लय भारी' च्या निमित्ताने

>> Sunday, July 20, 2014

 गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटांनी भारतीय चित्रपटउद्योगात आपलं स्वतःचं स्थान तयार केलंय. राष्ट्रीय पुरस्कारांमधे लक्षात येण्याजोगा सहभाग, करमणूकीबरोबरच विषयांच्या वेगळेपणाला आणि नवं काही करुन पहाण्याला स्थान, सामाजिक जाणीव, दिग्दर्शकीय दृष्टीकोनाला असणारं महत्व यामुळे प्रादेशिक चित्रपटांमधे  महाराष्ट्राचं नाव सध्या पुढे आहे. बाॅलिवुडच्या अधिक चमकदार, अधिक ग्लॅमरस चित्रपटांच्या बरोबर राहून आपण हे करुन दाखवतोय यामुळे कौतुक अधिक. दुर्दैवाने, अजुनही आपल्या प्रेक्षकांचा दृष्टीकोन बर््याच अंशी पारंपारिक करमणुकीच्या पलीकडे गेलेला नाही. त्यामुळे वेगळ्या चित्रपटांना हवा तितका प्रतिसाद अजुनही मिळत नाही. तरीही आज वेगळ्या वाटेने जाणारा संवेदनशील चित्रपट ( उदा- गाभ्रीचा पाऊस, गंध, विहीर, वास्तुपुरुष) आणि थोडा परिचित ढंगाचा पण चांगली  करमणूक करणारा प्रेक्षकप्रिय चित्रपट ( उदा- बालक पालक,डोंबिवली फास्ट, दे धक्का,यलो) हे दोन प्रवाह पूर्ण मराठी चित्रपटउद्योगाचा तोल राखून आहेत.   आपल्या चित्रपटगृहांमधली निशिकांत कामत दिग्दर्शित आणि रितेश देशमुख अभिनित ' लय भारी'ची ब्लाॅकबस्टर एन्ट्री ही या पार्श्वभूमीवर पाहायला हवी.
 काही चित्रपट क्रिटिक प्रुफ असतात. म्हणजे समीक्षकांच्या मतांचा ते चालण्या न चालण्याशी काहीही संबंध नसतो. त्यांची आधीपासूनच एक हवा असते, प्रेक्षकांना त्याच्याबद्दल उत्साह असतो, निर्मात्यांची भारी ताकद त्यांना शक्य तितक्या अधिक जनतेपर्यंत पोचवायला तयार असते, त्यामुळे चित्रपट कमालीची कमाई करणार हे जणू ठरलेलंच असतं.  ' लय भारी' असा असणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती.
 मला आधीपासूनच या चित्रपटाबद्दल कुतुहल होतं. कारणं दोन. दिग्दर्शक आणि नायक. निशिकांत कामतचे 'डोंबिवली फास्ट' आणि 'मंुबई मेरी जान' मला खूप आवडलेले आणि करायला बर््यापैकी अवघड चित्रपट आहेत. रितेश देशमुखही निःसंशय उत्तम अभिनेता आहे, ज्याचा व्हायला हवा होता तितका आणि तसा वापर तो काम करतो त्या हिंदी चित्रपटांनी आजवर तरी करुन घेतलेला नाही. हे दोघं एकत्र येऊन मराठीत एक चांगला चित्रपट करू पाहातायत ही गोष्ट छानच होती. 'लय भारी' बाबत  एक गोष्ट मुळातच स्पष्ट आहे. ती म्हणजे या चित्रपटाशी संबंधित मंडळींमधल्या कोणाचाही आपण कसं काहीतरी आशयसंपन्न करतोय असं दाखवण्याचा मुळीच दावा नव्हता, नाही. त्यांनी आपली बाजू आधीच स्पष्ट केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हा एक तद्दन व्यावसायिक चित्रपट आहे. जसे हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपट असतात, त्या वळणाचा. मराठीत तो असण्याचा वेगळेपणा असलाच तर हाच, की हुकूमी मनोरंजनाचं हे टोक आपण याआधी कधीच गाठलं नव्हतं.
खरं पाहाता, चांगल्या व्यावसायिक चित्रपटात वाईट काहीच नाही, मग तो हाॅलिवुडचा असो वा मराठी ! सार््यांनीच आशयघन चित्रपट केले तर ज्याला निव्वळ मनोरंजन हवंय, तो साधासुधा प्रेक्षक काय करेल? या मुद्दयात तथ्य आहे यात शंकाच नाही, पण अनेकदा ते व्यावसायिक चित्रकर्त्यांकडून कन्टेन्ट बेस्ड चित्रपटांच्या विरोधात, आणि सामान्य चित्रपटांना जस्टीफाय करण्यासाठी वापरलं जातं, जे योग्य नाही. दुसरा एक मुद्दा म्हणजे तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या बळावरच निर्माते म्हणा, दिग्दर्शक म्हणा, अधिक प्रायोगिक प्रयत्नांना पोसू शकतात. हेही मान्य. पण मनोरंजनाच्याही पातळ्या असतात, आणि कोणता चित्रपट कोणत्या पातळीवर उभा आहे, याने फरक पडतो. सर्व व्यावसायिक चित्रपटांना सरसकट एक न्याय लावता येत नाही. त्याशिवाय खरोखर किती व्यावसायिक निर्माते यशस्वी चित्रपटांच्या जोडीला  वेगळ्या प्रयोगांना थारा देतात हाही संशोधनाचा भाग. फँड्री, हा अलीकडचा एक चांगला अपवाद.
मुळात रंजनवादी चित्रपटांना विरोध कोणाचाच नाही, प्रेक्षकांप्रमाणेच समीक्षकही ते आनंदाने पाहातात. माझ्या स्वतःच्या खास आवडत्या चित्रपटांमधे 'स्टार वाॅर्स'पासून 'अंदाज अपना अपना' पर्यंत आणि 'ओम शांती ओम' पासून 'संत तुकाराम' पर्यंत अनेक उत्तम व्यावसायिक चित्रपटांची नावं आहेत. मात्र विशिष्ट प्रेक्षकवर्गाची करमणुक यापलीकडे जाऊनही चांगल्या व्यावसायिक चित्रपटाच्या दर्जाचे काही निकष असायला हवेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही हिशेबात, गणितात , वर्गात न बसता, त्याचं एक चांगला चित्रपट म्हणून काही स्थान असायला हवं. आणि ' लय भारी ' तसा सहज असू शकला असता.
'लय भारी' मधे मला खटकलेली गोष्ट ही, की तो पाहाताना  गणित मांडून केल्याचा भास होतो. अमुक दर्जाचा दिग्दर्शक, अमुक दर्जाचा स्टार, अमुक हिंदी चित्रपटांमधे हिट झालेली फाॅर्म्युला गोष्ट ( प्रमुख पात्राचं एका रुपात नष्ट होऊन दुसर््या रुपात अवतरणं हा प्रकार केवळ राकेश रोशनच्याही चित्रपटात नित्यनेमाने असतो. 'खून भरी माँग' पासून 'कहो ना प्यार है' पर्यंत मुबलक उदाहरणं. शिवाय इतर दिग्दर्शकांचे सिनेमे वेगळेच) , गाण्यांच्या ठरलेल्या जागा आणि प्रकार, धार्मिक घटकांचा लोकप्रिय वापर, विनोदा पासून हाणामार््यांपर्यंत नेहमीचा मसाला, वगैरे. स्वतंत्रपणे यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. मात्र चांगला चित्रपट नेहमीची गोष्ट सांगतानाही आपल्यापुढे काही नवं मांडत असल्याचा आभास निर्माण करेल, आपल्याला गुंतवून ठेवेल, पुढे काय होणार याविषयी कुतुहल निर्माण करेलशी अपेक्षा असते. ते 'लय भारी' करत नाही. हाताशी उत्तम कलावंत, तंत्रज्ञ असूनही नाही.  किंबहुना ते करण्याची त्याला गरज वाटत नसावी. नेहमीचा लोकप्रिय आणि हमखास यशस्वी मसाला देणं ही त्याने स्वतःपुढे घातलेली मर्यादा आहे, जो तो सफाईदारपणे देतो. त्या पातळीवर तो यशस्वी आहेच. जर आपण त्याच्याकडून जास्त अपेक्षा करत असलो, तर ती आपली चूक, त्याची नाही.
चित्रपटात काही नवीन नसलं तरी सारेच संबंधित लोक आपापल्या कामात हुशार असल्याने, आणि निर्मिती मूल्य अ दर्जाची असल्याने एका काॅम्पीटन्सी लेव्हलवर आपण तो पाहू शकतोच. कामत आणि देशमुख यांचा वाटा महत्वाचा, पण इतरही. गाणी, साऊन्डट्रॅक, अभिनय या सर्वच बाबतीत कलावंत आणि बाकी टीम हुशार आहे. मात्र त्यांच्या परफाॅर्मन्सवरही निश्चितपणे काहीच नं सांगू पाहाणार््या  संहितेच्या मर्यादा पडतात.
 लय भारी यशस्वी झाला- होणारच होता, त्याबद्दल मला फार काही म्हणायचं नाही. माझ्यापुढला प्रश्न आहे तो वेगळाच. या चित्रपटाने जर हे सिध्द केलं, की प्रेक्षकाला नवं काही न देता, वा तसा आभासही निर्माण न करता, केवळ आॅटोपायलटवर बनवलेल्या चित्रपटाचं स्वागत आपला प्रेक्षक नव्याने केलेल्या कोणत्याही प्रयत्नापेक्षा अधिक जोरात करतो, तर हा यशस्वी मराठी चित्रपट बनवण्याचा मापदंड ठरणार नाही का? असं झालं तर आजच्या  मराठी चित्रपटसृष्टीवर त्याचा कोणता परिणाम होईल?
गेल्या काही वर्षात मराठीत अनेक व्यावसायिक चित्रपट आलेले आहेत आणि त्यांनी बर््यापैकी व्यवसायही केला आहे. स्वतः निशिकांत कामत, राजीव पाटील, रवी जाधव, सतीश राजवाडे, महेश मांजरेकर, संतोष मांजरेकर या आणि इतरही अनेक दिग्दर्शकांनी असा मराठी व्यावसायिक चित्रपट उभा केलाय, जो रंजनमूल्य असणारा असेल, व्यावसायिक चौकटीतला असेल, पण थेट हिंदीची नक्कल करणारा किंवा प्रेक्षकाला हातचा धरणारा नसेल. तो प्रेक्षकाला कसं गुंतवायचं याचा दर वेळी नव्याने विचार करेल. डोळे मिटून फाॅर्म्युला अप्लाय करणार नाही. स्वतः रितेश देशमुखची निर्मिती असणारे 'बालक पालक' आणि 'यलो' देखील या चांगल्या व्यावसायिक चित्रपटांमधलेच मानायला हवेत.
लय भारी'  हा सारा प्रयत्नच अनावश्यक ठरवेल, अशी शक्यता आहे. आता पुढे या चित्रपटाचे जे काॅपीकॅट्स येतील त्यांना अशी मेहनत करण्याची गरजच वाटणार नाही. त्यांना काय करायचं हे आधीच माहीतेय. उगाच नावीन्य, कलात्मक मांडणी, निवेदनशैली, या अनावश्यक गोष्टींचा विचार करण्यात वेळ फुकट का घालवा?
दुसरी भीती आहे ती याहूनही थोडी अधिक गंभीर.
चित्रपट निर्मिती हा अखेर व्यवसाय असल्याने आर्थिक यश हे महत्वाचं आहेच, त्यात वाद नाही. पण त्यासाठी काय किंमत मोजली जाऊ शकते? यापूर्वी सोप्या फाॅर्म्युलाच्या मागे धावून चित्रपटउद्योग धोक्यात आलेला मराठी चित्रपटसृष्टीने दोन वेळा पाहिला आहे. आधी तमाशापटांच्या काळात, आणि पुढे विनोदी चित्रपटांच्या लाटेत. हे सारं मागे टाकून गेल्या दहा वर्षात आपण मराठी चित्रपटसृष्टी नव्याने उभी केलीय.  आता जर हिंदी/दाक्षिणात्य मेलोड्रामाची अशीच एखादी लाट आली तर हे सारं धुवून निघायला वेळ लागणार नाही.  मग आज असलेली मराठी चित्रपटाची नवी ओळख ,वेगळं स्थान या सगळ्याचं काय होणार? की तात्पुरत्या व्यावसायिक यशापलीकडे या सार््याची किंमत गौण आहे?
 सामान्यतः एखादा चित्रपट चालला वा पडला याने चित्रपटसृष्टीला फरक पडत नाही. पण जर त्या चित्रपटाचं भवितव्य हे अनेक चित्रपटांबरोबर जोडलं जाण्याची शक्यता असेल, तर विचार व्हायला हवा. कारण मग  प्रश्न म्हातारी मेल्याचं दुःख करुन संपत नाही, काळ सोकावण्याच्या शक्यतेकडे निर्देश हा करावाच लागतो.
- गणेश मतकरी

Read more...

लय भारी- मराठीतला हिंदी चित्रपट

>> Monday, July 14, 2014


गेल्या आठवड्यात मी एका चॅनलच्या साईटवर सादर केलेला निशिकांत कामत दिग्दर्शित, रितेश देशमुख अभिनित लय भारीचा रिव्ह्यू पाहिला आणि खालच्या कमेन्ट्स पाहून हादरलो. रिव्ह्यू अतिशय बॅलन्स्ड होता. कुठेही सिनेमाला मुद्दाम खाली ओढण्याचा प्रयत्न नव्हता. चित्रपटाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही मुद्दे त्यात नीट मांडले होते. वर स्टार देताना थोडं चांगल्या मुद्द्यांकडे झुकून तीन स्टार दिले होते. असं असतानाही, कमेन्ट करणार््या जवळपास सर्वांनी रिव्ह्यू, तो देणारा समीक्षक आणि चॅनल या सर्वांना अतिशय वाईट शब्दात संबोधलं होतं. शिव्याच दिल्या होत्या म्हणा ना !

 याला माझी पहिली रिअॅक्शन होती ती ही, की जर सामान्य प्रेक्षकाना प्रामाणिक समीक्षेची हीच किंमत असेल, तर उगाच ती करुन वेळ फुकट घालवण्यात काय अर्थ आहे? दुसरा प्रश्न हा की हे , अशा कमेन्ट करणारे लोक कोण आहेत? यांना खरोखर अगदी सोप्या शब्दात केलेलं चित्रपटाबद्दलचं विवेचनही समजत नाही आहे? का या लोकांची काही दैवतं या चित्रपटाशी संबंधित असल्याने त्यांना या दैवतांनी केलेली कोणतीही गोष्ट केवळ डोक्यावर घेण्यासारखीच वाटते? का मराठी चित्रपट थोडाफार त्यांच्या आवडत्या हिंदी चित्रपटाकडे जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसत असल्याने त्या मार्गात कोणतीही आडकाठी त्यांना नको आहे? जे असेल ते असो, ही मनोवृत्ती फार काळजीचं कारण आहे हे निश्चित.

गेली दहा वर्ष, मराठीत खूप चांगलं काम झालय आणि गेल्या शतकाच्या अखेरीला मृतप्राय मानला जाणारा चित्रपट आज अर्थपूर्ण, आशयघन काही देणारा चित्रपट म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातोय. त्याचबरोबर आपल्या चित्रपटात बर््यापैकी करमणूक करणारी एक व्यावसायिक शाखाही आहे. आणि जोपर्यंत ती चांगली हेल्दी करमणूक करतेय, तोवर तिला आक्षेप घेण्यासारखंही काही नाही. मात्र मला जर आज मराठी चित्रपटांचा  वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता विचारलं, तर मी खास प्रादेशिक टच असलेल्या , आशयघन , पुरेशा प्रेक्षक प्रतिसादाला न जुमानता काही नवं सांगू पाहाणार््या चित्रपटाचं नाव घेईन, शंभर कोटी क्लबात घुसण्याच्या नादात बाॅलिवुडची सही सही नक्कल करणार््या चित्रपटांचं नाही. आणि का घ्यावं, ते करणारे आणि आपल्यापेक्षा अधिक मोठ्या बजेटमधे, अधिक मोठे स्टार घेऊन आणि अधिक भव्य परिणाम साधणारे लोक आहेतच की हिंदीत, मग त्याची पुसट झेराॅक्स पुन्हा मराठीत कशाला हवी? त्यापेक्षा व्यावसायिक चित्रपटातही अस्सल मराठी काय करता येईल असा प्रयत्न होण्याची गरज आहे. दैवतांना जर अर्थपूर्ण काही करायचं नसेल तर निदान त्यांनी नव्या प्रकारचा चांगली करमणूक असलेला चित्रपट का करु नये?

या दृष्टीने पाहायचं तर रितेश देशमुखने आधी निर्माण केलेले दोन्ही चित्रपट 'बीपी' आणि 'यलो' हे चांगले आहेत. हे व्यावसायिक प्रयत्न आहेत परंतु हिंदीची नक्कल करण्याचा मोह त्यामधे नाही. उलट काही वेगळं करुन पाहण्याचा प्रयत्न आहे. स्वतः मराठी पडद्यावर  उतरताना मात्र रितेशने ( की त्याच्या सहनिर्मात्यांनी?) कोणतीही रिस्क घ्यायची नाही असंच ठरवलय.

खरं सांगायचं, तर 'लय भारी' बद्दल माझ्या मनात थोडी अढी तयार झाली ती त्याचं नाव एेकूनच. मला नावं चित्रपटाच्या थीमशी जुळणारी असली की आवडतात . स्वतःचं कौतुक करणारी आणि मग कशीतरी चित्रपटाशी जोडलेली नावं मला मुळातच आवडत नाहीत. चित्रपट चांगला असेल तर लोक कौतुक करतीलच, ते करण्यासाठी तुम्हाला शब्दही पुरवण्याची गरज नाही. पण या चित्रपटाने मुळातच शंकेला जागाच ठेवायची नाही असं ठरवलेलं. सर्वच गोष्टी अगोदरच सिध्द हव्यात, उगाच नवं काही करण्याचा प्रयत्न कशाला, हा लय भारीचा मंत्र आहे. त्यामुळे सर्व जमेल तितकं लोकप्रिय उचला आणि चिकटवा, हा पटकथेचा एकच नियम.

चिकटवलेल्या गोष्टी अशा - थ्रिलरला चांगला (आणि हिंदीतही काम केलेला) दिग्दर्शक , मोठा ( हिंदीत काम करणारा) स्टार, हिंदी चित्रपटात राकेश रोशनने लोकप्रिय केलेला ( एका रुपातला नायक- मरुन किंवा अदरवाईज- नव्या रुपात परतण्याचा ) फाॅर्म्युला ,अर्थात तोही हिंदीत लोकप्रिय असलेला; बाॅलिवुड आणि साऊथच्या चित्रपटासारख्या मारामार््या , बाॅलिवुड पध्दतीच्या गाण्यांच्या सिचुएशन्स ( भक्तीगीतापासून, नायिकेने खलनायकाला गुंगवण्यासाठी केलेला नाच, वगैरे), एकूण सारं बाॅलिवुड शैलीतलं. मराठी काय, तर अर्थात भाषा.आणि विठ्ठलाचा संदर्भ घेऊन क्वचित प्रसंगी वापरलेलं वारीचं वातावरण. तेही चिकटवल्यासारखं. बाकी सारं हिंदी. अगदी पाहुणे कलाकारही हिंदीच. या सगळ्यामुळे चित्रपटाचा परिणाम हा अर्थातच एक नेहमीचा मसाला हिंदी व्यावसायिक चित्रपट पाहिल्याचा आहे. इतका पारंपारिक वळणाचा की हिंदीतही हल्ली कोणी इतका टिपीकल चित्रपट करायला धजावू नये. पण आपल्याकडे तयार प्रेक्षक उपलब्ध आहे, जो नव्या मराठी प्रयत्नाची किंमत न ठेवता या जुन्या हिंदी मसाल्याला डोक्यावर घेईल.

गोष्ट परिचित. निंबाळकर घराणं प्रतिष्ठीत, श्रीमंत, पण प्रतापराव निंबाळकर ( उदय टिकेकर)आणि सुमित्रादेवी ( तन्वी आजमी) यांना  मूल नाही. मग नवससायास वगैरे. मग विठ्ठलाच्या कृपेने मूल होतं. हा प्रिन्स( रितेश) प्रिन्स परदेशात गाणी म्हणून मायदेशी परततो आणि वडिलांना हातभार लावणार इतक्यात त्याच्या चुलतभावाच्या ( शरद केळकर) दुष्ट कारवाया सुरु होतात. ज्यानी संपूर्ण निंबाळकर कुटंुबच धोक्यात येतं. मदत मिळते ती बर््यापैकी उशीर झाल्यावर, पण थेट पंढरपुरावरुन.

ज्यांनी 'कस्मे वादे' पासून 'कहो ना प्यार है' पर्यंत मृत नायकाच्या अशक्य पुनरागमनाचे शेकडो चित्रपट पाहिले आहेत, त्यांना अपरिचित असा इथे एकही क्षण नाही. किंबहुना तो नसणं हीच इथली योजना आहे. सार््या यशस्वी चित्रपटांचा अर्क असलेली ही पटकथा आहे. त्यात नवीन काही असेल तरी कसं? पण चित्रकर्त्यांना तेच अपेक्षितदेखील आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा लाइट आहे, म्हणजे विनोद, रोमान्स वगैरे. दुसरा हाणामार््या. पहिला लांबतो, दुसरा त्यामानाने वेगवान आहे. मात्र शेवट ( अनइन्टेन्शनली) गंमतीदार आहे. विठ्ठलाचं रुप असणार््या नायकाच्या हातून तर खलनायक मारायचा नाही, पण तो मरायला तर हवा, शिवाय देवाघरचा न्यायही दाखवायचा. अशा पेचातून मार्ग काढायचा, तर थोडी क्रिएटीव (!?) लिबर्टी हवीच.

चित्रपटात काही नवीन नसलं तरी सारेच संबंधित लोक आपापल्या कामात हुशार असल्याने, आणि निर्मिती मूल्य अ दर्जाची असल्याने एका काॅम्पीटन्सी लेव्हलवर आपण तो पाहू शकतोच. कामत आणि देशमुख यांचा वाटा महत्वाचा, पण इतरही. गाणी, साऊन्डट्रॅक, अभिनय या सर्वच बाबतीत कलावंत आणि बाकी टीम हुशार आहे. मात्र त्यांच्या परफाॅर्मन्सवरही निश्चितपणे संहितेच्या मर्यादा पडतात.

'लय भारी' बाॅक्स आॅफीसवर छान कमवतोय हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे निर्मात्यांनी जे मनाशी ठरवलं, ती योजना अत्यंत यशस्वी ठरली यात वादच नाही. पण प्रश्न हा, की मुळात ही योजनाच का ठरवली गेली. ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे, साधनं आहेत, पैसा आहे, त्यांनी केवळ पैसा मिळवणे या मर्यादीत महात्वाकांक्षेला धरुन नवनिर्मिती करावी का? आणि उद्या त्यांच्या या यशाला भुलून इतर निर्मातेही याच मार्गावर जायला लागले, आणि आज मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पातळीवर असलेलं नाव पुन्हा दिसेनासं झालं, तर त्याला जबाबदार कोण?

- ganesh matkari 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP