सुरेल उःशापाची गोष्ट

>> Monday, August 11, 2008


काही भाग्यवंत माणसे सोडली, तर आपण सारेच जण भूतकाळाची ओझी मनावर वागवत जगणारे लोक. कळत नकळत गोष्टी हातून घडून जातात आणि त्यांच्या भल्या-बुऱ्या आठवणींचे व्रण मात्र आपण अखेरपर्यंत वागवत राहतो. त्यातून सुटका नाही; मात्र कधी कधी एखाद्या सोन्यासारख्या क्षणी या शापालाही उःशाप मिळतो आणि माणसे अंतर्बाह्य उजळून जातात. "मॉर्निंग रागा'ची गोष्ट अशाच एका उःशापाची गोष्ट आहे.
गावाकडून शहराकडे जाणाऱ्या एका पुलावरचा दुर्दैवी अपघात हा या गोष्टीचा आरंभबिंदू. "मॉर्निंग रागा'मधली तीनही प्रमुख पात्रे आपापल्या पद्धतीने या अपघाताशी जोडली गेली आहेत.
गाण्याच्या कार्यक्रमासाठी शहरात निघालेली स्वर्णलता तिच्या विनवणीमुळे तिच्यासोबत आलेली, व्हायोलिनवर तिला साथ करणारी तिची मैत्रीण वैष्णवी आणि या दोघींचेही लेक दारू पिऊन बेभान झालेला एक मोटारवाला पुलावर बसला धडक देतो आणि बस नदीत कोसळते. वैष्णवी, बसमधले कित्येक गावकरी, स्वर्णलताचा मुलगा आणि मोटारवाला या अपघातात ठार होतात. स्वर्णलता गावात परतते ती वैष्णवीच्या मरणाचे ओझे घेऊनच. या मरणासाठी ती स्वतःला दोषी मानते आहे. या गोष्टीला 20 वर्षे उलटून जातात. वैष्णवीचा मुलगा अभिनय संगीतात नवे काही करू बघतो आहे. त्याचा अभिजात कर्नाटकी संगीताकडे ओढा आहे. आपल्या ग्रुपसाठी स्वर्णलताचा आवाज "टू मच ऑफ ए कोइन्सिडन्स' असे वाटण्याचा धोका या गोष्टीत आहे, पण "मॉर्निंग रागा'चे यश असे, की एकदाही असा विचार मनात येत नाही. अतिशय सहजगत्या गोष्ट पुढे सरकत जाते. अभिनय (प्रकाश कोवेलुमुडी), पिंकी (पेरिझाद झोराबियन) आणि स्वर्णलता (शबाना आझमी) या प्रमुख व्यक्तिरेखांइतकीच महत्त्वाची कामगिरी इतर पात्रांनी बजावली आहे. अभिनयच्या म्युझिक ग्रुपमधले त्याचे मित्र, पिंकीची काहीशी उथळ वाटणारी आई (लिलिएट दुबे) ही सारी मंडळी बारीकबारीक तपशिलांनी जिवंत केली आहेत. ती फक्त पार्श्वभूमीला न राहता आपापले स्वभाव घेऊन वावरणारी माणसे होऊन जातात. स्वर्णलताचा अपराधी भाव जिवंत करणाऱ्या शबाना आझमींइतकेच श्रेय या मंडळींनाही दिलेच पाहिजे. पेरिझाद झोराबियन आणि प्रकाश कोवेलुमुडी यांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखविली आहे.
दक्षिण भारतातले खेडे टिपणारा कॅमेरा ही "मॉर्निंग रागा'ची खासियत. तिथली विशिष्ट बांधणीची शांत, पांढरीशुभ्र घरे, देवळे आणि नदीवरचा "तो' पूल हे सगळे इतक्या जिवंतपणे टिपले आहे, की ते फक्त "लोकेशन' राहत नाही. हैद्राबादजवळचे ते गाव चित्रपटातले एक पात्र होऊन जाते. (हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही ठिकाणी मात्र दृश्याचा मोह संकलकाला अनावर झाल्याची शंका येते, पण अशा वेळा अगदी तुरळक आहेत, ही नशिबाची गोष्ट) प्रियदर्शनच्या चित्रपटांतून जिवंत होणाऱ्या अशा गावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वाट चालत राहते. शाप आणि उःशाप दोन्हीही देणारी नियती असे स्वरूप त्याला आहे. संगीत दिग्दर्शक अमित हेरी यांनी ही जबाबदारी अफलातून पेलली आहे. कर्नाटकी अभिजात संगीत ते आधुनिक वाद्यांसोबत मेळ साधत जाणारे कर्नाटकी संगीत असा या संगीताचा प्रवास. तो दृष्ट लागण्याइतका सुरेख आहे.
पटकथा, अभिनय, दृश्यांचा वापर, संगीत या सगळ्या बाबींमध्ये समाधान देणारा हा चित्रपट त्यात काही दोष आहेतही, पण ते निव्वळ तीट लावावी इतक्याच योग्यतेचे.
- मेघना भुस्कुटे

2 comments:

Unknown August 11, 2008 at 9:50 AM  

khUp divasani athvan zali ya movie chi.. phar awdla hota! :)

Hemant August 13, 2008 at 4:15 AM  

I dont know abt the movie ..
but review was good

thank you meghana

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP