आजोबाचा धडा

>> Sunday, May 18, 2014



'एवढ्या माणसांच्या गर्दीत माणसासारखं वागणारा हा एकटाच, म्हणून आजोबा !'

एका बिबट्याचं नामकरण 'आजोबा' असं का केलं, या प्रश्नाचं 'आजोबा चित्रपटात दिलं जाणारं हे उत्तर. वरवर पाहाता प्रगल्भ, काहीतरी सांगू पाहाणारं वाटेलसं, पण प्रत्यक्षात निरर्थक.हे नाव खरं का दिलं मला माहित नाही (गोष्टी एेकून आहे), पण त्या नावामागे काही विचार असेल तरी तो हा कसा असेल?  एखादा प्राणी माणसासारखा वागला तर त्याचं नाव 'माणूस' शब्दाशी समानार्थी देता येईल, पण ' आजोबा' ? शिवाय नाव देताना तो कसा वागेल याची आपल्याला माहिती थोडीच असते? आणि खरं तर तो बिबट्या बापडा वन्य प्राण्यासारखाच वागतो. कोणाला कारणाशिवाय त्रास देत नाही, गरजेपुरतीच शिकार करतो, इत्यादी. इतक्या सज्जन प्राण्याला माणूस म्हणणं हाही खरं तर अपमानच की ! असो!

मी या उत्तराचा खास उल्लेख अशासाठी केला, की ' आजोबा' हा संपूर्ण चित्रपट याच वळणाचा आहे. आपण काहीतरी खास वेगळं,कलात्मक करतोय असा अविर्भाव असलेला पण प्रत्यक्ष फार मुद्दा नसणारा.

सुजय डहाकेच्या ' शाळा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाबद्दल मला विशेष प्रेम नाही. त्याच्या ( राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या) पटकथेचा प्राॅब्लेम हा होता की ' शाळा' कादंबरीतला दरेक प्रसंग चित्रपटात आणण्याची तिची धडपड होती. त्यामुळे चित्रपटासाठी घटनांची निवड हा प्रकारच नव्हता.परिणामी चित्रपट माध्यम आणि त्याचा परिचित कालावधी यासाठी चित्रपट खूपच भरगच्च ( चांगल्या अर्थाने नाही) झाला होता. 'आजोबा'चा प्राॅब्लेम उलटा आहे. त्याच्याकडे चित्रपटाला चालाविशी कल्पना आहे, पण प्रत्यक्ष घटना नाहीत. ज्या आहेत त्यातल्या जंगलातल्या ,बिबट्याबरोबरच्या घटना ते काही कारणामुळे ( प्रत्यक्ष चित्रण वेळखाऊ/ अवघड असेल, बजेट अवाक्याबाहेरचं असेल, स्वस्त परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, वा आणखी काही) दाखवू शकत नाहीत. आणि ज्या दाखवू शकतात त्या फारच रुटीन ,काहीच नाट्यमय घडण्याची शक्यता नसणार््या आहेत.

मुळात एका बिबट्याने ( अगेन्स्ट आॅल आॅड्स) केलेला प्रवास, हा विषय असणारा, आणि तशी जाहीरात करणारा चित्रपट हा प्रत्यक्ष बिबट्याचं केवळ स्टाॅक फूटेज (बर््याच प्रमाणात, काही अपवादात्मक प्रसंग वगळता) वापरुन करायचा म्हंटल्यावर जी अडचण होईल ती या चित्रपटाची आहे. घटना आहे पुण्याजवळच्या टाकळी ढोकेश्वर गावची जिथल्या विहीरीत एक बिबट्या पडतो.'आजोबा' असं नामकरण झाल्यावर, पूर्वा ( उर्मिला मातोंडकर ) या रिसर्चरच्या मदतीने त्याला़ माळशेजजवळ जंगलात सोडलं जातं,ते त्याला ट्रॅक करण्यासाठी शेपटीत चिप ( का सिमकार्ड ?) बसवल्यानंतर. पहिले काही दिवस सिग्नल मिळत नाही अन जेव्हा मिळतो तेव्हा पूर्वाच्या लक्षात येतं की आजोबा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

सत्य घटनेवर आधारित एका बिबट्याचा हा प्रवास दाखवण्याची कल्पना चांगलीच आहे , पण वाईल्ड लाईफ चित्रणच नसेल तर तो दाखवायचा कसा? मग त्यासाठी आजोबा काही युक्त्या करतो. हा चित्रपट वन्यजीव संशोधक  विद्या अत्रेय यांच्या अनुभवावर आधारीत आहे. त्यांच्यावर बेतलेल्या पूर्वा या व्यक्तिरेखेला प्रमुख भूमिका देऊन चित्रपट मुळातच बिबट्याचा़ स्क्रीन टाईम कमी करतो.कथेच्या दृष्टीने हे तितकंसं योग्य नाही, कारण प्रत्यक्ष घटनात अॅक्टीव भाग होता बिबट्याचा, आणि विद्या यांचा सहभाग प्रामुख्याने निरीक्षकाचा होता. त्यामुळे पटकथा करताना वजनाची विभागणी आजोबाकडे झुकणारी हवी होती. इथे कारभार उलटा आहे. (कल्पना करा, संजयला प्रमुख भूमिका देऊन घडवलेलं महाभारत, किंवा काही टेकड्यांच्या स्टाॅक फूटेजच्या सहाय्याने केवळ ठाकूरच्या हवेलीत घडवलेला शोले ! मान्य, की ही उदाहरणं टोकाची आहेत, पण त्यातून मुद्दा स्पष्ट व्हावा.)आता आजोबाची भूमिका कमी केली तरी जंगल पूर्ण काढणंही शक्य नाही. काहीतरी दाखवायला तर लागणार. मग चित्रपट माफक खर््या फूटेजच्या जोडीला इतर काही युक्त्या वापरतो.

खर््या प्रसंगांना चालण्याजोगं साधारण व्हिडीओ गेम लेव्हलचं वास्तवसदृश अॅनिमेशन, वाईट अॅनिमेटेड बालचित्रपटांसारखं ( अगदी छोटा भीम लेव्हल) बिबट्याच्या प्रवासातल्या मुख्य घटना दाखवणारं अॅनिमेशन, एरीअल शाॅट्स, सूचक कॅमेरा अँगल, डिजिटल नकाशावरला कायम गैरहजर सिग्नल, जमेल तितका स्टिल फोटोंचा वापर असं काही बाही दाखवत आजोबाचा प्रेझेन्स आणण्याचा प्रयत्न चित्रपट करत राहातो. आजोबाबद्दल लिहीताना अनेकांनी त्यापेक्षा 'नॅशनल जाॅग्रफिक ' पाहा असं म्हटलय, त्यामागे कारण आहे. लोकांना हल्ली घरबसल्या आजोबा मधल्या केससारख्या अनेक केसेस आणि त्यांच्याबरोबर न घाबरता तन्मयतेने काम करणारे लोक यांचं अस्सल आणि वास्तव असूनही नाट्यपूर्ण चित्रण रोज पाहायला मिळतं. मग त्यांना असली जुळवाजुळव का खटकू नये?

खरं सांगायचं तर मलाही हे झेपलं नाही. जे खरं दाखवायला हवं, ते जर तुम्हाला दाखवता येणार नसेल, तर त्या विषयावर चित्रपट करायला घ्यावाच का? जेव्हा ते दाखवता येईल अशी तुमची खात्री होईल तेव्हा विषय वापरावा.बरं, जर जंगलात चित्रण शक्य नसेल तर पूर्वा ही व्यक्तिरेखा आशयाच्या दृष्टीने महत्वाची करण्याची कल्पनाही वाईट नव्हती. तिचे आईशी संबंध, व्यक्तिगत आयुष्य , सहकार््यांबरोबरची वागणूक , तिच्यावर होणारी टिका ,या सार््यातून एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा उभी करता आली असती. पण इथे भूमिकेला येते ती लांबी, खोली नाही.

 या भूमिकेसाठी उर्मिला मातोंडकरची निवड का केली असेल हे लक्षात यायला अवघड नाही. नावाभोवतालचं वलय प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करु शकतं. त्यात जेव्हा विषय वेगळा असेल तेव्हा तर नक्कीच मदत होऊ शकते.पण नुसतं नाव पुरेसं नाही. उर्मिलाची बोलण्याची पध्दत कृत्रिम आहे. एक पवित्रा घेऊन ती बोलतेय, किंवा उपदेश करतेय असं वाटतं. हे अधिक जाणवतं , ते बरोबर हृषिकेश जोशी, ओम भूतकर ( पूर्वाच्या सहकार््यांच्या भूमिकेत) सारखे अतिशय सहज नैसर्गिक अभिनय करणारे अभिनेते असतात तेव्हा. कदाचित पटकथा चांगली असती तर आपण पूर्वाच्या व्यक्तिरेखेत अधिक गुंतू शकलो असतो आणि मग ही अभिनयातली विसंगती आपल्याला इतकी खटकली नसती. पण ही झाली जरतरची गोष्ट.

आहे त्या स्थितीत पटकथेची परिस्थिती बिकट आहे. आजोबावर तर ती छायाचित्रणाच्या मर्यादांमुळे अधिक काळ रेंगाळू शकत नाही आणि पूर्वाच्या ट्रॅकमधे काही म्हणता काहीच घडत नाही. संशोधक ग्रुपचं आजोबावर नजर ठेवणं हेदेखील तसं गंमतीदार आहे. कारण नजर बहुतेकदा प्रत्यक्ष नसून कम्प्यूटरवरल्या डिजिटल ट्रॅकरवर ठेवली जाते. अर्ध्याहून अधिक वेळ त्यांना सिग्नल मिळत नाही. मिळतो तेव्हा सारेच जल्लोष करतात.उरलेला वेळ काळजी. मग रँडमली वेगवेगळ्या जागी फिरतात जिथे आजोबा असावा असं त्यांना वाटतं, किंवा ट्रॅकरच्या सहाय्याने कळतं. पूर्वा अधेमधे ती कशी आजोबाच्या वाटेतल्या अडचणी दूर करणार आहे, यावर धीरोदात्त भाषणं करते, मात्र ती प्रत्यक्ष काय करते, तर काहीच नाही. उदाहरणार्थ एकदा तिला नाशिक जवळ आजोबाचा सिग्नल मिळतो आणि तो हायवे क्राॅस करेल म्हणून सारे तिथे ठिय्या देऊन बसतात. पुढे कधीतरी तो क्राॅस करतो, पण कधी, ते यांना कळतही नाही. सारा वेळ हाच प्रकार .

मुळात विद्या अत्रेय यांच्या दृष्टीने संशोधन म्हणून हा अनुभव इन्टरेस्टिंग आणि मोलाचा आहे , पण प्रेक्षकासाठी केवळ 'रिसर्च' हा चित्रपटाचा विषय म्हणून इन्टरेस्टिंग आहे का? खासकरुन 'एका वाघाचा प्रवास' हा विषय दाखवण्याचा दिग्दर्शकाचा दावा असताना ?

खरी घटना, खर््या व्यक्तिरेखा असताना त्यांचं चित्रण स्टाॅक पध्दतीने करण्याची एक पध्दत अलीकडे काही मराठी आणि हिंदी चित्रपटात दिसायला लागलीये. आजोबामधेही हा प्रकार आहे.म्हणजे एकदा आईशी बोलताना पूर्वा तिला 'इतकी वर्षं काम केल्यावर आत्ता कुठेतरी यश दिसायला लागलंय' या प्रकारचं ( हे शब्दश: नाही, मी पॅराफ्रेज केलय) बोलते, किंवा पूर्वाचे मार्गदर्शक ( दिलीप प्रभावळकर, सुमारे दोन मिनिटांच्या भूमिकेत) तिचं ,' तू हे काम करतेयस म्हणून पुढच्या पिढ्याना फायदा होणार आहे' ( पुन्हा पॅराफ्रेज्ड) असं कौतुक करतात. आता पूर्वाच्या एकूण कामातली ही एक छोटी केस. तिला आजोबा सापडला तो अपघाताने आणि ती माहिती जमवतेय ती तशी रुटीन.ही तिची वन्स इन ए लाईफटाईम केस नाही( किंवा असल्यास ते जाणवत तरी नाही)त्यामुळे तिच्या आप्तांशी असं  नाट्यपूर्ण बोलणं खरं वाटत नाही. सार््यानी असं छापील, ओळखीचं , अपेक्षित बोलल्याने सारं घडवलेलं वाटायला लागतं. अस्सल वाटत नाही. हृषिकेश जोशीच्या व्यक्तिरेखेला फाॅरेस्ट डिपार्टमेन्टमधे काम करुन दुर्बिण माहीत नसणं यासारखे अविश्वसनीय तपशील, ओम भूतकरचं अनावश्यक प्रेमप्रकरण हे सारंच चित्रपटाचा परिणाम कमी करत आणतं.

या सार््यापलीकडे जाऊन कौतुक करण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली आहे तो विषयाचा खूपच वेगळेपणा. पारंपारिक कथनशैलीशी फारकत घेऊन मराठी चित्रपटात अपेक्षित नसलेलं काही बनवायला घेण्याचा आत्मविश्वास हा खासच महत्वाचा. पण केवळ वेगळा विषय पुरेसा नाही , तो सादरही तसाच व्हायला हवा.

दुसरी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे चित्रपटाचं सोफेस्टिकेशन. बेकार अॅनिमेशन वगळता तो सतत चांगला दिसतो,वेगळा वाटतो. कदाचित अधिक मोठं बजेट आणि वेळ खर्च करुन यातून एक खूप चांगला चित्रपट होऊ शकला असता असं वाटवणार््या जागाही इथे आहेत. नाही तो एकसंध परिणाम.

या दिग्दर्शकाचे पहिले दोन्ही प्रयत्न मला वैयक्तिक दृष्ट्या पटले नसले तरी त्याची दिशा बरोबर आहे असं मी म्हणू शकेन. त्याच्या उद्दीष्टापर्यंत मात्र तो पोचल्याचं अजून दिसत नाही. अर्थात, सर्वांच्याच प्रवासात अडचणी असतात, महत्व आहे ते तो प्रवास करत राहाण्याला.या चित्रपटात तरी दुसरं काय सांगितलय?  'आजोबा'पासून हा एक धडा तरी आपण नक्कीच घेऊ शकतो.
-- ganesh matkari 

Read more...

एक हजाराची नोट- अर्थपूर्ण आणि आटोपशीर

>> Saturday, May 10, 2014


सध्याच्या ( चांगल्या)मराठी सिनेमाचं- सध्याच्या म्हणजे साधारणपणे गेल्या दहा वर्षातल्या म्हणू- तर या सिनेमाचं बलस्थान काेणतं, हा प्रश्न विचारायचा तर त्याचं उत्तर प्रामुख्याने विषयातलं वैविध्य, सामाजिक विचार आणि करमणुकीपलीकडे जाण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल. या तीन घटकांच्या जोरावरच आज आपला चित्रपट राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातोय आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रिय स्तरावरही. या घटकांपलीकडे, म्हणजे तंत्र आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर पाहायचं तर आपण मोठ्या व्यावसायिक चित्रपटांशी स्पर्धा करु शकत नाही कारण अजूनही आपला चित्रपटउद्योग तसा मर्यादित साधनं असणारा आहे. त्याला म्हणावा तसा, तितका प्रेक्षक नाही आणि अार्थिक बळ नाही.  ते का नाही, हा वेगळ्या ,मोठ्या लेखाचा विषय, त्यात मी आता पडणार नाही, पण योग्य तो कथाविषय आणि दृष्टी असेल तर जे आहेत ते तीन घटकही पुरेसे आहेत याची अनेक उदाहरणं नजिकच्या काळातल्या मराठी चित्रपटाने दाखवून दिली आहेत. यातलं अगदी नवं उदाहरण, म्हणजे श्रीहरी साठे दिग्दर्शित आणि श्रीकांत बोजेवार लिखित ' एक हजाराची नोट' हा चित्रपट.

'एक हजाराची नोट' चं  थोडक्यात वर्णन करायचं तर 'अर्थपूर्ण  आणि आटोपशीर' असं करता येईल. त्याला काय म्हणायचय हे नेमकं आहे आणि तो नेमकेपणा शाबूत राखण्याच्या दृष्टीकोनातूनच त्याचा एकूण विचार झालेला आहे. त्याची लांबी, पात्रांची संख्या आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेली जबाबदारी, त्यातल्या प्रमुख घटनांची संख्या आणि रचना हे सगळं त्या विचाराशी जोडलेलं आहे( काही बाबतीत हा आटोपशीरपणा साधतानाची काटकसर टोकाची ठरते पण त्याविषयी थोडं नंतर बोलू) .

चित्रपटाचा विषय खूपच आजचा आणि मूलभूत स्वरुपाचा आहे. राजकारणाशी आणि निवडणूक प्रक्रियेशी जोडला असल्याने तर आहेच पण त्यापलीकडे जाऊनही. आपला स्वभाव, वागणं, आपल्या वागण्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उमटणारे पडसाद, स्वार्थ - मोह- त्याग यांसारख्या भावनांचा आपल्यावर होणारा परिणाम, आपले विश्वास, श्रध्दा, या सगळ्याला त्यात स्थान आहे. तो जे प्रश्न उपस्थित करतो ते चटकन उत्तर मिळणारे नाहीत, किंबहुना इथे उत्तराची अपेक्षाच नाही. अपेक्षा आहे, ती  चित्रपटा पाहाताना ते प्रश्न आपल्याला पडावेत हीच.

चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे एका छोट्याशा गावात राहाणारी एक म्हातारी ( उषा नाईक) . म्हातारीकडे पैसा नाही म्हणजे जरासुध्दा  नाही. तिच्या शेतकरी मुलाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे आणि तुटपुंज्या पैशावर ती कसंतरी घर चालवतेय. शेजारी राहाणारा सुदामा ( संदीप पाठक) तिला  मुलासारखाच आहे आणि त्याचं कुटुंब ती नात्यातलच मानते. प्रचारादरम्यानच्या एका राजकारण्याच्या ( गणेश यादव) सभेला, लोकाना मतांसाठी पैसेवाटप होत असताना सुदामा  म्हातारीच्या मुलाबद्दल बोलून सहानुभूती तयार करतो आणि तिला इतरांपेक्षा अधिक, म्हणजे शंभराएेवजी हजाराच्या नोटा मिळतात. म्हातारी या पैशातनं काय करायचं याची स्वप्न पाहायला लागते. थोडीफार खरेदी करावी म्हणून सुदामाबरोबर जवळच्या मोठ्या गावात बाजाराला गेली असताना म्हातारीवर या पैशांमुळे एक नवंच संकट कोसळतं.

चित्रपटाची रचना ही दोन अंकी असल्यासारखी आहे. पहिला अंक म्हातारीच्या गावात घडतो तर दुसरा बाजारच्या ठिकाणी. दोघांचे स्वतंत्र उत्कर्षबिंदू आहेत पण पहिला भाग हा प्रामुख्याने सेट अप सारखा आहे. त्यात म्हातारी आणि सुदामा कोण आहेत, त्यांचे परस्परसंबंध कसे आहेत हे सांगितलं जातं, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा क्षण आपल्यापुढे मांडला जातो आणि पुढल्या भागासाठी एक पार्श्वभूमी तयार होते. प्रत्यक्ष घटनांच्या दृष्टीने यात फार काही होत नसलं, तरी पुढल्या भागाचा परिणाम व्हायचा, तर हा भाग आपल्यापर्यंत पुरेशा ताकदीने पोचणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष नाट्य घडतं ते पुढल्या भागात. आता हे दोन्ही भाग आपापल्या परीने परिपूर्ण आहेत आणि त्यांच्या गतीत वा ते जे सांगू पाहातात, त्यात चुका काढायला जागा नाही. व्यक्तिश: मात्र मला एक गोष्ट जाणवली आणि  ती म्हणजे कथासूत्राच्या पूर्ण शक्यतांचा वापर चित्रपट करतो असं वाटत नाही . बहुतेक कथाविषय हे त्यांचा विस्तार कशा पध्दतीने होऊ शकतो याचा एक आराखडा स्वत:तच बाळगून असतात. काहींचा जीव लहान असतो तर काहींचा मोठा. जीव मुळात लहान असेल तर तो ताणणं जसं अनावश्यक तसंच असलेल्या शक्यता वापरण्याचं टाळणं देखील खटकणारं. एक हजाराची नोट अशी किमान एक , उघडपणे समोर दिसणारी महत्वाची शक्यता टाळतो.

 या प्रकारची कमेन्ट ही सामान्यत: पटकथाकार वा दिग्दर्शकांना मान्य होत नाही, खासकरुन जर त्यांची काही निश्चित भूमिका असेल तर. इथे दिग्दर्शक श्रीहरी साठे आणि पटकथाकार श्रीकांत बोजेवार यांची उघडच तशी आहे. त्यांना आपल्या आशयाचा विस्तार हा एका मुद्द्यापर्यंत करायचाय अन त्यापलीकडे नाही. आता असं असण्यामागे कारणं अनेक असू शकतात. टिपेला गेलेला आशय कदाचित थोडा भडक होईल, सेन्सेशनलिस्ट वाटेल असं असू शकतं, संघर्षावर अधिक फोकस आला तर आधी आलेल्या महत्वाच्या पण काहीशा संयत मुद्द्यांकडे दुर्लक्ष संभवतं असं असू शकतं, किंवा अधिक प्रॅक्टीकल, म्हणजे चित्रपटाच्या लांबीसारख्या गोष्टीशी जोडलेली कारणंही असू शकतात. (थोडं विषयांतर-  लांबीसाठी चित्रपटासंबंधातला इतका मोठा निर्णय घेतला जाणं संभवत नाही असं वाटणार््यांनी सुप्रसिध्द फ्रेन्च ओतर ज्याँ ल्यूक गोदारने जम्प कट या संकल्पनेचा शोध आपल्या 'ब्रेथलेस ' चित्रपटादरम्यान कसा लावला हे जरुर शोधून पाहावं. त्यांची करमणूक तर होईलच, वर त्यांच्या या विषयाकडे पाहाण्याच्या दृष्टीतही फरक पडू शकेल.) हे मुद्दे म्हंटलं तर रास्त आहेत आणि समीक्षक हा शेवटी निरीक्षक असतो, त्यामुळे विशिष्ट कलाकृतीत क्रिएटीव इन्पुट असणार््या माणसाला मी माझंच मत बरोबर असं नक्कीच सांगणार नाही. त्यांनी चित्रपटाचा विचार, कितीतरी अधिक वेळ देऊन केलेला असतो. मी केवळ एवढंच म्हणेन कि कलात्मक वा कलाबाह्य कोणत्याही कारणापलीकडे जाऊन जर यातला विषय एका थोड्या वरच्या टप्प्याला गेला असता, तर मला स्वत:ला अधिक आवडला असता.

ही एक गोष्ट सोडता मला हजाराची नोट पूर्णत: पटला. त्यातला विचार हा आपल्या आजच्या वातावरणाशी सुसंगत आहे आणि घटनांमधलं नाट्य हे अगदी शक्यतेच्या कोटीतलं , तरीही ( किंवा त्यामुळेच ) अस्वस्थ करणारं आहे. आपल्या देशात कोण कशाला आणि किती किंमत देतो याचा हा चित्रपट एक प्रकारे जाबच मागतोय असं आपण म्हणू शकतो. मात्र हे करताना तो कोणताही आव आणत नाही किंवा उपदेश करत नाही. तर्कशुध्द घटनांचीच तो अशी मांडणी करतो जी आपल्याला काही महत्वाचं, सहज समजणार््या भाषेत सांगेल.

उषा नाईक यांचं कास्टिंग हे विशेष उल्लेख करण्यासारखं. तरुण प्रेक्षकांना , म्हणजेच त्यांची आधीची कारकिर्द माहित नसणार््यांना, या नव्या , आजवर अपरिचित असूनही प्रथम दर्जाच्या अभिनेत्री नक्कीच वाटतील,पण खरी गंमत ही, की त्यांचं जुनं काम पाहिलेल्यांनाही  तेच वाटू शकेल . जुन्या मराठी चित्रपटांमधली त्यांची ढोबळ, तथाकथित नाट्यमय भूमिकांमधली ओळख विसरुन इथे त्या पुन्हा स्वत:ला इन्व्हेन्ट करतात. इथून पुढे त्यांची कारकीर्द नव्याने सुरु झाली तर आश्चर्य वाटू नये. संदीप पाठक आता नव्या पिढितल्या उत्तम अभिनेत्यामधला एक म्हणून एस्टॅब्लिश झालाय . एकेकाळी प्रामुख्याने विनोदासाठी ओळखला जाणारा हा नट आता विविध प्रकारच्या भूमिका करतोय. त्याची एक हजाराची नोट मंधली भूमिका बहुधा लांबीने तर आजवरच्या सर्व भूमिकात मोठी असेलच, वर  ती त्याची रेंज अधिक पुढे नेणारी आहे.

हा चित्रपट प्रेक्षकाला कसा वाटतो हे पाहाण्यात मला रस आहे कारण आपण एका ट्रान्झिशनच्या काळातून जातोय. जुना मराठी सिनेमा कधीच संपलाय आणि नव्या मराठी चित्रपटाचे ठोकताळे नव्याने ठरतायत. ज्यांना मिळालेल्या प्रतिसादावरुन येत्या वर्षांबाबत काही अंदाज बांधता येईल अशा मोजक्या चित्रपटातला एक म्हणून ' एक हजाराची नोट' चं नाव नक्कीच घेता येईल.

- गणेश मतकरी

Read more...

पुन्हा स्टार वाॅर्स- सनातन मूल्यांचा वैज्ञानिक ताळमेळ

>> Monday, May 5, 2014


(हे माझं पहिलं चित्रपट परीक्षण. महानगरच्या १९ सप्टेंम्बर १९९७ च्या अंकात आलेलं, सतरा वर्षांपूर्वीचं, त्याकाळातही वीस वर्षं जुन्या असणार््या चित्रपटाचं. तोवर मी चित्रपटांविषयी लिहीण्याची कल्पनाही केलेली नव्हती. पुढल्या आठवड्यापासून लिहायला लाग असं निखिल वागळेंनी सांगितल्यावर मी नवा कोणता चित्रपट येतोय याची चौकशी केली, तर ती होती रीमास्टर केलेली , स्टार वाॅर्स चित्रत्रयीची मूळ आवृत्ती, स्पेशल एडीशन. इतका गाजलेला आणि मला आवडणारा चित्रपट पहिल्या परीक्षणाला मिळणं हे मला खूप आॅस्पिशस वाटलं. यानंतर मी चित्रपटसमीक्षा रेग्युलरली सुरु केली. काल स्टार वाॅर्स फॅन सेलिब्रेट करत असलेला 'स्टार वाॅर्स डे ' होता. ४ मे ही तारीख, कारण ' मे द फोर्थ ' या तारखेचं ' मे द फोर्स बी विथ यू' , या मालिकेतल्या प्रसिध्द वचनाशी असणारं साम्य. त्या निमित्ताने हा लेख उत्खननात शोधला. तो मिळाला हेच आश्चर्य. या स्पेशल एडीशननंतर स्टार वाॅर्स प्रीक्वल आपल्याला पाहायला मिळाली आणि आता डिस्ने त्याच्या सीक्वल्स वर काम करतय. लवकरच तीही पाहयला मिळतील. या विषयावर मी अधिक विस्तृत लेख पुढे लिहीला. ज्यात यातल्या मिथमेकींगविषयी, हिडन फोर्ट्रेस सारख्या चित्रपटांच्या किंवा मॅटीने सिरीअल्सच्या ल्युकसला प्रभावित करणार््या संदर्भांविषयी बरंच आहे.तो लेख माझ्या 'फिल्ममेकर्स' पुस्तकात संग्रहीत आहे. पण हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे तसा ढोबळ असून माझ्यासाठी स्पेशल)


आपल्यापैकी बहुतेकांना ' स्टार वाॅर्स ' हा चित्रपट माहित असेल. अनेकांनी तो पाहिलादेखील असेल. पण माझ्यासारख्या अनेक जणांना पाहाण्याची इच्छा असूनही तो चित्रपटगृहात, त्याच्या पूर्वीच्या दिमाखदार रुपात पाहाणं शक्य नव्हतं. कारण जुन्या झालेल्या प्रती.
यावर उपाय म्हणजे अर्थात छोटा पडदा, जो कधीच भव्य चित्रपटांना न्याय देऊ शकत नाही. आज प्रथम प्रदर्शनानंतर वीस वर्षांनी 'स्टार वाॅर्स' आपल्यासमोर येत आहे. त्याच्या मूळ प्रतीहूनदेखील अधिक सुधारित स्वरुपात. त्यामागचे श्रम आहेत ते दिग्दर्शक जाॅर्ज ल्यूकस, 'इंडस्ट्रिअल लाईट अॅन्ड मॅजिक'चे तंत्रज्ञ आणि अर्थातच ट्वेन्टीएथ सेंचुरी फाॅक्स यांचे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचं मूल्यांकन पुन्हा एकदा होणं जरुरीचं वाटतं.
मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तो १९७७ मधे. त्यावेळी नुकत्याच बसल्ल्या व्हिएतनाम युध्द आणि वाॅटरगेट प्रकरणाच्या धक्क्यातून सावरणार््या जनतेला ही काहीशी पलायनवादी, काळ्या-पांढर््या रंगात रंगवलेली, ढोबळ तत्वज्ञान सांगणारी अद्भुतरम्य परीकथादिलासा देणारी वाटली आणि ' स्टार वाॅर्स' सर्वाधिक उत्पन्न मिळवणार््या चित्रपटांच्या यादीत दुसर््या क्रमांकावर जाऊन बसला. याचे पुढचे दोन भागदेखील ( द एम्पायर स्ट्राईक्स बॅक आणि रिटर्न आॅफ द जेडाय) चांगलेच यशस्वी ठरले. यात रंगवलेला सुष्ट आणि दुष्ट यांच्यातला कालातीत झगडा आणि सादरीकरणाची आधुनिक तंत्र लोकांच्या इतकी पसंतीला उतरली की ही परीकथा, आधुनिक पुराणकथेच्या, माॅडर्न मायथाॅलाॅजीच्या दर्जाला जाऊन पोचली.
ही कथा घडते, ती विश्वातल्या दुसर््या एखाद्या आकाशगंगेत, आणि तिला पार््श्वभूमी आहे, ती त्या जगातले निर्दय राज्यकर्ते आणि त्याना विरोध करणारे बंडखोर यांच्यातल्या लढ्याची. बंडखोरांनी राज्यकर्त्यांच्या नकळत एका ग्रहावर आपला तळ केला आहे. त्याची माहिती मिळवण्यासाठी ग्रॅन्ड माॅफ टार्कीन ( पीटर कुशिंग) आणि डार्थ वेडर ( डेव्हिड प्राऊस चा प्रत्यक्ष वावर, मात्र आवाज जेम्स अर्ल जोन्स यांचा) हे राज्यकर्त्यांचे सैन्यप्रमुख बंडखोरातल्या राजकन्या लिआ( कॅरी फिशर) ला ताब्यात घेतात. तत्पूर्वी ती आपले दोन यंत्रमानव सी- थ्रीपीओ आणि आर टू - डी टू यांना मदतीच्या आशेने अंतराळात सोडते. ते दोघं एका पृथ्वीसदृश ग्रहावर ल्यूक स्कायवाॅकरला (मार्क हॅमिल) सापडतात. तो आणि ओबी वान कनोबी( अॅलेक गिनेस)  हा जेडाय पंथाचा योध्दा, एका तिरसट आणि पैशांसाठी काही करायला तयार असणार््या, पण मुळच्या सुस्वभावी हान सोलो ( हॅरीसन फोर्ड) या यानचालकाच्या मदतीने तिला सोडवण्याच्या मोहिमेवर निघतात. यानंतरच्या घटना म्हणजे अतिशय वेगाने आणि स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने नेहमीच्या गोड शेवटापर्यंत होणारा प्रवास.
तुटपुंजी कथा आणि व्यक्तिरेखांवर आधारलेल्या या चित्रपटाचं यश हे दिग्दर्शकाने कल्पिलेल्या , शक्य कोटीतल्या वाटणार््या वीरपुरुष आणि दानव यांच्या विश्वातच आहे आणि ओघानेच ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या तत्रज्ञानात. हे तंत्रज्ञान हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे एवढंच म्हणणं योग्य नाही कारण खरं तर हे  तंत्रज्ञान म्हणजेच स्टार वाॅर्स.
आजपासून वीस वर्षांपूर्वी आजच्या इतक्या मोठ्या प्रमाणात काॅम्प्युटरचा उपयोग होत नसताना माॅडेल्स , बॅकप्रोजेक्शनच्या मदतीने केलेला हा चित्रपट ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. अर्थात, यंदा प्रदर्शित होणारी ' स्पेशल एडीशन' असल्याने यात ल्युकसने मूळ चित्रपटातल्या त्रुटी तर सुंधारल्या आहेतच, वर काही ठिकाणी नवी भरही टाकली आहे. उदाहरणादाखल बोलायचं, तर यात जाबा द हट् या राक्षसी परग्रहवासियाबरोबर हान सोलोचा एक प्रसंग आहे. मूळ चित्रपटात नसलेल्या पण चित्रित केल्या गेलेल्या या प्रवेशातल्या मूळ जाबाला पूर्ण काढून टाकून दिग्दर्शकाने संगणकीय मदतीने नवा जाबा तयार केलाय. त्याला दिलेला नवा आवाज आणि हॅरीसन फोर्डचा वीस वर्षांपूर्वीचा आवाज याचा मेळ घालणं ही एक कसोटी ठरल्यास नवल नाही.
या चित्रपटाचा एक गुण (आणि दोषही) म्हणजे यातली काळ्या पांढर््या रंगातली पात्र. त्यांना इतर छटा नाहीत. खरं तर त्यांना पात्रांएेवजी प्रवृत्ती म्हणता येईल. सर्व कथा घडते, ती नायकांच्या दृष्टीकोनांतून. त्यामुळे सर्व भाव भावना देखील ल्यूकच्या भाबड्या आशावादापुरत्या, सोलोच्या तिरसट चांगुलपणापुरत्या, लिआच्या निरागस धैर्यापुरत्या , आणि सी-थ्रीपीओ, आर टू- डी टूच्या मिश्कील मैत्रीपुरत्या मर्यादीत राहातात. त्यामुळेच की काय, पण ही भविष्यवादी वैज्ञानिका शेवटी सनातन मूल्यांनाच कवटाळते.
मार्क हॅमिलने ल्यूक चांगला उभा केला आहे. त्याचा नवखेपणा पण आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी, त्याचा 'फोर्स' या दैवी उर्जाक्षेत्रावर वाढत जाणारा विश्वास हा चित्रपटाचा पाया मानता येईल. लिआच्या भूमिकेत कॅरी फिशर दिसते छान, मात्र तिची केशरचना पृथ्वीवासियांच्या वरताण आहे.
सर्वात लक्षात राहातो, तो मात्र फोर्डचा सोलो. ही त्याच्या सुरुवातीच्या भूमिकांपैकी एक. काहीशा 'इंडिआना जोन्स' छापाच्या या भूमिकेने त्याला चांगलाच हात दिला. आजच्या फोर्डच्या चहात्यांना त्याची ही खूपच तरुण आवृत्ती आवडल्याशिवाय राहाणार नाही. वेडरच्या भूमिकेत खरं महत्व आहे ते वेश आणि आवाज यांना. त्याचा मुखवट्यासह असणारा काळा पेहराव, हा हाॅलिवुडमधल्या अजरामर वेशभूषांमधला एक आहे. जोन्सचा आवाजही स्टार वाॅर्सच्या खास आकर्षणातला एक मानला जातो.
इतरांच्या वेशभूषांचे ठळक तीन भाग पडतात. नायकाच्या बाजूला पायघोळ अंगरखे , झगे असे पौराणिक पध्दतीचे, खलनायकांच्या बाजूला युनिफाॅर्म्स. त्याखेरीज परग्रहवासी. त्यांचे प्रकार तर विचारुच नका. असो.
हा या शतकातला एक महत्वाचा चित्रपट. त्याचं स्वागत करायलाच हवं.
- ganesh matkari 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP