तरुणांचा जाने तू...

>> Friday, July 25, 2008

चार जुलै रोजी झालेल्या नवताऱ्यांच्या आणि त्यांच्या "पहुंच्या हुव्या' निर्मात्यांच्या युद्धात कोणाची सरशी झाली अन्‌ कोणाचा पाडाव, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आश्‍चर्य हेच, की "लव्ह स्टोरी'या चित्रपटाचा धुव्वा उडणार, हे विचार करू शकणाऱ्या कोणाही त्रयस्थाला पूर्ण चित्रपट न पाहताच लक्षात येऊ शकणारं सत्य बावेजा मंडळी किंवा ऍडलॅब्ज यांच्या लक्षात कसं आलं नाही? लव्ह स्टोरीच्या फार तपशिलात जाण्याची माझी इच्छा नाही; पण एक-दोन ठळक निरीक्षणं. नव्या नायकाला पडद्यावर आणायचं तर शक्‍य तर नायिका ही नवी असावी. कारण प्रेक्षकांच्या अतिपरिचयाची नायिका असेल तर ती वयाने केवढीही असली, तरी नायकाहून ज्येष्ठ वाटण्याची शक्‍यता असते अन्‌ पर्यायानं जोडी विजोड वाटण्याची. हा धोका मोठा आहे आणि नायक-नायिकेचे खरे अफेअर असल्याची कितीही मोठी पूर्वप्रसद्धी, हा त्यावर तोडगा ठरू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नवताऱ्यासाठी विषय निवडला जायला हवा तो कथानकाच्या भावनिक प्रभावाकडे किंवा इमोशनल इम्पॅक्‍टकडे पाहून. त्याला आपल्या अभिनयाचे पैलू दाखवायला जागा हवी. त्यासाठी कथानक जितकं साधंसरळ असेल तितकं चांगलं. स्पेशल इफेक्‍ट्‌स असणाऱ्या आणि अभिनेत्यांना नगास नग म्हणून वापरणाऱ्या विषयाची निवड, ही उघडच चुकीची आहे. त्यातही ती अधिकच चुकीची ठरते ती या तथाकथित इफेक्‍ट्‌सच्या बाळबोध दर्जामुळे. हॉलिवूड गेली तीस-चाळीस वर्षं जे इफेक्‍ट्‌स लीलया पडद्यावर आणतं ते आपल्याला अजून झेपत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट. आणि ते झेपत नाहीत, कारण ते "खरे' वाटण्याची गरज आपल्या दिग्दर्शकांना, निर्मात्यांना वाटत नाही. संगणकाचा या क्षेत्रातला प्रभाव वाढण्याआधी अनेक वर्षं जॉर्ज ल्यूकसच्या लक्षात आलं, की इफेक्‍ट्‌स/सेट्‌स खरे वाटायचे तर पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी नव्याकोऱ्या, चकचकीत न वाटता वापरातल्या वाटायला हव्यात. त्याने हा "यूज्ड युनिव्हर्स' ऍप्रोच आपल्या "स्टारवॉर्स' मालिकेत वापरला आणि इफेक्‍ट्‌सचं स्टॅंडर्ड ठरून गेलं. आपल्याकडे मात्र बजेट फुगवत चाललेल्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना या पद्धतीचा पत्ता नसावा. त्यामुळेच ते तद्दन खोट्या दिसणाऱ्या इफेक्‍ट्‌सच्या जोरावर प्रेक्षक गर्दी करतील अशी व्यर्थ अपेक्षा बाळगून आहेत. लव्ह स्टोरीदेखील याच विचारशैलीचा बळी आहे. असो. "जाने तू... या जाने ना'च्या प्रदर्शनाची संधी साधून आमीर खानने बावेजा कंपूला गोत्यात आणण्याचा किती प्रयत्न केला, याच्या सुरस कहाण्या रोज कानावर पडत असल्या, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, जाने तू चालतोय तो केवळ त्याच्या गुणवत्तेवर; खान कंपूच्या चाली- प्रतचालींमुळे नाही. नाही म्हणायला बावेजांना खरोखर अडचणीत आणणारी एक गोष्ट मात्र आमीर खानने नक्कीच केली. त्याने एक खरोखरच चांगला चित्रपट बनवला. आमीर खान आणि लेखक/दिग्दर्शक अब्बास टायरवाला या दोघांनी एक अतिशय साधा, कोणताही आव न आणणारा, "बॉलिवूड कॉलेज रोमान्स' या पारंपरिक चित्रप्रकारात चपखल बसणारा, तरीही हुशारीने रचलेला आणि योग्य तो परिणाम बिनचूक साधणारा चित्रपट देणं अन्‌ त्या निमित्ताने इम्रान खान अन्‌ जेनेलियाला जोरदार ब्रेक देणं व्यवस्थित जमवलेलं आहे. जाने तू... हा आमीर खानची निर्मिती असण्याचा एक उघड फायदा चित्रपटाला आहे. एक म्हणजे खानची स्वतःची बुद्धिनिष्ठ (अनेक अपवादां कडे दुर्लक्ष करून) अभिनेता आणि यशस्वी निर्माता (लगान/तारे जमीं पर) म्हणून प्रतमा तर आहेच, वर त्याने स्वतः "कयामत से कयामत तक'मधून केलेल्या धडाकेबाज पदार्पणाच्या आठवणी आज अनेकांच्या स्मरणात आहेत. इम्रानने तीन वर्षांचा असताना केलेली "कयामत'मधल्या छोट्या आमीर खानची भूमिका हादेखील धागा त्याला "कयामत'बरोबर जोडणारा आहे. त्याखेरीज "कयामत'ची आठवण करून देणाऱ्या अनेक जागाही जाने तू... मध्ये लक्षात येण्याजोग्या आहेत. नायक जयची श्रीमंती परंतु हिंसक पार्श्‍वभूमी, पप्पूच्या गाण्यात येणारा "पापा कहते है'चा संदर्भ, कॉलेजवयीन मुलांना आपले वाटावे तसे प्रसंग/संवाद, त्याशिवाय इम्रानची त्या काळच्या आमीर खानशी सुसंगत अशी सालस प्रतमा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसाठी एक विशिष्ट मूड तयार करून देणाऱ्या आहेत. मात्र केवळ त्यांच्यावर चित्रपट अवलंबून आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. दिग्दर्शकाच्या हुशारीची पहिली सूचना मिळते ती त्याने वापरलेल्या निवेदनशैलीतच. जय/अदितीच्या परदेशातून परतण्याची वाट पाहणारं त्यांचं एक मित्रमंडळ त्यांच्यातल्या एका नवीन भरती झालेल्या मैत्रिणीला त्या दोघांची प्रेमकहाणी सांगतं, अशी ही कल्पना आहे. वरवर साधी वाटली तरी या क्‍लृप्तीचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. इथे आपल्याला मित्रांकरवी पहिल्या झटक्‍यात सांगून टाकलं जातं, की चित्रपट टिपिकल सुखान्त आहे, तोही अनेक हिंदी चित्रपटांप्रमाणे विमानतळावर संपणारा. यामुळे आपण चित्रपटाकडून काय अपेक्षा करायची, हे चटकन ठरवून टाकतो आणि आगाऊ मिळालेल्या आगाऊ सूचनेमुळे प्रत्यक्षात जेव्हा विमानतळावरचा शेवट येतो, तेव्हा तो आपल्याला जुनाट वाटत नाही. याबरोबरच फ्लॅशबॅक पद्धतीचा अन्‌ तो अनेकांनी सांगण्यातलाही फायदा असा, की दिग्दर्शक प्रेक्षकाला आपल्या मर्जीप्रमाणे कथानकाच्या पुढे किंवा मा गे ठेवू शकतो. याखेरीज मध्यंतराला चपखल जागाही मिळते. (नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममधली पाटी पाहायला विसरू नये, असे विनोदही या डिव्हाईसमुळे संभवतात.) प्रत्यक्षात गोष्ट सुरू होते तेव्हा आपल्याला भेटते जय ऊर्फ रॅट्‌झ (इम्रान खान) आणि अदिती ऊर्फ म्याव (जेनेलिआ डि- सूझा) ही एकमेकांशिवाय न राहू शकणारी, मात्र टेक्‍निकली एकमेकांच्या प्रेमात न पडलेली जोडी. अर्थात त्याच्या सतत बरोबर असण्याने इतरांनी त्यांचं जमल्याचा समज सोयीस्करपणे करून घेतलेला. जेव्हा या दोघांना हे कळतं तेव्हा त्यांना धक्काच बसतो अन्‌ एकमेकांसाठी सुयोग्य वर अन्‌ वधू शोधण्याचा दोघं निर्धार करतात अन्‌ त्याप्रमाणे जोडीदार मिळवतातही. यापुढे काय होतं हे न सांगताही आपण अंदाज बांधू शकतो. जाने तू... मध्ये सर्वांत आवडतो तो त्याचा ताजेपणा. महत्त्वाच्या भूमिकांत जवळजवळ पूर्णपणे नवे चेहरे आणि छोट्या भूमिकांमध्ये जुनेजाणते अभिनेते, असं "जाने तू'चं रूप आहे. या रूपाला जितका दिग्दर्शक जबाबदार आहे तितकेच कास्टिंगचे लोकही. कारण त्यांनी जमवलेली ही मंडळी भूमिकांमध्ये इतकी चपखल बसतात, की त्यांनी अभिनयाचा खास प्रयत्न करण्याची गरजच नाही. त्यांचा स्वाभाविक वावरच इथं पुरेसा आहे. उत्तम कास्टिंगचं सर्वांत लक्षवेधी उदाहरण आहे अदितीच्या हुशार पण उर्मट भावाच्या भूमिकेतला प्रतीक बब्बर. जो केवळ चार-पाच प्रसंगांतून लक्ष वेधून घेतो. या चित्रपटानंतर त्याच्याकडे अधिक मोठ्या भूमिकांसाठी ऑफर्स आल्या तर आश्‍चर्य वाटू नये. मात्र, स्मिता पाटीलचा वारसा पुढे चालवणाऱ्या प्रतीकला नायकाची कामं मिळायला मात्र अजून काही वर्षं नक्की जावी लागतील. अब्बास टायरवालांचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असला, तरी पटकथालेखक म्हणून त्यांनी अनेक यशस ्वी चित्रपटांवर (मकबूल, मुन्नाभाई एमबीबीएस, मैं हूँ ना) काम केले आहे. त्यांची पटकथालेखनातली हुशारी इथेही दिसून येते. फ्लॅशबॅक डिव्हाईसचं श्रेय त्यांच्यातल्या दिग्दर्शकाबरोबरच पटकथाकाराकडेही जातं. कथानक म्हणून चित्रपटात फार काही घडत नाही. म्हणजे टिपिकल संघर्ष, खलनायक वगैरे प्रकार नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना गुंतवणे हे अधिक आव्हानात्मक. मग कथानकाला जोडणारी तितकीच साधी पण गमतीदार उपकथानकं वापरून पटकथा भरगच्च केली जाते. जयच्या भूतकाळाचं गुपित, त्याची आई (रत्ना पाठक शाह) आणि इन्स्पेक्‍टर वाघमारे (परेश रावल) यांच्यात उडणारे खटके आणि डिस्कोजमध्ये दंगा करणारे दोन उनाड घोडेस्वार (अरबाज आणि सोहेल खान) हे तीन फाटे पटकथेला फुटतात आणि शेवटाकडे ते पुन्हा एकत्र येऊन मूळ गोष्टीशी सहजपणे सांधले जातात. पटकथा नंतर येणाऱ्या वळणांची पूर्वसूचना देते, इतर चित्रपटनायकांचे संदर्भ शोधते, व्यक्तिरेखा कमालीच्या तपशिलात रंगवते आणि शक्‍य तेव्हा (प्रत्येक वेळी हे शक्‍य होतं असं मात्र नाही) अतिनाट्य टाळून अधिक खरे पर्याय शोधते. कयामत आणि दिल चाहता है या तरुणांनी तरुणांसाठी केलेल्या दोन्ही चित्रपटांची आठवण "जाने तू...' मध्ये जागवली जाते. मात्र तुलना केली तर याला मी तिघांतला सर्वांत उजवा चित्रपट म्हणेन. इतर दोन्ही चित्रपटांमध्ये दिग्दर्शकीय सफाई, चित्रीकरणातील हुशारी, अभिनयाचा ताजेपणा आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक (खास करून "दिल चाहता है'चा) या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांना ठराविक साच्याच्या नाट्याची गरज वाटते आणि ते आपला वेगळेपणा अर्धवट सोडून देतात. "जाने तू...'ला ही गरज वाटत नाही. क्वचित तो रेंगाळला, तरीही आपला स्वभावधर्म तो सोडताना दिसत नाही. त्याचा हा कथावस्तूचा मूळ गाभा जपण्याचा प्रयत्न त्याला अधिक ताकदीचा बनवतो आणि अधिक दर्जेदार.

- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP