सरकारराज आणि दिग्दर्शकीय अधोगती

>> Saturday, July 5, 2008

प्रख्यात दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक यांनी त्यांच्या हिचकॉकीयन शैलीतल्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजे लॉजर (1926) साठी एक चमत्कृतिपूर्ण दृश्य वापरलं होतं. या चित्रपटातला लॉजर ही एक रहस्यमय व्यक्ती आहे आणि ज्या घरी तो उतरलाय त्यांना संशय आहे, की हा दुसरा तिसरा कोणी नसून लंडनमध्ये धुमाकूळ घालून राहिलेला कुप्रसिद्ध खुनी, सीरिअल किलर आहे. या विशिष्ट दृश्यात हिचकॉकला दाखवायचंय, की लॉजरच्या प्रत्येक हालचालीची जाणीव या घरातल्या लोकांना आहे. ती त्यांना अस्वस्थ करून सोडते आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लॉजरच्या येरझारा अधिक ठाशीव अन् मूकपट असल्यानं आवाजाशिवाय चित्रित करण्यासाठी हिचकॉकनं मग एक जाड काच घेतली. प्रमुख भूमिकेतल्या नटाला त्यावरून चालायला लावलं आणि काचेखाली कॅमेरा लावून त्याच्या बुटांचे तळवे चित्रित केले. त्या काळात हे दृश्य खूप गाजलं. पुढे अनेक वर्षांनी मात्र या दृश्याचा विचार करताना हिचकॉकने वेगळंच मत प्रदर्शित केलं. या गिमिकची गरज नव्हती हे मान्य करून तो प्रांजळपणे म्हणाला, की मूकपटातही ही लॉजरच्या पावलांनी होणाऱ्या आवाजाची जाणीव वेगळ्या मार्गाने दाखवता येणं शक्य होतं. येरझाऱ्यांमुळे हिंदकळणारं खालच्या मजल्यावरचं झुंबर आणि खाली असलेल्या लोकांच्या डोळ्यांचे, त्याच पावलाबरहुकूम फिरणं दाखवून देणारे क्žलोजअप्स एवढ्यानं काम झालं असतं. काळाने अन् अनुभवाने हा दिग्दर्शक प्रगल्भ झाल्याचं स्पष्ट करणारं हे विधान आहे. केवळ हिचकॉकच नव्हे, तर अनेक मोठ्या दिग्दर्शकांबाबत हे म्हणता येईल, की त्यांची शैली ही काळानुसार अधिकाधिक नेमकी होत जाते. त्यांना आपल्याला काय सांगायचंय, कसं सांगायचंय आणि ते विशिष्ट शैलीत फापटपसारा न मांडता कसं सांगू शकू, याचं अधिकाधिक भान येत जातं. किंबहुना त्यामुळेच ते मोठे दिग्दर्शक ठरतात. आपल्याकडे मात्र 2002 मधल्या "कंपनी'पर्यंत अतिशय कर्तबगार मानल्या जाणाऱ्या रामगोपाल वर्माने गेल्या काही वर्षांत इतकी सुमार कामगिरी केली आहे, की त्याच्या आधीच्या कामाबद्दलही संशय उत्पन्न व्हावा. या दुर्दैवी काळातला त्याचा त्यातल्या त्यात चांगला चित्रपट म्हणून गॉडफादरची भारतीय आवृत्ती असलेल्या "सरकार'चं नाव घेता येईल. "सरकारराज'कडून अपेक्षा होत्या त्यासाठी. सरकारराज चित्रपट सुरू झाल्यावर पहिल्या पंधरा मिनिटांतच लक्षात येणारी गोष्ट ही, की रामगोपाल वर्माची दिग्दर्शन शैली ही नेमकी तर होत नाहीच आहे, वर अत्यंत नवशिके दिग्दर्शक किंवा फिल्म स्कूलचे विद्यार्थी यांच्याकडूनही अपेक्षित नसलेल्या चुका हा दिग्दर्शक करतो आहे. आपल्याला तंत्रज्ञान अवगत असेल, तरी त्याचा कसा कुठे आणि किती वापर करावा याची जाण दिग्दर्शकाला असणं अपेक्षित आहे. सरकारराज पाहून तरी वर्माला ही जाण असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध होत नाही. अतिउत्साहाने आणि एकूण परिणामाचा विचार न करता केलेला छायाचित्रणाचा अन् संगीताचा वापर ही इथली सर्वांत त्रासदायक गोष्ट. सरकारराजचं कथानक आणि पटकथा उत्तम नसली, तरी बऱ्यापैकी आहे आणि त्याचा गाभा हा गुन्हेगारीहून अधिक कुटुंबसंस्थेशी जोडलेला आहे. "सरकार' किंवा सुभाष नागरे (सीनिअर बच्चन) आणि त्यांचा धाकटा मुलगा शंकर (ज्युनिअर बच्चन) यांच्या नात्याची वीण हा पटकथेचा आधार आहे. हा गंभीर चित्रपट आहे आणि त्यातला भावनिक भाग हा प्रेक्षकापर्यंत थेट पोचवण्यातच चित्रपटाचं यश आहे. हे सगळं कोणी तरी (म्हणजे दिग्दर्शकानेच) सिनेमॅटोग्राफर आणि संगीत दिग्दर्शकाला सांगण्याची अत्यंत गरज होती. कारण त्यांना त्याचा पत्ताच दिसत नाही. प्रसंगाची गरज असो-नसो, इथला कॅमेरा हा सतत गरगर फिरत राहतो. उभा, आडवा, तिरका, उंच, इमारतीवरून, टेबलाखालून, खांबाच्या आडोशाने अशा विविध चमत्कृती साधत कॅमेरा जीव तोडून चांगला अभिनय करू पाहणाऱ्या अभिनेत्यांची कसोटी पाहत राहतो. त्यात सर्वत्र अंधार. नागरे कुटुंब पॉवर प्लान्टला पाठिंबा दर्शवतात कारण त्या निमित्ताने तरी त्यांच्या घरात वीज येईल की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती. सर्व खोल्या अंधारात. अभिनेते प्रकाशयोजनेच्या सोयीसाठी अंधार-उजेडात प्रयत्नपूर्वक पुढे-मागे करत असलेले. थोड्या वेळाने आपल्याला नटमंडळीची दया यायला लागते. ते जर नीट दिसलेच नाहीत, तर ते आपल्यापर्यंत पोचणार तरी कसे? त्यातून पोटात ढवळेलशा गतीने फिरणाऱ्या कॅमेराच्या जोडीला सतत जोरात बडवलं जाणारं संगीत प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्सला तारस्वरात मागे चाललेली अगम्य गाणी. संवाद बुडवून टाकणारा वाघाचा कल्लोळ. सरकारराजचा साऊंड ट्रॅक हा पूर्णपणे काढून केवळ संवाद ठेवले तर त्याचा प्रभाव किती तरी अधिक पडेल हे नक्की. दृश्ययोजना आणि ध्वनी या अत्यंत मूलभूत गोष्टीच एका आशय आणि अभिनयाच्या दृष्टीने बऱ्यापैकी असलेल्या चित्रपटाला मारक ठरतायत, हे ज्या दिग्दर्शकाला कळत नाही तो दिग्दर्शक कसला? असो. सरकारराजला कथानक म्हटलं तर अगदी जुजबी आहे. एन्रॉन छापाचा एक वीज प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातलेला. मात्र, तो उभारण्यासाठी काही गावं रिकामी करण्याची आवश्यकता. मग त्या कंपनीतर्फे अनिता (ऐश्वर्या राय, प्रथमच सुसह्य भूमिकेत) संपर्क साधते तो गुंडगिरी आणि राजकारण यामध्ये पटाईत असलेल्या नागरे कुटुंबाशी. सुभाष नागरेचं मत अनुकूल नसतानाही शंकर त्यांना पाठिंबा देण्यासाठी राजी करतो. पुढे या प्रकल्पानिमित्ताने काय राजकारण सुरू होतं ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथे पटकथेचा चांगला भाग हा, की ती काही प्रमाणात रिपिटीटीव असली, तरी रेंगाळणारी नाही. नागरे कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीने हाणामाऱ्या जरूर असल्या तरी यातल्या प्रमुख तीन पात्रांच्या परस्पर नात्यांना अर्थ राहील इतका वेळ ती या पात्रांना देऊ करते. अर्थात, ही पात्रं एरवीच्या आयुष्यातही एका कुटुंबातली असल्याने त्यांचा वावर इथे अधिक सहजपणे होतो हेदेखील खरंच. पटकथेच्या एकाच वेळी गतिमान आणि भावनिक दृश्यांना न्याय देण्याच्या जमलेल्या कसरतीबरोबर तिचा आणखी एक जमलेला भाग म्हणजे दोनतृतीयांश भागानंतर तिने चित्रपटाला दिलेलं अनपेक्षित वळण जे शेवटाकडल्या भागाला अधिक वजन आणून देतं. हे सगळं असूनही खलनायक विभागात मात्र तिची थोडी पंचाईत झाली आहे. इथे नागरे कुटुंब जितकं खरं वाटतं तितकेच खलनायक खोटे वाटतात. एकतर हे किती आहेत, त्यांचा काही हिशेबच नाही. पण प्रमुख खलनायक तीन असं म्हणता येईल. तेही पूर्वीच्या चित्रपटांतून उसने घेतल्यासारखे छापील बोलणारे आणि लकबी वगैरे असणारे. हे आजच्या काळातलेच न वाटल्याने ते अखेरपर्यंत चिकटवल्यासारखे वाटत राहतात. साहजिकच त्यांचा संघर्ष वाढवण्यासाठी थेट उपयोग होत नाही. सरकारराजबद्दलच्या दोन गोष्टी मला नीटशा कळल्या नाहीत. पहिली म्हणजे हा चित्रपट सरकारचं सीक्वल नाही, असं सांगण्याचा वर्मापासून बच्चनपर्यंत सर्वांचा अट्टाहास. आता हा सीक्वल नाही कसा? कारण तो सरकारमधल्याच कुटुंबाविषयी आहे. त्या चित्रपटात घडलेल्या कथानकालाच तो पुढे नेतो. त्यातल्या घडामोडींचा संदर्भ देतो. मग सीक्वल सीक्वल म्हणजे वेगळं काय? मुन्नाभाई चित्रपटाने हे म्हणणं समजण्यासारखं आहे. कारण त्यांनी मुन्नाभाई आणि सर्किटला जसेच्या तसे ठेवूनही इतर व्यक्तिरेखांचे संदर्भ पूर्णतः पुसले वा बदलले होते. सरकारराज असं काही करत नाही. त्यामुळे अर्थातच हे सीक्वल आहे. ज्यांना तसं वाटत नाही, त्यांना सीक्वल या शब्दाचा अर्थ माहीत नसावा. दुसरी अनाकलनीय गोष्ट म्हणजे इथली टॅगलाइन. "पॉवर कॅनॉट बी गिव्हन, इट हॅज टु बी टेकन' या वाक्याला चित्रपट केवळ पोस्टरवर मिरवत नाही तर सुरू होतानाही दाखवतो. याचा थेट अर्थ पाहावा, तर तो नागरे सीनिअर आणि ज्युनिअरशी संबंधित असावा, असा भास होतो. प्रत्यक्ष चित्रपटात तो या दोघांशी तर सोडाच, कशाशीच संबंधित नाही. म्हणजे स्वतंत्रपणे नाट्यपूर्ण असल्याखेरीज या वाक्याचा चित्रपटाशी संबंधित असा अर्थच नाही. हीच टॅगलाइन सत्या किंवा कंपनीला अधिक अर्थपूर्ण वाटली असती किंवा अगदी मूळ "सरकार'लासुद्धा. दिग्दर्शकाने काठावर पास कामगिरी करूनही सरकारराज अगदीच न पाहण्यासारखा नाही. पटकथा आणि अभिनयाने त्याला तरण्यासाठी पुरेशी साथ दिलेली आहे. मात्र, यावरून हे दिसून येतं, की आजवर गॅंगस्टर चित्रपटातून हुकमी कामगिरी केलेल्या वर्माचा त्यावरचा ताबाही आता सुटत चाललेला आहे. मोठमोठी कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्ट करून आणि सहायक दिग्दर्शकांची कामं केलेल्या अनेक तरुणांना ब्रेक देऊन चित्रपटांची फॅक्टरी काढताना त्याचं दर्जाकडे होत चाललेलं दुर्लक्ष आजवर लपून राहिलेलं नाही. आपण कलाकार आहोत की व्यापारी हे ठरविण्याची वेळही आत टळून गेलेली आहे. अजूनही प्रेक्षकांनी त्याला गंभीरपणे घ्यावं, अशी त्याची इच्छा असेल तर कामगिरीत चटकन आणि प्रचंड सुधारणा आवश्यक आहे. प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत तरी किती पाहायचा?

-गणेश मतकरी

5 comments:

Yawning Dog July 5, 2008 at 12:08 PM  

Chhan review ahe.
Mala vatle hote ha chitrapat taree changla asel anee parat poorvicha Ramu pahayla milel...pan !
Khalnayak department tar apan mhanlyapramne farach dhisaal ahe...vora che Voraaa, kinva Sayajee che kilasvane chrahare hya chitrapatat shobhat naheet...nidaan godfather varoon jya chitrapatchee theme ghetlee ahe tyat taree ase asu naye.
Saglyaat kahar mhanje Aishwryavar shoot kelele shevatche drushya,...te pahoon tar hacch ko to Shiva,Satya anee Companyvala Ramgopal ase vtayla lagle.

Yogesh July 5, 2008 at 6:56 PM  

अहो. दोन गोष्टींचा काहीही ताळमेळ नसणे यालाच तर अर्थपूर्ण सिनेमा, अर्थपूर्ण काव्य, अर्थपूर्ण लेखन असे म्हणण्याची पद्धत आहे. स्वत:लाच कशी अक्कल आहे हे जगजाहीर करताना बाकीचे सगळे कसे बावळट हे देखील वारंवार सांगावे लागते.

ह्या रामूपेक्षा दादा कोंडके बरा राव. एक पण पिच्चर बोर नाही. फुल्ल पैसे वस्सूल. 'नि:शब्द' बघितल्यावर रामू + अमिताभ समाजवादी बच्चन असे कॉम्बिनेशन बघायचे नाही असं ठरवलं होतं पण जित्याची खोड आमची. घालवले फुक्कट पैसे.

याच रामूने परत सगळ्या समीक्षकांना शिव्याही घातल्यात म्हणे. त्याला एकदा कोणीतरी सांगितले पाहिजे, की तुझा बैल देखील गूळ देतो तेव्हा तो गप्प बसेल.

ganesh July 7, 2008 at 8:05 PM  

Yd/ Ajanukarna,

you know ,i acctually had lot of hope from RGV once, i suppose everyone did. till company it was justified. according to me shiva ,satya and company remain a triology of sorts where each takes gangsterism and its a social impact one notch above the previous film.college level to city level to national and international level. in fact satya and shiva even remain good names for a triology where the last could be a variation on sundar. anyway, he had proclaimed some time ago that satya, company and sarkar is a triology which makes no sense(as sarkar is adaptation, not orginal cinema and it doesnt carry same themes as previous films) and now there is a discussion if contract is the last part of trio.
i think RGV's ambition to be a producer has ruined the director in him and his work as a producer is marred by the way multiplexes have turned cinema into a product .unknowingly his company has lost the sarcasm in its name and has become exactly what they are called. a factory.

santshali July 29, 2008 at 8:33 AM  

तुमचं म्हणणं बरोबर आहे. रामगोपाल वर्मा नवशिक्‍यांच्या नादी लागलाय. प्रेक्षकांना च्युत्या समजून काहीही माथी मारण्याचा धंदा त्यानं सुरू केलाय. कॉंट्रॅक्‍ट तुम्ही पाहिला असेलच. हा सिनेमा पाहून माझे पैसे तर गेलेच; पण तिकिटाच्या पाचपट किमतीचा मनस्ताप झाला. सिनेमातील "मराठी'चा वावर मात्र सुखद वाटला.

Sina December 13, 2011 at 9:32 PM  

I just encountered this blog. My response to this blog may be outadated.

Still I have a say....

I liked this movie.

I do not expect much from hindi movies.

Please do not compare this movie with earlier movies. Even Ramesh simmpy could not repeat the successs & class of Sholay. He had also produced many bad movies in his later stage.

I agree RGV's standard is going down. But this is not that bad movie.

There are negative aspects to this movie. But there are worse movies (eg. many SRK/Salman type movies)
Its climax is really intense eg. Ravi Kale & Dilip P's revelation etc..

How can anybody compare him with DAda K. There are of very diffrent genere. I never liked any of Dada's movie. I consider those as vulgar third class movies.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP