परिचित प्रवाहाविरोधातला ‘फ्लो’

>> Monday, March 10, 2025




अॅनिमेशन तंत्राचं नाव घेताच एकच नाव बहुधा सर्वांच्या डोळ्यासमोर उभं रहातं आणि ते म्हणजे वॉल्ट डिझ्नी. मिकी माऊस, डोनल्ड डक सारख्या डिझ्नीने पडद्यावर आणलेल्या स्वतंत्र व्यक्तीरेखा आणि जगप्रसिद्ध परिकथांच्या सहाय्याने त्याने उभं केलेलं ॲनिमेटेड चित्रपटांचं साम्राज्य यांमधून हे नाव अक्षरश: घरोघरी ओळखीचं झालं, आणि त्यांचं काम हा या प्रकारच्या चित्रपट
प्रकाराचा पाया ठरला. ‘मिकी माऊस’ ही व्यक्तीरेखा एका खऱ्याखुऱ्या उंदरावरुन प्रेरित असल्याची एक दंतकथा आहे, पण तरीही पडद्यावरील मिकी माउस हा मानवाचंच प्रतिरूप असल्यासारखा आहे. प्राण्यांचं मानवीकरण करुन मानवी व्यक्तीरेखांऐवजी उभं करण्याची सुरुवात वॉल्ट डिझ्नीने केली आणि मिकी प्रथम पडद्यावर दिसल्याला आज शहाण्णव वर्ष होऊनही ही प्रथा ॲनिमेटेड चित्रपटात रुढ झालेली आहे. पिक्सार, ड्रीमवर्क्स सारख्या मोठ्या अमेरिकन संस्थाही या शैलीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, आणि या चित्रपटांच्या छोट्या प्रेक्षकांनाही हेच सवयीचं होऊन गेलय. या व्यक्तीरेखांना आवाज देण्याच्या निमित्ताने स्टार्सची नावं जोडता येणं हेदेखील एक मार्केटिंग गिमिक बनलेलं आहे. आपल्याकडेही शाहरुख खानपासून अनेक मोठी नावं या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्यांशी जोडलेली दिसतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर ड्रीमवर्क्सच्या ‘द वाईल्ड रोबॉट’ला हरवून सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटाचं ऑस्कर पटकवणारा लॅटविआ या छोट्याशा युरोपीअन देशातला चित्रपट ‘फ्लो’, ही बातमी ठरते. 

दिग्दर्शक गिन्ट्स झिलबलोडिस चा ‘फ्लो’ हा या ठराविक पद्धतीच्या चित्रपटांपेक्षा अगदीच वेगळा वाटतो. ‘फ्लो’ ला जगभरात अनेक ठिकाणी गौरवलं गेलय, आणि तेही फक्त मुलांचा चित्रपट म्हणून नाही. ऑस्करबोरबरच गोल्डन ग्लोब पुरस्कारातही तो सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट ठरलाय, पण त्याहून विशेष म्हणजे  कॅन चित्रपट महोत्सवातल्या ‘अ सेर्टन रेगार’ (Un Certain Regard)  या विभागात त्याला सहभागी होता आलं. असा मान ॲनिमेटेड चित्रपटाला क्वचितच मिळतो. 

वरवर पहाता ‘फ्लो’ ची कल्पना ही परिचित बालपटाची वाटू शकते. एका मांजराने इतर प्राण्यांच्या साथीने केलेलं साहस,  अशी ती एका वाक्यात मांडणं शक्य आहे. पण चित्रपटाचं परिचित वाटणं इथे थांबतं. या चित्रपटाला पार्श्वभूमी आहे, ती मानवोत्तर काळाची. मानवजातीच्या काही खुणा इथे आपल्याला दिसतात, उदाहरणार्थ कथेतलं मांजर पाळीव आहे/ होतं हे आपल्या लक्षात येतं ते त्याच्या राहत्या जागेवरून, ते रहातं त्या घराला वेढणाऱ्या मार्जारशिल्पांवरुन, मात्र आता या जागी कोणी नाही. माणसं कुठेतरी नाहीशी झाली आहेत. कथेला वेग येतो, तो अचानक निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीमुळे. चढत जाणाऱ्या पाण्यापासून जीव वाचवण्यासाठी हे मांजर उंच जागा शोधत जातं, आणि शेवटी सारा प्रदेश जलमय झाल्यावर एका होडीत आसरा घेतं. या होडीत आधीपासूनच  मोठ्या उंदरासारखा दिसणारा कॅपीबारा हा प्राणी असतो. लवकरच इतरही काही प्राणी पक्षी या होडीच्या आसऱ्याला येतात.

सामान्यतः चित्रपटांना गोष्टी उकलून दाखवण्याची सवय असते, जे करणं ‘फ्लो’ टाळतो. मानवजात कुठे गेली, जगबुडी झाल्यासारखा पूर कशामुळे आला, अशा मोठ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत, तर काही गोष्टींचा निष्कर्ष काढणं आपल्यावर सोपवलं जातं. होडीतलं मांजर, कुत्रा, आणि इतर प्राणी या व्यक्तीरेखांच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट पुढे सरकतो असं म्हटलं तरी चालेल. त्यांना पृथ्वीवर नक्की काय चाललंय हे कळण्याची काहीच शक्यता नाही, त्यामुळे आपल्यालाही. त्यांचा भवताल जसा बदलतो, तसे तग धरुन रहाण्याचे नवे मार्ग ते शोधत रहातात. यात त्यांना एकमेकांची मदत होते, आणि हळूहळू त्यांचा एकमेकांवरचा विश्वास वाढत जातो. 

मी सुरुवातीला प्राण्यांच्या ज्या मानवीकरणाबद्दल बोललो ते इथे अजिबात दिसत नाही, हा ‘फ्लो’ चा प्रमुख वेगळेपणा आणि वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इतर चित्रपटांपेक्षा त्याचं काम कठीण होतं, कारण एरवी व्यक्तीरेखांचे विचार, त्यांची जुळणारी नाती दाखवण्यासाठी असणारे संवाद या चित्रपटात अजिबात नाहीत. हा संपूर्ण चित्रपट भाषाविरहीत आहे. यातले सर्व प्राणी हे निसर्गत: हे प्राणी जसे वागतील त्यासारखे वागतात. त्यांच्यात जे सख्य तयार होतं, जो संवाद साधला जातो, तो या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, आणि त्या एकमेकांशी वा प्रेक्षकांशी थेट बोलू शकणार नाहीत हे गृहीत धरूनच. त्यामुळे अधिक महत्व येतं ते या प्राण्यांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे भाव,  आवाज, यांना. या प्रत्येक प्राण्याची दर हालचाल, ही चित्रपटकर्त्यांनी वास्तव संदर्भ शोधून त्याबरहुकुम वापरली आहे. कधी यू ट्यूब व्हिडीओ पाहून, कधी ॲनिमेटर्सनी आपापले पाळीव प्राणी पाहून या व्यक्तीरेखांवर काम केलंय. प्राण्यांनी काढलेले आवाजही त्या त्या प्राण्यांचेच वापरले आहेत. अपवाद फक्त कॅपीबाराचा, कारण कॅपीबाराच्या खरा आवाजापेक्षा दिग्दर्शकाला थोडा वेगळा आवाज अपेक्षित असल्याने, या भूमिकेसाठी उंटाच्या वासराचा आवाज वापरला आहे. या सगळ्या बारकाव्यांमधून हे प्राणी खरे होतात. आपण ॲनिमेशन पहातोय याचा हळूहळू विसर पडायला लागतो. एक प्राणी मात्र त्याच्या अस्सल रुपापेक्षा वेगळा दिसतो, आणि तो म्हणजे देवमासा. आकार, गती, यासारख्या बाबतीत देवमासा हाच संदर्भ वापरण्यात आलाय, पण त्याचं दिसणं काहीसं चमत्कृतीपूर्ण आहे. कथानकाच्या पार्श्वभूमीला असणारी रहस्यमय संदिग्धता पहाता, कथेचं दंतकथेच्या जवळ जाणारं स्वरुप पहाता , हा बदल सुसंगत वाटतो.  

व्याक्तीरेखा खऱ्यासारख्या वाटल्याने चित्रपटात येणारी गंमत एरवीच्या बालपटांपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. भरधाव घटना, स्लॅपस्टिक वा शाब्दिक विनोद यात सापडत नाहीत, तर ही फिल्म एखाद्या लाईव ॲक्शन फिल्मप्रमाणे भासते. हा चित्रपट वास्तवसदृश आहे, पण वास्तववादी नाही. वास्तव आणि अतिवास्तव यांचं मिश्रण इथे पहायला मिळतं. निर्मनुष्य शहरातले प्रसंग, देवमाशाचं रुप, होडीतला बगळ्यासारखा पक्षी (सेक्रेटरी बर्ड) अखेर उडून जातो ते दृश्य, अशा विविध जागा, या कथनाची वेगळी हाताळणी दाखवून देतात. यातला बराच भाग हा सरळ गोष्ट सांगत नाही, तर पहाणाऱ्याला अर्थ लावण्याची संधी देतो. त्यामुळेच बालप्रेक्षकाला तो ज्या रितीने उमजेल त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर तो प्रौढ प्रेक्षकांना पहाता येईल.

ॲनिमेटेड चित्रपट हे सध्या वाढत्या बजेटचे, अधिकाधिक तंत्रकुशल, पण त्याचबरोबर फॉर्म्युलाबाज होत चालले आहेत. ‘फ्लो’ त्याच्या बरोबर उलट आहे. गिन्ट्स झिलबलोडिसने आपले याआधीचे लघुपट आणि एक चित्रपट एकट्याने आपल्या लॅपटॉपवर बसून केले आहेत. इथे त्याने टीमबरोबर काम केलंय पण लॅटविआमधे साधनांच्या मर्यादा आहेत, अनुभवी ॲनिमेटर कमी आहेत. मग त्याने आपल्या टीमच्या ट्रेनिंगपासून सुरुवात करुन, फ्रान्स आणि बेल्जियम मधल्या संस्थांची मदत घेत तब्बल साडेपाच वर्षं लावून हा चित्रपट पुरा केलाय. अतिशय कमी बजेटमधे आणि ब्लेन्डर या फ्री- ओपन सोर्स ग्राफिक सॉफ्टवेअरला वापरत. मी मध्यंतरी त्याची एक मुलाखत ऐकली ज्यात त्याने स्वत:ची तुलना ‘फ्लो’ मधल्या मांजराशी केली होती. एकट्याने काम करायची वृत्ती असताना सहकाऱ्यांबरोबर जमवून घेत त्याने हे आपलं साहस पूर्ण केलं आहे. हा सहकार्याचा संदेश केवळ चित्रपटाच्या कथेत नाही, तर निर्मितीतही आहे. अमेरिकन कंपन्यांकडे असणारी  मुबलक उपलब्धता ही कल्पकतेला पर्याय असू शकत नाही, हे त्याने सिद्ध करुन दाखवलंय. ते करताना त्याने एक अतिशय नावीन्यपूर्ण कलाकृती आपल्यापुढे ठेवलीय, जी पहायलाच हवी.

- गणेश मतकरी

मानापमान- काही मुद्दे

>> Monday, January 20, 2025




-------------------------------------------------------------
संगीत मानापमान पहायचा, तर का? नव्या पिढीसाठी आपल्या एका अभिजात नाट्यकृतीचा ( थेट नसला तरी ) परिचय, या गोष्टीला काही एक महत्व आहे. पाश्चात्य चित्रपटात वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे रिमेक, रुपांतरं होत रहातात आणि त्यातून साहित्य, रंगभूमी, चित्रपट हे पुन्हा एकदा नव्या पिढीच्या प्रेक्षकांपर्यंत पोचतात. हा हेतू व्हॅलिड आहे.
-------------------------------------------------------------------
गणेश मतकरी २०२५च्या सुरुवातीला आलेले दोन्ही मोठे मराठी चित्रपट हे जुन्या लोकप्रिय नाटकांवर आधारलेले असावेत ही गोष्ट मराठी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी काही फारशी उत्साहाची नाही. आता माध्यमांतरं असू नयेत असं बिल्कूल नाही, आणि कथा कादंबरी यांच्याप्रमाणेच नाटकांचीही चांगली माध्यमांतरं होऊ शकतात, झाली आहेत. प्रश्न तयार होतो जेव्हा ही दोन्ही नाटकं आपल्या चित्रपटीय आविष्कारातही आपल्या मूळ रुपाला विसरु शकत नाहीत तेव्हा. माझ्या मते परेश मोकाशीचा ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ (मूळ नाटक- परेश मोकाशी) आणि सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ (मूळ नाटक -कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, जरी चित्रपट त्यावर आधारित नसून प्रेरित आहे ) या दोन्ही चित्रपटांचं असं झालेलं आहे. एक गोष्ट आहे, की व्यक्तीश: मला हे सिनेमा पहाताना कंटाळा वगैरे आला नाही. मूळ कल्पनेची गंमत, काही प्रमाणात परफॉर्मन्स, काही पेलली गेलेली आव्हानं, अशा गोष्टी दोन्ही चित्रपटात होत्या. पण दोन्हीमधे नसलेली एक गोष्ट म्हणजे मूळ कल्पनेचा अवाका ओळखून माध्यमांतराने वरचा पल्ला गाठणं. चित्रपटात गृहीत असलेला वास्तवाचा आभास तसंच माध्यमबदलाने उपलब्ध करुन दिलेल्या कथा/पटकथाशक्यता लक्षात घेत दोन्ही कृतींना अपडेट करण्याची गरज वाटते, तसं झालेलं नाही. बोंबिलवाडीमधे प्रशांत दामलेला हिटलर म्हणून ज्या सहजपणे सादर केलंय त्याची गंमत मला वाटली, किंवा परफॉर्मन्सेस चित्रपटाच्या फार्सिकल वृत्तीशी सुसंगत राहीले हेदेखील जमलेलं, पण महायुद्धाशी, त्या काळाशी जोडलेल्या स्केलचं काय? हा काळ उभा रहाण्याचं काय? चित्रपटातही सारंच मोजून तीनचार स्थळांवर मोजक्या पात्रांमधे होणार असेल, तर मग तो नाटकापेक्षा वर कसा जाणार? हाच नाटकाच्या चौकटीत अडकून रहण्याचा प्रश्न मानापमानमधेही आहे. संग्रामपूर आणि शेजारचं नगर यांमधल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर ‘संगीत मानापमान’ चित्रपट घडतो. शेजारच्या नगराचा प्रमुख धीरेन (उपेंद्र लिमये ) आणि संग्रामपूरचा सेनापती (शैलेश दातार) यांच्यातल्या व्यूहरचना हा पटकथेचा एक भाग आहे. तर दुसरा भाग आहे, तो सेनापतीची कन्या भामिनी (वैदेही परशुरामी), तिचा बालपणीचा मित्र असलेला सध्याचा उपसेनापती चंद्रविलास (सुमीत राघवन) आणि नावाला जागणारा एक शूर गावकरी धैर्यधर ( सुबोध भावे ) यांच्या प्रेमत्रिकोणावर केंद्रीत झालेला. शीर्षकातल्या ‘मानापमान’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा चित्रपटातल्या पात्रांमधे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या नात्यांशी जोडलेल्या दिसतात. संग्रामपूर आणि शेजारचं नगर (की राज्य?) , तिथले गावकरी, तिथली नगररचना, दोन नगरांमधला भौगोलिक सांधा, सैन्याची, युद्धाची भव्यता, या साऱ्या गोष्टी मानापमान पडद्यावर आणताना दिसायला हव्या होत्या. इथे भव्यता दिसते तीदेखील वरवरची. वेषभूषा, काही प्रमाणात नेपथ्य, इतपत. संकल्पनांमधली भव्यता दृश्यात उतरलेली नाही. याला नेपथ्याच्या मर्यादेबरोबर व्हिज्युअल इफेक्ट्स कमी पडणंदेखील जबाबदार मानता येईल. त्याखेरीज अनेक बारकावे प्रेक्षकांनी समजून घेण्यावर सोडलेले आहेत. उदाहरणार्थ धैर्यधर जेव्हा सीमेवरल्या चौकीचं काम करतो, तेव्हा त्याची योजना नक्की काय आहे, चौक्यांचे आराखडे कसे महत्वाचे आहेत, सीमेवर हल्ला कसा होऊ शकतो, त्यासाठी सैन्यबळ काय लागेल, चौकीजवळ किती सैन्य तैनात आहे, अशा गोष्टींकडे आपण नाटकातल्या प्रवेशादरम्यान प्रोसिनीअम विंडोतून पहाताना दुर्लक्ष करु शकतो. पण सिनेमात आपण प्रत्यक्ष त्या स्थळी जाणं अपेक्षित असतं, आणि हा तपशील पडद्यावर प्रत्यक्ष दिसावा लागतो. तिथे लुटुपुटीच्या गोष्टी परिणामकारक ठरु शकत नाहीत. सुबोध भावेच्या ‘कट्यार काळजात घुसली’ मधे रुपांतर अधिक जमलं होतं कारण ते कथानक प्रामुख्याने इनडोअर कथानक होतं. राजवाडा, घरं, अशा जागांना तिथे महत्व होतं, आणि दिग्दर्शनात त्या जागांचा चांगला वापर करण्यात आला होता. मानापमानची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. ती पडद्यावर अस्सल उभी करायची, तर अधिक विचार, आणि मोठा खर्च, या गोष्टी आवश्यक. मराठी सिनेमाकडे बजेट कमी असतं हे आपल्याला माहीत आहे. पण चित्रपटात तसा डिस्क्लेमर देता येत नाही. सीमेवरचा हल्ला हा सीमेवरचा हल्लाच वाटायला हवा. अन्यथा नाटक आणि चित्रपट यात फरक तो काय राहिला ? या चित्रपटात नाटकातल्या वाटणाऱ्या अनेक जागा दिसतात. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरुवातीला धैर्यधर नगरात काही संशयास्पद हालचाली पाहिल्याचं चंद्रविलासच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो. पुढे यातून झालेला घातपातही आपल्याला दिसतो. त्यामुळे धैर्यधरने नक्की काय पाहिलं या घटनेला अधिक महत्व येतं. पण चित्रपटात ती घटना प्रामुख्याने केवळ संवादात आलेली दिसते. पुढे एकदा चौक्यांच्या कामाची पहाणी करायला आलेला चंद्रविलास आणि वेषांतर करुन तिथे वनमालेच्या रुपात राहिलेली भामिनी या दोघांच्या एक प्रसंग आहे. हा प्रसंग उघड्यावर घडतो. प्रत्यक्षात कामानिमित्त आलेला राज्याचा उपसेनापती, आणि तिथे काम करणारी एक सर्वसामान्य बाई यांना उघड्यावर सहज बोलता येईल का? नाटकात हे सहज होऊ शकतं, पण सिनेमात ते घ्यायचं, तर चंद्रविलासने ते कसं जमवलं याबद्दलचं काहीएक स्पष्टीकरण असायला हवं. आता अशी शक्यता आहे की मुळात पटकथेत हे सारं होतं, पण लांबीमुळे चित्रपटात ठेवता आलं नाही. पण जेव्हा अशी नाटकसदृश मांडणी पुन्हा पुन्हा दिसते, तेव्हा प्रेक्षकाला 'सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ’ टिकवणं अवघड होतं. काहीजणांनी चित्रपटाबद्दल लिहिताना असा उल्लेख केलाय की धैर्यधर कधी ग्रामीण बाजाचं बोलतो, तर कधी प्रमाण भाषेत. शिवाय पदं/ गाणी सुरु झाली, तर तो अलंकारीक प्रतिमांचा वापरही करायला मागेपुढे पहात नाही. हा एक भाग आहे. पण मला त्याहूनही वेगळा एक प्रॉब्लेम जाणवला, तो म्हणजे अभिनयाच्या शैलीतला फरक. धैर्यधर आणि भामिनी बरेचसे आधुनिक पद्धतीचं काम करतात, तर चंद्रविलास आणि धीरेन क्लासिकल पद्धतीचं. नाटकीय वळणाचं. मुळातच खलनायकी भूमिकेत असलेल्या सुमीत राघवन आणि उपेंद्र लिमये यांचं काम शैलीतल्या तफावतीने अधिकच भडक वाटतं, तर वैदेही परशुरामी आणि सुबोध भावे यांचं संयत. यात चूक बरोबर काही नाही, मात्र जे काय करायचं ते एका पद्धतीने केलं असतं, तर ही विसंगती जाणवली नसती. चित्रपटात गाणी थोडी कमी असायला हरकत नव्हती. प्रासंगिक, संवादाची जागा घेणारी गाणी अधिकतर पाश्चात्य म्युझिकल्समधे असतात. इथे तशीही आहेत ज्यातली काही जमली आहेत तर काही नाही. पहिलं धैर्यधर आणि आई यांच्यातल्या संवादाचं गीत मला फार परिणामकारक वाटलं नाही. तिथे सर्वात खटकला तो नीनाताईंच्या व्यक्तीमत्वाशी विसंगत आवाज, पण इतर बाबतीतही या गाण्याचीच फार गरज वाटली नाही. याउलट चंद्रविलासच्या तोंडी येणारं ‘सांगू कसा मी तुला’ हे गाणं त्यातल्या रंगभूमीची वेगळ्या रीतीने आठवण करुन देणाऱ्या गिमिकसाठी, आणि एकूण सादरीकरणासाठी आवडलं. संगीताबाबत कट्यार अधिक उजवा होता. शिवाय तो प्रामुख्याने गायकीविषयीच असल्याने त्यावर बरंच काम झालं होतं. इथे गाण्यांची संख्या वाढली तरी परिणाम वरखाली झाल्याने त्यात सातत्य रहात नाही. मग असं सगळं असताना संगीत मानापमान पहायचा, तर का? मी म्हणेन की नव्या पिढीसाठी आपल्या एका अभिजात नाट्यकृतीचा ( थेट नसला तरी ) परिचय, या गोष्टीला काही एक महत्व आहे. पाश्चात्य चित्रपटात वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे रिमेक, रुपांतरं होत रहातात आणि त्यातून साहित्य, रंगभूमी, चित्रपट हे पुन्हा एकदा नव्या पिढीच्या प्रेक्षकांपर्यंत पोचतात. हा हेतू व्हॅलिड आहे. त्यामुळे रुपांतर रॅडीकली वेगळं वा अद्ययावत नसलं, तरी हा दृष्टीकोन ते पहाण्यामागचं एक कारण असू शकतो. दुसरी गोष्ट आहे ते कथानक, जे खूप वेगळं नसलं, तरी रंजक आहे. त्यातली वळणं आणि मानापमान या संकल्पनेचे विविध पैलू या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. कलाकार चांगले आहेत. साऱ्यांची अभिनयाची पट्टी एक असती तर अधिक प्रभाव अधिक पडला असता हे मात्र खरं. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲक्शन वगळता खूप अपेक्षा न ठेवता गेलात, तर चित्रपट आवडू शकतो. बोंबिलवाडी आणि मानापमानच्या एन्ट्रीने २०२५ची दणक्यात सुरुवात होईल असं मला वाटलं होतं, तसं मात्र झालेलं नाही. त्यांचं काम आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद, या दोन्ही बाबतीत अपेक्षेइतकं यश या दोघांनाही मिळालेलं दिसलं नाही. सध्याच्या दाक्षिणात्य आक्रमणाने हिंदी सिनेमाही हवालदील झाला असताना ही बाब अधिकच चिंता वाटायला लावणारी आहे. मराठी चित्रपटाला आपलं आव्हान टिकवायचं असेल, तर पुढल्या दोनतीन महिन्यांत हा परफॉर्मन्स सुधारायला हवा. अन्यथा सुरु झालेली घसरण थांबवणं कठीण होईल.

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP