जोरदार दंगल

>> Saturday, December 24, 2016




पोस्टरवरच्या टॅगलाईन्सनी चित्रपट काय आहे हे थोडक्यात मांडणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे क्वचितच तसं होताना दिसतं. बहुधा केवळ लोकगर्दीच्या अपेक्षेने काहीतरी ठोकून दिल्याची  उदाहरणच अधिक. दंगल हा अपवाद ! इथे प्रत्यक्ष संवादात येणारी एक ओळ' म्हारी छोरियाॅं छोरों से कम है के?' ही या चित्रपटाचं आशयसूत्र असल्यासारखी आहे, आणि ती पोस्टरवर वापरण्यावरुन हे लक्षात येतं की चित्रपटाला काय म्हणायचय याची पूर्ण जाण तो बनवणाऱ्याना आहे. ही कुस्ती या खेळासंबंधीची स्पोर्ट्स फिल्म आहे पण केवळ स्पोर्ट्स फिल्म असणं हा त्याचा स्ट्राॅंग पाॅइन्ट नाही. मुलीना मुलांच्या बरोबरीने वागवणं , स्त्री पुरुष समानता हा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. महिला हाॅकी संघावर आधारीत 'चक दे , इंडिआ' मधेही तो होता, पण दंगल ही एका कुटुंबाची गोष्ट असल्याने तो अधिक प्रखरपणे येतो.
दंगल हा डिस्नीनी प्रोड्यूस केलाय आणि त्याची एकूण वृत्तीही डिस्नीच्या तत्वांबरोबर चपखल जाणारी आहे. आता डिस्नीच्या सहभागामुळेच तो असा आहे, का तो तसा असणं हा हॅपी कोइन्सीडन्स आहे, हे कोणाला माहीत ?
डिस्नीच्या लोकप्रिय प्रिन्सेस स्टोरीज सारखी हीदेखील एका नायिकेची यशोगाथा आहे. आणि अलीकडच्या चित्रपटांमधून जशी नायिका अधिक सक्षम दाखवली जाते तशीच गीता फोगाट ( तसच बबिता ही उपनायिकाही ) आहे. पारंपारिक नायक इथे गैरहजर आहे, पण पुरुष प्रोटॅगनिस्ट म्हणून महावीर फोगाट हा त्या दोघींचा पिताच आहे. गीता आणि महावीर ही यातली प्रमुख पात्र . इतर अनेक लक्षात रहाणारी पात्र आहेत, पण चित्रपट प्रामुख्याने फिरतो तो या दोघांभोवती. चित्रपट घटनांभोवती अधिक गुंफलेला आहे आणि व्यक्तीगत तपशील ( पात्रांची मनोवस्था वगैरे ) त्यामानाने ठळक स्ट्रोक्समधे , फार खोलात नं जाता रंगवलाय. पण हे सारं एका योजनाबद्ध पद्धतीने केलय, यात चुकून काही झालेलं नाही.

आता कथानक काय आहे हे मी सांगत बसणार नाही. ते सर्वांना माहीतही आहे, आणि मुळात ही (बरीचशी) सत्यकथा असल्याने, त्याचा शेवटही आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे. तरीही, एक सूत्र सांगायचं तर एवढच म्हणेन, की कुस्तीमधे राष्ट्रीय पातळीवर नावाजूनही आर्थिक अडचणीमुळे बाहेर पडावं लागणाऱ्या महावीर सिंगाचा ( आमीर खान) , आपल्या होणाऱ्या मुलाला तरी  भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता बनवण्याचा निश्चय, मुलाएेवजी चारी मुलीच झाल्याने  त्याने आधी निराश होणं , पण मग त्या मुलींनाच या खेळात पारंगत बनवून त्यांच्याकरवी आपलं स्वप्न पूर्ण करणं असा हा प्रवास आहे. मध्यंतर जरी गीता - बबिता मोठ्या झाल्यावर येत असलं, तरी बालपणीचा काळ आधी आणि मोठेपणीचा नंतर, असं हे पूर्वार्ध - उत्तरार्धाचं ढोबळ विभाजन आहे, त्यामुळे लक्षवेधी काम करण्याची संधी गीता ( लहान- झायरा वसीम, मोठी - फातीमा सना शेख) आणि बबिता ( लहान- सुहानी भटनागर, मोठी - सान्या मल्होत्रा ) च्या भूमिकातल्या चारी गुणी अभिनेत्रींना यथायोग्य मिळाली आहे. लहान मुलींचं कौतुक अधिक वाटतं आणि ते केवळ त्या लहान आहेत म्हणून नाही , तर त्यांना साध्यासुध्या मुलींचं मल्ल बनणं , हा बदल, हे ट्रान्स्फाॅर्मेशन दाखवायचय म्हणून. बाॅडी लॅन्ग्वेजपासून व्यक्तीमत्व बदलापर्यंत त्या हा बदल यथायोग्य दाखवतात. मोठ्यांपुढे आव्हान आहे, ते आधीच्या अभिनेत्रींचं काम सहजपणे  पुढे नेणं आणि चित्रपटातल्या नाट्यपूर्ण , भावपूर्ण भागाला पेलणं.

दंगल सर्वात यशस्वी ठरतो तो मध्यंतरा आधीच्या भागात. यातलं नाट्य या मुलींमधल्या बदलात आणि त्यांनी दाखवलेल्या कर्तुत्वात आहे आणि ते अतिशय स्वाभाविकपणे, कुठेही कृत्रिम नं होता येतं. गाणी बिणीही जोरदार आणि प्रसंगानुरुप आहेत, हा भाग सर्वच बाबतीत जमलेला आहे.

उत्तरार्धाचा प्राॅब्लेम हा, की मूळ घटनांमधे पुरेसं नाट्य नाही. गीताने सरकारी प्रशिक्षणासाठी भरती झाल्यावर तिला काॅमनवेल्थ गेम्समधे पदक मिळेपर्यंतच्या भागात ( चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसं) फार  काही घडत नाही. त्यातल्यात्यात गीताचा परफाॅर्मन्स घसरणं एवढाच भाग आहे. इथे नसलेलं नाट्य चित्रपट तयार करायला जातो ते कोच कदम ( गिरीश कुलकर्णी) या पात्रामार्फत, त्याच्या गीता आणि महावीर यांच्याशी होणाऱ्या संघर्षामधून. दुर्दैवाने हे पात्र मात्र खूपच कचकड्याचं ( डिस्नी व्हिलन?) वाटतं.

गंमत अशी की या कोचचा मुद्दा योग्य आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला जे जमेल तसं ट्रेनिंग मिळालय ते विसरायला लावून त्यांना नव्याने घडवणं हा त्याचा गेमप्लान आहे. यात गैर काही नाही. सर्व क्षेत्रात ( नाट्य क्षेत्रातही ) या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कोणी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाला गेल्यावर तिथल्या थोरामोठ्यांनी सांगितलेलं नं एेकता आमच्या गावच्या ग्रुपमधे असच सांगायचे म्हणून भडक अभिनयच करत राहिला तर कसं होईल, त्याप्रकारची इथली गीताची परिस्थिती आहे. पण कोचचा युक्तीवाद पटू नये आणि सहानुभूती गीता- महावीर कडे जावी , तसच गीताच्या हरण्याचं बिलही कोचवर फाडता यावं , म्हणून ही कदमची व्यक्तिरेखा अतिशय वरवरची आणि मुद्दाम खलनायकी लिहिली आहे, जी बाकी साऱ्या खऱ्या प्रसंगांच्या तुलनेत बिल्कुल नकली वाटते. ही खोटी वाटण्यात गिरीश कुलकर्णीचा दोष नसावा कारण लेखन आणि दिग्दर्शन हे याला प्रामुख्याने  जबाबदार आहेत. त्या भूमिकेला अधिक प्रसंग मिळते, तर ती हळूहळू घडवता आली असती पण ते कमी असल्याने ही भूमिका कृत्रिम होते. शेवटच्या भागात तर हे खलनायकी वागणं फार टोकाला पोचतं . असं काही गीताच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलं असेलसं वाटत नाही, किंवा असलं तरी ही गीताची बाजू झाली. कोचला त्याची बाजू विचारली गेली असेलसं वाटत नाही. आणि तसं नसेल तर मग हा केवळ नाट्यपूर्णता वाढवण्याचाच प्रयत्न म्हणून उरतो. चित्रपटासाठी तो खरा वाटणं आवश्यक होतं जे होत नाही. हा दंगलमधला सर्वात मोठा गोंधळ. पण या भागातही, सर्वजण कामं छान करतात आणि निवेदनाची गती रहाते ,सर्व मॅचेस पकड घेतात त्यामुळे आपण या दोषाकडे डोळेझाक करु शकतो.

कुस्तीच्या मॅचेसचं दंगलमधलं  चित्रण फार छान आहे आणि रेसलिंग मॅचेस खऱ्याच कमी वेळाच्या असल्याने चित्रपटात पुरेसा वेळ देत त्या रंगवता आल्या आहेत. चक दे मधे बऱ्याच मॅचेस उरकल्यासारख्या होत्या आणि खूप व्यक्तिरेखांमुळे चित्रपटही मधेमधे ड्रॅग व्हायचा. इथे तसं होत नाही. एका शब्दात सांगायचं तर या मॅचेसची कोरिओग्रफी आणि छायाचित्रण ( सेतू श्रीराम) ' रोमहर्षक ' झालेलं आहे. आता मॅचेसचा निकाल प्रेडीक्टेबल आहे का, तर आहे. गोष्ट लक्षात आली तर गीता कोणती मॅच जिंकणार- कोणती हरणार हे तुम्ही अचूक सांगू शकता, पण  हरकत नाही , पडद्यावर पहाताना आपण गुंतून जातो हे खरं, आणि ते पुरेसं आहे.

मागे आशुतोष गोवारीकरने बाजी, पहला नशा अशा सामान्य चित्रपटांनंतर एकदम लगान केला आणि त्याची गणना ए लिस्टर्समधे व्हायला लागली, तसच काहीसं चिल्लर पार्टी , भूतनाथ नंतर दंगल केलेल्या नितेश तिवारीचं होणार यात शंका नाही. आमीर खान असलेले स्पोर्ट्स थीम्ड चित्रपट दिग्दर्शकासाठी लकी ठरतात असं दिसतय. पण हा केवळ नशीबाचाच प्रश्न नाही. त्याने केलेलं काम हे त्याची लायकी सिद्ध करणारं आहे. नेहमीप्रमाणे आमीरच्या घोस्ट डिरेक्शनची चर्चा इथेही होईल, पण आपण नाव लागलेल्या दिग्दर्शकालाच मानून चालू. अर्थात लगानप्रमाणेच इथेही स्वत: आमीर खानने निर्मिती आणि व्यक्तीरेखा या दोन्ही बाबीत प्रचंड मेहनत घेतलेली आहे.

मी अनेकदा असं म्हंटलय, की अभिनेता म्हणून आमीर खान मला फार आवडत नाही कारण त्याची सारी वेषांतरं समोर असतानाही त्यामागे दडलेला आमीर खान सतत दिसत रहातो. इथे महावीर फोगाट उभा करताना दिसण्याबरोबर त्याने फिजिकल परीवर्तनही केलय. तरुण रेसलर पासून साठीच्या आसपासपर्यंत वयातला फरकही आहे, आणि आमीर खानने तो उत्तम रितीने पडद्यावर आणला आहे. यात अनेकदा अशा जागा आहेत ज्यात आपण आमीर खानला विसरुन व्यक्तीरेखेला दाद देतो. उदाहरणादाखल एक प्रसंग घ्यायचा  , तर गीता प्रशिक्षण घेत असताना गावी येते आणि बबिता आणि इतरांना काही नवे डावपेच शिकवू पहाते तो घेता येईल . गीताची लुडबुड पाहून चिडलेल्या महावीरने तिला दिलेलं आव्हान आणि पुढे येणारं कुस्तीचं दृश्य हा चित्रपटाचा एक हायलाईट आहे . भावपूर्ण तरीही अटीतटीचा आणि पुढे काय होईल याबद्दल प्रेक्षकाला संभ्रमात ठेवणारा प्रसंग. दंगल मधे अशी ही एकमेव जागा  नाही. इतरही आहेत. पण कोणत्या ते सांगण्यात मजा नाही. ते पहायलाच हवं.

गेल्या काही दिवसात डिमाॅनिटायजेशनच्या दणक्याने चित्रपटगृहांपासून प्रेक्षक काहीसा दूर गेलेला आहे. त्याला परत फिरवायला दंगलसारख्याच एखाद्या जोरदार चित्रपटाची गरज होती. दंगल हे करुन दाखवेल असा विश्वास वाटतो.
  - गणेश मतकरी

Read more...

मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं

>> Saturday, December 3, 2016




कॅस्ट्रो गेला आणि बंडाचा एक सिम्बाॅल हरवल्यासारखं झालं. खरं म्हणजे हरवल्यासारखंही नाही म्हणता यायचं. शक्यता अशीही वाटते की त्याचं क्युबामधल्या क्रांतीशी जोडलेलं नाव आता अधिक जागतिक होत जाईल. त्याच्या आयुष्याच्या तपशीलाला महत्व तर आहेच, क्युबा आणि जागतिक राजकारणातही तो मोठा नेता मानला जातोच, पण आता कदाचित त्या तपशीलापलीकडे जात  क्रांतीचा चिरतरुण शिलेदार म्हणून त्याचं नाव जगभरातल्या  तरुणांच्या अधिक जवळ पोचेल. हयातीत जवळचे मित्र आणि क्युबन लढ्यातले सहकारी असलेल्या  चे गेवारा ने व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या तरुणांच्या मनात पटकावलेलं स्थान, कदाचित आता मागून येणारा कॅस्ट्रोही पटकावेल. क्युबन राज्यक्रांतीचा चेहरा असणारी ही दोन नावं पुन्हा एकत्र येतील.

तरुणपणी गेलेले लोक कायम तरुणच रहातात. त्यांचे विचार, त्याची लोकांसमोरची अखेरची प्रतिमा हे काही बदलत नाही. याउलट वृद्धत्व व्यक्तीची प्रतिमा बदलत नेतं. दुर्दैवाने का असेना, पण गेवाराला कॅस्ट्रोपुढे हा अॅडव्हान्टेज मात्र आजही रहाणार. गेवाराच्या नावाचे टी शर्ट घालणाऱ्या तरुणांना त्याचं क्युबन लढ्यातलं काम, पुढे लॅटीन अमेरिकेतला बंडाचा फसलेला प्रयत्न, हत्या, याचे तपशील  माहीत नसतीलही, पण एक प्रतीक म्हणून तो चांगलाच परीचयाचा आहे. कॅस्ट्रोपेक्षाही अधिक परीचयाचा.

बरेचदा असंही होतं. लोकांपर्यंत पोचायला तुम्हाला काही गोष्टी सोप्या करुन सांगाव्या लागतात. विचार, कार्य यांचा अभ्यास हा आपल्या जागी ठीकच, पण लाल टी शर्ट वरची काळी प्रतिमा, ही कधीकधी सोपा आणि थेट संदेश देत असल्याने पटकन पोचते. अधिकांपर्यंत पोचते. फिल्म माध्यमाला आपण लोकांचं माध्यम म्हंटलं, तरी त्यातही अभ्यासपूर्ण मांडणीपेक्षा, थोडक्यात सांगितलेलं लोकांना आवडण्याची, समजण्याची शक्यता वाढते. गेवाराबद्दल स्टीवन सोडरबर्गने अभ्यासपूर्ण पद्धतीने काढलेला दोन भागातला चरित्रपट ' चे ' असताना, गेवाराच्या पुढच्या काळातल्या व्यक्तीमत्वाशी जराही संबंध नसणारा , आणि तरुण असताना गेवाराने लिहिलेल्या एका प्रवासाच्या आठवणींवर आधारीत ' द मोटरसायकल डायरीज' इतका लोकप्रिय असावा यामागेही हे सोप्या आणि थेट  आशयाचच कारण असावं.

२००४ साली वाॅल्टर सॅलीस दिग्दर्शीत ' द मोटरसायकल डायरीज' आला, तेव्हा तो समीक्षकांना आवडला, पण तो काय दृष्टीने पहावा याबद्दल त्यांच्यात मतभेद होते. आता चित्रपट चरित्रात्मक तर आहे, पण प्रत्यक्षात गेवाराच्या प्रमुख कार्यकाळातलं काहीच त्यात दिसत नाही, मग त्याला आशयाच्या दृष्टीने चांगला म्हणायचा का वाईट, का नुसताच रोड मुव्ही म्हणून सोडून द्यावं , असा काहीतरी गोंधळ झाला. ही गोष्ट खरी, की प्रत्यक्ष काम दिसलं नाही, तरी या नेत्याच्या मानसिकतेत होत गेलेला बदल, त्याचं एका सुखवस्तू कुटुंबातल्या मुलापासून ते समाजाच्या पिडीत घटकांबद्दल आपुलकी आणि त्यांच्यासाठी काही करायची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यात होणारं रुपांतर या चित्रपटात आपल्याला दिसतं. तरीही, हे थोडं मोठ्यांच्या छोट्या गोष्टीसारखं आहे. वर्गातली शेंगांची टरफलं आपण उचलणार नाही म्हणणारा मुलगा लोकमान्य टिळक होणार हे आपल्याला माहीत नसेल, तर आपण गुरुजनांची पर्वा नं करणारा आगाऊ मुलगा म्हणून त्याला सोडून देऊ. तसच, जर चित्रपटातला    २३ वर्षांचा मेडीकल स्टुडन्ट अर्नेस्टो गेवारा  पुढे कोण झाला हे जर माहीत असेल, तरच आपण त्याच्यातला बदल, एका वेगळ्या नजरेने पाहू शकू. नाहीतर ही एक साध्या आदर्शवादी मुलाची गोष्टच ठरेल.

सगळ्याच तत्कालीन समीक्षकाना जरी हे सारख्या प्रमाणात लक्षात आलं नाही, तरी चित्रपटातल्या अर्नेस्टोचं बदलणं हे लोकांपर्यंत पोचलं आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ' चे ' या नावाबद्दल तरुणांमधे आकर्षणही होतं, आता या नावाला साजेलशी प्रतिमा उभी करणारा हा पडद्यावरला चे त्यांना भेटला. त्यांच्याच वयाचा, त्यांच्यासारखाच उत्तरं शोधणारा. या व्यक्तिरेखेशी समरस होणं त्यांना सोपं गेलं. दुसरी चांगली गोष्ट ही झाली, की चरित्राच्या ओझ्याखाली चित्रपट दबला नाही. रोड मुव्ही हा चित्रप्रकार रस्त्यावर, प्रवासात घडतो. हे प्रवास बहुधा दोन पातळ्यांवरचे असतात. प्रत्यक्ष आणि प्रतीकात्मक. ते केवळ स्थलांतर घडवत नाहीत तर सहभागी व्यक्तिरेखांमधे त्यांनी आमूलाग्र बदल घडवणं अपेक्षित असतं. या चित्रप्रकारात गेवाराचं ' मोटरसायकल डायरीज' चपखलपणे बसलं. चरित्रपट आवडणाऱ्यांना, रोड मुव्ही आवडणाऱ्यांना आणि एकूणच चित्रपट आवडणाऱ्यांनाही, तो त्याच्या साधेपणाने, आणि अभिनिवेश नं बाळगणाऱ्या अर्थपूर्णतेने पटून गेला.

मोटरसायकल डायरीजमधल्या प्रवासाच्या सुरुवातीला अर्नेस्टो गेवारा ( गेल गार्शिआ बेर्नाल ) म्हणून जी व्यक्ती होती, ती त्या प्रवासाच्या शेवटी उरली नाही. आपल्या कोषात वाढलेला, आर्थिक सुबत्तेची सवय असलेला हा मुलगा, आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा व्हायला थोडेच दिवस बाकी असताना रोड ट्रीपवर निघाला तो आत्मशोधासाठी नाही, तर निव्वळ एक गंमत म्हणून. आल्बेर्तो ग्रानाडो ( राॅडरिगो डे ला सेर्ना) या आपल्या मित्राच्या हौसेखातर तो यासाठी तयार झाला. ब्युनोस आयरेसपासून वेनेझुएलापर्यंत जमेल तितकी दक्षिण अमेरिका बघत बघत मोटरसायकलवरुन हा १४००० किलोमीटरचा प्रवास करायचा, अशी ही मूळ कल्पना होती. प्रत्यक्षात प्रवासाचा थोडाच भाग मोटरसायकलवरुन होऊ शकला, आणि मग पायी वा मिळेल त्या वाहनातून असं प्रवासाचं स्वरुप बनलं.

डायरीज टप्प्याटप्प्याने अधिकाधक गंभीर बनत जातो. यातला पहिला भाग तसा खेळकर पद्धतीने उलगडतो. अर्नेस्टोचं घर, प्रवासाची सुरुवात, त्याच्यासारख्याच ( किंवा त्याच्याहून ) सुखवस्तू घरातल्या त्याच्या मैत्रिणीला भेट, थोड्या गंमतीजमती वगैरे. ज्यांनी गेल गार्शिआ बेर्नालचाच 'इ तू मामा ताम्बिएन' पाहिला असेल, त्यांना चित्रपटाच्या सुरुवातीकडे पाहून हा त्यासारखाच काही प्रकार वाटेल. पण तसं नाही. इ तू मामा ताम्बिएन मधेही सामाजिक परिवर्तनाची जाण असली तरी त्यात सुखवस्तू समाज आणि ते अनभिज्ञ असलेला पिडीत समाज, असं स्वतंत्र तुकडे योजनाबद्ध रितीने केले होते. मोटरसायकल डायरीज मधे असे तुकडे नसून एकरेषीय चढता संघर्ष आहे, आणि दर भागाला त्याचं त्याचं महत्व आहे.

उदाहरणार्थ, या सुरुवातीच्या भागात मूळात अर्नेस्टो कोण होता, त्यांच्या समाजाच्या स्थितीबद्दल त्याला किती कमी माहिती होती, आणि आपल्या परीघाबाहेरचं त्याचं ज्ञान किती मर्यादित होतं, याचं चित्रण येतं. मुळातच मोडकळीला आलेली आल्बेर्तोची बाईक ज्या क्षणी निकालात निघते, त्या क्षणी परिवर्तनाला खरी सुरुवात होते. आपल्या घरात असताना जो समाज त्याच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे होता, तो आता रस्त्यावर आल्यावर त्याला घेरुन टाकतो आणि त्याकडे डोळेझाक करणं आता अर्नेस्टोला शक्य होणार नसतं. रस्त्यावर रहाणारे, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले, स्वत:च्याच जमिनीवरुन उन्मत्त सत्ताधाऱ्यांकडून हकलले गेलेले लोक या दोघाना भेटतात, आणि अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येऊ लागतात. पुढचा टप्पा येतो तो १५ व्या शतकात पेरूमधल्या इन्का समाजाने वसवलेल्या माचू पिचू या वसाहतीच्या अवशेषांना ही जोडगोळी भेट देते तेव्हा. इन्का समाजाने वास्तुकलेप्रमाणेच इतरही शास्त्रात प्रगती केली होती, पण बंदुकधारी स्पॅनिअर्ड्सशी ते लढणं शक्य नव्हतं याची जाणीव गेवाराला या ठिकाणी होते, आणि कोणत्याही प्रकारचा उठाव हा शस्त्राशिवाय शक्य नाही, हे त्याच्या लक्षात येतं.

तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा घडतो तो पेरुमधल्याच कुष्ठरोग वसाहतीत, जिथे वसाहतीच्या मधून वहाणाऱ्या नदीनेच स्टाफ आणि आजार विकोपाला गेलेले रोगी यांना एकमेकांपासून दूर ठेवलेलं असतं. हे विभाजन झिडकारत गेवारा आणि ग्रानाडो संसर्ग टाळण्यासाठी हातमोजे घालणंही नाकारतात आणि मोकळेपणाने या लोकांमधे सामील होतात. या चढत्या टप्प्यांचा परमोच्च बिंदू ठरतं, ते वसाहतीतच गेवाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीमधे  केलेलं भाषण. छोटंसं असलं, तरी आपलं पहिलं राजकीय भाष्य, तो या भाषणात करतो. दक्षिण अमेरिकन समाज हा एकच आहे, आणि त्याचे तुकडे करुन त्यावर राज्य केलं जातय ही त्याच्या मनातली भावना इथे स्पष्ट होते, आणि रेस्ट, अॅज दे से, इज हिस्टरी.

चित्रपटाचा गाभा गंभीर असला आणि त्यात पाणी घालण्याचा प्रयत्न नसला, तरी गेवाराच्या मित्राची व्यक्तिरेखा चित्रपटाला बरचसं हलकंफुलकं ठेवते. त्यामुळे आपण त्याच्याकडे डाॅक्युमेन्टेशन सारखं न पहाता एक चित्रपट म्हणून पाहू शकतो.

आॅर्सन वेल्सने म्हंटलय, की ,' इफ यू वाॅन्ट ए हॅपी एंडींग, दॅट डिपेन्ड्स, आॅफ कोर्स, आॅन व्हेअर यू स्टाॅप द स्टोरी.' प्रत्यक्षातला गेवाराचा शेवट  सुखांत नाही. क्युबा सोडल्यावर दक्षिण अमेरिकेत क्रांती घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गेवाराला सीआयएच्या सल्ल्यानुसार चालणाऱ्या बोलिविअन सैन्याने पकडलं आणि वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीच त्याची हत्या केली गेली. द मोटरसायकल डायरीजचा शेवट मात्र सुखांत आहेच आणि खरं तर तो गेवाराची खरी गोष्ट सुरु होण्याच्याही आधी येणारा आहे. तरीही, तो जिथे आहे तिथे येण्याने आपण या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा अर्थ लावू शकतो, त्याच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो. तरुणांमधे दडलेल्या क्रांतीची बीजं इथे दिसतात, आणि गेवारामधली काय किंवा कॅस्ट्रोमधली काय, शेवटी ही बीजच महत्वाची , नाही का?
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP