चित्रपट रसास्वादाची गरज

>> Sunday, August 17, 2014


आपल्याकडे आस्वाद या गोष्टीला तशीही फार कमी किंमत आहे, मग तो चित्रपटांचाच असं नाही. माझ्या मते आपल्याला साहित्य, कला या  सर्वच प्रांतात महत्व वाटतं, ते समजून घेण्यापेक्षा मत देण्याला. चित्रपटात ते जरा जास्त प्रमाणात आहे इतकंच. आणि एका परीने ते साहजिकच आहे.
लहानपणापासून आपल्यासमोर साहित्य आणि एकूण कलांना सादर केलं जातं ते काहीशा गांभीर्याने, तेही मोठे लेखक, कलावंत यांच्या जुजबी माहितीसह. शाळांमधून या विषयांना मान असतो. हे सारं कोणत्या का मार्गाने होईना पण आपल्या संस्कृतीशी संबंधित आहे असं वलय या विषयांभोवती असतं. साहित्यात गोष्टीही सांगितल्या जात असल्या तरी पालकांच्या मनातला काही साहित्यकृतींचा, साहित्यिकांविषयीचा आदर कुठेतरी मुलांपर्यंत पोचतो. तीच गोष्ट काही प्रमाणात कलेची. विरंगुळ्यापेक्षा तंत्रासाठी, चित्रकाराच्या, शिल्पकाराच्या नावासाठी या कलाकृती पाहिल्या जातात. त्यांना महत्व दिलं जातं. चित्रपटांचं असं होत नाही.
घरात पहिल्यापासूनच आपल्याला शिकवणी मिळते की हे सारं करमणुकीसाठी आहे, खरं तर ते नं पाहाता अभ्यासच केलेला बरा. चित्रपट ही कलाही असली तरी त्यातल्या खर््या मास्टर्सच्या कलाकृती आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि चित्रपटगृहात दिसणारं सारंच एका पठडीचं असतं. त्यावर चर्चा होत नाही, गप्पा होतात. मतं व्यक्त केली जात नाहीत, शेरेबाजी केली जाते. त्यासंबंधी समीक्षा वाचली जात नाही, गाॅसिप वाचला जातो.
 या परिस्थितीत चांगले चित्रपट पाहण्याची शिस्त तयार होणार कशी?अन ती तयार झाली नाही तर चांगला प्रेक्षक तयार होणार कसा? आणि प्रेक्षकच बनला नाही, तर त्याला पाहाण्यासाठी चित्रपट निर्माण करणार कोण ? सध्या आपल्याकडलं एकूण आणि खासकरुन मराठी चित्रपटांचं वातावरण पाहिलं तर दिसतं, की आज आपल्याकडे चांगला चित्रपट कोणता याविषयीही काही प्रमाणात संभ्रम आहे. काहींच्या मते केवळ गंभीर वा सामाजिक समस्या मांडणारा चित्रपटच खरा आणि व्यावसायिक चित्रपट टाकाऊ तर काही जण ब्लाॅकबस्टरच्या प्रेमात राहून कोणत्याही वेगळ्या प्रयत्नाला शिव्या देणारे. खरं तर असा सरसकट 'सब घोडे बारा टक्के' करणारा दृष्टीकोनच चुकीचा आहे. चित्रपट चांगला का वाईट, हे तो कोणत्या प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून केलाय यावर ठरत नाही, त्याचा विषय गंभीर का विनोदी यावर ठरत नाही, तो तिकीट खिडकीवर चालला का पडला यावर ठरत नाही. ते ठरवण्यासाठी तुमची चित्रपटाकडे पाहाण्याची एक दृष्टी तयार व्हावी लागते.
चित्रपटाकडे करमणूक म्हणून पाहाण्यात काहीच हरकत नाही , पण करमणूकीची व्याख्या आपण काय करतो याचाही विचार हवा. केवळ पारंपारिक मेलोड्रामा, हाणामार््या वा खुर्चीतून पाडणारा विनोद हीच करमणूक नव्हे. चित्रपटाने तुम्हाला त्याच्या कथानकात अडकवणं, गुंतवणं हीदेखील करमणूकच झाली. मग त्यासाठी  चित्रपट वरवरच्या ढोबळ पारंपारिक युक्त्या वापरो वा नवीनच एखाद्या मार्गाने तुम्हाला आकर्षित करो. त्यातून करमणूक व्हावी हे मान्य केलं, तरी चित्रपटाचा आस्वाद केवळ  गोष्ट समजून घेण्यात, संवादांना दाद देण्यात, वा एखाद्या तयारीच्या नायकाचा़ अभिनय पाहाण्यात संपत नाही. ती तर सुरुवात असते. आपण जितकं खोलवर पाहू तितक्या अधिक गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. कधी वरवर कथेत वाहवत जाताना न समजून आलेल्या दिग्दर्शन , छायाचित्रण, संकलनासारख्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला माध्यमाचं नवं आकलन करुन देतं,  कधी आशयाचा एखादा छुपा पैलू आपल्याला नव्याने दिसून येतो, तर कधी या चित्रकर्त्याच्या इतर कामाबरोबर घातलेली सांगड आपल्यासाठी चित्रपटाचा वेगळाच अर्थ लावून जाते. अर्थातच हे सारं केवळ तुम्ही ठरवून होत नाही, होणार नाही. त्यासाठी निश्चित प्रयत्न होणं आवश्यक आहे.
गेल्या दहा वर्षांमधे मराठी चित्रपटांनी घेतलेली झेप ही लक्षणीय आहे. मात्र आज आपण ज्या पातळीला आहोत त्याहून वर जायचं, वा त्याच पातळीला राहायचं तरीही केवळ आपले निर्माता दिग्दर्शक तयारीचे असून भागणार नाही. त्यांची तयारी हवीच , पण त्यांच्या कामाला योग्य तो प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांकडून मिळायला हवा. तो मिळायचा तर प्रेक्षकाने आपली दृष्टी तयार करायला हवी.
म्हंटलं तर हे कठीण नाही. आज परिस्थिती खूप बदललेली आहे. आपल्याला पाहाण्यासाठी जगभरचा सिनेमा आज उपलब्ध होऊ शकतो. तीच गोष्ट पुस्तकांची. चित्रपटाचा रसास्वाद शिकवणारी उत्तमोत्तम पुस्तकं आज उपलब्ध आहेत. चांगल्या वेबसाईट्स आहेत.  मात्र ही झाली साधनं. नुसती ती असून भागणार नाही. आपल्या बाजूनेही प्रयत्न हवा. केवळ पुस्तकांचा सल्ला आंधळेपणाने न स्वीकारता, किंवा हाताला लागेल तो नवा चित्रपट केवळ मिळतोय म्हणून डाऊनलोड न करता आज प्रेक्षकाने विचारांची एक दिशा ठरवण्याची गरज वाटते.
मला वाटतं चित्रपटाचा जाणीवपूर्वक रसास्वाद घेणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. तिच्याकडे आज केलेलं दुर्लक्ष केवळ आपली प्रेक्षक म्हणून वाढ थांबवणार नाही, तर नव्या प्रयत्नांना मिळणार््या प्रतिसादाला आडकाठी करुन एकूण मराठी चित्रपटउद्योगालाही ते संकटात आणू शकतं.
चित्रपटाचं जाणीवपूर्वक रसास्वाद घेण्याचं कौशल्य ‘चित्रपट रसास्वाद’ शिबिरांतून मिळू शकतं.

मुंबईत प्रभात चित्र मंडळातर्फे असं शिबिर येत्या १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान पु लं देशपांडे अकॅडमी मधे घेण्यात येणार आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी ०२२- २४१३१९१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
त्याखेरीज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजचा महाराष्ट्र चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट रसास्वादाच्या ‘कार्यशाळा’ घेतल्या जातात. अशीच एक कार्यशाळा येत्या १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर्पयत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. www.nfaipune.gov.in या संकेतस्थळावर त्याची अधिक माहिती उपलब्ध आहे.



- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP