बदलाच्या प्रतीक्षेत मराठी सिनेमा

>> Tuesday, June 9, 2009



चित्रपटसृष्टी केव्हा बदलते? जेव्हा सातत्याने काही नवीन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांकडून होतो तेव्हा, आणि या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा. आता हा प्रयत्न तेव्हाच होईल- जेव्हा दिग्दर्शक केवळ आर्थिक नफा, व्यावसायिक यश यापलीकडे जाऊन चित्रपटांकडे पाहील...


अलीकडे एक गोष्ट नेहमीची झालीय. काही ना काही कारणाने एखादा मराठी चित्रपट चर्चेत येतो आणि उत्साहाचं वातावरण पसरतं. पुन्हा मराठी चित्रपटांनी कमबॅक केल्याची सर्वांची नव्याने खात्री होते, मराठी-इंग्रजी पेपरांमधून कौतुकपर लेख लिहिले जातात, काही नवे (आणि अनेकदा अमराठी) निर्माते या त्यामानाने कमी आर्थिक उलाढाल संभवणाऱ्या उद्योगात शिरू पाहतात. या निमित्ताने "बिग पिक्‍चर'कडे पाहण्याची संधी मात्र कुणी घेताना दिसत नाही. याआधी 2004 पासून कोणकोणते चित्रपट या प्रकारे लक्षवेधी ठरले हे आपण जाणतोच, आणि हेदेखील जाणतो, की या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या चित्रपटांपलीकडे जाऊन मराठी चित्रपटांनी फार गुणवत्तादर्शक कामगिरी केली नाही.
"श्‍वास'च्या काळात नसलेली एक गोष्ट मध्यंतरी सुरू झाली, ती म्हणजे "कार्पोरेट हाउसेस' आणि याच उद्योगात आधीपासून असणाऱ्या "झी/ मुक्ता आर्टस्‌'सारख्या मोठ्या कंपन्यांची मराठी चित्रपटांत वाढत चाललेली गुंतवणूक. याला उघडच जबाबदार आहे ती हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना लागणारी अत्यल्प गुंतवणूक. यातल्या काही संस्थांकडे असलेल्या चित्रपट वितरणाच्या सुविधा आणि अधेमधे पसरणाऱ्या "मराठी' उत्साहाचा फायदा घेण्याची संधी. त्याचबरोबर सरकारी अनुदान, आणि काही काळापूर्वी मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवलेल्या सुविद्य शहरी प्रेक्षकांचं मल्टिप्लेक्‍सच्या निमित्तानं परतणं, हादेखील फायदाच.
मल्टिप्लेक्‍सचा फायदा हा त्यामानाने दुहेरी महत्त्वाचा आहे. मुंबईसारख्या शहरांमधल्या मराठी चित्रपटांच्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची परिस्थिती ही आताआतापर्यंत चिंताजनक होती, त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षक हा या चित्रपटगृहांच्या वाटेला जाईनासा झाला होता. या वर्गाने पाठ फिरवल्यामुळे तिथे लागणारे चित्रपटही ग्रामीण किंवा ढोबळ विनोदी प्रकारचे होते- जे त्या वर्गाला मुळातच आकर्षित करत नाहीत. या कारणाने गंभीर विषयावर आधारित चित्रपटाला उपलब्ध प्रेक्षकवर्ग हा एकूणच मर्यादित झाला होता आणि सुमार विनोदी चित्रपटांचं पेव फुटलं होतं. मल्टिप्लेक्‍सनी हा तिढा सोडवला. सर्व वर्गातल्या, सर्व प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला जाता येईल अशी चित्रपटगृहं उपलब्ध करून दिली, आणि चित्रपटांच्या विषयाचा आवाका वाढवला. त्याचबरोबर फक्त विशिष्ट वर्गाला चालणारे, मर्यादित वितरण असणारे चित्रपट निघण्याच्या शक्‍यताही तयार केल्या, ज्यातून पुढेमागे खरोखरच मराठी चित्रपटांचं स्वरूप बदलू शकेल. मात्र या बदलाला सुरवात झाली आहे का, या प्रश्‍नाचं समाधानकारक उत्तर मात्र लगेच देता येणार नाही.
सध्या चर्चेत असलेला, कर्मधर्मसंयोगाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला अन्‌ यंदाच्या सर्वभाषिक चित्रपटांमधला सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या चित्रपटांमधला एक मानला जाणारा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा आजचा लक्षवेधी चित्रपट मानला जातोय. त्याच्या गुणदोषांची चर्चा करणं हा आजच्या लेखाचा हेतू नाही, मात्र "श्‍वास' किंवा "डोंबिवली फास्ट'सारखे गाजलेले चित्रपट आणि शिवाजीराजे भोसले यांची तुलना करूनच एक गोष्ट दिसून येईल, की ते चित्रपट- ज्याला बेतीव व्यावसायिक चित्रपट म्हणता येईल, या प्रकारचे नव्हते. "श्‍वास' स्वतंत्र अन्‌ "डोंबिवली फास्ट' आधारित असला तरी एक प्रकारचा प्रामाणिकपणा या दोन्ही चित्रपटांमध्ये होता. हेतुपुरस्सर काढलेल्या, प्रेक्षकांना काय आवडेल याचा अंदाज बांधणाऱ्या यशस्वी चित्रपटात वाईट काहीच नाही, मात्र तो तसा आहे, याची नोंद घेणं जरूर आवश्‍यक आहे. "शिवाजीराजे' चित्रपटाचं व्यावसायिक असणं कुठेच लपत नाही. मराठी समाजाला सरसकट आवडणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाला दिलेलं "सकारात्मक' स्थान, खर्चिक चित्रीकरणासहित काढलेल्या पोवाड्यासारख्या प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी, अनेक दिवस चालणारी आणि मराठी अस्मितेला आवाहन करणारी (अन्‌ मराठी चित्रपटांना क्वचित परवडणारी) जाहिरात आणि हिंदी चित्रपटांच्या पद्धतीचं वितरण, या सर्व गोष्टी त्याची साक्ष आहेत. त्याला न भूतो न भविष्यति असं यश मिळवून द्यायला हिंदी निर्माते अन्‌ मल्टिप्लेक्‍समधला वाद थोडाफार कारणीभूत असला तरी त्याशिवायही "शिवाजीराजे' यशस्वी ठरला असता, हे नक्‍की. या प्रकारच्या व्यावसायिक निर्मिती या लवकरच मराठी चित्रपटांमध्ये नित्याच्या होतील असं दिसतं. "साडेमाडे तीन' किंवा "एक डाव धोबी पछाड' यासारख्या वाहिनी बॅक्‍ड चित्रपटांच्या यशातही या प्रकारच्या व्यावसायिक गणितांचा वास जरूर येतो.
या हुकुमी व्यावसायिक निर्मितीबरोबर आज एक मोठी लाट आलेली दिसते ती ज्याला सहजपणे समांतर चित्रपट म्हणता येईल अशा चित्रपटांची. यातले सगळे अतिवैचारिक किंवा प्रेक्षकांना अगम्य वाटणारे नाहीत, यालट लक्षापासून मकरंद अनासपुरेपर्यंत सर्व मंडळींच्या विनोदाला विटलेल्या आणि अगदी काही वेगळं पाहण्याची इच्छा आणि तयारी असलेल्या प्रेक्षकांना यातले बरेच चित्रपट जवळचे वाटावे. गेल्या वर्षभरात समेला पोचलेल्या या लाटेत अनेक तरुण दिग्दर्शक सहभागी आहेत. त्यांचं तारुण्य केवळ त्यांच्या वयात नाही, तर त्यांच्या चित्रपटात दिसून येतं. उमेश कुलकर्णी (वळू, आगामी चित्रपट - विहीर), सचिन कुंडलकर (रेस्टॉरंट, गंध), सतीश मनवर (गाभ्रीचा पाऊस), मंगेश हाडवळे (टिंग्या), परेश मोकाशी (हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी) या नव्या प्रयत्नांत आघाडीवर आहेत.
चित्रपटसृष्टी केव्हा बदलते? जेव्हा सातत्याने काही नवीन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांकडून होतो तेव्हा, आणि या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा. आता हा प्रयत्न तेव्हाच होईल- जेव्हा दिग्दर्शक केवळ आर्थिक नफा, व्यावसायिक यश यापलीकडे जाऊन चित्रपटांकडे पाहील.
इतर प्रादेशिक चित्रपट आणि आपले चित्रपट यामध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे आपलं बॉलिवूडच्या खूप जवळ असणं. त्यामुळे आपल्याकडले सर्व प्रेक्षक हे मराठी चित्रपटांची तुलना हिंदी चित्रपटांशी करतात आणि आपले बहुतेक दिग्दर्शक हे पुढेमागे हिंदी चित्रपटांत जाण्याची स्वप्नं पाहतात. बहुतेकदा मराठी चित्रपट करताना दिग्दर्शकांचा हेतू हा आपली कला सिद्ध करण्याचा एक हुकमी आणि कमी खर्चिक टप्पा, एवढाच असतो. इथला नेत्रदीपक प्रयत्न हा हिंदी निर्मात्यांसमोर आपलं काम ठेवण्यापुरता असतो. खरं तर हे योग्य नाही.
जगभरात जेव्हा दिग्दर्शक आपल्या मातृभाषेत चित्रपट बनवतात, तेव्हा त्या भाषेत आपल्यावर सर्वात कमी बंधनं असतील, आपण आपले विचार अधिक योग्य रीतीने मांडू शकू, असा हेतू असतो. बर्गमनसारख्या प्रथितयश दिग्दर्शकाने अमेरिकेत मान्यता मिळूनही स्वीडन सोडण्याचा मोह आयुष्यभर टाळला. गिलेर्मो डेल टोरोसारख्या हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकाने मातृभाषेतल्या आव्हानात्मक निर्मितीसाठी (पॅन्स लॅबिरीन्थ) अधिक पैसे मिळवून देणारी व्यावसायिक निर्मिती (क्रॉनिकल्स ऑफ नार्निया) नाकारल्याची उदाहरणं आहेत. जेव्हा जेव्हा ऑस्करला परभाषिक चित्रपटांची नामांकनं/पारितोषिकं जाहीर होतात, तेव्हा तेव्हा या इतरदेशी भिन्न भाषांमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकांना अमेरिकेतून आमंत्रणं येतात, मात्र बऱ्याचदा ती न स्वीकारता आपापल्या भाषेत/देशातच काम करणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. हे घडू शकतं. कारण हे सर्व जण अधिक वरच्या जागी पोचण्यासाठी लागणारी एक आवश्‍यक शिडी म्हणून आपापल्या भाषेतल्या चित्रपटांकडे पाहत नाहीत, तर आपण आपलं सर्वोत्तम काम हे स्वतःच्या भाषेत करू शकतो, हा विश्‍वास त्यामागे असतो.
मराठी चित्रपट दिग्दर्शकांमध्ये हा अभिमान, ही गरज कमी प्रमाणात दिसून येते. संधी मिळणारे दिग्दर्शक लगेचच हिंदीत जातात (उदा. - निशिकांत कामत), तर इतर जण नाइलाजाने मराठीत राहतात. मग कालांतराने त्यांची स्वतःची गणितं ठरत जातात, आणि त्यांच्या आविष्काराला आपसूक मर्यादा पडत जातात. हिंदीत जाणारेही फार काळ मनाला पटेलसं करू शकत नाहीत. कारण हिंदी चित्रपट हा मुळातच व्यावसायिक धर्तीचा असल्याने तिथे येणाऱ्या मर्यादा अधिक मोठ्या, अधिक जाणवणाऱ्या असतात; आणि कलेपेक्षा धंद्यावर, तडजोडीवर बेतलेल्या.
आज आपला चित्रपट कुठे पोचावा असं वाटत असेल, तर आपल्या दिग्दर्शकांनी (दाक्षिणात्य किंवा बंगाली चित्रपटांमध्ये दिसून येणारा) आपल्या भाषेच्या चित्रपटांचा अभिमान जागता ठेवणं आवश्‍यक आहे. हे व्यावसायिक, बेतीव चित्रपटांकडून अपेक्षित नाही. कारण मुळातच त्यांचा हेतू हा कलेपेक्षा व्यवसायाला अधिक महत्त्व देणारा आहे. मघा मी ज्या दुसऱ्या समांतर फळीचा उल्लेख केला, त्या फळीकडूनच या प्रकारची कामगिरी होऊ शकते.
त्यांचं सुरवातीचं काम (कारण यातल्या बऱ्याच जणांची ही नुकती सुरवातच आहे.) हे त्यांच्या संवदना जाग्या असल्याचं, ते बॉक्‍स ऑफिसपलीकडे जाऊन कलाविष्काराच्या पातळीवर चित्रपटांकडे पाहत असल्याचं दाखवून देणारं आहे. त्यातल्या अनेकांना आपल्या देशात अन्‌ देशाबाहेरही गौरवण्यात आलेलं आहे. जागतिक पातळीवर पाहता सर्वच चित्रपट सबटायटल्ड असल्याने, आपली भाषा ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यातली अडचण उरत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे.
मात्र दुसऱ्या बाजूने हेही लक्षात घ्यायला हवं, की केवळ चित्रपट महोत्सवांवर चित्रपटनिर्मिती चालू शकत नाही. आपल्या भाषेतल्या चित्रपटांना सुधारणारे प्रयत्न तेव्हाच पुढे जातील, जेव्हा त्यांच्या मातीतच त्यांना आवश्‍यक तो प्रतिसाद मिळेल. आपण जर कायम चाकोरीतल्या मनोरंजनाचाच हेतू ठेवला आणि हिंदी किंवा मराठीतही तथाकथित विनोदी वा मराठी अस्मितेच्या आवाहनामागे दडून धंद्याची गणितं मांडणारेच चित्रपट पाहायला लागलो, तर या नवदिग्दर्शकांचा उत्साहदेखील टिकणार नाही. मी मघा म्हणाल्याप्रमाणे केवळ चित्रकर्ते सध्याच्या परिस्थितीवर मार्ग काढायला पुरेसे नाहीत, तर त्यांना आश्रय देणारा एक निश्‍चित प्रेक्षकवर्ग तयार होण्याची आवश्‍यकता आहे. जेव्हा हे दोन्ही एकाच वेळी घडेल, तेव्हा आपल्या चित्रपटांमध्ये बदल घडायला सुरवात झाली, असं ठामपणे म्हणता येईल.
- गणेश मतकरी

2 comments:

Unknown July 14, 2009 at 3:10 AM  

Agdi khara ahe Ganesh kaka. I fully agree with you. Apla cinema ( marathi/Hindi)ha phakta paisa dolya samor thewun kela jato. Mala he patla ki jo paryant Prekshakanchi manasikta badlat nahi towar cinema badalnar nihi. Ajachya jamanyat sagly film makers na ek soiskar palwat aste ti mhanje," Lokana je awdel tech amhi dakhawto". A very good article for the issue. Thank you very much

Hemant Jambhalikar October 18, 2011 at 12:04 AM  

kay kalesathi arthashastra vaparta yeil? mag changle kuthe kahi milnarach nahi.
Prekshakani changle pahayche! kay nirman tari zale pahije changle. chitrapata kinva kontehi madhyam lokanparyant pohochnyasathi te uttam aaslech pahije.jar tase nassel tar te takau aaste.
Aatache kahi (sarv bhashik)chitrpat takau aastat.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP