प्रामुख्याने ओळखला जातो, तो कथुलू मायथोजसाठी. त्याच्या एकूण साहित्यामागची कल्पना ही माणसाला क्षुद्र भासवणाऱ्या दैत्यवजा दैवतांनी ( एल्डर गाॅड्जनी) व्यापलेल्या विश्वाची आहे. हे जीव पृथ्वीबाहेरून वा दुसऱ्या एखाद्या मितीमधून आलेले आहेत ,अन कदाचित एखाद्या वैश्विक युध्दाचा ते भाग असावेत. त्यांच्या दृष्टीने आपण किडामुंगीसारखे. लवक्राफ्ट म्हणतो, की आजही त्यातले काही पृथ्वीवरच वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी निद्रिस्तावस्थेत आहेत. कथुलू हे त्यातलच एक भयंकर दैवत.  त्याला येणारी जाग आणि त्याबरोबर ओढवणारा मानवजातीचा विनाश हे सूत्र लवक्राफ्टच्या एकूण साहित्याशीच जोडलेलं आहे. 
या कथा लिहीताना लवक्राफ्टने खूप सूचक निवेदन वापरुन घटनांचा पूर्ण अवाका आपल्यापासून कायमच लपवून ठेवलेला दिसतो. आपल्याला दिसतं ते हिमनगाचं वरचं टोक. त्यापलीकडल्या त्याच्या विस्ताराची कल्पना करणं लवक्राफ्ट आपल्यावरच सोडतो. आता हे साहित्यात ठीक आहे, चित्रपटात सारं स्पष्ट करणं अपेक्षित असल्याने जमणं कठीण. लवक्राफ्टचे चित्रपट फसतात ते सारं काही दाखवायला लागल्यानेच. द काॅल आॅफ कथुलू ते टाळतो. तेही एक म्हंटली तर सोपी युक्ती वापरुन.
मायथोजमधली सर्वात महत्वाची मानली जाणारी 'द काॅल आॅफ कथुलू' ही कथा लिहीली गेली १९२० च्या आसपास. दिग्दर्शक लेमान कल्पना करतो, ती या चित्रपटाची निर्मितीही त्या सुमारासच , मूकपटांच्या काळात झाली असावी, अशी, आणि चित्रपट बेमालूम तसाच सजवतो. अर्थात ब्लॅक अॅन्ड व्हाईट. या काळात तंत्रज्ञान  बरचसं मागे होतं. काय दाखवता येईल याला मर्यादा होत्या. या सगळ्या काळाच्या अन तंत्राच्या  मर्यादाच, दिग्दर्शक दृश्य भागाला एक नवं टेक्श्चर देण्यासाठी वापरतो.
द काॅल आॅफ कथुलू ची गोष्ट तशी तुकड्यातुकड्यात आणि नायकविरहीत आहे. कथुलू जागा होऊन मानवजातीचा विनाश जवळ येईल की काय अशी परिस्थिती तयार होणं हीच त्याच्या  केंद्रस्थानी असलेली कल्पना. काही जुन्या कागदपत्रांमधून मिळालेली माहिती, कोणा इन्स्पेक्टरची साक्ष, कोणाला पडणारी स्वप्न, एका बोटीवरल्या लोकांना आलेला भयानक अनुभव अशा सुट्या गोष्टी जोडत हे कथानक तयार होतं. जेमतेम तासाभराच्या या चित्रपटाला ते पुरेसंही आहे.
हे सारं शब्दश: दाखवायचं तर प्रचंड बजेट तर लागेलच, वर तरीही ते हास्यास्पद होण्याची भीती. चित्रपटात ते होत नाही कारण ज्याप्रमाणे स्वत: लवक्राफ्ट सूचक शब्द वापरून डोकं लढवणं वाचकांवर सोडायचा, तसाच इथला दिग्दर्शक जुन्या शैलीत पण आधुनिक दृष्टी वापरुन सूचक नेपथ्याचा वापर करतो आणि तपशील प्रेक्षकांवर सोडतो. आपण चित्रपट जुन्या काळचा मूकपट म्हणूनच पहात असल्याने, जे दिसतं ते आपल्याला खटकत नाही, उलट आपल्या विचाराला चालना देण्यासाठीच आपण या दृश्यांना वापरतो.
मध्यंतरी दिग्दर्शक  गिआर्मो डेल टोरो (पॅन्स लॅबिरिन्थ, हेलबाॅय) लवक्राफ्टच्या दुसऱ्या एका महत्वाच्या कथेवर, 'अॅट द माऊन्टन्स आॅफ मॅडनेस' वर चित्रपट काढणार अशी हवा होती. ते जर झालं, तर खरोखरच आपल्याला डेफिनिटीव लवक्राफ्ट म्हणण्याजोगा बिग बजेट चित्रपट पहायला मिळेल. पण जोपर्यंत ते होत नाही, तोवर त्याच्या साहित्यावर कमी बजेटचे का होईना, पण चांगल्या कल्पना लढवत केलेले इतरही चित्रपट बनावेत. तरच या भयसाहित्यातल्या मोठ्या लेखकाला अधिक लोकांपर्यंत पोचता येईल. १५ मार्च या त्याच्या मृत्यूदिनानिमित्ताने आपण एवढी इच्छा तरी नक्कीच व्यक्त करु शकतो.

-  गणेश मतकरी

Read more...

अमेरिकन सिनेमा आणि कलामूल्य

>> Saturday, March 5, 2016

आॅस्कर निकाल हे साधारण अपेक्षेप्रमाणेच लागले. 'साधारण' म्हणण्यामागे कारण आहे. द रेवेनन्ट जे चार महत्वाचे पुरस्कार  घेऊन जाईल असं वाटलं त्यातले तीन त्यांनी मिळवले आणि त्या तिन्ही पुरस्कारांत एक प्रकारचा इतिहास घडवला. १९९४ साली 'व्हाॅट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप?' साठी पहिलं, सहाय्यक अभिनेत्याचं नामांकन मिळाल्यावर इतक्या वर्षांनी लिओनार्डो डिकाप्रिओला हा बहुचर्चित पुरस्कार एकदाचा मिळाला आणि जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना आभाळ ठेंगणं झालं. सोमवारी आपल्याकडले जे लोक सोशल नेटवर्कवर होते त्यांना डिकाप्रिओला पुरस्कार मिळाल्याने किती प्रचंड आनंदाचं वातावरण आलय याची कल्पना आली असेल. जवळपास आपण व्यक्तीश: किंवा अापल्या देशानेच काहितरी मोठी कामगिरी केल्यासारखा आनंद यात होता. तो निर्भेळ, निरपेक्ष होता, त्यामुळे तो पाहून छानच वाटलं. खरी चांगली गोष्ट ही झाली की पुरस्कार मिळाला, तो खरोखर चांगल्या परफाॅर्मन्सला.

अनेकदा असं होतं, की चार पाचदा नामांकन होऊन पुरस्कार मिळाला नाही, तर हळूहळू त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीची लाट पसरायला लागते, आणि फार ग्रेट नसलेल्या कामाबद्दलही पुरस्कार देऊन टाकण्यात येतो. वेगळ्या विभागातलं एक उदाहरण द्यायचं, तर मार्टीन स्कोर्सेसीला दिग्दर्शनाची जी पहिली पाच नामांकनं मिळाली, त्यात 'रेजिंग बुल'पासून 'गुडफेलाज' पर्यंत त्याचे अनेक महत्वाचे , स्वतंत्र चित्रपट होते. प्रत्यक्षात जो चित्रपट सहाव्या खेपेला त्याला दिग्दर्शनाचं आॅस्कर देऊन गेला, तो होता 'द डिपार्टेड', हॅान्गकाॅन्गच्या इन्फर्नल अफेअर्सचा रिमेक. हा चित्रपट चांगला असला, तरी हे स्कोर्सेसीचं सर्वोत्कृष्ट काम नक्कीच नाही. डिकाप्रिओचं असं झालं नाही. हा कदाचित त्याचा आजवरचा सर्वोत्तम परफाॅर्मन्स नसेल, पण निश्चितच त्याच्या चांगल्या कामातला एक आहे.

उरलेली जी दोन पारितोषिकं रेवेनन्टने मिळवली त्यात लुबेज्कीचं छायालेखनाचं लागोपाठ तिसरं आॅस्कर , आणि अलेहान्द्रो इन्यारितूचं दिग्दर्शनाचं लागोपाठ दुसरं ( गेल्या साठ / पासष्ट वर्षात दिग्दर्शनाचा पुरस्कार दोन वर्ष लागोपाठ एका व्यक्तीला मिळालेला नाही) आॅस्कर, असे पुरस्कार होते. या तीनही अपेक्षित पुरस्कारांनंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिकही त्यांनाच मिळावं अशी अपेक्षा होती, जे झालं नाही. उलट 'स्पाॅटलाईट' सारखा त्यामानाने छोटा , आशयप्रधान चित्रपट ते घेऊन गेला. हे अनपेक्षित नक्कीच नव्हतं, कारण 'स्पाॅटलाईट' आणि 'द बिग शाॅर्ट' यांचा आशयच त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत अस्सल स्पर्धक म्हणून उभा करणारा होता. पण रेवेनन्टच्या तीन पुरस्कारांनंतर त्यांच्या बाजूने पारडं झुकलं असताना हे होणं, हा वेगळेपणा. स्पाॅटलाईट बद्दल पहायचं तर त्यांना एकूण दोनच पुरस्कार आहेत. एक स्वतंत्र पटकथेचा आणि दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम असल्याचा धोषा लावणाऱ्यांना हा वेक अप काॅल म्हणता येईल का? नक्कीच.

अशा आॅस्करमय झालेल्या वातावरणात, फेसबुकवर एक पोस्ट पहायला मिळाली, ती आॅस्करला विरोध करणारी. आॅस्कर केवळ इंग्रजी चित्रपटांबद्दलचे पुरस्कार असतात आणि या चित्रपटांमधे काहीही पहाण्यासारखं नसतं, त्यापेक्षा युरोपिअन चित्रपटच कसे चांगले, चित्रभाषा आणि हाताळलेले विषय यात उजवे असतात, आणि एकूण हाॅलिवुड त्याबरोबर आॅस्कर पुरस्कारही कसे टाकाऊ आहेत, या प्रकारची ही पोस्ट होती. तिचा काहीसा सेन्सेशनल शेवट होता, तो "हा असला हाॅलिवुड सिनेमा पहाण्यासाठी मी नालायक असल्याचा  मला अभिमान आहे", असा. गंमत म्हणजे या विचारात काहीही नवं नाही, किंबहुना ते जुने( जुनाटही)  आणि कदाचित तीसेक वर्षांपूर्वी खरोखर व्हॅलिड वाटणारे असावेत या प्रकारचे आहेत. ( तेही खूप नाही, कारण ज्या युरोपिअन सिनेमाचे हे विचार गोडवे गातात त्यातलीच फ्रेन्च न्यू वेव्ह सुरु करणाऱ्या समीक्षक-दिग्दर्शकांनी १९४०/५० मधे हाॅलिवुडने केलेल्या कामाला कला म्हणून मान मिळवून देऊन त्यांचं रास्त कौतुकही केलेलं आहे.) त्यानंतरच्या काळात अमेरिकन चित्रपटात झालेला बदल, या लोकांच्या खिजगणतीत नाही.

आपल्याकडे अमेरिकन चित्रपटांना प्रामुख्याने विरोध झाला तो इन्टेलिजन्शीआकडून , चित्रपट पंडितांकडून, समांतर सिनेमाची चळवळ उभी करणाऱ्या दिग्दर्शका- कलावंतांकडून, आणि काही प्रमाणात फिल्म स्कूलमधे शिकून आलेल्या विद्यार्थ्यांकडून. या विरोधकातल्या किती जणांनी अमेरिकन सिनेमाला आपल्याकडे वितरीत होणाऱ्या ब्लाॅकबस्टर सिनेमांच्या पलीकडे जाऊन पाहिलं, हा एक संशोधनाचाच विषय आहे. ज्यांनी ते पाहिलं, त्यांचा विरोध पुढे मावळत गेला अशीही उदाहरण आहेत.

हाॅलिवुडला एकूण अमेरिकन सिनेमा समजणं ही मोठी चूक आहे, तरीही आपल्याकडे जसा हिंदी सिनेमा/ बाॅलिवुड हेच राष्ट्रीय सिनेमा मानलं जातं, आणि त्यापलीकडल्या कामाकडे दुर्लक्ष करण्याचा कल असतो तसच हे काहीसं. अमेरिकन सिनेमाला होणारा विरोधदेखील प्रामुख्याने याच गृहीतकावर आधारलेला असतो. हाॅलिवुड म्हणजे चार लोकांची करमणूक करण्याच्या हेतूने बनवलेला सवंग सिनेमा, त्याला कलाधिष्ठान नाही, हा यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे केवळ मार्केटिंग आणि ब्रॅन्डींग या जोरावर हा सिनेमा पुढे आला आहे. त्यामुळे दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर हा कन्झ्युमरीझम आहे. दुसरं काही नाही. या प्रोडक्टला दर्जा नाही, केवळ ते विकायला बसलेल्यांना, ते कसं विकायचं, ते  माहित आहे. तिसरा म्हणजे अर्थातच अमेरिका बाह्य चित्रपटांचं कौतुक , मग ते युरोपापर्यंत न थांबता टर्की, इराण पर्यंत पोचतं. आणि अखेरचा मुद्दा म्हणजे अमेरिकेची राजकीय भूमिका, जी त्यांच्या चित्रपटातून पुढे येते, आणि जिचा धिक्कार करणं आवश्यक आहे ( तो धिक्कार, हाॅलिवुडमधे काम करणारे लोकच अनेकदा करत असतात, हे कोणी लक्षात घेणार नाही) . अशा विरोधाला काय उत्तर द्यायचं हे अनेकदा कळेनासं होतं, कारण आपला मुद्दा सिध्द करण्यासाठी ही मंडळी काही उदाहरणं देताना दिसत नाही, आणि आपण उदाहरणांसह आपला काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्या उदाहरणांना निव्वळ अपवाद म्हणून बाजूला टाकलं जातं.

अमेरिकन चित्रपटाने सुरुवातीपासूनच पध्दतशीर आणि बरीचशी निर्मितीसंस्थांच्या हाताखाली असणारी निर्मिती केली हे खरं आहे, पण मूळचे अमेरिकन तसेच तिथे मिळणाऱ्या संधीमुळे जगभरातून त्यांच्याकडे आकर्षित झालेले दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून त्यांच्याकडे खूप दर्जेदार काम झालेलं आहे. विशेषत १९८० च्या दशकात झालेला सनडान्स चित्रपट महोत्सवाचा उत्कर्ष आणि त्यातून अमेरिकन इंडिपेन्डन्ट सिनेमाला आलेलं महत्व, यामुळे त्यांच्या चित्रपटाचं रुप बदलायला मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. रिचर्ड लिन्कलेटर, डेव्हिड लिंच, स्टीवन सोडरबर्ग, वेस अॅंडरसन, डेव्हिड फिंचर, क्रिस्टफर नोलन, क्वेन्टीन टेरेन्टीनो या आणि अशा इतरही अनेक दिग्दर्शकांचं काम हे अजिबातच दुर्लक्ष करण्यासारखं नाही. मात्र ते डोळसपणे पाहून मग त्यावर आपलं मत बनवलं पाहिजे. मुख्य म्हणजे आजचा अमेरिकन सिनेमा व्यवसाय आणि कला यांचं मिश्रण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

अमेरिकन चित्रपट हे 'केवळ करमणूक' करतात हा आरोप ( यात आरोप करण्यासारखं तरी काय आहे !)  केला जातो खरा, पण तेही खरं नाही . खरा विरोध असतो, तो गोष्ट सांगण्याला . गोष्ट सांगणारा सिनेमा हा कलाप्रकार म्हणून कुठेतरी कमी आहे आणि गोष्टीपेक्षा चिंतनाला महत्व देणारा, वा काही न घडवणारा, वास्तवाच्या आभासातून परिस्थितीवर भाष्य करु पहाणारा सिनेमा कला म्हणून श्रेष्ठ असं या विरोधकांच्या मनावर कुठेतरी बिंबवलेलं असतं. युरोपीअन चित्रपटात अशी मांडणी असण्याचं प्रमाण अधिक असल्याने सबकाॅन्शसलीच त्यांना तो सिनेमा अधिक वरचढ वाटतो. युरोपिअन प्रेक्षकांना या प्रकारचे चित्रपट पहाण्याची हाॅलिवुडपेक्षा अधिक सवय आहे, त्यामुळे तो सिनेमा त्यांना अधिक जवळचा वाटतो. (हे खरं असलं , तरी याचा अर्थ रंजक सिनेमा त्याच्याकडे नाहीच असं नाही. सर्वच चित्रपट उद्योगात धंदेवाईक चित्रपटांना स्थान आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो नाहीसा होत नाही.) याउलट  अमेरिकन सिनेमा हा गोष्ट सांगत असल्याने तो प्रेक्षक धार्जिणा , अशी समजूत तयार झालेली आहे. जितकं घडणं कमी, तितकं कलामूल्य अधिक,असा काही नियम नाही. असायलाही नको.

सिनेमाला गोष्ट आहे की नाही, तो कोणत्या देशात बनला, त्यात अभिनेते स्टार्स आहेत  का नाॅनअॅक्टर्स, त्याला नफा झाला का तोटा, यावर चित्रपटाचं मूल्य ठरु नये. ते एकाच प्रकारे ठरवावं, चित्रपट त्रयस्थपणे , कोणत्याही विचारशैलीच्या ओझ्याखाली न येता पाहून. ज्यांचा अमेरिकन चित्रपटाला मनापासून विरोध आहे त्यांना मी एकच म्हणेन, की गेल्या आणि या वर्षीच्या आॅस्करमधे सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी नामांकनात आलेल्या चित्रपटांची यादी समोर ठेवा आणि संधी मिळेल तसे ते पहात चला. ते तुम्हाला युरोपिअन वा आशियाई चित्रपटापेक्षा वेगळे जरुर वाटतील, आणि का नाही, जरुर वाटावे. ते वेगळ्या संस्कृतीतून आलेच आहेत. तरीही त्यातले बहुसंख्य चित्रपट तुम्हाला फायदा डोळ्यासमोर ठेउन केलेले, निव्वळ करमणूकप्रधान वाटणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो. हे चित्रपट पाहूनही तुमचं मत बदललं नाही, तर पुन्हा बोलूच.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP