संमिश्र परिणामांचा धुरळा

>> Monday, January 6, 2020



सिनेमा वेळेवर पहाण्याचे काही फायदे असतात आणि काही तोटे. पहिला फायदा हा, की फिल्म तुमच्यापुढे मिस्ट्रीसारखी उलगडते. अगदी सोशल फिल्मसुद्धा. तुम्ही त्याबद्दल काही मत बनवलेलं नसतं. जे पहायला मिळतं ते सरप्राईज असतं. अशा वेळी इम्पॅक्ट हा एनहान्स्ड असू शकतो. फिल्म खूप आवडू शकते, किंवा उलट. फिल्म थोडी नंतर पाहिली की तुमच्या कानावरुन मतं गेलेली असतात, रिव्ह्यू ऐकलेले असतात, काही अपेक्षा तयार झालेल्या असतात. ज्यांचा उलटा परिणामही होऊ शकतो. मला स्वत:ला फिल्म पहाण्याआधी तिच्याबद्दल माहिती असणं अधिक आवडतं. कारण त्यामुळे तुम्ही फिल्म जागरुकपणे पहाता. शक्य तितकं निरपेक्ष रहाण्याचा प्रयत्न मात्र अशा वेळी करावा लागतो.

धुरळाबद्दल मी अगदीच निरपेक्ष होतो असं म्हणता येणार नाही. समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन हे दिग्दर्शक - लेखक मला आवडणाऱ्या चित्रकर्मींपैकी आहेत, आणि त्यांच्याकडून तशीही अमुक एक अपेक्षा असतेच. जोडीला महत्वाकांक्षी विषय, स्टार वर्गात मोडणारा चांगला नटसंच आणि खूपच चांगले रिव्ह्यूज यावरुन अपेक्षा तयार होणारच. या सगळ्या अपेक्षा फिल्मने पुऱ्या केल्या का ? त्याकडे आपण येऊच.

अनेक रिव्ह्यूज आल्याने , मी कथानक सांगत बसत नाही. एवढच सांगतो, की गावच्या लोकप्रिय सरपंचांच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या इतरांनी त्यांची जागा घेण्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून कुटुंबात पडत गेलेली फूट याबद्दलचा हा चित्रपट आहे. त्याला कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन बाजू आहेत, ज्यांच्या मिश्रणातूनच त्यातलं नाट्य तयार होतं.

पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी की फिल्म सरळच पहाण्यासारखी आहे.कारण ती काहीतरी महत्वाकांक्षी अटेम्प्ट करते. सिंहासनशी तुलना व्यर्थ आहे, पण पुरेशा गंभीरपणे राजकारणावर नजर टाकणारे चित्रपट आपल्याकडे होतच नाहीत. धुरळा ग्रामीण राजकारणातल्या अनेक बाजू पुरेशा गंभीरपणे मांडायचा प्रयत्न करतो. आणि ते करताना तो आपला मानवी चेहरा घालवत नाही. अल्टीमेटली तो एका कुटुंबाचा चित्रपट रहातो. हे करताना तो आपला सेन्स ऑफ ह्यूमर शाबूत ठेवतो, नाट्यपूर्ण जागा शोधतो, अनेक चांगल्या कलावंतांसाठी प्रसंग तयार करतो, हे सगळं तो पहाण्यासाठी पुरेसं आहे. पण हे करताना, त्याच्या काही मर्यादाही आहेत.

सर्वात पहिली मर्यादा म्हणजे त्यात खूप अधिक व्यक्तीरेखा आहेत आणि त्याची लांबी ( जवळपास तीन तास) अनावश्यक  वाटेलशी मोठी आहे. आता ही लांबी नुसतीच , घटनांशिवाय आहे, असं नाही. चित्रपट घटनाप्रधान आहे, शह काटशह, चाली प्रतिचाली, याचा खेळ यात सतत आहे. पण त्याला इनेविटेबिलिटी नाही. कथेची गरज आणि त्या प्रमाणात वेळ, हे गणित इथे गोंधळलय असं मला वाटतं. अशाच प्रकारे चित्रपट आणखी तासभरही चालू शकतो, किंवा तो अर्धा तास कमीही होऊ शकला असता. मग इथेच का संपला, याला काही कारण नाही. सरपंचपदासाठी होणाऱ्या निवडणूकांना चित्रपटात फार महत्व आहे. पण त्यासाठी निश्चित टाईमलाईन, आणि त्या जवळ येण्यानुसार बदलता वेग, हे स्पष्ट असण्याची गरज होती. ते इथे पुरेशा ठळकपणे दिसत नाही. त्याऐवजी नुसताच प्रचार बरीच जागा खातो.

दुसरी गोष्ट म्हणजे एका कुटुंबातले सगळे ‘उभे’ असणं ही चमत्कृती आहे, पण त्यातच चित्रपटाचा पॅराडाॅक्स आहे. तो कोणता , हे सोनाली कुलकर्णीच्या व्यक्तीरेखेच्या तोंडून एकदा बाहेर येतं, पण चित्रपट ते पुरेशा गांभीर्याने घेत नाही. स्पाॅयलर नको , म्हणून मी तो उल्लेख इथे करत नाही, पण लक्ष दिलत तर तुम्हालाच समजेल. चित्रपटातल्या अनेक घटना, या सोयीस्करपणे होतात. ( उदा हणमंतच्या पार्टीतलं विघ्नं ) त्या होतात कारण चित्रपटाला अमुक मुद्दा गाठायचाय , असं वाटतं, बरेचदा ते स्वाभाविक वाटत नाही. चित्रपटाचा शेवट याचं खूपच ठळक उदाहरण आहे. तो प्रिची होतो, ढोबळ होतो. एकाच वेळी तो गडद आहे असं भासवतो, पण प्रत्यक्षात तो कथानकाचा गडदपणा कमी करतो, व्यक्तीरेखांना रंगसफेदी करतो.

चित्रपटाचा पहिला भाग हा बराच लांबल्यासारखा वाटतो. त्यात बहुतेक व्यक्तिरेखांचे तपशील येतात. काही घटनांचेही. बॅक स्टोरी येते. हे सारं कदाचित कादंबरीत अधिक छान वाटलं असतं,( ती अजूनही लिहिण्यासारखी आहेच. बालगंधर्व चित्रपटात सारे तपशील नीट न वापरता आल्यावर अभिराम भडकमकरने ते कादंबरीत वापरले तसं. ) पण चित्रपट त्याला गरजेएवढा वेळ देऊ शकत नाही, आणि परिणामी हे वरवरचं वाटतं. दुसरा भाग अधिक आटोपशीर आहे. या भागात चित्रपट बराच सावरतो. मला असंही वाटलं की चित्रपटातला विनोदी भाग गाळून तो गंभीर केला असता, तर अधिक प्रभावी वाटला असता. स्वतंत्रपणे पाहिलं तर तो गंभीरच आहे. महत्वाकांक्षेतून ओढवणारा नाश असा खास शेक्सपिअरन अंडरकरन्ट त्यात आहे, वर दोन व्यक्तीरेखांचे ट्रॅक्स तर खासच शोकांताकडे झुकताना दिसतात. संवादातून विनोदाचं टेक्श्चर टिकवण्याचा आग्रह, कोणतीच गोष्ट गडद होऊ देत नाही. त्यामुळे खूप हसवणाऱ्या काही जागा असूनही ते अनावश्यक वाटतं.

कामांबद्दल बोलायचं, तर सई ताम्हनकर आणि तिच्या खालोखाल अलका कुबल, यांची कामं मला खासच आवडली. दोघींनिही आपलं बरचसं करीअर पोटेन्शिअलपेक्षा उथळ भूमिकांमधे घालवलं आहे, त्यामुळे चांगल्या भूमिकांमधे त्या दिसणं विशेष वाटतं.अंकुश चौधरीचा स्क्रीन प्रेझेन्स आहेच, भूमिकेला लांबीही आहे, पण भूमिका त्यामानाने सपाट आहे. इतर लोक छोट्या प्रसंगातही छाप पाडून जातात, ( विशेषत: अमेय वाघ )तसं त्याच्या भूमिकेत होत नाही. प्रसाद ओकच्या भूमिकेचं टोक पुढे संहिताच बोथट करुन ठेवते. बाकी सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत, पण ती त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांनुसारच.

एकूणात सांगायचं, तर धुरळा , हा एक फर्मली चांगला प्रयत्न म्हणण्याजोगा, पण पोटेन्शीअल पूर्णपणे वापरता न आलेला सिनेमा आहे. त्यात प्रेक्षकांचा विचार आहे. ढोबळ नाट्यमय जागा, विनोद, टाईपकास्टींग, स्टार्सचा वापर यात तो दिसतो. असा प्रेक्षकांचा विचार करण्यात फार गैर काही नाही. अखेर हा व्यावसायिक सिनेमा आहे. महोत्सवांना डोळ्यापुढे ठेवून बनवलेला नाही. पण त्यामुळे जर परिणामाशी तडजोड होत असेल तर ते टाळायला हवं. कारण विनोद वगैरे आणूनही प्रत्यक्षात तो सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोचतोय असं चित्र मात्र पहायला मिळत नाही. याला आपल्या प्रेक्षकांच्या मर्यादा हे एक कारण आहे. पण तेवढच कारण नाही.

समीर विद्वांसच्या चांगल्या चित्रपटांपैकी धुरळा म्हणता येईल, पण डबल सीट आणि आनंदी गोपाळ हे परिणामात उजवे असणारे त्याचे चित्रपट आताही धुरळाच्या वरचीच जागा राखून आहेत. धुरळा हा बनवण्यासाठी या दोघांहून कठीण नक्कीच आहे. पण परिणामात तो या दोघांपेक्षा कमी पडणारा आहे.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP