इन्व्हेस्टमेन्टच्या निमित्ताने -

>> Monday, September 16, 2013



अमोल (डिरेक्टर आॅफ फोटोग्रफी अमोल गोळे) 'इन्व्हेस्टमेन्ट'विषयी बोलताना एक गोष्ट नेहमी सांगतो, जी खरी आहे. त्याने जेव्हा चित्रपटाची पटकथा एेकली, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग बाबांना म्हणाला, ' काका, जगात खरोखर कोणी चांगलं नसतंच का?' यावर मला  वाटतं बाबा नुसते हसले असावेत.
इनव्हेस्टमेन्ट अनेक चित्रपट महोत्सवांमधून झाला, इथल्या तसंच न्यू याॅर्क, जर्मनीच्याही. त्या निमित्ताने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या , वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या तेव्हा लक्षात आलं, की अमोलची प्रतिक्रिया ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रीया म्हणता येईल.
मला स्वतःला ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. कारण इन्व्हेस्टमेन्टमधे केवळ वाईट माणसं दिसतात असं नाही. त्यात आपल्या आजुबाजुला दिसतात तशी सर्वच प्रकारची माणसं आहेत. काही अतिशय भली, काही तडजोडी करणारी, काही सुखवस्तू, काही स्वार्थी, काही वैयक्तिक प्रगतीचा विचार करणारी, तर काही त्या प्रगतीपलीकडे काहीच पाहु न शकणारी. किंबहुना मी तर असं म्हणेन, की टिपिकली त्यातल्या ज्या व्यक्तिरेखेच्या पदरात बराचसा वाईटपणा घातला जातो, तीदेखील पारंपारिक अर्थाने वाईट नाही. तिचा दोष म्हणायचा तर एवढाच, की ती आजच्या काळाशी सर्वार्थाने बांधलेली आहे. तिला मागे पडायचं नाही. तिची नजर पुढे लागलेली आहे. अधिक चांगल्या परिस्थितीकडे, अधिक उज्वल भविष्याकडे. पण मला सांगा, आजच्या महत्वाकांक्षी तरुण पिढीतल्या कोणाची नजर तशी नाही?
मी जेव्हा २००३ मधे इन्व्हेस्टमेन्ट कथा एेकली, तेव्हा मला सगळ्यात अधिक जाणवलं ते तिचं हे आजचं असणं. अर्थात, ही गोष्ट आजपासून दहा वर्षांपूर्वीची आहे, अन या दहा वर्षांत परिस्थिती रॅडीकली बदललेली तर नाहीच, वर ती कथेच्या अधिक जवळ गेलेली आहे. मी स्वतःही तेव्हा होतो त्याहून या कथेच्या अधिक जवळ आहे. यातलं कुटुंब हे माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या  कुटुंबापेक्षा फार वेगळं नाही. आणि या जवळच्या अंतरावरून मी निश्चितच म्हणू शकतो की ही गोष्ट वाईट माणसांची नाही, साध्या माणसांची आहे. कदाचित थोड्या अधिक हुशार, अधिक एफिशियन्ट माणसांची, जी आल्या प्रसंगासमोर हताश होऊन न राहाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निर्णयाला विशिष्ट अर्थ देऊ करते ती ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीची चौकट. या चौकटीकडे लक्ष वेधणं, ती तिथे आहे याची जाणीव करुन देणं, हा या कथेमागचा किंवा चित्रपटामागचाही हेतू आहे.
हा लेख लिहिण्यापुरती मी माझी समीक्षकाची भूमिका बाजूला ठेवली आहे असं आपण समजू कारण माझा या चित्रपटाशी इतका जवळचा संबंध आहे, की मी त्याच्या गुणवत्तेची चिकित्सा करण्यात मुद्दा नाही. ती तो पाहाणार््यांनी करावी. मला केवळ काही निरीक्षणं मांडण्यात रस आहे. या निरीक्षणातून कदाचित त्याच्याकडे पाहाण्याची दिशा मात्र मिळू शकते.
बर््याचदा आम्हाला चर्चांमधून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे हा चित्रपट कोणा सत्य घटनेवर आधारीत आहे का? याचं उत्तर टेक्निकली 'नाही' असं आहे पण तेही तितकसं योग्य नाही. कारण ही घटना सलग, जशी कथेत आहे, जशी चित्रपटात दाखवली जाते, तशी घडलेली नाही, मात्र त्यामुळे ती सत्य नाही असंही म्हणता येणार नाही. या कथेचे सरसकट सर्व पैलू, बरीचशी पात्र, त्यांचे दृष्टीकोन आणि सामाजिक पार्श्वभूमी आणि काही महत्वाच्या घटना या थेट आपल्या आजच्या वास्तवाचा भाग आहेत. त्यातला आशय हा जराही काल्पनिक वा अतिरंजित नाही. संकल्पना , निरीक्षण आणि निष्कर्ष या तिन्ही पातळ्यांवर, इन्व्हेस्टमेन्ट ही सत्यकथाच म्हणायला हवी. 
इन्व्हेस्टमेन्ट कथेतच तिची पटकथा दडलेली आहे. बाबा त्यांच्या विपुल लिखाणात अनेकदा साहित्यप्रकार काहीशा प्रायोगिक पध्दतीने मिसळून टाकतात. कधीकधी त्यात सोयीचा भाग असतो, म्हणजे विषय सुचला आणि अधिक तपशीलात काम करायला वेळ नसेल, तर तो एखाद््या सोप्या ( म्हणजे त्यांच्यासाठी सोप्या, हे जनरल स्टेटमेन्ट नाही) फाॅर्ममधे नोंदवून मग फुरसतीत त्याकडे पुन्हा वळायचं. उदाहरण द्यायचं, तर त्यांचं दादाची गर्लफ्रेन्ड नाटक, हे असं आधी कथारुपात केलेल्या टिपणावर आधारीत आहे. ( याची नोंद घेणं आवश्यक, की मूळ कथा सोय म्हणून लिहिलेली असली, तरी ती  कुठेही डफरावलेली नाही, हे ती पाहून कोणीही सांगू शकेल). किंवा कधीकधी ही साहित्यप्रकाराची मिसळ हा योजनेचा भाग असतो. लोककथा ७८ची हिशेबापलीकडे कलावंत असणारी आणि नाटकाचा सहा सात प्रसंगांचा फाॅरमॅट मोडीत काढून पटकथेसारखी दर चार पाच मिनिटाला प्रसंग आणि नेपथ्ययोजना बदलणारी तरीही प्रयोगात अत्यंत बंदिस्तपणे उभी राहू शकणारी संहिता , हे उदाहरण. इन्व्हेस्टमेन्टही अशी पटकथा म्हणून दिसलेली, पण मुळात कथारुपात लिहीलेली गोष्ट आहे. कथेचं निवेदन प्राची करते, त्यामुळे तिचा दृष्टीकोन वाचकाला फस्ट हॅन्ड कळतो, मात्र त्यामुळे आई आणि आशिष हे इतर दोन दृष्टीकोन लपत मात्र नाहीत. उलट तिच्या बोलण्याच्या शैलीतच  ते स्पष्ट होतात. हे तीन दृष्टीकोन इन्व्हेस्टमेन्टच्या केंद्रस्थानी आहेत. खरी गोष्ट ही या दृष्टीकोनांचीच आहे.
आशिष आणि प्राची हे स्वतःच्या प्रगतीची स्वप्नं पाहाणारं आधुनिक जोडपं, त्यांच्या तालमीत तयार झालेला त्यांचा मुलगा सोहेल आणि आशिषची जुन्या पारंपारिक विचारांना मानणारी आई या यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा. मी जेव्हा मूळ कथा  एेकली ,तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते हे की यातला सोहेल हा इन्सिडेन्टल आहे. त्याची योजना एखाद्या कॅटॅलिस्ट सारखी आहे. तो जे काही करतो, ते महत्वाचं नाही, तर त्याच्या वागण्यामुळे जे दृष्टीकोन समोर येतात तेच खरे महत्वाचे. ( हे माझं मत कथा एेकल्यावर होतं!  आजच्या वर्तमानपत्रांना वाचून ते बदललं नाही तरच नवल ! आज मी सोहेलच्या पात्राला केवळ कॅटॅलिस्ट मानत नाही, तर बाबांना तेव्हा भविष्याची चाहूल लागली होती, असं मानतो!) .
गोष्ट दिवाळी अंकात आली आणि त्या वर्षीच्या महत्वाच्या कथांमधे ती गणली गेली. बाबांना जसे अभिनंदनाचे फोन आले, तसेच कथेवर काही करु पाहाणार््या चित्रपट दिग्दर्शकांचेही आले. मात्र ती बाहेर द्यायची नाही हे आधीच ठरलेलं होतं. काही विषय हे फार संवेदनशील असतात. ते मांडणार््या कथा-पटकथांचा तोल हा अतिशय महत्वाचा असतो, जो ढळला तर सारच निरर्थक वाटू शकतं. आणि हा तोल ठरवतो तो दिग्दर्शक. एकदा कथा/पटकथा त्याच्या हवाली केली की लेखकाचं त्यावरचं नियंत्रण संपतं. त्यामुळे यावर चित्रपट करायचा तर आपणच करायचा हे ठरवलेलच होतं.  बाबांनी लवकरच पटकथा लिहून ठेवली, आणि आम्हाला वाचूनही दाखवली.
इन्व्हेस्टमेन्टची कथा आणि पटकथा यात एक छोटा पण महत्वाचा फरक आहे. कथेची निवेदक प्राची आहे, त्यामुळे वाचक तिच्या चष्म्यातून सारं बघतो. चित्रपटात मात्र प्रेक्षकांची प्रतिनिधी प्राची नाही. आशिष आहे. यातल्या तीन प्रमुख वैचारिक भूमिकांत खूपच फरक आहे. प्राचीचा व्यक्तीगत प्रगतीवर विश्वास आहे. म्हणजे तिची अन तिच्या जवळच्या माणसांची प्रगती. या प्रगतीच्या आड कोणी येणं तिला मान्य होणार नाही. कोणत्याही नाॅर्मल कुटुंबातल्या जबाबदार पत्नीसारखं तिचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि ते सुरक्षित ठेवणं तिला सगळ्यात महत्वाचं वाटतं.अॅट एनी काॅस्ट. तिच्या उलट बाजूला आहे ती आशिषची आई. ती जुन्या रूढी आणि संस्कारांना धरुन आहे. आपल्या नितीमत्तेच्या कल्पना ती सोयीस्करपणे बदलू शकत नाही. आशिष या दोघींच्या मधला आहे. तो दोघींनाही समजू शकतो. तो प्रगतीचं मूल्यही आेळखतो आणि संस्कारांची किंमतही जाणतो. पण त्यामुळेच त्याच्यापुढले निर्णय अधिक कठीण आहेत. या दुहेरी जबाबदारीत त्याची थोडी फरफटही होते कधीकधी. पटकथेत त्याला असलेलं महत्व चित्रपटाचा तोल ठेवण्यासाठी योजलेलं आहे.
या चित्रपटाबद्दल एक गंमत अशी की त्यात दोन वेगळ्या शैली एकत्र येतात. एका बाजूने तो खूप वास्तववादी तपशीलांना एकत्र करतो. अगदी आपल्या सर्वांच्या वागण्या बोलण्यातले तपशील, संवादातले तपशील . दृश्यभागातही हेच . घरापासून स्मशानापर्यंत प्रत्येक प्रसंग लोकेशनवर चित्रीत केला आहे , आणि खरेपणा टिकवण्यासाठी मेक अप पासून प्रकाशयोजनेपर्यंत दर ठिकाणी विचार केलेला आहे. त्यामुळे हे रिअॅलिझमचं स्कूल इथे काही अंशी जरुर आहे. याउलट आशयात मात्र पटकथा तशी थेट वास्तववादी नाही. ती सीलेक्टीव आहे. ती मघा सांगितलेल्या दृष्टीकोनांना प्रामाणिक राहून त्यांच्यातल्या संघर्षाला समोर आणते. यासाठी एक साधी योजना आहे. अनावश्यक गोष्टी, प्रसंग दाखवायचेच नाहीत, जे या दृष्टीकोनाना डायल्यूट करतील. वास्तववाद म्हणून नाही वा इतर कोणत्या कारणासाठीही नाही. पटकथेला जे म्हणायचय ते अतिशय स्पष्ट आहे. हा स्पष्टपणा काॅम्प्रोमाईज करेल किंवा प्रेक्षकाला उगाच संभ्रमात पाडेल असं काही (वास्तववादाच्या किंवा व्यक्तिरेखांना ढोबळ खोली देण्याच्या नावाखाली) वापरायचं नाही. यामुळे हा  चित्रपट वास्तववाद आणि 'सिनेमा विथ अॅन अजेन्डा', यांच्या मध्यावर आहे. हे निरीक्षण आउट आॅफ द हॅट केलेलं नाही. पटकथा हा त्याचा पुरावा आहे. ते पडताळून घेणं सहज शक्य आहे.
मला आणि सुप्रियाला कधीकधी कोणी विचारतं की बाबांबरोबर काम करण्याचा काय अनुभव, तर यात काही नवीन सांगण्यासारखं नाही कारण आम्ही कायमच त्यांच्याबरोबर काम करत आलो आहोत. वेगवेगळ्या टोप्या बदलत. सुप्रिया प्रामुख्याने अभिनेत्री आणि नंतर वेशभूषाकार म्हणून, मी मुलांच्या नाटकात अभिनेता म्हणून, नंतर काॅलेजपासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून , ( साटं लोटं नाटकाच्या १९९५ मधल्या अमेरिका दौर््याला म्युझिक आॅपरेटर म्हणूनही) गहिरे पाणी मालिकेच्या काही भागांना त्याच्या संहितांचा दिग्दर्शक म्हणून आणि इन्व्हेस्टमेन्टला सहदिग्दर्शक म्हणून. खरं तर आमचा बराचसा घरातला वेळही एकत्र काम करण्याचा असतो असं म्हणता येईल, कारण काही ना काही कामं ही चालूच असतात. आई बाबांचे नवे प्राॅजेक्ट्स असतात ,नवं लिखाण वाचून दाखवलं जातं त्यावर चर्चा होतात, त्यांच्याहून खूपच कमी प्रमाणात माझं़ आणि सुप्रियाचं लिखाणही चर्चेला पडतं. या चर्चांमधे आई, आणि पल्लवी (माझी पत्नी)चाही सहभाग असतो. या घरातल्या इन्टरॅक्शनचच एक्स्टेन्शन म्हणूनच चित्रपटाकडेही पाहाता येईल.
इन्व्हस्टमेन्टची संहिता खूप आधी तयार होती. त्यामुळे कामाला लागण्याआधीच बहुतेक सगळं ठरलेलं होतं.  कास्टमधल्या अनेकांबरोबर आम्ही आधी काम केलेलं होतं. अमोलबरोबर काम करण्याचा अनुभव नवा होता पण तो इतक्या चटकन ग्रुपमधे सामील झाला की तो आधीपासूनच आमच्याबरोबर काम करत असावा असं वाटावं. स्क्रिप्टवर आधी काम झालेलं होतं, पण आम्हाला ते पेपरवर शंभर टक्के ठरवायला आवडत नाही. तशानं त्याची उस्फूर्तता कमी होऊ शकते आणि सिनेमॅटोग्राफर च्या सहभागालाही मर्यादा पडते. त्यामुळे आधी ठरवलेले आराखडे बेस म्हणून वापरणं, रिहर्सल्स, करुन पाहाताना काही नव्या गोष्टींची भर पडू शकते का पाहाणं, अमोलशी डिस्कशन या सगळ्याचा चित्रीकरणात भाग होता. कलावंतांपैकी सारे, म्हणजे तुषार दळवी ,सुप्रियापासून लहान पण लक्षात राहाणार््या भूमिकेतल्या भाग्यश्री पाणेपर्यंत सारेच कलावंत स्टेजचे होते, त्यांना प्रयत्नाचं गांभीर्य होतं आणि तयारीही.
इन्व्हेस्टमेन्ट बनवताना आम्हाला जराही त्रास झाला नाही. यानिमित्ताने आमच्या टीममधे मोलाची भरच पडली. सहनिर्माते म्हणून उभे राहाणारे मंदार वैद्य आणि अनिश जोशी, आमच्याबरोबर आधी काम न केलेला पण बारीक सारीक गोष्टींचा सतत विचार करणारा संकलक सागर वंजारी, साउंड डिझाईन साठी पुष्कळ कष्ट घेणारे दिनेश उचील आणि शंतनू अकेरकर यांच्याशी आमची छान मैत्री झाली. संगीताची बाजू सांभाळणारा माधव विजय ( आजगावकर ) तर आमच्या नात्यातला आणि गहीरे पाणी पासून आमच्याबरोबर काम करत असलेला आहे. आमच्या चित्रपटात गाणी नसल्याने त्याच्या स्कोपला मर्यादा होत्या पण तसं असतानाही प्रेक्षक 'म्युझिक कोणाचं आहे?' असं विचारतात ते त्याच्या कामामुळेच. या सगळ्यात ओढले गेले, ते पल्लवी आणि  आमचा मित्र नितीन कुंभारे. त्यांचं निर्मितीदरम्यान सुरू झालेलं काम अजूनही चालू आहे.
इन्व्हेस्टमेन्टला पहिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तो त्याची प्रिव्ह्यू आवृत्ती मुंबई चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीकडे पाठवली तेव्हा आणि त्यानंतर अनेक ठिकाणी तो फिरुन आला. असं एक कन्व्हेन्शन आहे, की चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षकांना आवडणारा चित्रपट काही वेगळा असतो. हे का, कोणाला माहीत ! मी स्वतः अनेक महोत्सवांना हजेरी लावली आहे आणि या मंडळींची आवड काही खास वेगळी असेल तर मला तरी ती दिसली नाही. मला या महोत्सवांमधे सर्व प्रकारचे लोक भेटलेले आहेत. आधीही आणि इन्व्हेस्टमेन्टच्या निमित्तानेही. ही सारी आपल्या नेहमीच्या पाहाण्यात असतात तशीच माणसं होती. आमच्या चित्रपटाबद्दल बोलताना या सार््यांची रिअॅक्शन कम्पेअरेबल होती, असं म्हणता येईल. न्यू याॅर्क इंडिअन फिल्म फेस्टीवलच्या डिरेक्टरपासून , चेन्नई महोत्सवातल्या थिएटरच्या डोअरकीपरपर्यंत बहुतेकांची.
इन्व्हेस्टमेन्ट हा काही मसाला चित्रपट नाही हे उघड आहे. हे लपवण्याचा आम्ही कुठेही प्रयत्न केलेला नाही. मात्र मसाला चित्रपट ही करमणुकीची व्याख्या आहे असं किती दिवस म्हणत राहाणार? शेवटी करमणुक म्हणजे काय, तर कलावस्तूने, मग ते नाटक असो वा चित्रपट, प्रेक्षकांना धरुन ठेवणं, त्यांना गुंतवणं, विचार करायला लावणं. हे इन्व्हेस्टमेन्ट करु शकतो हे त्याने छोट्या पातळीवर सिध्द केलेलं आहे. आम्ही २० सप्टेम्बरला चित्रपट प्रदर्शित करतो आहोत खरे, मात्र वितरणाचा आम्हाला तसा प्रत्यक्ष अनुभव नाही. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळूनही या प्रांतात आम्हाला मदत करण्यासाठी कोणी पुढे झालेलं नाही. आम्ही जे काही करतो आहोत ते पिकल एन्टरटेनमेन्टच्या सहाय्याने पण आमच्या जिवावर. चित्रपट प्रदर्शित करण्यामागे हेतू तो महोत्सवांपुरता मर्यादित न राहाता सर्वांपर्यंत पोचावा , त्याला त्याचा प्रेक्षक मिळावा हा आहे. तसा तो मिळतो का हे मात्र आमच्या प्रयत्नांइतकच प्रेक्षकांच्या प्रतिसादावरही अवलंबून आहे.
-गणेश मतकरी

1 comments:

attarian.01 September 16, 2013 at 8:44 AM  

Best of luck.....................................मी तुमची दिग्दर्शक होण्याची खूपच दिवसापासून वाट पाहत होतो .... नक्की पाहीन...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP