कुलकर्ण्यांची ‘विहीर’

>> Monday, March 22, 2010

ढोबळमानाने पाहिलं, तर सिनेमा हा दोन प्रकारांत मोडणारा असल्याचं लक्षात येईल- व्यावसायिक आणि अर्थपूर्ण.व्यावसायिक सिनेमा हा बहुधा त्यातल्या कथानकांचा अन् त्यांच्यात असणाऱ्या मनोरंजन क्षमतेचा गुलाम असतो. त्याचे काही संकेत असतात, काही ढाचे असतात. प्रेक्षकांच्या त्याच्यापासून काही निश्चित अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करणं त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र यामुळेच उत्तम व्यावसायिक चित्रपटदेखील आशयाची किती खोली गाठू शकेल याला मर्यादा पडते. इथल्या कथा त्यांच्यावर पडलेल्या करमणूक करण्याच्या जबाबदारीने काही ठराविक वर्तुळात फिरत रहातात आणि ‘कॉन्टेक्स्ट’ हा प्रकारच हरवून बसतात.
रंजनापुढे पाश्र्वभूमी, व्यक्तिरेखा, काळ या सर्वच गोष्टी दुय्यम होतात आणि निर्वातात घडणारी गोष्ट असल्यासारखी या चित्रपटांची परिस्थिती होते. ‘हॉलीवूड’ अन् तथाकथित ‘बॉलीवूड’मधल्या अनेक बऱ्यावाईट चित्रपटांबद्दल आपण हे विधान करू शकतो.
याउलट अर्थपूर्ण चित्रपट हे खरोखर मनापासून काही सांगण्याच्या हेतूने केलेले असतात. इथे कथानकांचे आलेख अथवा रंजनमूल्य याहून अधिक महत्त्व दिग्दर्शकाचा दृष्टिकोन थेट आपल्यापर्यंत पोहोचण्याला असतो. इथल्या व्यक्तिरेखांना वाऱ्यावर सोडून दिलं जात नाही. गोड शेवटाची अपेक्षा पुरी करणाऱ्या बाहुल्या अशी त्यांची व्याख्या बनत नाही. इथली पात्रं कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत यातच बहुधा अशा चित्रपटांच्या आशयाची गुरुकिल्ली असते. आपापल्या मातीतल्या गोष्टी सांगणाऱ्या देशोदेशींच्या चित्रपटांमध्ये, ‘वर्ल्ड सिनेमा’मध्ये या प्रकारच्या चित्रपटांचं मोलाचं स्थान आहे. त्यांना असणारी संदर्भाची चौकट हा त्यांचा विशेष आहे.
मराठी सिनेमामध्ये घडत असलेल्या रेनेसान्सविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण हेही लक्षात घ्यायला हवं की वर उल्लेखिलेल्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटांची वाढती संख्याच ते यशस्वीपणे घडवू शकेल. आपल्याकडे आधीच अस्तित्वात असणाऱ्या बॉलीवूडची मराठी आवृत्ती, प्रेक्षकांचा गरजेपेक्षा अधिक विचार करत वा चॅनल्सना हाताशी धरून जाहिरातबाजीचा मार्ग अवलंबत काढलेला सिनेमा आज तिकीट खिडकीवर चालताना दिसला, तरी तो चित्रपटसृष्टीला मोठं करणार नाही, तर पुढेमागे अडचणीतच आणेल. याउलट अर्थपूर्ण सिनेमा पाहण्याची आवड म्हणा, प्रथा म्हणा, शिस्त म्हणा प्रेक्षकांत तयार झाली, तर केवळ सेलेब्रेटी करमणुकीसाठी ओळखला जाणारा आपला सिनेमा मराठी चित्रपटांतून आपली नवी ओळख तयार करू शकेल. उमेश कुलकर्णींचा दुसरा सिनेमा ‘विहीर’ हे अशा आशयघन चित्रपटांमध्ये जाणाऱ्या वाटेवरलं योग्य पाऊल आहे.
‘विहीर’ हा एक अनुभव आहे. दिग्दर्शकाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवर तो आधारित आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि पटकथालेखक गिरिश कुलकर्णी/ सती भावे यांनी एका आठवणीला शक्य तितक्या शुद्ध स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे काम म्हटलं तर खूपच अवघड आहे. कारण या आठवणीचं स्वरूप फारच तरल आहे. एका शाळकरी मुलाला प्रथमच झालेलं मृत्यूचं दर्शन, त्या धक्क्याने त्याचं छोटेखानी विश्व हादरून जाणं आणि जीवनासंबंधातलं हे कटू सत्य पचवून त्याचं पुन्हा मार्गस्थ होणं ही विहीरच्या केंद्रस्थानी असलेली घटना आहे. इथे नायकाच्या आयुष्यात जे घडतं त्यापेक्षा अधिक महत्त्व त्याला जे जाणवतं त्याला आहे. चांगल्या साहित्यकृतीत सर्व गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. ‘बिट्वीन द लाइन्स’ वाचणं तिथं शक्य होतं. विहीर असा ‘बिट्वीन द सीन्स’ पाहता येतो. प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रसंगाइतकंच महत्त्व इथे प्रत्यक्ष न दिसणाऱ्या, पण रचनेतून जाणवणाऱ्या नायकाच्या भावनिक आंदोलनांना येतं.
समीर (मदन देवधर) इथला नायक आहे. समीर पुण्यात राहतो, पण सुटीत गावाला जाणं हा त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. गावात आजी-आजोबांच्या (ज्योती सुभाष, डॉ. मोहन आगाशे) घरी या कुटुंबातले सारेजण एकत्र जमतात, पण समीरच्या लेखी सर्वात महत्त्वाचे आहे ती नचिकेत (आलोक राजवाडे) या त्याच्या मावसभावाशी होणारी भेट. सर्वसाधारण कारणांवरून तंटे-बखेडे उकरत राहणाऱ्या मोठय़ांपेक्षा समीर आणि नचिकेत एकमेकांच्या सहवासात सुट्टी छान घालवतात. शेतातल्या मोठय़ाथोरल्या विहीरीत पोहतानाही त्यांचा वेळ मजेत जातो.
मात्र कधीतरी समीरच्या लक्षात येतं की या सगळ्यात नचिकेतचं मन नाहीये. बहुधा घरच्या कटकटींना कंटाळून वा इतर काही कारणांनी असेल, पण त्याला या सगळ्याचा कंटाळा आलाय. नचिकेतच्या वागण्याचा पुरता अर्थ लागायच्या आतच त्याचा मृतदेह विहीरीत सापडतो. अपघात की आत्महत्या या प्रश्नाचंही नीट उत्तर मिळू शकत नाही. मात्र उत्तर काही असेना, समीरच्या आयुष्यातली पोकळी त्यामुळे भरून निघणार नसते.
विहीरचा अस्सलपणा आपल्याला एका दृष्टिक्षेपात समजतो. सुरुवातीला नचिकेत अन् समीरमधल्या पत्रापत्रीच्या निवेदनातूनच तो दिसायला लागतो. या पत्रातले अन् जोडून येणाऱ्या दृश्यातच तपशीलाचं वातावरण आणि व्यक्तिरेखा जिवंत करायला लागतात. पुढे निवेदनाने ओळखीचा आकार घेतल्यावरही हा अस्सलपणा कमी होत नाही. उमेश कुलकर्णीच्या शैलीत अवकाश जिवंत करण्याची हातोटी आहे. त्याच्या दृश्य चौकटी तर भरगच्च असतातच, वर साऊंड डिझाईनकडे त्याने खास लक्ष दिलेलं जाणवतं. त्याच्या ‘गिरणी’ किंवा ‘थ्री ऑफ अस’सारख्या लघुपटांमध्येही हे स्पष्ट झालेलं आहे. ‘विहीर’मधेही समीरचं पुणं, गावातलं घर, शेतावरली विहीर, अशा जागा त्यांच्या त्यांच्या दृश्यध्वनीसह पूर्णपणे उभ्या राहतात.
विहीरच्या केंद्रस्थानी जरी समीर व नचिकेत असले, तरी त्यात पात्रांची पुष्कळ गजबज आहे. अशा वेळी पटकथाकारांचं अन् दिग्दर्शकाचं काम कठीण असतं. मग पात्रं केवळ कथा पुढे ढकलण्यासाठी घातल्यासारखी वाटण्याची वा दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. ‘विहीर’मध्ये तसं होत नाही. मोठं असो वा छोटं, इथलं प्रत्येक पात्रं तिथे असण्याला कारण आहे. यातल्या घटना घडण्याला ही पात्रं अप्रत्यक्षपणे वा प्रत्यक्षपणे जबाबदारही आहेत. त्यांच्यावरचे संस्कार, त्यांच्या वागण्याची पद्धत यांचा चित्रकर्त्यांनी केलेला विचार आपल्याला दिसण्यासारखा आहे. हा विचार चित्रपटाला स्वत:ची ओळख देणारा आहे.अखेर मेटाफिजिकल पातळी गाठणारा विहीरमधला आशय केवळ प्रेक्षागृहात आपल्याला प्रभावित करत नाही तर बाहेर पडल्यावर तो अधिकच गडद होतो. जाणवत राहतो, पिच्छा पुरवतो. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम नाटय़ाचा आधार न घेता जीवनातलं नाटय़ बाहेर आणण्याची अन् त्याकडे काहीशा त्रयस्थपणे पाहत ते प्रेक्षकांना उलगडून दाखवण्याची या दिग्दर्शकाची हातोटी हा त्याच्या शैलीचा विशेष आहे. त्याच्या ‘वळू’मध्ये चित्रपटाच्या उपहासात्मक संकल्पनेने तो पुरेशा प्रमाणात जाणवला नसला तरी त्याच्या लघुपटांमधून तो स्पष्टपणे पुढे आलेला आहे. तो त्याने जपायला हवा. एकटा ‘विहीर’ एकटा ‘गंध’, एकटा ‘गाभ्रीचा पाऊस’ किंवा एकटा ‘टिंग्या’ भारताबाहेरची आपल्या चित्रपटांची ‘सॉन्ग अ‍ॅण्ड डान्स’ प्रतिमा कदाचित बदलू शकणार नाहीत, मात्र या चित्रपटांचं बनत राहणं हेच आश्वासक आहे. गेली अनेक वर्षे ‘वर्ल्ड सिनेमा’मध्ये दुर्लक्षित असलेलं भारताचं नाव पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता या चित्रपटांनी तयार केली आहे. मात्र केवळ बाहेरचा प्रतिसाद पुरेसा नाही, घरचा प्रतिसाद आवश्यक आहे. तरच हे नवे चित्रकर्ते पुढली मजल गाठण्यासाठी जोमाने तयार होतील.

-गणेश मतकरी (रविवार लोकसत्तामधून)

5 comments:

Anee_007 March 24, 2010 at 2:50 AM  

I will say Directors attraction towards popular subjects is because of response they get from audience.Our audience still want spoon feeding,they don't want to think about the subject of cinema.
Same thing is happening with Vihir,LSD.Same thing happened with Dev D,Swades & so on.What our audience want is just masala movies like Wanted,Ghajini etc.

ganesh March 24, 2010 at 3:58 AM  

no aneeket,
dev d and swades were well received ,and wanted /ghajini are in a diffrent category altogether. louder ,south influenced than normal bollywood fare.also, i dont entirely believe in blaming the audience. they have some sixth sense usually which points them to better films most of the times. how else to explain sudden collapse of films like RGV sholay from first show.with good cast, hook like AB playing Gabbar and track record of RGV. its just that these films are few and audience still believes in entertainment than content. ( note that they dont read books only to get entertained,though its a more time consuming affair) i think we need to get more educated. that said, i have no clue how that will be achieved.

Vivek Kulkarni March 28, 2010 at 6:22 AM  

Vihir is more of 'Film Festivals' type film. I loved it for its originality but still i think that Marathi films should focus on to make more mass oriented films that doesn't mean Makarand Anaspure type but somewhere between serious and comedy like Lage Raho Munnabai. They should try to make film of every genre. No Marathi director had tried his hands in making a 'Film Noir' or 'Neo-Noir' film or a Hitchcockian film.

ganesh March 30, 2010 at 1:03 PM  

probably because our mass films have simplified the equation. lot of hindi films in b & w era were influenced by noir (take gurudutts aarpaar /Jal or films like howrah bridge)but even at the time marathi did not want to venture too far from familycentric films. even recently ,hindi cinema did attempt neo noir with 1.40 ki last local or johny gaddar but we are still bound with ideas of what our audience will accept an not accept. once a filmmaker moves beyond the thought limited to audience ,he can do wonders.

Anagha October 21, 2011 at 11:42 AM  

अप्रतिम लिहिलंय तुम्ही...शेवटचा मुद्दा तर खूपच पटला आणि आवडला....भारतीय सिनेमा...वर्ल्ड सिनेमावर...
परवा 'विहीर' टीव्ही वर दाखवण्यात आला...पण काही अपरिहार्य कारणामुळे नाही बघता आला...आता परत कधी आणि कुठे बघायला मिळेल कोण जाणे...
खूप छान लेख.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP