पटलेल्यांना पटवणारा ' पिंक '

>> Sunday, September 25, 2016

 (स्पाॅयलर अलर्ट- लेखात बरेच तपशील आहेत, त्यामुळे ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी वाचू नये . खरं म्हणजे चित्रपटात असं काही रहस्य वगैरे नाही, पण तेवढच तुमच्या मनाचं समाधान...)

सेरवान्तेसने आपल्या डाॅन किहोटे या जगप्रसिद्ध कादंबरीत म्हंटलय, की ' देअर इज नो बुक सो बॅड...दॅट इट डझ नाॅट हॅव समथिंग गुड इन इट ' . हाच न्याय चित्रपटाला लावून आपण असं नक्कीच म्हणू शकतो, सर्व चित्रपटांतच काही ना काही चांगलं असतं, अगदी टिकेला पात्र ठरणाऱ्या किंवा प्रेक्षकांनी नाकारलेल्या चित्रपटांत सुद्धा. अर्थात यालाही सन्माननीय अपवाद जरुर आहेत , पण आपण हा सर्वसाधारण चित्रपटाला लागणारा न्याय म्हणू शकतो.

अनिरुद्ध राॅय चौधरी दिग्दर्शित 'पिंक', या अतिशय प्रेक्षकप्रिय ठरलेल्या चित्रपटात तर अनेक चांगल्या गोष्टी निश्चित आहेत. उत्तम कास्ट आहे, निर्मिती मूल्य आहेत, प्रेक्षकांना पटणारा सूर आहे. पण त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तो अतिशय साध्या सरळ पद्धतीने हा संदेश देतो, की एखादी मुलगी जेव्हा 'नाही' म्हणते, तेव्हा त्याचा अर्थ 'नाही' हाच असतो. त्यात समोरच्याला वेगळा अर्थ काढायला, सूचकतेला वाव नाही. तो शब्द नाहीच, ते एक पूर्ण वाक्य आहे, आणि त्याचा अर्थ ' नाही' हाच . आता या प्रकारचा आशय यापूर्वी चित्रपटात आलेला नाही असं नाही. स्त्रियांचा अधिकार आणि पुरुषी वर्चस्वाला विरोध ही अनेक चित्रपटांनी हाताळलेली थीम आहे. मात्र आजच्या बदलत्या, स्त्री स्वातंत्र्याला पूर्ण मान्य करणाऱ्या काळात, कोणीतरी तो संदेश अनक्लटर्ड , सोप्या पद्धतीने सांगण्याची गरज होती. पिंक हे करतो. या एका गोष्टीसाठी त्याचं कौतुक व्हायला हरकत नाही, आणि ते होतंही आहे.

मी पिंक पाहिला, तो लागल्यानंतर आठवडाभराने. या काळात त्यावर बरीच चर्चा झाली होती त्यामुळे काय पहायला मिळेल हे काही प्रमाणात माहीत होतं. पिंकचं मध्यंतर झालं तेव्हा मी बऱ्यापैकी इम्प्रेस्ड होतो. बऱ्याच लोकांकडून या सिनेमाबद्दल चांगलं एेकलं होतं, ते बरोबर ठरेलसं वाटत होतं. या भागात मला खासकरुन आवडल्या त्या दोन गोष्टी. त्यातली पहिली म्हणजे खरं काय झालं हे नं दाखवता ते इन्टरप्रिटेशनवर सोडणं .

आता इथली मूळ घटना आहे ती एका रिजाॅर्ट रुममधे मिनल ( तापसी पन्नू )  या मध्यमवर्गीय तरुणीने,  राजवीर ( अंगद बेदी ) या बड्या घरच्या तरुणावर केलेल्या हल्ल्याची. मध्यंतर होतं, तोवर  राजवीर आणि त्याच्या मित्रांनी मिनल आणि तिच्या फलक ( किर्ती कुल्हारी ) आणि आन्द्रेआ ( आन्द्रेआ तारीआन्ग)  या मैत्रिणींना आधी बरच धमकावून मग त्यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यापासून प्राॅस्टिट्यूशन पर्यंत अनेक गोष्टींचे आरोप करणारी  केस टाकली आहे. मुली निर्दोष आहेत, आणि आता त्यांना  मदत करायला मानसिक स्थैर्य गमावलेला, पण अन्यायाच्या विरोधात पुन्हा उभा रहाणारा निवृत्त वकील सेहगल ( बच्चन ) पुढे झालेला आहे.

चित्रपट सुरु होतो तेव्हा हल्ला होऊन गेलेला आहे. सगळे रिजाॅर्टमधू बाहेर पडलेत. इथे खरी घटना आपल्याला नं दाखवणं ही चांगली कल्पना आहे. कारण चित्रपटात महत्वाची आहे ती केस, आणि अशा केसेसमधे १०० टक्के विश्वसनीय माहिती ही नसतेच. अशा वेळी प्रत्यक्षात काय घडलं यापेक्षा  मिळालेल्या माहितीचा अर्थ कसा लावला जातो याला महत्व येतं. शिवाय हा समाजोपयोगी आशय मांडणारा चित्रपट असल्याने , पडद्यावर जज्ज दिसला , तरी शेवटी प्रेक्षकाने व्यक्तिरेखांबद्दल अंतिम  मत बनवणं अपेक्षित आहे. त्यामुळे कोणाची चूक हे चित्रपटाने आधीच सांगून टाकण्यापेक्षा त्याला स्वत:चं मत बनवण्याची संधी देणं कधीही चांगलं. काय घडलं हे दाखवणं टाळल्याने ती संधी तयार होते.

दुसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे पूर्वार्धात तयार होणारं भीतीचं वातावरण. सामान्य माणसांची चूक नसताना त्यांना हतबल करण्यासाठी काय पद्धतीच्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात याचं हे चित्रण खरोखर अस्वस्थ करणारं. या भागातला अमिताभ बच्चनचा सेहगल वकीलाच्या भूमिकेतला गूढ वापर आवश्यक होता का असं वाटलं, पण मला ते पात्र कोण आहे हे मूळातच माहीत असल्याने असं वाटलं असू शकतं. स्क्रिप्टच्या ओघात पहायचं तर हे पात्र कोण, हे नंतर उलगडण्यात काहीच गैर वाटण्यासारखं नाही.

हा भाग आवडल्याने मी सरसावून बसलो, पण मध्यंतरानंतर खटला सुरु झाला आणि सगळ्याला एका ढिसाळ कारभाराचं स्वरुप आलं.

कोणाला अवांतर वाटेल, पण मी इथे एक गोष्ट सांगेन. ती ही, की मी कायद्यावर आधारीत अमेरिकन  मालिका नियमितपणे  पहातो. ग्रिशमच्या कादंबऱ्यांप्रमाणे कोर्टरुम थ्रिलर्सही वाचतो पण मालिका इथे अधिक रेलेवन्ट, कारण त्यांनाही एपिसोडच्या मर्यादित वेळात राहून, आणि रेग्युलर पात्रांची मालिकाभर चालणारी गोष्ट सांगता सांगता; अनेक छोटेछोटे खटले दाखवायचे असतात. हे किती उत्तम पद्धतीने दाखवले जातात याचं उदाहरण हवं असेल, त्यांना मी नुकतीच पाहिलेली  रिडली / टोनी स्काॅटने निर्मिलेली 'द गुड वाईफ'  मालिका रेकमेन्ड करेन.

 आता अमेरिकन  कोर्ट आणि आपलं, यात मोठा फरक म्हणजे आपल्याकडचा ज्युरी सिस्टीमचा अभाव. त्यामुळे त्यासंबंधातलं प्रोसिजर, किंवा ज्युरीचं इमोशनल मॅनिप्युलेशन, कायदेशीर बाजू, हे सगळं आपल्याकडे पूर्ण गैरहजर. पण इन्टॅक्ट असायला हवं, ते केस लढवतानाचं तर्कशास्त्र. कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कायकाय गोष्टी लागाव्यात, जज्जांचे/ वकीलांचे विविध प्रकार, युक्तीवादांच्या विविध पद्धती, तपासणी- उलट तपासणीतली लिंक, शिक्षा देताना असणाऱ्या वेगवेगळ्या शक्यता, इत्यादी इत्यादी. आता हे सगळं दाखवताना, मालिकांमधे अनेक प्रकारचे तपशील असतात, पण ते कुठेही बोजड, कळायला कठीण होत नाही. ते सतत रंजक आणि गुंतवणारं असतं, आणि त्यामुळेच अगदी व्यावसायिक. ( त्याशिवाय या मालिका वर्षानुवर्ष सुरु रहात नाहीत )  मालिका असल्याने काही खटल्यांचे निकाल योग्य बाजूने  तर काहींचे उलट लावणं त्यांना परवडतं, पण तरीही दर वेळी या एकेक एपिसोड असणाऱ्या केसमधे आपण पूर्ण अडकतो. योग्य न्याय झाला की आपल्याला बरं वाटतं, चुकलं की आपण हळहळतो.  हे पहाताना कुठेही असं वाटत नाही की या मंडळींचं आधीच ठरलय बरं का सगळं, कोण जिंकतो कोण हरतो हे माहीतच आहे आणि आता निकालही तसेच लागणार. या केसेसमधे मोलेस्टेशनपासून सर्वच विषय आहेत हे वेगळं सांगायला लागू नये. या मालिकांमधे दिसणारा  हा जो खऱ्या केसचा आभास आहे, तपशील आहे, अनिश्चित वास्तव सूचित करण्यात येतय, ते चित्रपटात तर अधिक ताकदीने जमायला हवं, पण पिंक चित्रपटात ते पूर्णत: अदृश्य आहे. ही केस लढण्याचा चित्रपटातला जो मध्यंतरानंतरचा भाग आहे, तो संपूर्ण भाग हा  लुटूपुटीचा, ढोबळ आणि प्रेडीक्टेबल झालेला आहे.

मध्यंतरापूर्वी जाणवणाऱ्या पिंकमधल्या फिर्यादी आणि आरोपींच्या  व्यक्तीरेखांमधे थोड्याफार  ग्रे शेड्स आहेत. राजवीरची बाजू ही गडद आहे परंतू प्रत्यक्षात त्याचं चित्रण बरचसं संयत आहे. तो फार काही अॅग्रेसीव्ह करताना दिसत नाही. त्या गोष्टी करण्यासाठी पूर्वार्धात त्याच्या एका मित्राची योजना केलीये जो मिनलला पळवण्यापर्यंत मजल गाठतो, पण त्याला दुसऱ्या भागात कोर्टात बसण्यापलीकडे काम नाही. या योजनेमुळे राजवीर थोडा शांत वाटतो. शिवाय एकदा तो आणि फलक फोनवर बोलतात तेव्हाही तो मीनलच्या तोंडून साॅरी एेकायचय यापलीकडे धमक्यांवर जात नाही. उलट यावेळी फलक त्याला आणि आधी मीनल त्याच्या मित्राला , सकारण पण अद्वातद्वा बोलतात. कृष्णकृत्य डिपार्टमेन्ट मित्राकडे गेल्याने राजवीर थोडा सरळ वाटतो. तरीही थोडासाच, कारण प्रेक्षकांना मिक्स्ड मेसेज जाऊ नयेत म्हणून त्याची गॅंग जरुरीपुरती खलनायकी दाखवण्यात येते. फेअर इनफ.

मुलींचं वागणं हे मोकळं आहे, जे मात्र आवश्यक आहे. मुली अगदी कृत्रिम सद्गुणी नं दाखवता आजच्या तरुणतरुणींप्रमाणेच वागणाऱ्या आहेत. प्रत्येकालाच जसं आपल्या बाबतीत काही वाईट होणार नाही असं वाटतं, तसं त्यांनाही वाटतं, त्यामुळे त्या फार ओळख नसलेल्यांबरोबर पार्ट्यांना जाणं , ड्रिंक्स घेणं अशा गोष्टीही करतात. नोकरदार तरुणींचं समकालीन चित्रण , या चित्रपटातल्या  मेसेजशी जोडलेलं आहे. ( चित्रपटात एकदा फलक कारण नसताना आम्ही राजवीरकडून पैसे घेतले होते असंही कबूल करुन टाकते, तेही त्यातल्या मेसेजच्याच गरजेसाठी ) कारण मेसेज असा, की मुलींचा शब्द हा अंतिम शब्द आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यावरुन पुरुषांनी सोयीस्कर निष्कर्ष काढणं बेकायदा आहे. त्यांनी नाही म्हंटलं, थांबा म्हंटलं, की थांबायलाच हवं.

इथे एक लक्षात ठेवायला हवं, की पिंकमधलं वास्तव हे मुळातच थोडं सोयीस्कर वास्तव आहे. कारण प्रत्यक्षात असं घडलं, तर या मुली दिल्लीसारख्या ठिकाणी कोर्टात लढण्याइतक्या मोकळ्या - सलामत  रहातील हेच आज दिवास्वप्न वाटेलशी परिस्थिती आहे. तरीही, हा एक चांगली बाजू लढवणारा चित्रपट आहे, असं मानून आपण ही गोष्ट सोडून देऊ. तरीही , ही आपल्या सोडून देण्याची मर्यादा असायला हवी , सुरुवात नाही. प्रत्यक्षात चित्रपटात इथून पुढे घडणाऱ्या गोष्टी, या पटकथाकार आणि दिग्दर्शकाने शेवट ठरवून दिल्यासारख्या आहेत. यातला दोन पक्षांमधला संघर्ष कुठेही उभा राहू शकत नाही आणि तो उभा झाला नाही, तरी जज्जला ते चालेलसं वाटतं, कारण त्याने निकाल कोणाच्या बाजूने द्यायचा हे मुळातच ठरवून दिल्यासारखी इथल्या न्यायाधीशाची ( धृतीमान चॅटर्जी )  देहबोली आणि संवाद आहेत.


पिंक पहाताना रसभंग व्हायला सुरुवात होते, ती मध्यंतरानंतर लगेचच. फिर्यादीच्या - राजवीरच्या वकीलाच्या दिसण्याबोलण्याबरोबरच. प्रशांत मेहरा या वकीलाच्या भूमिकेत पियुष मिश्रांनी जणू जुन्या हिंदी सिनेमातला दुय्यम खलनायकच उभा केला आहे. त्याचं दिसणं, उर्मट ओरडणं, आरोप करणं हे एवढं भडक करण्याची काय गरज होती असं वाटत रहातं. प्रत्यक्षात त्रयस्थपणे जर ही केस पाहिली, तर एका सभ्य , वेल प्लेस्ड घरातल्या उच्चशिक्षित, सुशील तरुणावर, सामान्य मध्यमवर्गीय ( आणि कदाचित संशयास्पद चारित्र्याच्या )  तरुणीने केलेला हल्ला अशी आहे. वकीलाला एवढा आरडाओरडा करायचं काय कारण? तो अतिशय सभ्य दिसणारा, शांतपणे तर्कशुद्ध आर्ग्युमेन्ट करणाराच हवा होता. ही पात्रयोजना आणि व्यक्तिचित्रण, हे प्रेक्षकाला दुष्ट बाजू कोणती हे स्पष्ट करुन सांगितल्याचं वाईट उदाहरण आहे.

मिश्रा जितके हॅम करतात, तितकाच संयतपणाचा कृत्रिम अभिनय अमिताभ बच्चन सेहेगलच्या भूमिकेत करतात. कदाचित एक बाजू भडक झाल्याने दुसरीही अधोरेखित करावी लागली असावी. बरं त्यांच्या बिकट मानसिक अवस्थेचं आपण एेकून असतो. पण क्वचित हळू बोलण्या आणि भलतीकडे पहात रहाण्याखेरीज या अनिश्चित मानसिक स्थैर्याचा कोणताही परिणाम त्यांच्या लढतीवर होत नाही. मग ही व्यक्तीरेखा तशी आहे असं सूचित करण्यामागचं काय कारण? केवळ परफाॅर्मन्समधली नाट्यमयता? कदाचित असं तर नाही, की मुळात केसमधेच दम नसल्याने वकीलांच्या व्यक्तीमत्वातच नाट्य शोधण्याची गरज पडली असावी ? बहुधा तसच असेल. कारण कोर्टात समोर येणाऱ्या केसमधे मुलींच्या विरोधात म्हणावासा एकही पुरावा नाही. त्या मुलांबरोबर रिजाॅर्टमधे जातात हे मान्य ( एका अर्थी मूर्खपणाच ) पण मांडलेला एकही पुरावा, त्यांच्या तसा विरोधात जाणारा नाही. उलट खुद्द सेहगल वकीलच अशा एका गोष्टीचा साक्षीदार आहे, ज्यानी राजवीर गॅंग धोक्यात यावी. पुन्हा कोर्टातल्या युक्तीवादातही कुठेच कोणत्याच बाजूची चलाखी दिसत नाही. जिथे आॅब्जेक्शन घेतली जायला हवीत तिथे घेतली जात नाहीत, क्राॅस घ्यायला हवी तिथे घेतली जात नाही.कोणत्याही रॅंडम क्रमाने साक्षीदार येत जातात,  हवे ते सर्व मुद्दे तपासलेही जात नाहीत आणि आवश्यक त्या सर्वांची साक्षही काढली जात नाही.

कोर्टाच्या कामकाजातल्या दोन गंमती मला फारच खटकल्या, पण कोणाला खरोखर अधिक माहिती असेल तर सांगावी. इथे जेव्हा फिर्यादी वकिल साक्षीदाराची जबानी घेतो, तेव्हा आरोपी वकील विचारलं जाऊनही  कधीच लगेच क्राॅस घेत नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसं व्हायला हवं. किंवा साक्षीदाराला पुन्हा बोलावण्याची न्यायाधीशाकडून परवानगी तरी घ्यायलाच हवी.  एकवेळ तसा नियम नसेल तरी शक्य असल्यास ते करणं लाॅजिकल नाही का? एकेक साक्षी जर उधळल्या गेल्या, तर फिर्यादीची केस ही न्यूसन्स केस असल्याचं लगेचच लक्षात येईल. त्याउलट वेळीच क्राॅस घेतल्या नाहीत, तर फिर्यादीची केस भक्कम होऊ शकते. अर्थात , हे माझं काॅमन सेन्स लाॅजिक झालं. नियम वा वस्तुस्थिती वेगळे असल्यास सांगावं. इथे ते करण्याचं कारण उसनी नाट्यपूर्णता, हे आहे. पण हा घोळ आपल्याला दिसत असताना नाट्यपूर्णतेचा फार आनंद घेता येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे फिर्यादींना शिक्षा ! आरोपी दोषी वा निर्दोष ठरतो, हे मान्य, पण फिर्यादीला कशी थेट शिक्षा करता येईल? त्यासाठी वेगळा खटला नको का चालवायला? हे अगदी मूलभूत आहे. आज आपल्याला तीन मुलांनी एकदम आणि थेट आईला रक्त दिल्याचा सीक्वेन्स गडबडीचा वाटत असेल. तर एकाच खटल्यात आरोपीला सोडून फिर्यादीला शिक्षा हेदेखील तितकच चमत्कारीक वाटायला हवं.

आता मला या चित्रपटात खटकलेली शेवटची गोष्ट. ही मात्र अगदीच व्यक्तीसापेक्ष आहे, आणि त्यावर वेगवेगळी मतं असू शकतात. ती गोष्ट म्हणजे एन्ड टायटलवर येणारा प्रत्यक्ष काय घडलं याचा सीक्वेन्स. पूर्वार्धात तो नसणं मला ज्या कारणासाठी आवडलं, त्याच कारणासाठी त्याची उत्तरार्धातली हजेरी खटकली. आपण आपल्या मनात मुलींना क्लीन चिट दिल्यावर पुन्हा राजवीर गॅंगच्या कुकर्माचा पुरावा कशाला? तो काय साधतो. मुलींचा इनोसन्स प्रेक्षकांपुढे सिद्ध करण्यासारखी ही योजना वाटते. असा फ्लॅशबॅक एखाद्या रहस्यपटात शोभला असता ज्यात या सिक्वेन्सने आपल्या वेगळं सत्य दाखवलं असतं. इथे तो जे आपल्याला चित्रपटभर सांगितलं जातय तेच सांगत असेल, तर तो अनावश्यक आहे. असो, हे माझं मत. तुमचं वेगळं असू शकतं.

तर असा हा पिंक. पूर्वार्धात आवडलेला, पण उत्तरार्धात अधिकाधिक निराश करत गेलेला. आता यामुळे त्याच्या प्राॅपोगंडा व्हॅल्यूत फरक पडतो का? तर उघडच नाही. मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्याचं महत्व आहेच. आणि तो जितके लोक पहातील तितकं चांगलच. पण एक वाटतं, की हे जे प्रेक्षक आहेत, त्यात किती राजवीर असतील ? आणि जर तसे नसले, तर हा कन्विन्सिंग द कन्विन्स्डचाच एक एक्जरसाईज नाही का?
-गणेश मतकरी
 

3 comments:

Vandana Khare September 26, 2016 at 1:18 AM  

" हे जे प्रेक्षक आहेत, त्यात किती राजवीर असतील ?" - राजवीर तर अनेक असतीलच पण त्याहून जास्त 'विश्वा' असतात - हे मला नक्की माहितीये. साधारण १८ ते २५ वयोगटातल्या पुरुषांसोबत सातत्याने गेली दहा वर्ष काम करायचा अनुभव आहे म्हणून मला ही खात्री वाटते. बहुसंख्य पुरुष स्त्रियांवरच्या अत्याचारात प्रत्यक्ष active नसले तरी ते अत्याचाराच्या क्षणी उपस्थित असतानादेखील त्याविरुद्ध काहीही भूमिका घेत नाहीत, इतकंच नव्हे - जर एखादी मुलगी प्रतिकार करू पाहत असेल, पोलीस कम्प्लेंट इ. करणार असेल तर मात्र ते तिला actively discourage करतात. अशा माणसांपर्यंत देखील NO Means No - पोचायला पाहिजे असं मला वाटतं! ते पोचल्यावर त्यांच्यात किती बदल होतो की होतच नाही, हे सिनेमा बनवणारापेक्षा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे.

Vaachak September 26, 2016 at 12:25 PM  

I am an avid fan of American TV show "Law and Order" all three franchises since their initial seasons. In comparison, courtroom scenes in Indian films seem primary and at times laughably pathetic. "Pink" teaser had Amitabh (the most overrated actor of Hindi films according to me) growls at one of the three accused girls - I do not remember her name - "Miss ---- are you a virgin?" What the heck? It must seem as daring interrogation to India's audiences but I was appalled and then he continues min almost threatening tone to get a verbal response from her"Say yes or no".The writers have robbed the girl of her basic human rights of being treated in decent fashion. I may be watching it from American point of view but that short scene turned me off. I am not going to watch the film.

Unknown October 11, 2017 at 11:02 AM  

NO Means No हे माहिती नव्हतं का? माहीत असूनही त्यावर बोटचेपेपणाची भूमिका आपण घेत नाही का? आणि तशी ती घेत असतानाचं वास्तव कोणा दिग्धर्शकापासनं लपून राहीलं होतं का? या सगळ्याची उत्तरं नकारार्थी असतील तर मग आजवर हा विचार का मांडण्यात आला नाही? प्रयत्नच होउ नये अगदी चित्रपटानं देखील? अन् झालाच तर त्याच स्वागत करायला हवं की नको? क्रॉस एक्झॅॅमिन केल पाहीजे की नाही हे ठरवायला चित्रपट काही बार कौन्सिलमधे लावलेला नाही. आपण वकीलाच्या वेशातला सनी देओलचा आरडा ओरडा पण चालवून घेतो. पर्यायाने न्याय व्यवस्थेच ब-याच आटोपशीरपणे चित्रण यात आहे. आता बारकावे उज्वल निकम अधिक सांगू शकतील तर मग त्यांच्या लेखावर असे चित्रपट चांगले वाईट ठरवावेत काय?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP