ठिसूळ पटकथेचा जोधा अकबर

>> Sunday, April 13, 2008

"बाजी' आणि "पेहला नशा'सारख्या मसालेदार पण अयशस्वी दिग्दर्शन प्रयत्नांनंतर जेव्हा आशुतोष गोवारीकरने पुढच्या चित्रनिर्मितीचा विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की लोकांना खूष करण्याचा विचार हा व्यर्थ आहे. आपण जेव्हा आपल्याला मनापासून सांगायची असेलशी गोष्ट तडजोडीशिवाय पडद्यावर आणू तेव्हाच ती यशस्वी होईल. मग आपल्याला सुचलेली स्वातंत्र्यपूर्व काळातल्या क्रिकेट मॅचची गोष्टच या ना त्या मार्गाने पडद्यावर आणायचं त्याने ठरवलं आणि रेस्ट इज हिस्टरी. लगान आणि त्यानंतरचे आशुतोष गोवारीकरचे चित्रपट यामध्ये काही बाबतीत असणारं साम्य हे सिद्ध करतं, की त्याने लगान निर्मितीच्या वेळी घेतलेले निर्णय आणि आपण कशा प्रकारचे चित्रपट करावेत याविषयी मांडलेले ठोकताळे पूर्णपणे योग्य ठरल्याचा अमूक एक परिणाम त्याच्या कार्यपद्धतीवर झाला असावा. "लगान', "स्वदेस' आणि आताचा "जोधा अकबर' हे यशाच्या ढोबळ फॉर्म्युलात बसणारे चित्रपट नाहीत. खरं तर तिघांच्या कथाकल्पना पडद्यावर आणणं हे एक प्रकारचं धाडसच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे लगानच्या निर्मिती आधी त्याचं खेळाला महत्त्व देणं, पिरियड फिल्म असणं, भाषेचा वेगळा वापर या सगळ्या घटकांचा वापर हा एक प्रकारचा जुगार होता, त्याचप्रमाणे "स्वदेस'मधला "ब्रेन ड्रेन'ला विरोध करण्यासाठी तथाकथित नाट्यपूर्णतेच्या साचात न बसणारी कथा आणि शाहरूख खानला दिलेलं नवं रूप हादेखील होता आणि "जोधा अकबर'मधली इतिहासाची संदिग्धता, मोगले आझमशी होऊ शकणारी तुलना किंवा विषयाची वादग्रस्तता हादेखील. मात्र या प्रकारचं धाडस आता गोवारीकरच्या अंगात मुरलेलं दिसतं. एकदा का त्याला स्वतःला विषय पटला, की तो पूर्ण मेहनतीने आणि तपशिलात जाऊन मांडायचा हा या दिग्दर्शकाचा विशेष, सुदैवाने "लगान'ची पुण्याई (अर्थात व्यावसायिक यश) इतकी मोठी आहे, की गोवारीकरच्या निर्णयाची शंका घेण्याची हिंमत भल्याभल्या निर्मात्यांना होऊ नये. धाडस अन् प्रामाणिकपणा या दोन गोष्टींबरोबरच या दिग्दर्शकाकडे असलेला तिसरा गुण म्हणजे मेहनतीची तयारी. पटकथेला साह्य होण्याकरिता तो ज्या त्या गोष्टीचा तपशिलात अभ्यास करतो आणि अमेरिकेतल्या नासा हेडक्वार्टर्सपासून अकबरकालीन दागिन्यांच्या डिझाइन्सपर्यंत सर्व गोष्टी शक्य तितक्या मुळाबरहुकूम उतरतील अशी काळजी घेतो. या तिन्ही चित्रपटांमध्ये विषयाचं वेगळेपण दिग्दर्शकाचा स्वतःच्या कामाकडे पाहण्याचा गंभीर दृष्टिकोन, चित्रभाषेवर केलेली मेहनत या सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्यामुळे आश्चर्य वाटतं, ते एकाच वैचारिक साच्यातून निघालेल्या तीन चित्रपटांतले पुढचे दोन इतके प्रभावहीन ठरतात याचं. अखेर "स्वदेस' चालला अन् त्याच्या चाहत्यांची एक फळी जरूर अस्तित्वात आहे. मात्र पटकथेच्या पातळीवर तो फसला यात शंका नाही. इथल्या नायकाने घेतलेल्या धीरोदात्त निर्णयानंतर त्याने निवडलेल्या ग्रामसुधार मार्गामधला संकुचितपणा आणि दृष्टिकोनाची मर्यादा याने अनेक प्रश्न उभे राहिले. ज्यांची उत्तरं पटकथेकडे नव्हती. त्याबरोबरच गरजेपेक्षा अधिक लांबी, त्यातून येणारा पसरटपणा अन् नाट्यपूर्णतेचा अभाव यांनी परिस्थिती बिकट झाली. नाट्य म्हणजे केवळ संघर्ष नव्हे. त्यामुळे विरोध उघड संघर्ष नसण्याला नाही. मात्र प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता पटकथेत नसण्याचा जरूर आहे. प्रभाव मात्र कमी "जोधा अकबर'चीही काहीशी हीच गत आहे. दिग्दर्शकाच्या हेतूबद्दल शंका घ्यायला जागाच नाही. त्याने आपल्याला सुचलेल्या कल्पनेला पडद्यावर आणण्यासाठी योग्य वाटेल त्या सर्व गोष्टी केल्या आहेत. ज्या विशिष्ट काळात ही गोष्ट घडते त्या काळाचा, राजघराण्यांचा, वस्त्रालंकारांचा, रणनीतीचा त्याने खूप अभ्यास केला आहे आणि तो चित्रपटाच्या दृश्यपरिणामातून यथायोग्यपणे व्यक्तदेखील होतो. निर्मितीची श्रीमंती अन् त्यामागे घेतली गेलेली मेहनत जागोजाग दिसून येते. मात्र या सगळ्याचा प्रभाव अतिशय मर्यादित प्रमाणात पडतो. या चित्रपटाचा प्रभाव हा खरं तर दोन परस्पर भिन्न दृष्टिकोनातून पाहायला हवा. दृश्य आणि भावनिक. बऱ्याच प्रमाणात इथे दृश्य प्रभाव आहे. वातावरणनिर्मिती नेपथ्य आणि वेशभूषा या इथल्या जमेच्या बाजू. छायाचित्रणदेखील जरी सुद्धादरम्यान सैन्याची भव्यता कमी वाटायला लावणाऱ्या टॉप अँगल्ससारख्या काही दृश्ययोजना शंकास्पद, त्याचबरोबर स्टार्सचा वापरदेखील. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांना अकबर आणि जोधा म्हणून पाहताना आपण त्यांचं स्टार असणं विसरू शकत नाही, त्यामुळे या व्यक्तिरेखा कधीच अस्सल होत नाहीत. "स्वदेस'मध्ये शाहरूख खान काही प्रमाणात का होईना आपलं स्टारपण पुसून टाकण्यात यशस्वी झाला होता. इथल्या प्रमुख कलाकारांना ते शक्य होत नाही. त्यामुळे अर्थातच एक मोठी मर्यादा तयार होते. बरं, दृश्य प्रभाव हा महत्त्वाचा असला (खासकरून या प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटात तो जरूर असतो) तरी सर्वाधिक महत्त्व असतं ते भावनिक प्रभावाला आणि जोधा अकबरचा खरा गोंधळ आहे तो इथेच. याचा संबंध प्रामुख्याने आहे तो कथानकाशी (अन् अर्थातच पटकथेशी) आणि त्याचबरोबर व्यक्तिचित्रणाशी. इतिहासाच्या पार्श्वभूमीमुळे आणि व्यक्तिरेखांच्या राजघराण्यामधून येण्याने जी आपसूक भव्यता येते ती सोडली तर व्यक्तिनिष्ठ कथानक हे अत्यंत सामान्य आहे. एक जोडपं पती मुस्लिम तर पत्नी हिंदू. लग्न म्हणजे प्रेमविवाह निश्चित नाही, पण लग्नानंतर हळूहळू वाढीला लागलेलं प्रेम. मग गैरसमज. पत्नीने माहेरी निघून जाणं. मग पतीला आपली चूक लक्षात येणं. तो तिला नेण्यासाठी तिच्या माहेरी जाऊन भडकणं वगैरे वगैरे. आता या कथानकात विशेष ते काय? व्यक्तिरेखांच्या वलयाने तपशील सुधारू शकतो, पण कथेचे मूळ घटक कसे बदलणार? हे कथानक लोकांनी अनेक वेळा पाहिलं आहे, पाहत आहेत. टीव्ही सिरिअल्समधल्या अनेक उपकथानकांमधून त्याने हजेरी लावली आहे, नाटका-सिनेमातही येऊन गेलेलं आहे. असं नावीन्याचा संपूर्ण अभाव असलेलं कथानक केवळ पार्श्वभूमी सुसह्य करू शकेल? मला वाटत नाही. त्याबरोबरच हाही विचार व्हायला हवा, की आज आधुनिक काळातल्या मध्यमवर्गीय घरातली जोडपी आणि अकबर-जोधा यांच्या वागण्यात काही फरक असेल की नाही? असला (आणि तो असणारच) तर तो इथे दाखवला जात नाही. या मंडळींचं वागणं हे प्रेम, हेवेदावे, कर्तव्य यांच्या सांकेतिक कल्पनांनीच जोडलेलं दिसतं, जे खरं वाटत नाही. आपल्याला जेव्हा या चित्रपटासाठी केलेल्या प्रचंड रिसर्चविषयी सांगण्यात येतं, तेव्हा "रिसर्च कसला?' असा प्रश्न विचारावासा वाटतो. अर्थात या प्रश्नाचं उत्तर आपण जाणूनच आहोत. रिसर्च हा तेव्हाच्या वास्तुशास्त्राचा, दागिन्यांचा, कपड्यांचा. काही प्रमाणात चालीरीतींचा आणि ऐतिहासिक सनावळींचा. हे चित्रपट खरे व्हायचे तर या रिसर्चचा उपयोग जरूर आहे, पण तो दुय्यम. खरा रिसर्च व्हायला हवा तो वर्तणुकीचा. ही माणसं काय होती? कशी होती? ती अमुक प्रकारे वागली का? वागल्यास कशामुळे? हे प्रश्न इथे खरे महत्त्वाचे आहेत. ज्यांची उत्तरं ऐतिहासिक ग्रंथांमधून मिळतीलच असं नाही; मात्र ती आवश्यक जरूर आहेत. कदाचित ती तेव्हाच्या काव्यसंपदांमधून, बखरींमधून मिळतील, कदाचित कोणा लेखकाच्या सुपीक डोक्यातून. कधीकधी एखाद्या आधुनिक पटकथाकारही या काळाच्या पडद्याआड गेलेल्या महानायक-नायिकांच्या प्रेमकथेला विशद करू शकेल. मात्र इथे तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही. इथे अकबर जोधाचे रोमॅंटिकपण (रोशन/बच्चन वादामुळे) सांभाळून चित्रित केलेले बेडरूम सीन्स दिसतात, अकबराने मौलवींच्या गाण्यावर तल्लीन होऊन केलेला नाच (?) दिसतो, दरबारात बसलेल्या अकराला अनेक महाल ओलांडून आपल्या देवघरासमोर बसलेल्या जोधाने गायलेलं भजन लख्ख ऐकू येताना दिसतं, अकबराने एक टॅक्स माफ केल्यामुळे जनतेला आलेलं प्रेमाचं भरतं आणि त्यांनी शाळेच्या गॅदरिंगला आल्याप्रमाणे विविध वेष परिधान करून म्हटलेलं गाणं दिसतं. हे सगळं अत्यंत ढोबळ आणि वरवरचं आहे. या व्यक्तिरेखा अशा वागणं शक्य नाही हे आपल्याला कुठे तरी जाणवतं आणि आपण स्वतःला कथानकात गुंतवून घेत नाही. हा सुंदर बेगडीपणा आपल्याला जाणवत राहतो. जोधा-अकबर वादात सापडला ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण अशा वादांमुळे कलाकृतीच्या खऱ्या दर्जाला पडताळलं जाऊ शकत नाही. ती चुकीच्या कारणांनी चर्चेत येते. आणि त्यानंतर तिला कायम संदर्भ येतो तो या वादांचा. वाद फार वेळ चालले तर या कलाकृतींकडे त्रयस्थपणे पाहणं अशक्य होऊन बसतं. "जोधा अकबर'मध्ये खरं महत्त्व हे वाद उत्पन्न करणाऱ्या तपशिलांना देऊ नये किंवा काळ उभा करण्यासाठी दिग्दर्शकाने घेतलेल्या अविरत प्रयत्नांनाही. अखेर प्रश्न आहे तो चित्रपट ज्या व्यक्तींना आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या तशा येऊ शकल्या का? अकबर आणि जोधा कोण होते, त्यांच्या प्रेरणा काय होत्या, हे आपण समजू शकलो का? निदान माझ्या पुरतं या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. जर इतकी साधी अपेक्षा चित्रपट पूर्ण कर शकत नसेल, आणि प्रभावहीन ठरत असेल तर मुळातच तो पडद्यावर आणण्यात, त्यासाठी प्रचंड पैसा आणि मेहनत खर्ची घालण्यात अर्थ होता का, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. आशुतोष गोवारीकर आपल्या चित्रपटांमागच्या कल्पना तर अधिकाधिक महत्त्वाकांक्षी निवडतो आहे अन् त्यांच्या निर्मितीतही स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आहे, मात्र स्वदेस आणि जोधा अकबर पाहिल्यावर हे दिसून येतं की कल्पना स्पष्टपणे समजेलशी मांडणारी महत्त्वाची पायरी असणारी संहिता मात्र गोवारीकरच्या हातून सुटत चालली आहे. लगानच्या यशात संहितेचा मोठा वाटा होता, जी पहिल्या निवेदनापासून प्रेक्षकांचा ताबा घेत असे ती शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत. इथलं गुंतागुंतीचं कथानक, अनेक व्यक्तिरेखा, उपकथानक यांना या संहितेने सुबोध करून सांगितलं होतं. पुढल्या चित्रपटांचं अपयश हे प्रामुख्याने संहितेचं अपयश आहे. गोवारीकरच्या हे लवकर लक्षात येईल तर बरं. अर्थात त्याच्यासारखा सर्वमान्य दिग्दर्शक या त्रुटी मान्य करण्याची शक्यता फारच कमी. जवळजवळ नाहीच म्हणा ना. मग त्यावर पावलं उचलणं दूरच राहिलं.
- गणेश मतकरी

10 comments:

Abhijit Bathe April 14, 2008 at 11:38 AM  

Matkari -

I could not disagree more with this review. I found Swades and Jodha Akbar better than Lagaan.

ganesh April 14, 2008 at 1:41 PM  

abhijeet,
does it mean that you actually felt that this representation of these character comes close to what they actually might be?if so, i dont know what to say, because to me, all this is too superficial.authentic background with people missing.
are you saying lagaan was great ,but swades and JA are phenominal, or lagan was bad or so so ,and these to are better/best/whatever.
clarify.

Abhijit Bathe April 14, 2008 at 9:10 PM  

Matkari -
1) Pesentation of characters: I dont know what Akbar and Jodha might have been. What I saw here - I didnt feel it was unrealistic, that is to say - if it had been like what is shown in the movie, I wouldnt be surprised. Its not a known fact that it was otherwise.
2) Though I liked Lagaan, I also liked Swades and Jodha Akbar. If I had to rank them, Swades and JA would rank above Lagaan in my book.

Y April 14, 2008 at 11:10 PM  

गनेश तुमचे निरिक्शन बरोबर आहे. लगान चांगला होता. गोवारिकर ला स्वत:ला प्रूव्ह करन्यासाठी तसाच एखांदा चांगला सिनेमा बनवायला लागेल. नाही तर तो सिनेमा फ्ल्यूक होता असं काहीजन म्हंतील. ते जोधा अक्बर मधलं ’ख्वाजा मेरे ख्वाजा’ गानं लागलं की दहा कोल्ह्यांची कोल्हेकूई सूरू झाल्यासारखं वाट्टं असं म्हटलं तर ते चुकीचं होनार नाही.
स्वदेस ओव्हररेटेड होता. एनराय लोकांनी काही चांगलं म्हटलं कि त्याला चांगलं म्हनन्याचि आपली आता पद्दत झाली आहे.

- बाळासाहेब चौगुले,
राहुरी

Abhijit Bathe April 15, 2008 at 6:38 PM  

आवो पर बाळासाएब - हितं बोल्तोय त्यातले (म्हनजे हिन्दी ऍज वेल ऍज इंग्रजी) मायंदाळ सिनेमे लोनीत आनि रहात्यात आनि श्रीराम्पुरात पायलेत! आता आपल्याच मान्साला एनराय म्हनुन दूर सारायचं व्हय वो?

Matkari - let it lightly! :)
Just couldnt stop myself from writing this comment.:))
But the content is true though.

BTW - Went to get 'Sexus' but instead picked up Miller's 'Tropic of Capricorn'. More on mail.

ganesh April 15, 2008 at 7:12 PM  

abhijeet,
though i believe, that he has a point.

Abhijit Bathe April 15, 2008 at 9:18 PM  

Matkari - Do you really think so? I mean good cinema is good cinema. Once you are in the theatre - how does it matter where you live?

Unknown April 17, 2008 at 2:52 AM  

मी जोधा अक्बर पहिलेल नहि. अशुतोश थन्द मनुस दिसतो. चिनेमा सुधा सन्थ आहे का?

Vaishali Hinge April 23, 2008 at 12:41 AM  

I am agree with you, i have not seen Lagaan but swadesh was quite good than Jodha Akabar.
I found Jodha like Mrs. Bachchan.:)

Shubhangi October 13, 2013 at 8:56 PM  

Hi Ganesh, I've just stumbled upon your blog and reading random blog posts and commenting on them.

I personally, loved Lagaan. Swades touched me and it had it's moments. I think it's one of Shah Rukh Khan's most (perhaps only) sincere attempt to be the character and not SRK.

Jodha Akbar seemed like it was not about the story anyways but about how Hritik and Aishwarya (undoubtedly the most good looking people in the industry at that time) would look resplendent in Mughal & Rajput finery. It was more a feast of stunning, lush visuals. I spent most of the time gawking at 'eye candy' Hritik and Aishwarya's queenly get up.

Don't know what's happened to Ashutosh Gowarikar and where he is hiding. In one of his interviews he had said that every director has only 5 good movies in him. I hope he hasn't already emptied his bag of stories.




Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP