दोन युद्धपट

>> Wednesday, May 14, 2008

माझ्या एका मित्राची अशी आवडती थिअरी आहे, की भारतीयांचा इतिहास इतर देशांच्या मानाने कमी रक्तरंजित असल्याने आणि युद्धात प्रत्यक्ष सामील होण्याच्या वेळा क्वचित आल्याने युद्धपट (आणि काही प्रमाणात इतर गंभीर चित्रपटदेखील) बनवण्याला लागणारा अनुभव आपल्या दिग्दर्शकांमध्ये कमी पडतो. साहजिकच आपल्याला युद्धपट हाताळता येत नाहीत. यावर दाखला म्हणून तो हिटलरची कारकीर्द, व्हिएतनाम युद्ध यासारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक कालावधींवर आधारित उत्तम चित्रपटांची उदाहरणे देतो आणि समोरच्याला गप्प करून टाकतो. मला हे फारसे पटत नाही. हे म्हणजे आपल्याला युद्धपट बनवता येत नाहीत हे नव्हे, ते तर उघडच आहे, पण आपला युद्धविषयक अनुभव कमी पडतो. कारण इंग्रजीची हुकूमत ही फार लोकांचा बळी घेणारी नसली तरी मानसिक अत्याचार करणारी जरूर होती. (मायकेल मूरच्या "बोलिंग फॉर कोलंबाईन' या ऑस्करविजेत्या डॉक्युमेंटरीमध्ये तर रक्तरंजित इतिहासाचे तुलनात्मक उदाहरण म्हणून इंग्रजांच्या भारतावरच्या अत्याचाराचा उल्लेखही आढळतो.) त्याशिवाय इंग्रजांबरोबर महायुद्धात घेतलेला भाग किंवा स्वातंत्र्यानंतरची युद्धे, फाळणीनंतर पाकिस्तानबरोबर बिघडत गेलेले संबंध अशा गोष्टी होत्या. नाही असे नाही, पण काही कारणाने आपल्या चित्रकर्त्यांचे आणि युद्धपटाचे गणित जमले नाही ते नाहीच. हे सगळे आठवायचे कारण, दोन चित्रपट. युद्धाविषयी सामान्य नागरिकांवर, खासकरून मुलांवर होणाऱ्या परिणामांविषयी असलेले हे चित्रपट; पण त्यांना युद्धपट म्हणता येणार नाही. यातला एक आहे बाहमन गोबादीचा "टर्टल्स कॅन फ्लाय', तर दुसरा झियाद दोईरीचा "वेस्ट बेरूत'! युद्धामुळे जनजीवनावर झालेला परिणाम आणि मुलांचा दृष्टिकोन, तसेच प्रमुख भूमिका. हे सोडले, तर मात्र हे एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे चित्रपट आहेत. दोघांचा परिणाम मात्र एकच... अस्वस्थ करणारा. गोबादी मुळात यशस्वी डॉक्युमेंटरी बनवणारा दिग्दर्शक. त्याची "लाइफ इन फॉग' ही इराणमध्ये बनलेली सर्वांत प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मानली जाते. पुढे प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक किआरोस्तमी यांच्याबरोबर सहायकाचे काम केल्यावर गोबादी चित्रपटाकडे वळला. त्याच्या पहिल्याच "ए टाईम फॉर ड्रंकन हॉर्सेस' चित्रपटाचे कान महोत्सवात चांगले स्वागत झाले. "टर्टल्स...' हादेखील त्याच्या पहिल्या चित्रपटाच्याच प्रकारात मोडणारा चित्रपट आहे, मात्र थोडा अधिक विदारक. हा घडतो इराक आणि टर्कीच्या सीमेवरल्या एका निर्वासितांच्या छावणीत. छावणी म्हणजे झोपडीवजा घर, टाकाऊ लोखंडी सामानाचे ढीग आणि त्यातून धावणारी मुले... यातली अनेक युद्धामुळे अपंग झालेली. कोणाला हात नाहीत, तर कोणाला पाय. तरी बालसुलभ उत्साहाने ही मंडळी सर्वत्र धावपळ करताना दिसतात. यांचा नेता बारा-तेरा वर्षांचा सॅटेलाईट (सोरान एब्राहिम) हा या छावणीतल्या मोठ्यांपेक्षा अधिक कर्तबगार वाटणारा. इराकमधली सद्दामची राजवट अमेरिका उलथून टाकेल असे मानून त्या बातमीची वाट पाहणारा, आपली सजवलेली सायकल घेऊन फिरणारा, मुलांना असणारे शेतातले सुरुंग वेचून देण्याचे एकुलते एक काम वाटून देणारा आणि नंतर या सुरुंगांच्या बदल्यात भाड्याने बंदुका आणणारा. डिश अँटेना लावून टीव्हीवरच्या कार्यक्रमांची सोय करणारा. सॅटेलाईटचे आग्रिन या मुलीवर प्रेम आहे, पण ती त्याला दाद देत नाही. एका तीनेक वर्षांच्या मुलाला काखोटीला मारून ती सॅटेलाईटला चुकवत फिरते. हा तीन वर्षांचा मुलगाही आग्रिन आणि तिचा दोन्ही हात नसलेला भाऊ हेन्कोव (हर्ष फैजल) यांचा भाऊ असावा असे वाटते. नंतर कळते, की तो आग्रिनचा मुलगा आहे. इराकी सैनिकांनी केलेल्या बलात्कारातून झालेला. आग्रिनला तो नकोसा वाटतो; आणि जगणंही. "टर्टल्स...'ला खरे तर चित्रपट आणि डॉक्युमेंटरी यांचे मिश्रण म्हणावे लागेल. कारण त्याचे एकूण स्वरूप हे कथा सांगण्यापेक्षा या लोकांच्या जगण्याचे चित्र उभे करण्याचे आहे. यातले कलाकार उघडच सराईत अभिनेते नसून, या प्रकारचे आयुष्य खरोखरीच जगणारे कुर्दी रहिवासी/ निर्वासित आहेत. गोबादीला चित्रपटाला राजकीय रंग आणण्यात रस नाही. त्यामुळे "टर्टल्स...' ना सद्दामच्या विरोधात आहे, ना बुशच्या. तो कोणतीही बाजू न घेता त्रयस्थपणे परिस्थिती मांडतो. तिची भीषणता आपल्याला अधिक जाणवते, तीही त्यामुळेच. "वेस्ट बेरूत' मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात चित्रपटासारखा आहे. 1975 च्या सुमारास लेबनॉनमध्ये राहणाऱ्या तीन मुलांची गोष्ट हा रेखीवपणे सांगतो. पण हा रेखीवपणा प्रामुख्याने संहितेच्या पातळीवरचा आहे. प्रत्यक्ष दृश्यांमध्ये वास्तववाद जाणवण्यासारखा आहे. तारेक (रामी दोईरी, दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ) आणि ओमार (मोहंमद कामास) हे जवळचे मित्र. त्या वेळी फ्रेंचांच्या ताब्यात असणाऱ्या आणि श्रीमंत शहर समजल्या जाणाऱ्या बेरूतमधल्या फ्रेंच शाळेत जाणारे. 13 एप्रिल 1975 नंतर इथे युद्धाला तोंड फुटते आणि शाळा बंद होते. आपल्याला अचानक मिळालेल्या स्वातंत्र्याचा सुरवातीला या दोघांना आनंदच होतो. त्यांची मे (रोलाडाल अमीन) या मुलीशी मैत्री होते अन् तिघे उनाडक्या करायला लागतात. कारेकचे आई-वडील हे आनंदी जोडपे आहे, पण युद्धग्रस्त बेरूतमध्ये राहण्याच्या तणावाने त्यांच्यात कुरबुरी वाढायला लागतात, आर्थिक तणावही वाढतात. आणि या तिघांचे बालपण लवकरच संपून जाते. वेस्ट बेरूतमध्ये युद्धाची पार्श्वभूमी आहे, पण महत्त्व व्यक्तिरेखांत अधिक आहे. युद्धाच्या सुरवातीपासून त्याचे वाढत जाणारे गांभीर्य याचा मुलांवर आणि तारेकच्या पालकांवर होणारा परिणाम एका चढत्या आलेखाद्वारे व्यवस्थित मांडण्यात येतो. हा आलेख दिग्दर्शकाला महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांमध्ये त्याने थोडा फेरफारही केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा परिणाम निश्चित वाढतो. गंमत म्हणजे दोइरी हा क्वेटीन टेरेंटिनो या विक्षिप्त लोकप्रिय दिग्दर्शकाच्या तीन चित्रपटांचा कॅमेरामन असूनही त्याच्यावर टेरेंटिनोच्या अतिशय संसर्गजन्य शैलीचा जराही प्रभाव दिसत नाही. वेस्ट बेरूतची तुलना त्रुफॉंच्या "फोर इंड्रेड ब्लोज' या पहिल्या चित्रपटाशी केलेली आहे आणि तीच अधिक रास्त आहे. "टर्टल्स...' आणि "वेस्ट बेरूत' या दोन्ही चित्रपटांमध्ये तपशिलाला मात्र विलक्षण महत्त्व आहे आणि ते या मुलांची आयुष्ये खऱ्या अर्थाने जिवंत करते. "टर्टल्स...'मध्ये असणारा सुरुंग काढून विकण्याचा धंदा, हेन्कोकचे भविष्य वर्तवणे किंवा सॅटेलाईटला तळ्यात न सापडणारे लाल मासे जसे महत्त्वाचे आहेत, तसेच वेस्ट बेरूतमध्ये ओमारच्या कॅमेऱ्यातली फिल्म डेव्हलप करण्याचा प्रयत्न, वेश्यागृहाला मुलांनी दिलेली धावती भेट, शेजाऱ्यांची भांडणे यासारख्या गोष्टींना महत्त्व आहे. हे छोटे प्रसंग, यातल्या व्यक्तिरेखा आपल्यापर्यंत अधिक चांगल्या रीतीने पोचवतात. आपल्यावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले असे आपण म्हणतो, पण या कालावधीवर आपल्याकडे कितीसे चित्रपट आले? जे थोडेफार आले ते बहुधा कोणा ना कोणा थोर व्यक्तीच्या चरित्राचा भाग म्हणून आले. पण या वेळी सामान्य माणसाचे काय चालले होते? हा आपला इतिहास आपल्या दिग्दर्शकांना नाट्यपूर्ण वाटत नाही, का ज्याप्रमाणे इंग्रजांचे पुतळे काढून आणि जागांची नावे बदलून आपण इतिहास पुसण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवला आहे त्याप्रमाणेच आपण चित्रपटांमध्येही ब्रिटिशांना अनुल्लेखाने मारणार आहोत? मला माझ्या मित्राची थिअरी पटत नाही ती यासाठीच. आपल्याला कमी आहे ती इतिहासाची नाही, तर तो मांडू शकणाऱ्या संवेदनशील, सर्जनशील कलावंतांची. सत्य समोर आणण्यापेक्षा ते विसरून मनोरंजनाचे रंगीत फुगे फुगवण्यातच आपल्याला रस आहे, अन् कदाचित त्यामुळेच आपला चित्रपट-उद्योग दिवसेंदिवस अधिक बेगडी होत चालला आहे. केवळ युद्धपटांपुरता नव्हे, तर एकूणच.
-गणेश मतकरी

4 comments:

सिनेमा पॅरेडेसो May 15, 2008 at 12:29 AM  

1857chya swatantraudhala 150 varshe zalyachi athavan alyamuleki kay.zashi ki rani ani tatya tope ya 2 bollywoodi films yetayt. itihas jagavnaysathi. yatala ek jari chalala tar mag aplya mathi bahgatsing sarakhya sumar darjachya film malikana samore jave lagnar ahe.

tumala aplya itihasik film avadtat, pattat ka?

jaROOR LIHA YAVAR ITHE.

ya lekahbaddalchya prtikriyaHI kalva.

विनायक पंडित May 16, 2008 at 5:15 AM  

आपण सिनेमाबद्दल खूपच माहितीपूर्ण असं लिहिता.दोन युध्दपटांमधला टर्टल्स...हा चित्रपट मी पाहिला होता.प्रचंड परिणामकारक आणि अंगावर येणारा तो वाटला होता.आपल्या ब्लॉगला नेहमी भेट द्यायला आवडेल!
विनायक पंडित

cinemaworld of santosh May 18, 2008 at 2:18 AM  

Dear Ganesh & Pankaj
good efforts.
because of you I started netsurfing.

THANKS

ganesh May 21, 2008 at 4:21 AM  

thanks vinayak and santosh.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP