रॉकस्टार - पटकथेचा आणखी एक बळी

>> Sunday, November 20, 2011

एखादी कल्पना, एखादा विचार ,चांगला असला तरीही पूर्ण लांबीचा चित्रपट पेलण्यासाठी पुरेसा असतो का? असू शकतो ,पण बहुधा नाही. ती एक सुरुवात असू शकते, पण तिला पटकथेचा आकार देताना, सर्व संबंधित शक्यतांचा विचार व्हावा लागतो.त्या कल्पनेला एका तर्कशुध्द चौकटीत बसवावं लागतं, रचना/मांडणी यांचा विचार व्हावा लागतो. या प्रोसेसमधून गेल्यावरच तिचं रुपांतर उत्तम निर्मितीत होऊ शकतं . याउलट ,एखादा अभिनेता , एखादा स्टार , हा पूर्ण लांबीचा चित्रपट पेलण्यासाठी पुरेसा असतो का? या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण फार विचार न करता, चटकन होकारार्थी देऊ शकतो.आपला चित्रपट उद्योग आणि हॉलीवूड यांत मिळून आपण शेकडो असे चित्रपट पाहिले आहेत जे मूळ कल्पनेवर काम करण्याचा आळस करुन यशाची जबाबदारी प्रमूख अभिनेत्यावर सोडून मोकळे होतात. याचं ताजं उदाहरण आपल्याला इम्तिआज अली दिग्दर्शित ' रॉकस्टार' मधे पाहायला मिळतं.पहिल्या चित्रपटापासून कायमच लक्षवेधी ठरत आलेल्या , पण 'स्टार' वर्गात बसण्यासाठी आवश्यक ते वजन , आव्हान आणि बॉक्स ऑफिस पोटेन्शिअल असणारी भूमिका न मिळालेल्या रणबीर कपूर साठी हा अतिशय महत्वाचा चित्रपट आहे. त्याने आपला वारसा इथे निर्विवादपणे सिध्द केलेला आहे.त्याच्याबरोबर पदार्पण केलेल्या नील नितीन मुकेश आणि इम्रान खान यांना त्याने कधीच कितीतरी मागे टाकलं आहे.
रॉकस्टारची मध्यवर्ती कल्पना सुरुवातीच्या गंमतीदार प्रसंगांच्या आधारे नवी असल्याचा आभास आणणारी असली तरी प्रत्यक्षात पारंपारिक स्वरुपाची आणि सत्यापेक्षा सुडो-रोमॅण्टिक दंतकथांवर आधारीत आहे. सच्चा कलाकार( चित्रपटाच्या टर्मिनॉलॉजीत रॉकस्टार) हा ह्रदयात दर्द असल्याशिवा़य प्रकट होवू शकत नाही असं इथलं तत्वज्ञान आपल्याला सांगतं.या व्याख्येत सहज बसू शकणा-या काही रॉकस्टार्सचे फोटोही दाखवले जातात. पण दर्द नसताना अवतरलेल्या मिक जॅगर पासून फ्रेडी मर्क्युरी पर्यंत अनेकांना, अन पैसा अन प्रसिध्दीच्या अतिरेकाने आपलं दु:ख स्वत: तयार करणा-या स्टीवन टायलर पासून जिमी हेन्ड्रिक्स पर्यंत अनेकांना चित्रपट सोयीस्करपणे विसरतो.एकदा का ही एका ओळीत बसणारी कल्पना सापडली की चित्रपट ऑटो पायलटवर पटकथा रचायला बसतो. इम्तिआज अलीला आपल्या 'जब वुइ मेट' या चांगल्या अन 'लव्ह ,आज कल' या सर्वसामान्य चित्रपटावरुन एक फॉर्म्युला सापडलाय जो, तो इथे डोकं नं वापरता अप्लाय करतो. मुळात विजोड वाटणा-या नायक नायिकेचं एकत्र येणं , मैत्री हा प्रेमाचा आधार ठरणं, दोघांनी स्वतंत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करुन पाहाणं आणि ते जमत नाही हे लक्षात येताच एकत्र येणं. सुखांत आधी वापरुन झाल्याने, इथे शोकांत वापरुन पाहावा ,असं वाटलं असण्याची शक्यता आहे.शिवाय तो मूळच्या ,कलावंताच्या कलंदर असण्यावर शिक्कामोर्तब करणा-या कल्पनेशी सुसंगत आहेच ,नाही का ? इम्तिआज अलीचे आधीचे चित्रपटदेखील उत्तरार्धात फार कसरती करत आले आहेत. रॉकस्टार त्याला अपवाद तर नाहीच, वर पटकथेमागचे दिग्दर्शकीय हिशेब उघडे पाडणारं हे उदाहरण हल्लीच्या सर्वात बाळबोध पटकथांमधलं प्रमुख मानता येईल. गंमत म्हणजे , मध्यंतरापर्यंत ही कसरत सुरु होत नसल्याने , तोपर्यंतची पटकथा -अन पर्यायाने अभिनय किंवा इतर तांत्रिक बाजू निर्दोष असलेला चित्रपट - चांगलाच वाटतो.
रॉकबँड अन रॉकस्टार ही संकल्पना आपल्याकडे प्रामुख्याने परीचित आहे ती पाश्चिमात्य संदर्भातून. आपल्याकडे या संगीताची माफक उदाहरणं असली तरी त्या प्रमाणात प्रसिध्दी, पैसा आणि वेडाचार आपल्याकडे पाहायला मिळत नाही. या वातावरणाचा परिचय नसलेल्या प्रेक्षकासाठी रॉकस्टारची सुरुवात (जरी कथेच्या ओघात ती पुढे वाहून जात असली ,तरी)अन श्रेयनामावली ही या जगाची धावती ओळख करुन देणारी ठरते. जॉर्डन (रणबीर) या लोकप्रियकतेच्या शिखरावर असणा-या रॉकस्टारची बंडखोर प्रतिमा अन भोवतालचं वलय दाखवून चित्रपट भूतकाळात शिरतो. या काळात जनार्दन नावाने ओळखल्या जाणा-या नायकाच्या ,उमेदवारीच्या दिवसांकडे पाहात ़
जमेल तिथे गाऊन पाहाणा-या पण अजून यशस्वी न ठरलेल्या नायकाला अनाहूत सल्ला मिळतो ,तो रॉकस्टारचं यश हे त्याच्या गळ्यात नसून त्याच्या भंगलेल्या ह्रदयात असल्या़चा. कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या जनार्दनची प्रेमभंग करवून घेण्याची तयारी लागलीच सुरू होते.हीर (नर्गिस फाक्री) या कॉलेजच्या ब्युटी क्वीनला तो लगेच प्रपोज करतो आणि तिने हाकलून दिल्यावर प्रेमभंग झाल्याच्या भ्रमात राहातो. या वेडेपणामुळे त्याचं गाणं तर सुधारत नाही , पण हळूहळू हीरशी मैत्री मात्र होते. हीरच्या लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत ही मैत्री इतकी घट्ट झालेली असते ,की येणारा विरह , एव्हाना जॉर्डन झालेल्या जनार्दनच्या ह्रदयात तो सुप्रसिध्द दर्द निर्माण करणार यात शंकेला जागा राहात नाही. दिग्दर्शक हा हातखंडा भाग छोट्या छोट्या प्रसंगातून , विनोद / अनपेक्षित स्थलयोजना आणि इन्स्पायर्ड अभिनय याच्या सहाय्याने छान रंगवतो.गाणीही आपलं काम अचूक करतात. एवढंच नाही ,तर लोकप्रियता मिळायला लागल्यावरचा काही काळ आणि हीरच्या गावची (प्राग, नो लेस! ) सफर हा भागदेखील चांगला जमतो. रॉकस्टार आपलं निवेदन कळेलसं ठेवतो पण पूर्णत: लिनीअर मात्र नाही. मधे मधे ते पुढे मागे जात राहातं आणि गाळलेल्या जागा निवांतपणे भरल्या जातात.मध्यंतरापर्यंत गाडं मैत्री , प्रेम हे टप्पे घेत शरीरसंबंधांवरच्या चर्चेपर्यंत पोहोचतं . तिथे मात्र नियंत्रण सुटतं आणि चित्रपट वर्तुळात फिरायला लागतो.
मध्यांतरानंतर रॉकस्टारची अवस्था शेवट शोकान्त तर करायचाय, पण कसा हे कळत नसल्यासारखी होते! सर्वं पात्रं आपल्या व्यक्तिरेखेला नं जुमानता वागायला लागतात , योगायोगाना कथेत महत्वाचं स्थान मिळतं आणि कथा पुढे न जाता तेच ते प्रसंग पुन्हा पुन्हा घडवायला लागते. मुळात सज्जन ,सुस्वभावी असणारा जॉर्डन दिसेल त्यावर हात उचलायला लागतो, हीरच्या घरी कळताच तिची आजवर काळजी घेणारे सासरचे लोक तिला तत्काळ घराबाहेर काढतात आणि त्यामुळे आपसूक प्रश्नं सुटण्याची शक्यता तयार होताच तिला दुर्धर आजारदेखील होतो. हीर आजारी पडताच ,ती अन चित्रपट, या दोन्हीची आशा मी सोडली. मृत्यू हा निदान चित्रपटांसाठी , छत्तीस व्याधींवर एक उपाय असतो. अनावश्यक पात्रांना बाजूला करणे, हव्या त्या बाजूकडे सहानुभूती वळवणे, पेचप्रसंगाना तर्कशुध्दं उत्तर नसल्यास भावनांना आवाहन करणे अशा अनेक गोष्टी पडद्यावरला मृत्यू साधतो. रॉकस्टारच्याही तो मदतीला येतो. समाधानकारक नसला ,तरी एक शेवट पुरवतो.
अंतिमत: रॉकस्टार करमणूक करत नाही असं नाही, पण आपल्याला काय दर्जाची करमणूक हवी याचाही विचार आपण स्वत:च करायला हवा. पूर्वी प्रेक्षकाचं निवडीचं स्वातंत्र्य आणि चित्रपटांची उपलब्धता ,दोन्हीला मर्यादा होती .आज ती नसल्याने आपण चित्रपट नाकारुन , प्रत्यक्ष कृतीतून आपलं मत व्यक्त करु शकतो. दुर्दैवाने चित्रकर्त्यांनाही चित्रभाषेच्या खालोखाल , ही एकच भाषा समजते !

- गणेश मतकरी. 

17 comments:

हेरंब November 20, 2011 at 10:07 PM  

एकूण एक ओळीशी सहमत !! पुणेरी दुकानात ज्याप्रमाणे गिऱ्हाईक ही सगळ्यात दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे त्याप्रमाणे हिंदी चित्रपटात कथा ही !! :(

आनंद पत्रे November 20, 2011 at 10:13 PM  

ह्म्म.. निराशाजनक..

> दिग्दर्शक हा हातखंडा भाग छोट्या छोट्या प्रसंगातून , विनोद / अनपेक्षित स्थलयोजना आणि इन्स्पायर्ड अभिनय याच्या सहाय्याने छान रंगवतो.

ह्यातलं "इन्स्पायर्ड" अभिनय हे काय ते कळलं नाही...

ganesh November 20, 2011 at 10:26 PM  

that was a quick responce.
Anand, for acting, inspired would be instinctive, अातून आलेला, heartfelt. going beyond the instructed.

Nils Photography November 20, 2011 at 10:44 PM  

I think its already declare as HIT but now, I am confused abt whether to watch or not ?
Anyway,
I am waiting for your review for movie "The Devil's Double" !!!

ganesh November 20, 2011 at 10:50 PM  

Nil,
you can surely watch but strictly for the performance. and maybe music. expect more and you will be disappointed.
even i am curious about devil's double. let's see.

Deepak Parulekar November 20, 2011 at 11:31 PM  

Great Review of Film and Imtiyaaz Ali also!

I'm 100% agreed what you said about Imtiyaz Ali.

After watching Love Aaj Kal i think he is really trying to put something in bollywood cinema but he is damn confused in between Hollywood and bollywood's cultural crises.

aativas November 21, 2011 at 1:45 AM  

पटकथा या विषयावर तुम्ही या ठिकाणी पूर्वी काही लिहिल आहे का? वाचायला आवडेल मला.

ManatalaKahi November 21, 2011 at 1:58 AM  

पटकथा या विषयावर तुम्ही या ठिकाणी पूर्वी काही लिहिल आहे का? वाचायला आवडेल .

ganesh November 21, 2011 at 2:56 AM  

thanks Dipak.
A ani MK , i have not written independently about screenplays , but time and again, all my writing refers more to themes and screenwriting. the title of my article about love aaj kal was apurya patkathalekhanacha bali , thats what prompted this title as well. you will find that article at

http://apalacinemascope.blogspot.com/2009/08/blog-post_28.html

Suhrud Javadekar November 24, 2011 at 10:28 PM  

The story and screenplay have quite a few flaws sure, but still Ranbir's performance and Rahman's rocking music carry the film through...the actress was quite mediocre though...Imtiaz should've selected someone with better acting potential...still, compared to Jab We Met, Rockstar is a far better effort...

ganesh November 25, 2011 at 12:12 AM  

Suhrud, about the initial part of your comment ,we are of the same opinion, but i didn't get that rockstar is a better film than jab we met. how ? jab we met is a simple straightforward feel-good variety film , but it delivers what is expected ,where as rockstar falls flat in the second half. i will agree that rockstar is a more ambitious film, but better ? no.

Suhrud Javadekar November 25, 2011 at 5:23 PM  

Ganesh, Jab We Met was good in parts...but overall I thought it was just about average...Rockstar leaves a deeper impact...it remains in the mind longer...it tells you something about the relation between pain and creativity that you may not have consciously thought of before...that makes it a far more enriching experience...

32 December 6, 2011 at 1:30 PM  

तुम्हाला इम्तियाझ अली चा राग आहे का हो? I mean, I know that you are definitely not biased and you do like his Jab We Met. But somehow it does feel that you tend to criticise him more than any other writer-director. Is it out of disappointment after Jab We Met or pure anger?

ganesh December 8, 2011 at 10:43 AM  

32, LOL. No ,nothing in particular. He hasn't done enough to anger me just yet, and as far as possible ,i try to be neutral . Neutral does not mean appreciative of everyone , but trying to see the credit and the problems as they come. I genuinely see a problem here. And i have given a reasoning of what that problem is. I would be happy if he improves, but he seems to be headed in a wrong direction.

32 December 18, 2011 at 5:33 AM  

@Ganesh: True! I know for sure that you are not biased and are neutral about him. I, somehow, tend to appreciate his crafting but I understand the fact that good presentation and crafting can make a good film but script is essential. If screenplay has no element, you can't juggle audience for long time with your tricks. I also hope that one day Imtiaz Ali will improve his screenply writing. Let's hope for the best.

आनंद पत्रे April 16, 2012 at 12:23 PM  

चित्रपट पाहिल्यावर संपुर्ण लेख पटला... शेवटची चाळीस मिनिटं जीवघेणी आहेत.. थोडक्यात दीड तास आवडलेला चित्रपट शेवटच्या तासात अतिशय बोर होतो...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP