हिरानीचे इडिअट्स

>> Thursday, January 14, 2010


भारतातल्या एका प्रतिथयश इंजिनिअरींग कॉलेजचे तीन विद्यार्थी नायक असणं, त्यांच्या विरोधातल्या एका खडूस प्राध्यापकाच्या मुलीवर तिघांमधल्या एकाचं प्रेम बसणं, व्यक्तिरेखांचे काही विशिष्ट तपशील आणि आपल्या शिक्षणपद्धतीच्या सांकेतिक नियमावलीकडे असलेल्या ओढ्यावर असणारा टिकेचा सूर या गोष्टी राजकुमार हिरानीचा थ्री इडिअट्स आणि चेतन भगतची फाईव्ह पॉईन्ट समवन ही कादंबरी, या दोन्हीमध्ये पहायला मिळतात. मात्र त्यापलीकडे जाऊन पाहाता, या दोन कलाकृतींमध्ये फार साम्य आढळणार नाही. त्यामुळे ते शोधू नये, हा जो धोशा हिरानी, चोप्रा अन् कंपनीने लावला (त्यावरून झालेला वाद आता शमला असला तरी) त्यात तथ्य़ आहे हे निश्चित. हिरानी किंवा आमिर खान या प्रोजेक्टकडे आकृष्ट का झाले, हे कळणं फार कठीण नाही, अन् त्यांना मूळ कल्पनेत स्वतःची भर घालत राहावी असं का वाटलं, हे देखील स्पष्ट आहे. हिरानी अन् खान या दोघांनीही हल्लीच केलेल्या यशस्वी आणि विचारप्रवर्तक चित्रपटांमध्ये शिक्षणपद्धतीविषयी जे विचार मांडलेले आहेत, त्यांचं थ्री इडिअट्स हे लॉजिकल एक्स्टेंन्शन आहे. हिरानीने मुन्नाभाई एम.बी.बी.एस.मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांवर आपली तिरकी नजर रोखली होती. अन् डॉक्टरांनी माणूसकी शिकण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
आमिर खानने तारे जमीं परमध्ये शालेय शिक्षणातल्या सब घोडे बारा टक्के मानण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले होते. थ्री इडिअट्स याच विचारधारेला पुढे नेतो. त्याचं असं करणं हे मला त्याच्या फाईव्ह पॉईन्ट समवनशी प्रामाणिक असण्यानसण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटतं. कादंबरीच्या गुणदोषाची चर्चा न करताही, ही गोष्ट स्पष्ट व्हावी.
हिरानीच्या आधीच्या दोन चित्रपटांकडे अन् आता इडिअट्सकडे पाहून लक्षात येईल की व्यावसायिक मनोरंजन या गोष्टीवर या माणसाचा पूर्ण विश्वास आहे. त्याचे चित्रपट हे नक्कीच काही विचार मांडणारे असतात, मात्र विचार हे करमणूकीची जागा घेत नाहीत अन् करमणूक देखील कशी , तर खास बॉलीवूड शैलीतली. मोठे स्टार्स, विनोद, मेलोड्रामा, नाचगाणी हे सगळंच इथे पाहता येते. मात्र सर्व व्यावसायिक चित्रपटात सहजासहजी पहायला न मिळणारी प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची क्षमता देखील त्यांच्यात जरूर असते. अनेकदा हे विचार करमणुकीपासून वेगळे काढता येत नाहीत, पण सबकॉन्शस पातळीवर ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात.
चित्रप्रकारांच्या भाषेत बोलायचं तर थ्री इडिअट्स दोन प्रकारांशी नातं सांगतो. त्याचा मूळ जीव आहे तो कॉलेज जीवन चित्रित करणा-या चित्रपटांचा. यात कॉलेजमधल्या मुलांनी केलेली धमाल आहे, प्रोफेसर्सचा खाष्टपणा आहे, रोमान्स आहे, स्पर्धा आहे, माफक गंभीर प्रकरणंदेखील आहेत. थोडक्यात म्हणजे या प्रकाराकडून ज्या अपेक्षा हव्यात त्या सर्व इथे पु-या केल्या जातात.
दुसरा प्रकार आहे, तो रोड मुव्हीचा. दिल चाहता है आठवत असेल, तर नायक तरुण असतानाचा भूतकाळ अन् काही वर्षांनंतरचा वर्तमान असे दोन काळ दाखविलेले आठवतील. मात्र इथला वर्तमान हा केवळ बंपर्ससारखा, सुरुवातीला अन् शेवटी असा वापरलेला नाही. ज्याला दोन मित्रांनी घेतलेल्या तिस-याच्या शोधाचा व्यवस्थित छाया आहे. अनेक ठिकाणं, अनेक व्यक्तिरेखा जोडत तो घेतला गेल्याने, तो लक्षात राहण्यासारखा आहेच, वर व्यक्तिरेखांचे बारकावे दाखविण्यासाठीही त्याचा उपयोग आहे.
त्याला एक बारीकसं रहस्यदेखील जोडलंय, पण ते इतकं बारीकसं आहे, की ते कसं उलगडेल हे कळण्याकरीता हुशार प्रेक्षकाला शेवटपर्यंत थांबावं लागणार नाही.
फरहान (माधवन), राजू रस्तोगी (शर्मन जोशी) आणि रान्चो (आमिर खान) हे आय.सी.इ (वाचा आय.आय.टी) या सुप्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारे मित्र. फरहान आपल्या इच्छेविरुद्ध केवळ वडिलांच्या सांगण्यावरून आलेला, तर राजू आपल्या घरच्या गरीबीवर एकुलता एक उपाय म्हणून. राजूवर उत्तीर्ण होण्याचा इतका ताण आहे, की तो कायम देवधर्माच्या नादी लागलेला. रान्चो मात्र घरचा चांगला, अन् विद्या या गोष्टीवर मुळातंच विश्वास असलेला. केवळ शिक्षण घेणं हा त्याचा एकमेव हेतू आणि परीक्षांमध्येही त्याचा निकाल अव्वल. मात्र कॉलेजमध्ये ज्या प्रकारे शिकवलं जातं, ते त्याला मान्य नाही. त्याच्या स्वतःच्या स्वतंत्र कल्पना आहेत. मात्र त्या कल्पनांमुळेच मुख्याध्यापक वीरू सहस्त्रबुद्धे (बोमन इरानी) यांचं त्याने शत्रूत्व ओढवलेलं. परिस्थिती अधिकच बिकट होते, जेव्हा सहस्त्रबुद्धेंची धाकटी मुलगी (करीना) रान्चोच्या प्रेमात पडते.
थ्री इडिअट्सचा विशेष म्हणजे क्राऊड प्लीजर प्रकारचा चित्रपट असूनही, तो वेळप्रसंगी खूप गंभीर व्हायला घाबरत नाही. इंजिनीअरींग कॉलेजचं तणावग्रस्त वातावरण, विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रयत्न अशा गोष्टी तो न कचरता दाखवितो. त्याबरोबरच शिक्षणपद्धतीविषयी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतो. पालकांच्या सुप्त महत्त्वाकांक्षेचा बळी म्हणून मुलांचं इच्छेविरुद्ध शाखा निवडणं, सांकेतिक विचारांमधून केवळ वरवरचं ज्ञान मिळणं, घोकंपट्टीविरुद्ध आत्मसात केलेलं ज्ञान, अशा अनेक मुद्यांना तो प्रसंगांच्या आधारे स्पर्श करतो. काहीवेळा मनोरंजनाचा अट्टाहास या प्रसंगांना नको इतकं टोकाला नेतो. उदाहरणार्थ शेवटाजवळचा सहस्त्रबुद्धेंच्या मोठ्या मुलीचा (मोना सिंग) डिलीवरीचा प्रसंग. मात्र शिक्षणाच्या प्रत्यक्ष (अप्लाईड) वापराचा मुद्दा या प्रसंगामागे आहे हे लक्षात घेतलं, तर तो घालण्यामागचं कारण कळू शकतं.
इडिअट्समधल्या काही गोष्टी मात्र खटकल्या. एक म्हणजे चित्रपट तीन मित्रांवर इतकं फोकस करतो, की ते आणि सायलेन्सर नामक त्यांचा शत्रू (ओमी कपूर अतिशय महत्त्वाच्या लांबीने मोठ्य़ा अन् भयंकर विनोदी भूमिकेत.) सोडता इतर मुलं व्यक्तिरेखा म्हणून उभी राहू शकत नाहीत. थोडक्या प्रसंगात हे करणं शक्य असणाल्याचं हिरानीने मुन्नाभाईच्या पहिल्या (मुन्नाचे सहविद्यार्थी) अन् दुस-या (सेकंड इनींग होमचे रहिवासी आणि रेडिओ शोसंबंधित प्रकरणं) भागात सिद्ध केलंय. इथेही तो ते शक्य होतं, पण केलेलं दिसत नाही.
इंजिनीअरींग कॉलेजमध्ये चार पाच वर्षांचा काळ गेल्याचं योग्य रीतीने सूचित झाल्यासारखं वाटत नाही. जेमतेम एखादं वर्ष वाटतं. काळ महत्त्वाचा अशासाठी, की रान्चो अन् सहस्त्रबुद्धे यांच्या वैराचं परिमाण त्याने बदलत नेलं असतं. इथे ते फार पुढे मागे जात नाही.
त्याचबरोबर राजूच्या घरच्या गरिबीचा इतका विनोद करण्यामागचं कारण लक्षात येत नाही. एखाद्या माणसाच्या ख-याखु-या अडचणींकडे,खासकरून ती एका सामाजिक प्रश्नाशी जोडलेली असताना, चित्रपटासारख्या लोकशिक्षणाशी संबंधित माध्यमांनी सहानुभूतीने पाहाणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही फिरकी अकारण अन् पोलिटिकली इनकरेक्ट वाटते.
मात्र या काही गोष्टी वगळता इडिअट्स मला पटला. चांगला, अर्थपूर्ण, रंजक अन् शंभर टक्के बॉलीवूड सिनेमा म्हणजे काय हे रसायन राजकुमार हिरानी या माणसाला उमगलेलं आहे. आपल्यावर मुन्नाभाई मालिकेचा छाप पुरता बसण्याआधीच त्याने वेगळी निर्मिती यशस्वीपणे करून दाखवणं हेदेखील त्याच्या आत्मविश्वासाचं आणि आपल्या तंत्रावरल्या भरवशाचं लक्षण आहे. नजिकच्या भविष्यकाळात लक्ष ठेवून राहावं असा विशाल भारद्वाजच्या बरोबरीचा आणखी एक दिग्दर्शक आपल्यापुढे आला आहे, असं खात्रीने म्हणता येईल.

-गणेश मतकरी.

8 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) January 14, 2010 at 3:20 AM  

चित्रपटाचं समिक्षण आणि खरी बाजू उत्तम रितीने लिहीली आहे. फक्त एकच बदल सुचवावासा वाटतो. चतुरची भूमिका करणा-या नटाचं नाव ओमी वैद्य असं आहे. इथे त्याची माहिती आहे.

ganesh January 14, 2010 at 8:59 PM  

this is what happens when u watch too many films. i knew that his name is omi vaidya as i had checked about him on the net. i have no idea why i wrote omi kapoor. i am guessing its a subcncious residue of om shanti om. if i remember correctly, 2nd srk is called om kapoor in that one.

Anee_007 January 15, 2010 at 6:30 AM  

मला वाटत की जर नीट बघितलं तर मुन्नाभाई १,२ आणि ३ इडीअटस मध्ये बरंच साम्य आढळेल.उदा.मुन्नाभाई MBBS मध्ये असणार बोमन इरानीच प्रोफ़ेसरच कॆरेक्टर आणि ३ ईडिअट्स मधल कॆरेक्टर,शर्मन जोशीला बरं करताना केलेल्या क्लुप्त्या इत्यादी.पण तरी सुद्धा हा चित्रपट सर्व प्रकारच्या वर्गाला आवडायचं कारण की असे चित्रपट कॊलेजच्या आठवणी नकळतचं जाग्रुत करुन जातात ज्या प्रत्येकाला बहुमुल्य असतात असं मला वाटतात.

ganesh January 15, 2010 at 7:37 AM  

samya ahe he tar ughad ahe, pan mala watta te boman cha caharcterpeksha adhik education system varlya comments madhe adhik ahe. boman charactermadhli similarity adhik superficial ahe . karan mbbs madhe te ughad carricature ahe whereas ithe te khoopach realistic ahe including the backstory of his son. similarity feels more obvious because they are played by the same person and reperesent a same category ie head of the school. not to mention the father of the heroine. i did not find much similarity between lage raho ani idiots.that both are good films,both represent typical bollywood while being thought provocative are similarities but r v general. btw, do u realise that mbbs is reworking of patch adams?

Anee_007 January 16, 2010 at 10:04 PM  

Yaah,That true.apart from that I will even say that somewhere acting of Sanjay Dutt is quite similar to one performed by Robin Williams in Patch Adams.But I don't know I am right or wrong but somewhere I think Munnabhai MBBS is definitely better than Patch Adams.What do you think?

ganesh January 17, 2010 at 9:30 PM  

without a doubt mbbs is better because of its focus. in patch , the dean is actually right and patch claiming that laughter IS the best and probably ONLY madicine is wrong. in MBBS , munna doesnt actually want to become a doctor. all he expects is a human treatment for the patients. so even though the film has farcical elements, it remains more plausible at the core. makes sense?

Ruminations and Musings February 4, 2010 at 9:34 PM  

mala cinema awaDalach nahee.. akaran Aamir Khan war sagala focus aahe..! Aani to slow hoto sarkha.. katha pudhe sarkat nahee..

Unknown February 19, 2010 at 11:19 PM  

Maajhi first reaction ashi hoti ki 'its typical masala movie'.
Its a good entertainer, bore hot naahi - but I think its not worth the hype created.
Many of the things are taken from email forwards etc.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP