हाफहार्टेड रईस

>> Friday, February 3, 2017


लोकसत्ता गप्पांच्या कार्यक्रमात जावेद अख्तरना ' मै आजभी फेके हुए पैसे नही उठाता' या प्रकारचे जबरदस्त डायलाॅग्ज कसे लिहायचात असा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले ‘आज मला तसे डायलाॅग्ज बरे वाटत नाहीत. ते खोटे वाटतात, आजचे संवाद हे असे टाळीबाज नसतात, अधिक नैसर्गिक असतात.’ असं असतानाही त्यांचा मुलगा सहनिर्माता असलेल्या रईसमधे जागोजाग अशा टाळीबाज वाक्यांची रेलचेल आहे. या वाक्यांचा प्राॅब्लेम हा असतो, की संवाद तेवढ्यापुरता एेकायला बरा वाटला , प्रसंग चमकदार वाटला, तरी व्यक्तिरेखा खऱ्या वाटत नाहीत. त्या मुळापासून उभ्या नं रहाता वरवरच्या वाटतात. 

शब्दबंबाळ संवाद आणि प्रसंगांचं जुनाट पद्धतीचं डिझाईन हा भाग आज फार कंटाळा आणतो. एखाद दुसऱ्या प्रसंगात हे ठीक वाटतं, पण कोणतच पात्र दुसऱ्याचा शब्दही खाली पडू देत नसेल तर जरा वेळाने कंटाळा यायला लागतो. पुन्हा हे संवाद असणारे प्रसंग आशयाचा दृष्टीने काही घडणारे आहेत, पण त्या घडवण्याची पद्धतही जुन्या सिनेमातल्यासारखी , ड्रामेबाज. जयराजचं आव्हान आणि त्याला पुढे दिलेल्या प्रत्युत्तराबरोबरची घड्याळाची फेकाफेक, मजमूदारच्या रईसबरोबरच्या पहिल्या भेटीतला चहाचा संदर्भ आणि तो पुढे वापरणं , हे सगळच कृत्रिम वाटतं, आणि ते सतत आहे. मुद्दा कळला, पुढे चला, असं म्हणावंसं वाटतं. 

काही वर्षांपूर्वी हे चालून जात असे पण आज कालबाह्य वाटतं. किंबहुना केवळ संवादाबाबत नाही तर एकूणच रईस हा जुन्या वळणाचा सिनेमा आहे. अॅन्टीहिरोला पारंपारिक पद्धतीने डेव्हलप करत त्याच्या गडद बाजूंवर रंगसफेदी करणारा, मेलोड्रामा हाच धर्म समजणारा, अनावश्यक गाण्यांची गर्दी असलेला, सरधोपट खलनायक असणारा आणि इनकन्सिस्टन्ट व्यक्तिरेखांना ग्लोरिफाय करणारा. 

याचा अर्थ तो काही टाकाऊ आहे असा अजिबातच नाही. एेशीच्या दशकात तर तो खूपच जोरदार वाटला असता. त्यातले अमिताभचे संदर्भही त्यामुळेच चपखल आहेत. रईसची व्यक्तिरेखाही दिवारमधल्या अमिताभमधे तीसेक टक्के त्रिशूलमधला अमिताभ मिसळल्यासारखी वाटते. असो. चित्रपट जुन्या काळात घडणारा असणं, आणि जुनाट वाटणं , यात फरक आहे. (संदर्भासाठी पहा - गँग्ज आॅफ वसेपूर) . आज रईस जुनाट वाटतोच. तरीही, अडीच दशकं उशीर करुनही तो ठीक वाटतो हेच विशेष. 

कोणत्याही नॅरॅटीवचे सुरुवात, मध्य आणि शेवट असे तीन भाग असल्याचं अॅरिस्टाॅटल म्हणतो, पण हिंदि चित्रपटात मध्य हा फार डाॅमिनेट करतो असं आपल्याला दिसतं. या तीन विभागातून जो ग्राफ तयार व्हायला हवा तो बहुधा होत नाही आणि बराच वेळ एका पदधतीतच घटना घडत रहतात. सुरुवात आणि शेवट हे नावालाच असतात. रईसमधेही साधारण हाच प्रकार आहे. प्रत्यक्षात रईसने ( एसार्के )स्वत:ला कसं प्रस्थापित केलं हा भाग इन्टरेस्टिंग झाला असता, पण तो भाग फारसा न दिसता, केवळ त्याने जयराजने   ( अतुल कुलकर्णी) मागितलेल्या पैशांची सोय कशी लावली हे तो दाखवतो आणि थांबतो. तिथून पुढे प्रस्थापित होण्याचा भाग मोन्ताजमधे येतो. त्यामानाने शेवटाकडे किंचित ग्राफ दाखवण्याचा प्रयत्न आहे, पण त्यातला कळीचा मुद्दा ' धंदा तोवर चांगला जोवर तो दुसऱ्याचं नुकसान करत नाही ' , हा बाकीच्या मसालेदार फिल्ममेकिंग आणि संवादफेकीत आफ्टरथाॅटसारखा येतो, आणि पुरेसा अधोरेखित होत नाही. 

चित्रपटभर पसरलेला, आणि मुख्य बाॅडी असणारा भाग हा गुजरातमधलं प्रोहिबिशन धाब्यावर बसवून दारुचा धंदा करणारा आणि पुढे थोडाफार गॅंगस्टर झालेला रईस आणि त्याच्यामागे वेड्यासारख्या लागलेला इन्स्पेक्टर मजमूदार ( नवाजुद्दीन ) यांचा संघर्ष , हा आहे. पण हा संघर्ष बराचसा अनइव्हन आहे, दोन कारणांसाठी. पहिलं म्हणजे मध्यंतरापर्यंत जयराजचं पात्र अधिकृत खलनायक असल्याने मजुमदार ही दुय्यम व्यक्तिरेखा रहातो. त्यानंतरही, मजमूदारचं पात्र इनकन्सिस्टन्ट रहातं. प्रत्यक्षात रईस हा हार्डकोअर बॅड गाय नाही. तो दारुचा धंदाही करतो, पण हा धंदा गुजरातच्या चौकटीत मोठा गुन्हा असला तरी एका पोलिस अधिकाऱ्याबरोबर एवढा जीवघेणा संघर्ष उत्पन्न होण्यासारखा हा गुन्हा वाटत नाही. त्यात चित्रपटभर त्यांचा संघर्ष काहीसा लव्ह-हेट रिलेशनशिप असल्यासारखा वाटतो. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटचं मजमूदारचं वागणं पटत नाही. चित्रपटाचं एकूण तर्कशास्त्र आजचं नाही , अॅंग्री यंग मॅन पिरीअडचं आहे. त्या तुलनेत शेवट ( शेवटाचं तर्कशास्त्र- एन्ड रिझल्ट नाही) आजच्या चित्रपटात चालण्यासारखा आहे. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटत रहातं.

तपशीलात रईस बराच मार खातो. प्रत्यक्ष धंद्याचे बारकावे नं दाखवता, वरवरच्या गमजा मारण्यात आणि आॅब्विअस निराक्षणं ( उदाहरणार्थ दप्तरातून दारू नेणे) करण्यात त्याचा बराच वेळ जातो. खलनायकांची अनावश्यक गर्दी असल्याने कोणाचाच विशेष प्रभाव पडत नाही. मुसाची व्यक्तिरेखा तर कॅमिओच वाटते. अतुल कुलकर्णी ला काही प्रसंग येतात. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता ही तर कार्टून्सच वाटतात. त्यांचं वागणं कुठेही, एकाही प्रसंगात पटत नाही. खरे गुजरातचे मुख्यमंत्री किती चतुर असतात हे आपल्याला माहीतच आहे. त्या मानाने चित्रपटातले राजकारणी भलतेच बावळट वाटतात. त्यांच्यापुढे रईसचं नांगी टाकणंही पटत नाही. हे सावरायलाच शेवटी मजमूदारला खलनायकी पावलं उचलावी लागतात असंही वाटून जातं. 

ते सगळं सोडताही रईस निवडून येतो त्याचा फायदा - तोटा काय, ते दिसत नाही. रईसच्या मुलाचं हवं तेव्हा दिसणं आणि बाकी गैरहजेरी तर हास्यास्पदच. चित्रपटाचा काळ गाण्यांमधे विसरल्यासारखा वाटतो. आणि नायिकेच्या संपूर्ण व्यक्तीरेखेतही. 

चित्रपटाच्या नसानसात भिनलेला मेलोड्रामा बाजूला केला तर चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना  अधिक पटण्यासारखी आहे. रईसचा प्रत्यक्ष काळ्या धंद्याकडून गॅंगस्टरीझमकडे जाणं , तिथून मार्ग बदलून अधिकृत व्यवसायात शिरण्याचा प्रयत्न करणं ( जे खरोखरच तेव्हाच्या गॅंगस्टर्सनी केलं, काहींना ते जमलं, काहींना नाही) आणि शेवटी त्याच्या भूतकाळातल्या पापांचा घडा भरणं, हे पुरेसं वजन असणारं आहे. प्रमुख भूमिकेत शहारुख खान असल्याने त्या व्यक्तिरेखेला अमुक एक वजन देण्याचं आणि नवाजुद्दीनने आपली बाजूही नेहमीच्याच हुशारीने सांभाळण्याचं काम केल्याने एकूण चित्रपट चालून जातो. कंटाळा आणत नाही , पण अपेक्षेइतका आवडत नाही. परझानिआ केलेल्या राहूल ढोलकीआंकडून याहून अधिक अपेक्षा नक्कीच होत्या. 
 
-  गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP