पॅरासाईट - भेदक वास्तवाचं प्रत्ययकारी चित्रण

>> Sunday, February 2, 2020




सूचना- लेखात भरपूर स्पाॅयलर्स आहेत. चित्रपट पहाण्याआधी अजिबात वाचू नये

बाॅन्ग जून-हो चा पॅरासाईट हा विषयाकडे पाहून एका विशिष्ट वर्गात बसवणं फार कठीण आहे. पहिला अर्धा भाग पाहिला, तर ती काॅमेडी आहे असं वाटतं. पुढे त्यात भय आणि रहस्याचा भाग शिरतो, आणि शेवटाकडे लक्षात येतं की आपण एक प्रगल्भ आणि भेदक सामाजिक आशय मांडणारा चित्रपट पहातो आहोत. हा जो आशय आहे, त्याची मूळं चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच आपल्यासमोर आहेत, पण ती इतक्या सफाईने लपवलेली आहेत, की आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवलेलच नाही. शेवटाच्या भागाकडे पाहून जर आपण मागे नजर फिरवली, तर ही सारी आशयसूत्र आपल्यापुढे उभी रहातात आणि आपल्या हे आधी कसं लक्षात आलं नाही, असं होऊन जातं. यातली सर्वात उघड गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटाचं शीर्षक, ‘पॅरासाईट’. सुरुवातीच्या काही भागातच याचा एक सरळ अर्थ आपल्याला लागतो. पण चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसा आपल्याला लागलेला अर्थ बरोबर होता, का चित्रपट त्याच्या पूर्णपणे उलट विधान करतोय या संभ्रमात आपण पडतो

मॅक्झिम गाॅर्कीच्या लोअर डेप्थ्सनाटकात तळघरात रहाणारी पात्र आहेत, आणि त्यांच्या रहाण्याच्या जागेतून त्यांचं सामाजिक उतरंडीत तळाला असणं, हे प्रतीकात्मक रितीने दाखवलेलं आहे. मूळ रशिअन नावाचं भाषांतर होतं, तेॲट बाॅटमअसं. आपल्याकडेही चेतन आनंदचानीचा नगर’ ( १९४६) हे त्या अर्थाने गरीबांचं समाजातलं स्थान, वस्तीच्या नावातूनच उभं करतो. त्यामुळे पॅरासाईटमधल्या मुख्य पात्रांचं तळघरात असणं, हे लगेच समजण्यासारखं आहे. हे आहे किम कुटुंब. चुंग-सूक (चान्ग हे-जिन) आणि की-टेक( साॅंग कांग-हो) हे आई वडील , की-वू ( चोय वू-शिकहा मुलगा आणि की-जोन्ग (पाक सो-डाम) ही मुलगी. पात्रांची आणि त्यांच्या परिस्थितीचीही आपली पहिल्या पाच मिनिटात ओळख होते. आई वडील बेकार आहेत, मुलांनी शिक्षणं सोडलेली. फोनची बिलं भरायलाही पैसे नाहीत. शेजाऱ्यांचा वाय फाय सिग्नल चोरुन कसंतरी इंटरनेट मिळतय. की-वूचा एक मित्र त्याला  -हाय( जाॅन्ग जी-सो) या श्रीमंत घरच्या मुलीला इंग्रजी शिकवण्याची संधी देऊ करतो आणि चित्रपटातल्या नाट्याला सुरुवात होते. -हाय चा बाप, पाक डाॅन्ग-इक (ली सुन-क्यून) हा व्हिडिओ गेम्स डेव्हलपर असतो, आणि कुटुंब एका प्रसिद्ध आर्किटेक्टने डिझाईन केलेल्या आधुनिक महालात रहात असतं. किम कुटुंबाचं तळघर हे या चित्रपटात जितकी महत्वाची भूमिका बजावतं, तितकाच हा पाक कुटुंबाचा महालही. ते घर जसं प्रतिकात्मक, तसच हेदेखील. खाली मोठा चौथरा देऊन उंचीवर बांधलेलं , आणि अंतर्भागात आपली रहस्य लपवणारं. या कुटुंबातला छोटा मुलगा -साॅन्ग ( जुंग ह्योन-जुन ) ला कलेची प्रचंड जाण आहे, असं त्याच्या आईचं , योन-ग्योचं ( चो येओ जाॅन्ग ) मत आहे. आणि त्याला चित्रकला शिकवण्यासाठी ती शिक्षक शोधतेय. -हाय ला शिकवण्यासाठी आलेला की-वू, आपल्या बहिणीला प्रसिद्ध कला प्रशिक्षक म्हणून चिकटवतो आणि एकेक करुन किम कुटुंबाचे सारेच सदस्य वेगवेगळ्या रुपात पाक कुटुंबात घुसतात. बाप ड्रायव्हर म्हणून लागतो, तर आई हाऊसकीपरची जागा घेते. त्यासाठी पाक कुटुंब या घरात रहायला येण्याआधीपासून कामाला असलेल्या हाऊसकीपरला ( ली जुंग-युन) योजनाबद्ध रीतीने काढावं लागतं, जी पुढे होणाऱ्या गोंधळाची नांदी ठरते

पॅरासाईटची रचना तीन अंक आणि एपिलाॅग अशी आहे. पहाताना, ती अगदी स्पष्ट कळणारी आहे. पहिला जो सेट अपचा भाग आहे, तो प्रामुख्याने किम कुटुंबाने पाक कुटुंबाच्या आयुष्यात ( आणि घरातही ) केलेल्या प्रवेशाबद्दल आहे, जो काही दिवसांच्या काळात घडतो. दुसरा आणि तिसरा अंक प्रमुख्याने दोन दिवसात जवळजवळ सलग घडतात. पाक कुटुंब कॅंपिंग ट्रिपसाठी गेलं असताना पावसाळी रात्री चाललेली किम कुटुंबाची पार्टी, आणि हाऊसकीपरचा प्रवेश इथे दुसरा अंक सुरु होतो, जो रात्रीच्या साऱ्या घडामोडीनंतर किम कुटुंबातल्या तिघांच्या घराबाहेर पलायन करण्याने संपतो. तिसरा अंक हा दुसऱ्या दिवशी पूरसदृश परिस्थिती ओसरत असताना पाक कुटुंबातल्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी, आणि सेलिब्रेशन या दरम्यान घडतो. हे अंक संपल्यावरची दोन पत्र हा एपिलाॅग आहे. किम कुटुंबातल्या बापाने मुलाला लिहिलेलं एक, तर मुलाने बापाला लिहिलेलं दुसरं. या पत्रांकडे वास्तववादी पद्धतीने पहाणं योग्य नाही. ती चित्रपटाच्या आशयाला टोक आणून देण्याचं काम करतात. मुलाने बापाला लिहिलेल्या पत्राचा शेवट विशेष आहे, आणि ते ज्या वाक्यावर आणि चित्रचौकटीवर संपतं, ती देखील. ती काय, हे मात्र मी इथे सांगणार नाही

पॅरासाईट चित्रपट हा अनेक आशयघटकांनी गच्च भरलेला आहे. त्यातले सगळेच आपल्याला प्रथमदर्शनी समजतील असं नाही, पण तो कथेपलीकडे साधारण तरी कळायचा, तर दोनदा तरी पहायला हवा. हे आशयघटक पटकन दिसण्याचं एक कारण म्हणजे त्याला एक व्यवस्थित, गुंतवणारं कथानक आहे, त्यामुळे आपण त्या कथेतच अडकून मेटॅफोरिकल गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता तयार होते. तरी बरं, त्यातलं एक पात्र वरवर साध्या गोष्टीमेटॅफोरिकलआहेत अशी आठवण आपल्याला पहिल्याच प्रसंगापासून सतत करुन देतंयात पहिल्यांदा ज्या गोष्टीला मेटॅफोरिकल म्हंटलं जातं, ती म्हणजे की-वू च्या मित्राने किम कुटुंबाला भेट दिलेला सुबत्ता आणणारा दगड. हा खरोखरच प्रतीकात्मक अर्थासह येतो आणि चित्रपटात अनेक प्रकारे वापरला जातो. ते प्रतीक तर आहेच, वरबी केअरफुल व्हाॅट यू विश फाॅरयासारखी धोक्याची सुचनाही त्यातून ध्वनित होते. मेटॅफोरिकल शब्दाचा वापर हा सुरुवातीला थोडी विनोदनिर्मिती जरुर करतो, पण जे दिसतय त्यापलीकडचे अर्थ पहाण्याबद्दलची ती छुपी सूचनादेखील आहे

वर्गभेद, खालचे आणि वरचे, सहन करणारे आणि अन्याय करणारे, यांमधली वाढती दरी हा चित्रपटाचा विषय आहे. पण तो मांडताना चित्रपट सोपी समीकरणं शोधत नाही. उदाहरणार्थ, पाक कुटुंब हे यात सधन , वर्चस्व गाजवणारं असलं, तरी चित्रपट त्यांना खलनायक म्हणून रंगवत नाही. त्यांच्या जगात ते योग्यच आहेत. त्यांचा दोष असलाच, तर त्यांना आपल्या जगापलीकडचं काही दिसत नाही, हाच असू शकेल. त्यांचा पैसा हीच त्यांची शक्ती आहे, आणि त्यांच्यासाठी सारे दरवाजे इतक्या सहज उघडतात, की रोजच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक त्यांना दिसूही शकत नाहीत.भयंकर पावसाने लोकांची घरंदारं बुडतात तेव्हा पाक कुटुंबातल्या आईला या पावसाचं अचानक येणं हे वरदान वाटतं. आकाश निरभ्र झालं आणि प्रदूषण गायब झालं, आता बागेत छान पार्टी होऊ शकेल , हे कारण तेवढ्यासाठी पुरे असतं. ती तिच्या नजरेआडच्या आपत्तीग्रस्त लोकांचं वाईट चिंतत नाही. पण ते तिला दिसतच नसल्याने, ती वाईट चिंतेल तरी कशीकिम कुटुंबातली दोन्ही मुलं अत्यंत हुशार आहेत. पण त्याला काॅलेज परवडत नाही, आणि तिला कलेची जाण, फोटोशाॅप सारख्या माध्यमांत हुशारी असूनही ती बेकार आहे. वर ही दोघं पाक कुटुंबातल्या सामान्य वकुबाच्या मुलांना शिकवण्यासाठी राबतात. किम कुटुंबाच्या पोरांना भविष्य नाही, आणि पाक कुटुंबातल्या मुलांच्या यशाच्या आड त्यांचा वकुब येणार नाही

कलेचा आस्वाद घेणं हे श्रीमंतांचं काम. जगण्याचाच प्रश्न असलेले कसला आस्वाद घेणार आणि काय. एका महत्वाच्या प्रसंगात जुनी हाउसकीपर किम कुटुंबावर डाफरते. या सुंदर घराचं कलामूल्य त्यांना समजूच शकणार नाही म्हणते. तेव्हा तिचा नवरा तिला थांबवतो, आणित्यांना कसं कळेल?’ असं विचारतो. पाक कुटुंब येण्याआधीच्या काळातल्या फुरसतीच्या क्षणांबद्दल बोलतो, आणि तेव्हाच आपल्यालाही या कलेचं सौंदर्य जाणवलं, अशी आठवण काढतो. कष्टकरी समाजाचं धावपळीचं आयुष्य, आणि कलेला असलेला श्रीमंतांचा आश्रय, यावर ही टीका आहे. पॅरासाईट अशा विसंगतींवर भाष्य करतो, आणि  भयंकर संघर्षावाचून याला दुसरं उत्तर  नाही असा निष्कर्ष मांडतो

फोरशॅडोईंग, किंवा पूर्वसूचना देणं, यात सतत वापरलेलं दिसतं. पुढे महत्वाचे ठरणारे घटक चित्रपट सहज रितीने आधी समोर ठेवतो. त्यातले काही थेट उपयोगाचे, तर काही प्रतीकात्मक. वाॅकी टाॅकी घरी आणणं, किंवा पावसाची सुरुवात, या दोन्ही गोष्टींची सुरुवात साधी आहे, पण कथेत त्यांना पुढे खूप महत्व येतं. प्रतिकात्मक गोष्टींमधे साधेपणाने वापरलेल्या दोन गोष्टी म्हणजे नेटिवांना संपवून त्यांच्यावर राज्य करणाऱ्या गोऱ्यांचं कथानकात डोकवत रहाणं, आणि दुसरी गोष्ट आहे, तो वास. या दोन्हीविषयी थोडं अधिक सांगता येईल. रेड इंडिअन पहिल्यांदा डोकावतात ते की-वू पहिल्यांदा पाक कुटुंबाच्या घरी जातो तेव्हा. मुलाचे खेळातले बाण इथे आधी दर्शन देतात, मग त्याची आई त्यामागचं स्पष्टीकरणही देते. पुढेही मुलाचा खेळण्यातला रेड इंडिअन बनावटीचा तंबू येतो. असं करत करत शेवटी पार्टीदरम्यान होणाऱ्या नाटकापर्यंत आपण पोचतो ज्यासाठी दोन्ही कुटुंबांमधले वडील रेड इंडिअन वेष धारण करतात. हा संपूर्ण धागा आपल्याला अत्याचारी आणि अत्याचाराचे बळी यांमधल्या नात्याची आणि या संघर्षात स्वाभाविकपणेच येणाऱ्या हिंसेची आठवण करुन देतो. याला सोपा शेवट नाही, तडजोड नाही. अत्याचारमुक्त व्हायचं, तर अत्याचाऱ्यांच्या बाजूला जाणं हाच पर्याय असल्याचंही चित्रपटाचा शेवट सुचवतो

वास हा घटकही असाच सहज कथेत सामील होतो. छोट्या -साॅन्गच्या लक्षात येतं की त्याची चित्रकला शिक्षीका, ड्रायव्हर आणि हाऊसकीपर यांना एकसारखा वास येतो. तेव्हा वाटतं, की हे प्रकरण फक्त कथेतल्या रहस्याशी जोडलेलं आहे. पण ते तेवढं सोपं नाही. विचारांती समजतं की हा ते रहातात त्या ओलसर तळघराचा वास आहे. या तळघरासारखाच वास पाक कुटुंबाच्या तळघरालाही असणारच. त्यामुळे तिथे वस्तीला असलेल्यालाही तो असणार हे ओघानेच आलं. क्षणात हा वास त्या वर्गाचं प्रतीक बनतो. चित्रपट पुढे सरकतो, तेव्हा या वासावर इतर चर्चा होत रहातात. वाढदिवसाची तयारी करताना साॅन्गची आई ड्रायव्हर बनलेल्या की-टेक ला घेऊन बाहेर जाते तेव्हा तिचं खिडकीची काच खाली करणं, हे त्याचं टोक असतं. इतकं, की पुढल्या वेळी गार्डन पार्टीमधे जेव्हा -साॅन्गचा बाप जेव्हा वास सहन होऊन नाक धरतो, तेव्हा याचा कडेलोट होतो, आणि संघर्षाची ठिणगी पेटते

पॅरासाईटमधली घरं हा एक स्वतंत्र विषय आहे. किम कुटुंबाचं छोटंसं घर त्यातल्या छोट्या , कोंदट जागांमुळे लक्षात रहातं, त्याचबरोबर त्याच्या थेट तळागाळात, अर्धवट जमिनीखाली असण्यानेही. पाक कुटुंबाच्या घरात दोन्ही प्रकारचे अवकाश आहेत. मोकळं, आधुनिक, सुसज्ज घर, जे खालच्या दुर्लक्षित, कोणालाही दिसणाऱ्या तळघराच्या डोक्यावर बांधलेलं आहे. पाक कुटुंबाला तर त्या तळघराचा पत्ताच नाही, जसा त्यांना समाजातल्या खालच्या स्तराचाही पत्ता नाही. एका परीने हे घर, या अख्ख्या चित्रपटाचं सूत्र वास्तूकलेच्या भाषेत मांडतं. दोन्हीकडल्या तळघरातल्या रहिवाशांना  मात्र मदतीची सारखीच गरज आहे. हे रहिवासी आपल्या सुखवस्तू बांधवांना मदतीचाएसओएसपाठवतात, पण तो त्यांना समजतच नसल्याने, ती भाषाच त्यांना कळत नसल्याने तिथून मदत येण्याची शक्यताच शून्य. पावसाळी पुरात प्रेक्षकाच्या नजरेत या दोन्ही जागा एकत्र होतात त्या संकलनाच्या मदतीने, आणि एसओएस च्या मोटीफमधूनही. बंगल्यात दिव्याच्या उघडझापेमधून हा मोर्स कोडमधला संदेश प्रक्षेपित होतो, तर किम कुटुंबाच्या तळघरात असा प्रत्यक्ष संदेश कोणी देत नाही, पण तिथे फडफडणारी ट्यूबलाईट, ही त्याच परिस्थितीचं प्रतिबिंब दाखवते

चित्रपटातल्या अभिनयाबद्दल मी बहुधा कमीच बोलतो, कारण बहुतेक वेळा ही प्रेक्षकांना सहजच लक्षात येणारी गोष्ट आहे. इथेही ती येईल. यातले बहुतेक जण आपण कोरिअन चित्रपटांमधे पाहिलेले आहेत. इथली सर्वात अवघड भूमिका आहे, ती किम कुटुंबातल्या वडिलांची, कारण आपली परिस्थिती आहे तशी मान्य करुन आनंदात रहाणाऱ्या माणसापासून ते बंडासाठी शस्त्र उचलण्यापर्यंतचा प्रवास या व्यक्तीरेखेला दाखवायचा आहे. त्या भूमिकेला साॅंग कांग-हो ने फार वर नेऊन ठेवलय. जाॅइन्ट सिक्युरिटी एरीआ, सिम्पथी फाॅर मि. व्हेन्जन्स, मेमरीज ऑफ मर्डर, स्नो पिअर्सर, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून लक्षात राहिलेला हा अभिनेता आहे. नटसंचातल्या प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, पण तो सगळाच चित्रपटाच्या परिणामात भर टाकणाराच आहे

पॅरासाईट हे एका भेदक वास्तवाचं प्रत्ययकारी चित्रण आहे. म्हंटलं तर हा कोरीअन चित्रपट आहे, पण कोणत्याही समाजात या प्रकारची अदृश्य तळघरं असतातच. आपल्याकडेही आहेत. जागतिक सिनेमाचं हे प्रमुख सूत्रच आहे, की चित्रपट हा प्रादेशिक तथ्याशी, वातावरणाशी प्रामाणिक हवा, पण तरीही त्यातला आशय हा जगभर समजणारा हवा. त्या दृष्टीने बाॅन्ग जून-हो चा हा चित्रपट अस्सल जागतिक चित्रपट आहे. अनेकदा या प्रकारचे चित्रपट नुसतेच गंभीर असतात, किंवा मानवी नितीमूल्यांची चर्चा करणारे असतात. पॅरासाईट करमणूक करतो. आपल्या विचारांना चालना देतो, या व्यक्तीरेखांमधे आपल्याला अडकवतो, आपल्याला बाजू घ्यायला लावतो आणि तरीही कोणती बाजू योग्य आहे याकडे निर्देशही करतो. कदाचित गेल्या वर्षातला हा सर्वात महत्वाचा चित्रपट असेल.


गणेश मतकरी

Read more...

1917 - महायुद्धाचा साक्षीदार

>> Friday, January 24, 2020




जो साको या ग्राफिक नाॅव्हेलिस्टचं ‘द ग्रेट वाॅर’ नावाचं एक प्रसिद्ध नाॅव्हेल आहे, जे पहिल्या महायुद्धातल्या एका महत्वाच्या दिवसाचं चित्रण करतं. १ जुलै १९१६ हा तो दिवस, ज्या दिवशी फ्रान्समधे फ्रेंच आणि ब्रिटीश विरुद्ध जर्मन सैन्य यांच्यात साॅमच्या लढाईला सुरुवात झाली . खरंतर याला पारंपरिक अर्थाने ग्राफिक नाॅव्हेलही म्हणता येणार नाही कारण याला रुढार्थाने कथा नाही. ब्रिटीश सैन्याच्या बाजूने मांडलेलं हे युद्धाचं सलग चित्र आहे, जे सैनिकांच्या छावण्यांपासून सुरु होत पुढे सरकत युद्धभूमीपर्यंत जातं, बरोबर काळातला प्रवासही दाखवतं, वाचणाऱ्यालाही या रणधुमाळीत सामील करुन घेतं आणि युद्धात कामी आलेल्यांच्या शवांच्या दफनविधीशी येऊन थांबतं. या चित्रात खंड नाही, एकमेकांना जोडलेली ही एक फुटाची चोवीस पॅनल आहेत, जी आपण सलग उलगडून हे थरारक दृश्य पाहू शकतो. हे कथेबिगर पण प्रचंड तपशिलातलं पुढे सरकणारं लांबलचक चित्र आपल्याला युद्धाच्या कल्लोळात खेचून घेतं. सॅम मेन्डीसचा ‘1917’ पाहून मला पहिली आठवण या पुस्तकाची झाली.

हा सिनेमा आणि हे पुस्तक यांचा थेट संबंध नाही, पण कन्वेन्शनल कथेच्या आधाराशिवाय पहिल्या महायुद्धाचं अतिशय तपशिलात केलेलं चित्रण, आपण घटनेचे साक्षीदार असल्याचा प्रेक्षकावाचकाला अनुभव देणं, ही यांमधली जाणवण्यासारखी साम्यस्थळं आहेत.

चित्रपटातल्या घटना घडतात  त्या ६ एप्रिल १९१७ या दिवशी, फ्रान्समधे . ब्रिटीश बटालिअनमधल्या  ब्लेक ( डीन चार्ल्स चॅपमन ) आणि शोफील्ड ( जाॅर्ज मॅके ) या दोन सैनिकांवर एक कामगिरी सोपवली जाते. त्यांच्या छावणीपासून काही मैलांवर असलेल्या दोन ब्रिटीश तुकड्यांवर संकट आलय. १६०० सैनिकांसह या तुकड्यांनी ज्या जागेवर हल्ला करण्याची योजना आखलीय तो त्यांच्यासाठी रचलेला सापळा आहे, पण त्यांना याची कल्पना नाही. ब्लेक आणि शोफील्डनी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे अंतर पायी पार करुन तिथल्या सेनाप्रमुखाला चढाई रद्द करण्याची सूचना असलेलं पत्र पोचतं करायचं आहे. जर हल्ला झाला, तर मोठ्या संख्येने ब्रिटीश सैन्य कामी येईल हे निश्चित. ब्लेकचा भाऊ त्या तुकड्यांमधे आहे, आणि बातमी पोचली नाही, तर त्याचं  भवितव्य अनिश्चित आहे. ब्लेक कामगिरी स्वीकारतो, आणि दोघांचा प्रवास सुरु होतो.

चित्रपट म्हंटलं तर सत्य घटनेवर आधारीत आहे, म्हंटलं तर नाही. कारण तुकड्यातुकड्यांमधे घडलेल्या अनेक घटना एकत्र सांधून चित्रपटाचं जुजबी कथानक तयार केलय. ट्रेन्च वाॅरफेअर, किंवा जमिनीत खोदलेल्या चरांमधे सैन्याने दडून युद्ध करणं हे फार प्रभावीपणे चित्रपटात दिसलेलं नाही. पण इथे ते दिसतं. इथल्या सैन्याची अवस्था, वातावरण 1917 च्या सुरुवातीच्या भागात येतं. आपण ब्लेक आणि शोफील्डबरोबर पुढे जात रहातो आणि रिकाम्या छावण्यांपासून प्रत्यक्ष युद्धभूमीपर्यंत अनेक जागांचे, घटनांचे साक्षीदार होतो. प्रत्यक्ष युद्धाचा भाग यात कमी आहे, पण केवळ युद्ध दाखवणं हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. चित्रपटाला समोर ठेवायचाय तो एक जिवंत अनुभव. शंभर वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका युद्धात सहभागी होण्याचा.


‘1917’ पहाताना शाॅटमधे, प्रसंगात खंड नाही. संपूर्ण कथानक एकच सलग प्रसंग असल्याचा आभास इथे तयार करण्यात आला आहे.  अमेरिकन ब्युटी (१९९९) पासून स्कायफाॅल (२०१२)  पर्यंत अनेक नावाजलेले चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सॅम मेन्डीसने वापरलेल्या या क्लुप्तीबद्दल प्रेक्षकांमधे मतभिन्नता आहे. कोणी म्हणतं ती अनावश्यक आहे, चित्रपटाच्या कथनाला त्यामुळे मर्यादा पडते, तर कोणी तिचं वारेमाप कौतुक करतं. व्यक्तीश: मला ही योजना अतिशय चपखल वाटते. ही मांडणी तरुण पिढीला आपली वाटेलशी आहे, कारण तिचं स्वरुप गेमिंगच्या खूप जवळ जाणारं आहे. फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन शूटर्समधे या प्रकारची कथनशैली सरसकट वापरली जाते. तिथे तुम्हीच कथेतलं एक पात्र बनता आणि खेळात मांडलेल्या अनुभवविश्वाला सामोरे जाता. तिथेही कॅमेरा तुमच्याबरोबर असतो. दृश्य खंडीत होत नाहीत, तर तुमचा प्रवास सलग चालू रहातो. ‘ काॅल ऑफ ड्यूटी’ सारख्या युद्धावर आधारीत खेळांमधेही ती वापरली गेली आहे. अर्थात , केवळ तरुणांना परिचित असणं, एवढाच या शैलीचा फायदा नाही. या प्रकारच्या कथनात एक अर्जन्सीदेखील आहे. सोपवलेलं काम पुरं होईपर्यंत वाढत जाणारा ताण आहे. हा ताण चित्रपट तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्ही त्या प्रवासाचा एक भाग बनता.


या दिग्दर्शकीय क्लुप्तीत तांत्रिक सफाई असली , तरी तंत्र नवीन म्हणता येणार नाही. मेन्डीसने अधिक लांबी असलेले वेगवेगळे शाॅट्स घेतले आहेत, आणि ते चटकन लक्षात येणार नाहीत अशा जागा पाहून एकमेकांना जोडून हा सलग कथनाचा परिणाम साधला आहे. आपण लक्ष देऊन पाहिलं तर या जोडकाम असलेल्या जागा लपणार नाहीत ( उदाहरणार्थ जाॅर्जची नदीत उडी ) पण त्या जागा लपवणं गरजेचं नाही. केवळ घटनेत एकसंधता आणणं हाच या युक्तीमागचा हेतू आहे, जो साध्य होतो. २०१४ च्या ‘बर्डमॅन’ चित्रपटासाठी अलेहान्द्रो इन्यारितूनेही सीन्स स्वतंत्र चित्रीत करुन जोडले होते आणि एका शाॅटमधेच चित्रपट उलगडल्याचा आभास आणला होता, पण तिथलं जोडकाम अदृश्य रहाणारं नाही. ते लक्षात आणून देणं हाच त्या चित्रपटाच्या गंमतीचा भाग आहे. मेन्डीसची योजना ही इन्यारितूच्या चित्रपटापेक्षा वेगळी आहे. आल्फ्रेड हिचकाॅकने १९४८ मधे जेव्हा ‘रोप’ हा आपला पहिला रंगीत चित्रपट केला त्याची आठवण करुन देणारी आहे. एका घरात घडणाऱ्या रहस्यनाट्याला चित्रीत करताना त्याला हा सलग चित्रणाचा परिणाम साधायचा होता. तेव्हा तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे त्याने दहा मिनिटांच्या लाॅंग टेक्समधे चित्रण करुन ते लक्षात येणार नाहीसं जोडलं. आज प्रत्यक्ष लांब टेक्स शक्य असले, तरीही ‘1917’ मधे हिचकाॅक स्ट्रॅटेजीचीच आवृत्ती वापरली आहे. यातल्या प्रवासात येणाऱ्या काळ आणि अंतर यातल्या उड्यांसाठी हे चित्रण प्रत्यक्षात सुटं असण्याची गरज आहे. हे सारं एकत्र सांधताना आणि युद्धचित्रणातही व्हिजुअल इफेक्ट्सचा मोठा वापर असणं साहजिक आहे. पण हा वापर अदृश्य आहे. पहाताना कुठेही काय चित्रीत केलय आणि काय डिजीटली उभं केलय हे लक्षात येत नाही, यातच या तंत्रज्ञानाचं यश आहे.


मी काही रिव्ह्यूजमधे असं वाचलं की चित्रपटाचं तांत्रिक अंग उत्तम आहे, पण चित्रपटातून फार काही हाती लागत नाही. काय हाती लागावं अशी आपली अपेक्षा आहे ? चित्रपट तुम्हाला देऊ करतोय तो एक अस्सल अनुभव आहे . तो तुम्हाला तुमच्या बसल्या जागेवरुन उचलून शंभर वर्षापूर्वी झालेल्या एका युद्धाच्या मध्यभागी नेऊन ठेवतो आहे, तिथल्या सैनिकांची मनस्थिती, त्यांचं जगणं दाखवतोय. हा अनुभव हे चित्रपटाचं उद्दीष्ट असू शकत नाही का ? त्याने दर खेपेला गोष्ट सांगायला हवी का ? संदेश द्यायला हवा का?

वाॅशिंग्टन डिसीला असलेल्या हाॅलोकाॅस्ट म्युझिअम मधे आपण गेलो, तर एका ठिकाणी बुटांचा खच पडलेला आपल्याला दिसतो.हे बूट छळछावण्यांमधे मारल्या गेलेल्यांच्या पायातले. दुसरीकडे एका पुलावरुन जाताना वरपासून खालपर्यंत लावलेले असंख्य फोटो आपल्यापुढे येतात. हेदेखील अन्यायाने मारल्या गेलेल्या ज्यूंचे. हे पाहून आपण म्हंटलं की बूट आणि फोटो कशाला दाखवले, त्यापेक्षा आम्हाला काय घडलं ही गोष्ट सांगितली तर पुरे आहे, तर ते योग्य ठरेल का ?  ऐकीव माहितीपेक्षा अधिक परिणाम करण्याची ताकद त्या फोटोंमधे आणि त्या बुटांच्या ढिगाऱ्यातच आहे, कारण ते तुम्हाला साक्षीदार बनवतात. कधीकाळी अमुक अमुक  घडलं, इतकं सांगून न थांबता जे घडलं त्याला तुमच्या अनुभवविश्वाचा थेट भाग बनवतात. 1917  आपल्याला एक शतक मागे  टेलिपोर्ट करतो. ते सैनिक ज्या प्रसंगाला सामोरे गेले, तेच तुमच्यापुढे ठेवतो. तुम्हाला विश्वासात घेतो.  तिथल्या चिखलाचा सडा, रिकामे ट्रेन्चेस, कुजणारी माणसांची, प्राण्यांची प्रेतं, गावांचे उध्वस्त अवशेष, यांमधूनच हा चित्रपट बोलतो. ते आपण ऐकू शकतो का , हा खरा प्रश्न आहे !
--  गणेश मतकरी

Read more...

तानाजी - इतिहासाचा रंजक अर्थ

>> Friday, January 10, 2020



इतिहासकार इ एच. कार म्हणतात, की ऐतिहासिक सत्य, ही काही कोळणीने आपल्या पाटीवर नीट मांडून ठेवलेल्या माशांसारखी नसतात, त्याऊलट ती एका कदाचित आपण पोचूही शकणार नाही अशा एका महासागरात सुळकन पोहणाऱ्या जिवंत माशांसारखी असतात. इतिहासकार कोणत्या सत्यापर्यंत पोचतो यात काही वेळा अपघाताचा भाग असू शकतो, पण बहुधा ते अवलंबून असतं, ते तो या महासागराच्या कोणत्या भागात गळ टाकायचं  ठरवतो, आणि त्यासाठी कोणती साधनं वापरतो यावर. या दोन्ही गोष्टी ठरतात, ते अर्थातच त्याला कशाचा शोध आहे यावरच. इतिहासकाराला जे हवं आहे, ते बहुधा त्याला मिळू शकतं, कारण शेवटी इतिहास म्हणजे काय, तर अन्वयार्थ.

तानाजी- द अनसंग वाॅरीअर चित्रपटाचं थोडंसं असच आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आणि पटकथाकार प्रकाश कापडिया ( ओम राऊत सह ) , यांनी तानाजीची कथा, ही इन्टरप्रिट केलेली आहे. त्याचा अर्थ, त्यांना उमजेल अशा, आणि प्रेक्षकांच्याही पचनी पडेल अशा पद्धतीने लावलेला आहे. ती प्रत्येक वेळी आपण ऐकलेल्या तानाजीच्या प्रसिद्ध कथेशी जुळते का, तर अर्थातच नाही. पण त्यातला बराच भाग ; म्हणजे प्रामुख्याने तानाजीचं व्यक्तीमत्व आणि ती ऐतिहासिक चढाई याबद्दलचा भाग, हा इतिहास आणि चित्रपटीय तर्कशास्त्र या दोन्हीच्या सामायिक चौकटीत पटण्याजोगा झालेला आहे. आणि मी म्हणेन की हेच चित्रपटाचं यश आहे.

मागे मी हिरकणी चित्रपटाबद्दल लिहिताना असं म्हणालो होतो, की मूळची आख्यायिका, ही चित्रपटाची पूर्ण लांबी भरण्यासाठी पुरेशी नाही, त्यामुळे तिला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती एक पटेलशी कथा रचणं आवश्यक होतं, किंवा त्या घटनेलाच तपशीलात रंगवून चित्रपट भरायला हवा होता. तानाजी काही प्रमाणात या दोन्ही गोष्टी करतो. आपण लहानपणी ऐकलेली कथा , ही प्रामुख्याने कोंढाणा परत मिळवण्याची निकड आणि चढाई, या दोन घटनांशी जोडलेली आहे, आणि या केवळ दोन घटना, चित्रपटाची लांबी भरण्यासाठी पुरेशा नाहीत. मग तानाजीच्या लहानपणचा थोडा ( पुढल्या महत्वाच्या भागाला फोरशॅडो करणारा ) प्रस्तावनापर भूतकाळ, किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीने असलेलं महत्व मांडणारा भाग, आणि मोठा, प्रत्यक्ष चढाईआधीचा भाग, असे भाग चित्रपटात तपशीलवार मांडण्यात आलेले आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष चढाईच्या प्रसंगावरही आवश्यक तो वेळ घालवून तो चांगला रंगवला आहे.  या मांडणीमुळे चित्रपट अजिबात रेंगाळत नाही. पटापट पुढे सरकतो.  या सगळ्या भागात स्वत: तानाजी ( देवगण ) आणि किल्लेदार उदयभान ( सैफ ) यांच्या व्यक्तीरेखा तपशीलात रंगवलेल्या आहेत. हे करताना शेलारमामाच्या मूळ कथेत महत्वाच्या असलेल्या शेलारमामा या व्यक्तीरेखेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालय. विशेषत: ती शशांक शेंडेसारखा ताकदीचा मराठी अभिनेता करत असल्याने ते फार जाणवतं, पण आधी म्हणाल्याप्रमाणे दिग्दर्शकाने टाकलेला गळ हा त्याला इतिहासाच्या समुद्रातून काय शोधायचय, यावर अवलंबून आहे. शरद केळकरचा शिवाजी, काजोलची सावित्री, या तशा पुरक भूमिका आहेत. त्यांची लांबी अनावश्यक वाढवलेली नाही, ही चांगलीच गोष्ट आहे.

तानाजी आणि उदयभान या  दोन व्यक्तीरेखांचा एक प्राॅब्लेम असा, की त्या वास्तववादी पद्धतीने रंगवलेल्या नाहीत, तर प्रामुख्याने पारंपरीक मसाला हिंदी चित्रपटातल्या नायक आणि खलनायकांच्या माॅडेलवर त्या  खूपच आधारलेल्या आहेत. तानाजीचा मूळ कथेतला भागही त्यात उतरल्याने, त्या व्यक्तीरेखेच्या बाबतीत हा बाॅलिवुड हिरोईझम थोडा लपतो. खलनायकासमोर नाच, टाॅर्चर सीक्वेन्स, अशा तो ढळढळीतपणे पुढे आणणाऱ्या जागा आहेत, पण त्याकडे आपण इतर भागामुळे दुर्लक्ष करु शकतो. उदयभान म्हणून सैफ मात्र सगळा वेळ ‘सायको खलनायक’ मोडमधेच आहे. हा एक बरा दिसणारा गब्बर सिंग वाटावा अशी ही व्यक्तीरेखा रचली आणि सादरही केलेली आहे. या दोन्ही भूमिका चांगल्या अभिनेत्यांनी साकारल्याने आणि कथेत तुल्यबल मांडणी असल्याने, तसच, तानाजीची वीरश्री या सर्वतून उत्तमरित्या अधोरेखित होत असल्याने याबद्दल आपल्या प्रेक्षकाला तक्रार असण्याचं कारण नाही. परंतु या भागात आपण इतिहासापेक्षा बाॅलिवुड लाॅजिकमधेच जातो हे नाकारण्यात काहीच मुद्दा नाही.

तानाजीवर केलेलं vfx चं काम, हा चित्रपटसंबंधातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि गेल्या काही वर्षांमधे, खासकरुन बाहुबलीपासून, आपली या क्षेत्रात कथित प्रगती सुरु असल्याने, त्याविषयी बोलणं आवश्यक आहे.व्हिजुअल इफेक्ट्सचं काम हे दोन प्रकारचं असतं, व्हिजुअलायजेशन आणि एक्झिक्यूशन. व्हिजुअलायजेशनच जर चांगलं नसेल, तर तांत्रिक काम कितीही चांगलं असेल तरी उपयोग नसतो, आणि तांत्रिक काम फसलं, तर व्हिजुअलायजेशनचा परिणाम कमी होतो. तरीही आपल्याकडे व्हिजुअलायजेशन अधिक सुधारणं, हे या घडीला आवश्यक आहे. तंत्रज्ञ आपल्याकडे आहेत, आणि वाटल्यास बाहेरुनही आणता येतात. हे काम कमी पडतं, ते मुख्यत: बजेट आणि आवश्यक त्या वेळाची कमतरता यामुळे. जे काही वर्षात आपोआप सुधारेल अशी शक्यता आहे. पण व्हिजुअलायजेशनचं  काय, जे संपूर्णपणे दिग्दर्शकाच्या कुवतीवर अवलंबून आहे, आणि त्यासाठी वेगळे पैसे पडत नाहीत ! तानाजीबद्दल एक समाधानकारक गोष्ट अशी म्हणावी लागेल, की त्यातला व्हिजुअलायजेशनचा भाग व्यवस्थित आहे. इफेक्ट्स साठी प्रसंगांची निवड ( बुद्धीबळ, तानाजीचा इन्ट्रो ) इथपासून त्यांचं स्टन्टबरोबरचं इन्टीग्रेशन , हे सगळं इथे  विचारपूर्वक आणलेलं आहे. तांत्रिक बाजूत मात्र ते अजूनही कमीच पडतात.

आता आपल्याकडे ‘भारतासाठी खूपच चांगलंय’ असं मानण्याची एक पद्धत आहे. शिवाय काही लोकांना अदृश्य vfx हा प्रकारच कळत नाही. त्यांना ते कळावेच लागतात. ते लक्षात आले, की मगच ‘ वा, काय काम केलय’ असं त्यांना वाटतं. या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. ज्याप्रमाणे चांगलं दिग्दर्शन हे दिग्दर्शक अदृश्य असण्यात आहे, तसेच चांगले vfx ते आहेत हेच ओळखू न येण्यात आहे. जे दिसतय ते आपल्याला खरच वाटायला हवं. ते तसं नसणार, हे मागाहून वाटायला हवं.

तानाजीचे पहिल्या भागातले इफेक्ट खूपच कळण्यासारखे आहेत. इतके, की ही काही परफाॅर्मन्सेस असलेली चांगली, पण ॲनिमेटेड फिल्म वाटावी. साध्या घोडदौडीसारख्या प्रसंगांपासून, स्थळं उभी करण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचा कधी आवश्यक, तर कधी उगाचच वापर आहे, आणि तुम्ही तरबेज प्रेक्षक असाल, तर प्रत्येक वेळी या जागा तुमच्या लक्षात येतील. एक चांगली गोष्ट म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या भागात इफेक्ट्सचा वापर वेगवेगळ्या प्रकारचा आहे. पहिला भाग अनेक गोष्टी एस्टॅब्लिश करत असल्याने, त्याला वाईड ॲंगल्स, लाॅंगशाॅट्स, स्थलदर्शन करणारी दृश्य, यांची अधिक गरज आहे. आपण जसे उत्तरार्धाकडे येतो, तसे आपण मानवी स्केलकडे येत जातो. चित्रपट अधिक इन्टीमेट होतो. स्टंट्सना, जे छान जमलेले आहेत ,  इफेक्ट्सहून अधिक महत्व येतं. लांबून पहाण्यापेक्षा, व्यक्तीरेखांचा आमनेसामने संघर्ष, अधिक दिसायला लागतो. आणि या जागी vfx जमून जातात. ते पहिल्या भागासारखे खटकत नाहीत. एकूण, हा चित्रपट या तंत्रज्ञानाकडे आशेने पहायला लावतो. पुढल्या काळात तंत्र आणि ते चांगल्या प्रकारे वापरणारे दिग्दर्शक, या दोन्हीकडून अपेक्षा ठेवावी असं वातावरण तयार करतो.

चित्रपटाने तुमच्यावर परिणाम केला का, हे ओळखण्याची साधी परीक्षा म्हणजे चित्रपट संपतेवेळी तुम्ही यातल्या प्रमुख व्यक्तीरेखेबरोबर कितपत आयडेन्टीफाय करु शकता, ही आहे. तुम्हाला होणारा आनंद, दु:ख, किंवा काहीच न वाटणं, यावरुन ते लक्षात येतं. तानाजी माझ्या मते त्या दृष्टीने यशस्वी आहे. ओम राऊतचा हा दिग्दर्शक म्हणून दुसराच सिनेमा आहे. लोकमान्य नंतरचा. आणि दोन चित्रपटांमधून दिसलेलं काम पाहिलं तर त्याला खूपच प्राॅमिसिंग दिग्दर्शक म्हणायला हरकत नाही. निव्वळ काम म्हणूनही, आणि पहिलं आणि दुसरं या दोन पावलात दिसलेल्या प्रगतीसाठीही. आता तिसरं पाऊल अधिक अवघड होणार हे झालच, पण त्याची प्रतिक्षा करायला हरकत नाही.

-  गणेश मतकरी

Read more...

संमिश्र परिणामांचा धुरळा

>> Monday, January 6, 2020



सिनेमा वेळेवर पहाण्याचे काही फायदे असतात आणि काही तोटे. पहिला फायदा हा, की फिल्म तुमच्यापुढे मिस्ट्रीसारखी उलगडते. अगदी सोशल फिल्मसुद्धा. तुम्ही त्याबद्दल काही मत बनवलेलं नसतं. जे पहायला मिळतं ते सरप्राईज असतं. अशा वेळी इम्पॅक्ट हा एनहान्स्ड असू शकतो. फिल्म खूप आवडू शकते, किंवा उलट. फिल्म थोडी नंतर पाहिली की तुमच्या कानावरुन मतं गेलेली असतात, रिव्ह्यू ऐकलेले असतात, काही अपेक्षा तयार झालेल्या असतात. ज्यांचा उलटा परिणामही होऊ शकतो. मला स्वत:ला फिल्म पहाण्याआधी तिच्याबद्दल माहिती असणं अधिक आवडतं. कारण त्यामुळे तुम्ही फिल्म जागरुकपणे पहाता. शक्य तितकं निरपेक्ष रहाण्याचा प्रयत्न मात्र अशा वेळी करावा लागतो.

धुरळाबद्दल मी अगदीच निरपेक्ष होतो असं म्हणता येणार नाही. समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन हे दिग्दर्शक - लेखक मला आवडणाऱ्या चित्रकर्मींपैकी आहेत, आणि त्यांच्याकडून तशीही अमुक एक अपेक्षा असतेच. जोडीला महत्वाकांक्षी विषय, स्टार वर्गात मोडणारा चांगला नटसंच आणि खूपच चांगले रिव्ह्यूज यावरुन अपेक्षा तयार होणारच. या सगळ्या अपेक्षा फिल्मने पुऱ्या केल्या का ? त्याकडे आपण येऊच.

अनेक रिव्ह्यूज आल्याने , मी कथानक सांगत बसत नाही. एवढच सांगतो, की गावच्या लोकप्रिय सरपंचांच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या इतरांनी त्यांची जागा घेण्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून कुटुंबात पडत गेलेली फूट याबद्दलचा हा चित्रपट आहे. त्याला कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन बाजू आहेत, ज्यांच्या मिश्रणातूनच त्यातलं नाट्य तयार होतं.

पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी की फिल्म सरळच पहाण्यासारखी आहे.कारण ती काहीतरी महत्वाकांक्षी अटेम्प्ट करते. सिंहासनशी तुलना व्यर्थ आहे, पण पुरेशा गंभीरपणे राजकारणावर नजर टाकणारे चित्रपट आपल्याकडे होतच नाहीत. धुरळा ग्रामीण राजकारणातल्या अनेक बाजू पुरेशा गंभीरपणे मांडायचा प्रयत्न करतो. आणि ते करताना तो आपला मानवी चेहरा घालवत नाही. अल्टीमेटली तो एका कुटुंबाचा चित्रपट रहातो. हे करताना तो आपला सेन्स ऑफ ह्यूमर शाबूत ठेवतो, नाट्यपूर्ण जागा शोधतो, अनेक चांगल्या कलावंतांसाठी प्रसंग तयार करतो, हे सगळं तो पहाण्यासाठी पुरेसं आहे. पण हे करताना, त्याच्या काही मर्यादाही आहेत.

सर्वात पहिली मर्यादा म्हणजे त्यात खूप अधिक व्यक्तीरेखा आहेत आणि त्याची लांबी ( जवळपास तीन तास) अनावश्यक  वाटेलशी मोठी आहे. आता ही लांबी नुसतीच , घटनांशिवाय आहे, असं नाही. चित्रपट घटनाप्रधान आहे, शह काटशह, चाली प्रतिचाली, याचा खेळ यात सतत आहे. पण त्याला इनेविटेबिलिटी नाही. कथेची गरज आणि त्या प्रमाणात वेळ, हे गणित इथे गोंधळलय असं मला वाटतं. अशाच प्रकारे चित्रपट आणखी तासभरही चालू शकतो, किंवा तो अर्धा तास कमीही होऊ शकला असता. मग इथेच का संपला, याला काही कारण नाही. सरपंचपदासाठी होणाऱ्या निवडणूकांना चित्रपटात फार महत्व आहे. पण त्यासाठी निश्चित टाईमलाईन, आणि त्या जवळ येण्यानुसार बदलता वेग, हे स्पष्ट असण्याची गरज होती. ते इथे पुरेशा ठळकपणे दिसत नाही. त्याऐवजी नुसताच प्रचार बरीच जागा खातो.

दुसरी गोष्ट म्हणजे एका कुटुंबातले सगळे ‘उभे’ असणं ही चमत्कृती आहे, पण त्यातच चित्रपटाचा पॅराडाॅक्स आहे. तो कोणता , हे सोनाली कुलकर्णीच्या व्यक्तीरेखेच्या तोंडून एकदा बाहेर येतं, पण चित्रपट ते पुरेशा गांभीर्याने घेत नाही. स्पाॅयलर नको , म्हणून मी तो उल्लेख इथे करत नाही, पण लक्ष दिलत तर तुम्हालाच समजेल. चित्रपटातल्या अनेक घटना, या सोयीस्करपणे होतात. ( उदा हणमंतच्या पार्टीतलं विघ्नं ) त्या होतात कारण चित्रपटाला अमुक मुद्दा गाठायचाय , असं वाटतं, बरेचदा ते स्वाभाविक वाटत नाही. चित्रपटाचा शेवट याचं खूपच ठळक उदाहरण आहे. तो प्रिची होतो, ढोबळ होतो. एकाच वेळी तो गडद आहे असं भासवतो, पण प्रत्यक्षात तो कथानकाचा गडदपणा कमी करतो, व्यक्तीरेखांना रंगसफेदी करतो.

चित्रपटाचा पहिला भाग हा बराच लांबल्यासारखा वाटतो. त्यात बहुतेक व्यक्तिरेखांचे तपशील येतात. काही घटनांचेही. बॅक स्टोरी येते. हे सारं कदाचित कादंबरीत अधिक छान वाटलं असतं,( ती अजूनही लिहिण्यासारखी आहेच. बालगंधर्व चित्रपटात सारे तपशील नीट न वापरता आल्यावर अभिराम भडकमकरने ते कादंबरीत वापरले तसं. ) पण चित्रपट त्याला गरजेएवढा वेळ देऊ शकत नाही, आणि परिणामी हे वरवरचं वाटतं. दुसरा भाग अधिक आटोपशीर आहे. या भागात चित्रपट बराच सावरतो. मला असंही वाटलं की चित्रपटातला विनोदी भाग गाळून तो गंभीर केला असता, तर अधिक प्रभावी वाटला असता. स्वतंत्रपणे पाहिलं तर तो गंभीरच आहे. महत्वाकांक्षेतून ओढवणारा नाश असा खास शेक्सपिअरन अंडरकरन्ट त्यात आहे, वर दोन व्यक्तीरेखांचे ट्रॅक्स तर खासच शोकांताकडे झुकताना दिसतात. संवादातून विनोदाचं टेक्श्चर टिकवण्याचा आग्रह, कोणतीच गोष्ट गडद होऊ देत नाही. त्यामुळे खूप हसवणाऱ्या काही जागा असूनही ते अनावश्यक वाटतं.

कामांबद्दल बोलायचं, तर सई ताम्हनकर आणि तिच्या खालोखाल अलका कुबल, यांची कामं मला खासच आवडली. दोघींनिही आपलं बरचसं करीअर पोटेन्शिअलपेक्षा उथळ भूमिकांमधे घालवलं आहे, त्यामुळे चांगल्या भूमिकांमधे त्या दिसणं विशेष वाटतं.अंकुश चौधरीचा स्क्रीन प्रेझेन्स आहेच, भूमिकेला लांबीही आहे, पण भूमिका त्यामानाने सपाट आहे. इतर लोक छोट्या प्रसंगातही छाप पाडून जातात, ( विशेषत: अमेय वाघ )तसं त्याच्या भूमिकेत होत नाही. प्रसाद ओकच्या भूमिकेचं टोक पुढे संहिताच बोथट करुन ठेवते. बाकी सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत, पण ती त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांनुसारच.

एकूणात सांगायचं, तर धुरळा , हा एक फर्मली चांगला प्रयत्न म्हणण्याजोगा, पण पोटेन्शीअल पूर्णपणे वापरता न आलेला सिनेमा आहे. त्यात प्रेक्षकांचा विचार आहे. ढोबळ नाट्यमय जागा, विनोद, टाईपकास्टींग, स्टार्सचा वापर यात तो दिसतो. असा प्रेक्षकांचा विचार करण्यात फार गैर काही नाही. अखेर हा व्यावसायिक सिनेमा आहे. महोत्सवांना डोळ्यापुढे ठेवून बनवलेला नाही. पण त्यामुळे जर परिणामाशी तडजोड होत असेल तर ते टाळायला हवं. कारण विनोद वगैरे आणूनही प्रत्यक्षात तो सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोचतोय असं चित्र मात्र पहायला मिळत नाही. याला आपल्या प्रेक्षकांच्या मर्यादा हे एक कारण आहे. पण तेवढच कारण नाही.

समीर विद्वांसच्या चांगल्या चित्रपटांपैकी धुरळा म्हणता येईल, पण डबल सीट आणि आनंदी गोपाळ हे परिणामात उजवे असणारे त्याचे चित्रपट आताही धुरळाच्या वरचीच जागा राखून आहेत. धुरळा हा बनवण्यासाठी या दोघांहून कठीण नक्कीच आहे. पण परिणामात तो या दोघांपेक्षा कमी पडणारा आहे.

Read more...

स्कायवाॅकर सागाची अखेर

>> Saturday, December 21, 2019

मी काॅलेजमधे असताना मुंबईतल्या लिबर्टी थिएटरमधे/ किंवा क्वचित स्टर्लिंगला मॅटिनी शोजना काही जुन्या चांगल्या फिल्म्स लागायच्या. म्हणजे खूप जुन्या नाही, पंधरा वीस वर्ष जुन्या. ज्या मुळात आल्या तेव्हा आम्ही खूपच लहान होतो, आणि पुढे पहाण्याची संधी आली नाही. या काळात व्हीसीआर होते, पण मोठा स्क्रीन तो मोठा स्क्रीन. मी आणि माझा एक मित्र जमेल तेव्हा जाऊन या फिल्म्स पहायचो. क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काईन्ड, रेडर्स ऑफ द लाॅस्ट आर्क, वगैरे फिल्म्स मी अशा पाहिल्या. यातच कधीतरी मला मूळ स्टार वाॅर्स (१९७७, एपिसोड ४- ए न्यू होप) पहायला मिळाला. फिल्मबद्दल मला फार कुतुहल होतं. त्याबद्दल काहीकाही वाचलेलं होतं, ‘इन्डस्ट्रीअल लाईट ॲन्ड मॅजिक’ ( ILM) या जाॅर्ज ल्युकसने स्टार वाॅर्सच्या निर्मितीच्या निमित्ताने काढलेल्या आणि पुढे हाॅलिवुड गाजवणाऱ्या संस्थेबद्दल ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीत असलेल्या जाडजूड पुस्तकाची पारायणं झाली होती,  अगदी आपल्याकडे ग्रह युद्धे नावाच्या वाईट्ट शीर्षकासह केलेलं त्याचं नाॅव्हेलायजेशन म्हणा, किंवा इंग्रजी नाॅव्हेलायजेशनचा अनुवाद म्हणा ( लेखक बहुधा अरुण ताम्हणकर ) पण मी शाळेत असताना मिळवून वाचला होता. फाॅर्चुनेटली आता तो अजिबात आठवत नाही.

आम्ही पाहिलेली प्रिन्ट फारशी बरी नव्हती, किवा प्रोजेक्शन तरी खूप खास नव्हतं. त्यामुळे अंधारं, जुनं काहीतरी पहात असल्याचा इफेक्ट होताच. तराही दृश्य परिणाम थक्क करणारा होता. हे नव्या छान प्रिन्टनिशी कधी पहायला मिळेल, असं वाटून गेलं. पण जिथे खराब प्रिन्टसहदेखील एपिसोड ५ आणि ६ पहायला मिळेनात, तिथे नव्या प्रिन्ट कुठल्या मिळायला ! पण ही इच्छा लवकरच पुरी होणार होती. ल्युकसने केलेली त्रयी ही सुरुवातीपासून गोष्ट सांगणारी नव्हती हे तर सर्वांना माहीत होतच,  त्याच्या आगे आणि मागे असलेला कथाभाग सांगण्याची त्याची इच्छाही माहीत होती, पण ए न्यू होप (१९७७), द एम्पायर स्ट्राईक्स बॅक (१९८०) आणि रिटर्न ऑफ द जेडाय ( १९८३)  ही मूळ त्रयी संपवल्यानंतर त्या विश्वात घडणाऱ्या ॲनिमेटेड मालिका, काॅमिक्स, असले उद्योग करुनही, तो मूळ कथानक पुढे ( आणि मागे )  नेणाऱ्या फिल्म्सवर काही करण्याची चिन्ह अनेक वर्ष नव्हती. मग अचानक स्टार वाॅर्स कॅंपमधे काहीतरी हालचाल दिसायला लागली. १९९७ मधे मला महानगरमधे चित्रपटसमीक्षा करण्याची संधी मिळाली, तेव्हा रिव्ह्यू करायच्या पहिल्याच सिनेमाचं नाव मला अत्यंत आनंद देणारं होतं. ती होती एपिसोड चारची स्पेशल एडीशन. लगोलग या तिन्ही फिल्म्स उत्तम प्रिन्टमधे, आणि नव्या सुधारित आवृत्त्यांमधे पहाता आल्या, आणि त्याबद्दल लिहिताही आलं. लवकरच येऊ घातलेल्या इतर फिल्म्सकडे पहाण्याची मनाची तयारीही झाली.

१९७७ मधे सुरु झालेल्या या ‘स्कायवाॅकर सागा’ मधली अखेरची फिल्म, ‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’, काल प्रदर्शित झाली. तीन पिढ्यांचा इतिहास नऊ चित्रपटांमधून मांडणारी ही भव्य कहाणी  चार दशकांहून अधिक काळ घेत पडद्यावर उतरली. या चित्रपटांचा दर्जा क्षणभर बाजूला ठेवला, तरीही एकूण हा प्रकल्प पुरा करणं हे प्रचंड महत्वाकांक्षी काम आहे, हे कोणीही मान्य करेल. या मालिकेचे चहातेही काही पिढ्यांवर पसरलेले आहेत. काहींनी ते चित्रपट लागले तसे पाहिले , काहींनी केवळ नवी त्रयी मोठ्या पडद्यावर पाहिली, आणि आधीचा रिकॅप छोट्या पडद्यावर पाहून घेतला. काहिंनी चित्रपटाबरोबर कथा कादंबऱ्या, काॅमिक्स,मालिका यांमधून पसरलेल्या या विश्वाचीही माहिती करुन घेतली आहे. माझ्यापुरतं म्हणायचं, तर मी चित्रपटांचा फॅन आहे. ते सगळे  मी मोठ्या पडद्यावर पाहिलेले आहेत, आणि कालच्या चित्रपटाने स्कायवाॅकर कुटुंबाची कथा समाधानकारक रितीने शेवटापर्यंत आणली आहे, असं मी खात्रीने म्हणू शकतो.

या तीन चित्रत्रयींबद्दल ढोबळमानाने सांगायचं, तर म्हणता येईल की प्रिक्वल त्रयी ही प्रभावात थोडी कमी होती, विशेषत: त्यातला पहिला भाग, ‘एपिसोड १:  फॅन्टम मेनेस’ (१९९९)  , ज्यात छोट्या ॲनाकिन स्कायवाॅकरचं काम करणाऱ्या जेक लाॅईडवर खूप टिका झाली. त्याशिवाय जार जार बिन्क्स हे त्रासदायक ॲनिमेटेड कॅरेक्टर आणि एकूण चित्रपटाचा फार प्रभाव न पडणं, यामुळे फॅन्स नाराज ढाले. पण प्राॅडक्शन डिझाईनच्या बाबतीत चित्रपट ल्युकस आणि आयएलएमच्या किर्तीला शोभण्यासारखा होताच. कदाचित ल्युकस अनेक वर्षांनंतर , म्हणजे १९७७ च्या पहिल्या चित्रपटानंतर तब्बल बावीस वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळत असल्याचा हा परिणाम असेल, किंवा चाहत्यांच्या प्रचंड वाढलेल्या अपेक्षाही त्याला कारणीभूत असतील. पण ‘एपिसोड २: अटॅक ऑफ द क्लोन्स’ ( २००२ ) पासून गाडी वळणावर आली. असं असूनही, या तीनही त्रयी परस्परांपासून भिन्न भूमिका निभावतात, त्यामुळे अशी तुलना खरं तर करु नये या मताचा मी आहे. ल्युकसची मूळ गोष्ट ल्यूक स्कायवाॅकर ( मार्क हॅमिल), लिआ ( कॅरी फिशर ) आणि त्यांचा बेडर मित्र हान सोलो ( हॅरिसन फोर्ड)  , या तिघांनी एम्पायरविरोधात दिलेल्या लढ्याची आहे. वीर जेडाय योद्धे विरुद्ध क्रूर सिथ, या काळ्या पांढऱ्या बाजू या संघर्षातला महत्वाचा भाग आहे, आणि ‘फोर्स’ ही या विश्वात समतोल आणू शकणारी दैवी शक्ती आहे. पहिल्या त्रयीतच आपल्याला कळतं, की डार्थ व्हेडर हा एम्पायरचा प्रमुख सेनापती हाच ल्यूक आणि लिआचा बाप आहे, आणि डार्थ सिडीअस अर्थात पॅलपिटीनच्या हाताखाली तो विश्वावर कब्जा मिळवायचा प्रयत्न करतो आहे. स्कायवाॅकर भाऊबहीण आणि सोलो विरुद्ध एम्पायर, हा या संपूर्ण कथानकातला मध्यवर्ती संघर्ष आहे. पहिली त्रयी, ही ॲनाकिन स्कायवाॅकर या जेडायचं क्रूर डार्थ व्हेडरमधे रुपांतर कसं झालं याची गोष्ट सांगते, तर अखेरची त्रयी ही संघर्षाचा शेवट कसा झाला याबद्दलची आहे.

तिनही त्रयींमधे मधल्या चित्रपटांचं, म्हणजे अटॅक ऑफ द क्लोन्स (२००२, दिग्दर्शक जाॅर्ज ल्युकस ) , द एम्पायर स्ट्राईक्स बॅक (१९८०, दिग्दर्शक अर्विन कर्शनर) आणि द लास्ट जेडाय ( २०१७, दिग्दर्शक रायन जाॅन्सन ) या तीन चित्रपटांचं सर्वाधिक कौतुक झालय. यात आश्चर्य नाही कारण प्लान्ड ट्रिलजी असताना हे बहुतेकदा झालेलं दिसतं. पीटर जॅक्सनची ‘लाॅर्ड ऑफ द रिंग्ज’ त्रयी, हे आणखी एक, तसं अलीकडचं उदाहरण. कथा समजून घेण्याच्या दृष्टीने जरी मधले भाग अपुरे असले; कारण कथेची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही त्यात दाखवले जात नाहीत, तरी परिणामात ते त्यामुळेच वरचढ ठरतात. व्यक्तीरेखांची ओळख, मूळ कथासूत्रांचा परिचय, सेट अप, यात ते वेळ घालवत नाहीत, आणि शेवट कथानक गुंडाळण्याचीही त्यांच्यावर जबाबदारी नसते. त्यामुळे हे चित्रपट एकाच वरच्या गीअरमधे भरधाव पुढे जातात. हाच न्याय जर आपण तीन त्रयींना लावला, तर पहिलीवर सेट अपची जबाबदारी आल्याने, तर अखेरची कथानक शेवटाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असल्याने किंचित मागे रहातात.४/५/६ भागांची मूळ त्रयी केवळ संघर्ष मांडत असल्याने अधिक प्रभावी वाटते.

मूळ त्रयी आणि अखेरची त्रयी यांमधे बरच साम्य आहे. कारण त्यातला संघर्ष बराचसा सारखा आहे. लिआ, ल्यूक , सोलो, या त्रिकुटासारखच इथे रे ( डेझी रिडली ) , फिन ( जाॅन बोयेगा ) आणि पो ( ऑस्कर आयझॅक ) हे त्रिकुट आहे. व्हेडर ऐवजी त्याचा नातू, लिआ आणि हानचा एम्पायरला सामील झालेला मुलगा बेन सोलो/कायलो रेन ( ॲडम ड्रायव्हर) आहे. यात लिआ आणि ल्यूक प्रमाणे भावाबहिणीची जोडी नसली, तरी कॅरेक्टर्स त्या प्रकारची आहेत. अडचण एवढीच, की व्हेडर ही व्यक्तिरेखा मुखवट्यामागे लपलेली आणि तिचा वापर कमी आणि प्रामुख्याने दहशतीपुरता होता. कायलो रेन मात्र सततच्या वावरामुळे आणि रेबरोबरच्या प्रसंगांमुळे अधिक प्रभावी ठरतो, आणि त्यामानाने फिन आणि पो दुय्यम वाटायला लागतात. नीट पाहिलं तर लक्षात येईल की पहिल्या त्रयीत नायकाचा ॲनाकिन ते डार्थ व्हेडर असा गडद होत जाणारा ग्राफ होता, त्याच्या बरोबर उलटा ग्राफ इथे आहे, कायलो रेन ते बेन सोलो असा प्रवास यात येतो. या पद्धतीने अनेक घटक या नऊ चित्रपटात आहेत, जे परस्परांना बॅलन्स करतात. तिन्ही त्रयींमधे असलेले C3PO, R2D2, चुबॅका, पॅलपिटीन, पहिल्या आणि दुसऱ्या त्रयीत असलेला व्हेडर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रयीत असलेले ल्यूक, लिआ, सोलो,  हेदेखील कथेत एक प्रकारची संगती ठेवतात. कॅरी फिशरचा २०१६ मधे मृत्यू झाल्याने ती या भागात असेल का याबद्दल काही एक साशंकता होती. पण द फोर्स अवेकन्स आणि द लास्ट जेडाय या सातव्या आणि आठव्या भागातल्या चित्रपटात न वापरलेल्या दृश्यांमधून तिला या अखेरच्या चित्रपटातही स्थान मिळालं आहे.

‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’ (दिग्दर्शक जे. जे. एब्रम्स)  हा अंतिम त्रयीचा अंतिम भाग, म्हणजे खरं तर एकूण कथानकाचा क्लायमॅक्सच आहे. त्यामुळे तसाही तो स्वतंत्र सिनेमा म्हणून पहाणाऱ्याला कळेल अशी अपेक्षा नाही. ज्यांनी आधीचे चित्रपट ( अगदी सगळे नसले तरी बरेच ) पाहिले आहेत, ज्यांना या व्यक्तीरेखा माहीत आहेत, त्यांनाच तो कळणार. असं असताना तो नुकत्याच आलेल्या ‘ॲव्हेंजर्स: एन्ड गेम’ प्रमाणे कथेला दुय्यम महत्व देऊन व्यक्तीरेखा आणि ॲक्शन यांना प्राधान्य देणारा असू शकला असता. पण स्टार वाॅर्सने आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे बरीचशी मांडणी ठेवली आहे. त्यांच्या ठराविक पद्धतीप्रमाणे सीक्वल्स ही घटनांना सलग पुढे नेत नाहीत. दोन चित्रपटांमधे काळ गेलेला असतो आणि त्यातल्या घटना लिखित रिकॅप सारख्या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जातात. मुख्य कथाभाग हा मोजक्या महत्वाच्या प्रसंगामधून उलगडतो. इथे कायलो रेन आणि पॅलपटीनची भेट होते, इथे चित्रपटाची सुरुवात होते. एका हेराकडून पॅलपटीनचा डाव बंडखोरांना कळल्यावर रे त्याच्या मागावर जायचं ठरवते, पण त्यासाठी वेफाईंडर, ही नकाशासारखी वस्तू सापडणं आवश्यक असतं. त्या वस्तूच्या मागे रे, फिन आणि पो जातात आणि त्यांचा सामना कायलो रेनशी होतो.

हा त्रयीचा अखेरचा भाग असल्याने चित्रपटात मालिकेत येऊन गेलेली स्थळं, व्यक्तीरेखा, वस्तू, प्रतिमा, आणि महत्वाच्या प्रसंगांची आठवण जागवणारे नवे प्रसंग यांची रेलचेल आहे. एका परीने ‘बेस्ट ऑफ स्कायवाॅकर सागा’ असं याला म्हणता येईल. मिलेनीअम फाल्कनच्या करामती, चुबॅकाचा चेससारखा खेळ, ल्यूकच्या ट्रेनिंगची आठवण करुन देणारं रेचं ट्रेनिॅग,  सेकंड डेथ स्टारवरच्या प्रसंगात होणारी ‘रिटर्न ऑफ द जेडाय’ची आठवण, टॅटूईनवरचा दुहेरी सूर्यास्त अशा अनेक जागा सांगता येतील.

फिन आणि पो हे त्रयीत एकूणच दुर्लक्षित होत गेलेले आहेत. या चित्रपटात मात्र हे प्रमाण खूपच आहे. कायलो रेनची इथली व्यक्तीरेखा आणि रेचं त्याच्याकडे ओढलं जाणं हे या चित्रपटासाठी विशेष महत्वाचं आहे. रेचं जन्मरहस्य उलगडून चित्रपट कायलो रेन आणि रेच्या जोडीला एक वेगळं वजनही आणून देतो. एका अर्थी तेच इथले नायक आणि नायिका असल्याप्रमाणे वाटतात, आणि खरं तर ते आहेतही. चित्रपटाचा शेवट सर्वांना समाधानकारक वाटेल असं नाही, आणि त्या विरोधात समीक्षकांची मतंही मी वाचली आहेत, पण फॅन्सकडून बहुधा चित्रपटाचं स्वागत होईल.

‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’ हा ‘स्कायवाॅकर सागा’चा शेवट असला, तरी स्टार वाॅर्स विश्वाचा शेवट नक्कीच नाही हे रोग वन, आणि सोलो या स्वतंत्र चित्रपटांनी सूचित केलच आहे. टिव्ही आणि सिनेमा, या दोन्ही प्रांतात स्टार वाॅर्सचं विश्व पुढे बराच काळ टिकेल अशीच अपेक्षा आहे.
-  गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP