वास्तवाचा तुकडा - टिंग्या

>> Friday, May 30, 2008

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दोन बैलांनी धुमाकूळ घातलाय हे सर्वश्रुत आहे. गावच्या माजलेल्या बैलाभोवती दंतकथाचं मोहोळ निर्माण करणारा "वळू' आणि माणुसकीचा युनिव्हर्सल संदेश देणारा "टिंग्या' हे उमेश कुलकर्णी आणि मंगेश हाडवळे या दोन तरुण दिग्दर्शकांचे उल्लेखनीय प्रथम प्रयत्न. समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचं अमुक एका प्रमाणात लक्ष वेधून राहिलेले. दोन्ही यशस्वी असले तरी दोघांनी जणू यशाची विभागणी केलेली. मुक्ता आर्टससारख्या मातब्बर संस्थेच्या पाठिंब्याने "वळू' जाहिरात अन् प्रत्यक्ष प्रदर्शन यामध्ये बाजी मारून गेला आणि शैलीदार दिग्दर्शन तसंच सहज विनोदी संवादांच्या आधाराने प्रेक्षकांमध्येही त्याने हवा तयार केली. त्यामुळे यंदाच्या कोणत्याही मराठी चित्रपटाच्या तुलनेत त्याने नफा अधिक मिळवला. दुर्दैवाने पारितोषिकं आणि इतर सन्मानाबाबत त्याची फार उपेक्षा झाली. अनेक ठिकाणी त्याला नामांकन नाकारण्यात आली, काही चित्रपट महोत्सवांनी त्याला डावलला आणि काही वेळा उघडपणे कमी दर्जाच्या निर्मितींना त्याच्या वर स्थान देण्यात आलं. हे असं का ते मला कळलं नाही. विचार करूनही कळत नाही. "वळू'मध्ये काहीही चुका नाहीत किंवा तो यंदाचा सर्वोत्तम चित्रपट आहे असं मला उघडच म्हणायचं नाही. त्याची पटकथा सदोष असल्याचं तर मी वऴूच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. मात्र त्याची संकल्पना, दिग्दर्शनातले प्रयोग आणि मांडणीतली चतुराई या गोष्टी निश्चितच दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. पारितोषिक नाकारणं आपण समजू शकतो, कारण ते एकाच उत्तम सर्वोत्तम निर्मितीला देण्यात येतं. पण नामांकन, चित्रपट महोत्सवातले प्रवेश, याबाबतही जेव्हा उदासीनता दिसून येते, तेव्हा परीक्षकांच्या किंवा निवड समितीच्या हेतूबद्दल वा ज्ञानाबद्दल शंका उपस्थित होऊ शकते. याच्या बरोबर विरुद्ध केस "टिंग्या'ची. त्याची आर्थिक बाजू "वळू'हून कमी प्रमाणात लढवण्यात आली असली, तरी त्याच्या दर्जाचा मात्र सर्व ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे. अनेक पारितोषिकं मिळवणारा "टिंग्या' सर्वत्र गाजतो आहे. आता प्रश्न असा, की ज्या संबंधितांना "टिंग्या'चा दर्जा लक्षात येतो, ते "वळू'च्या दर्जाबद्दल नको इतके उदासीन का? की बैलाचे दोन सिनेमे आहेत ना, मग कोणता तरी एकच निवडा!' असा काही चमत्कारिक निकष इथे लावला गेलाय? असो. निदान "टिंग्या'कडे दुर्लक्ष करण्यात आलं नाही, हे काय कमी आहे? इराणी वास्तववादाशी आणि मजिद मजिदीसारख्यांच्या चित्रपटांशी नातं सांगणारा "टिंग्या' हा अनेक दृष्टींनी गुणी चित्रपट आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा टिंग्या (शरद गोयेकर) आणि त्याचा चितंग्या हा बैल यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. टिंग्याला पार्श्वभूमी आहे ती शेतकऱ्यांच्या सध्याच्या बिकट अवस्थेची. टिंग्याच्या वडिलांनी आधीच सावकाराकडून कर्ज काढलेलं आहे, जे फेडणं त्यांना जड जातंय. अशातच शेतीसाठी वापरण्याचा त्यांचा बैल चितंग्या एका खड्ड्यात पडतो अन् जायबंदी होतो. शेतीचं कामकाज ठप्पं होतं. पैशांच्या चिंतेनं ग्रासलेल्या वडिलांच्या मनात चितंग्याला खाटकाला विकायचे विचार घोळायला लागतात. मात्र चितंग्याला थोरल्या भावासारखा मानणारा टिंग्या याला विरोध करण्यासाठी आपली कंबर कसतो. ज्यांनी नजीकच्या भूतकाळातले इराणी चित्रपट पाहिले असतील, त्यांना "टिंग्या'मध्ये अनेक साम्यस्थळं सापडतील. साधी, आडवळणांनी न जाणारी कथा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणता येतीलशा कुटुंबांमधली माणसं, अत्यंत अस्सल वातावरण, नट असल्याची शंकाही येणार नाही अशा जिवंत व्यक्तिरेखा आणि एकाच वेळी प्रादेशिक अन् जागतिक वाटणारा विषय, अशा अनेक घटकांबाबत हे म्हणता येईल. इराणमध्ये अनेकदा नॉन ऍक्टर्स वापरण्याची, म्हणजेच सराईत अभिनेत्यांना न घेता भूमिकेत चपखल बसणाऱ्या कोणालाही घेण्याची प्रथा अनेक वर्षं आहे. मंगेश हाडवळेने पूर्णपणे नॉन ऍक्टर्स घेतलेले नाहीत, मात्र हे चेहरे खूप ओळखीचे नाहीत आणि विठ्ठल उमप किंवा चित्रा नवाथेसारख्या ओळखीच्या चेहऱ्यांच्या बाबतीतही त्यांना दिलेल्या बेअरिंगमुळे किंवा रंगभूषा/ वेशभूषेमुळे त्यांच्या पडद्यावरच्या वावरात आपल्याला ओळख जाणवत नाही. प्रमुख भूमिकेतला शरद गोयेकर तर नवाच आहे. एकुणात काय, तर रशिदाच्या भूमिकेतली लहान मुलगी सोडता कोणीही अभिनय करतोय वा सांगितलेले संवाद म्हणतोय असं वाटत नाही. इथे जे दिसतंय ते खरं असल्याचीच आपली भावना होते. टिंग्याचा विषय हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा संदर्भ असलेल्या भीषण सामाजिक वास्तवापासून ते बैलबाजारासारख्या स्थळांच्या तपशिलापर्यंत पूर्णतः आपल्या मातीतून येणारा असला तरी त्याचा विषय हा अखेर मूलभूत मानवी भावभावनांशी नातं सांगणारा आहे, ज्या जगाच्या पाठीवर कुठंही बदलू शकत नाहीत. त्यामुळे त्यातली भारतीय पार्श्वभूमी जरी त्याला प्रादेशिक बाज देत असली, तरी जगभरातल्या कोणालाही तो समजायला कठीण नाही. त्याला जे म्हणायचंय ते तो माणुसकीच्या भाषेत सांगतो आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की ज्याप्रमाणे तो आपल्या प्रेक्षकांना आवडतो आहे त्याचप्रमाणे तो विदेशी रसिक, आणि त्यांचे समीक्षक/ अभ्यासक यांनाही आवडण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना त्याला मिळालेल्या पारितोषिकांमधल्या विदेशी परीक्षकांच्या सहभागावरूनही हे सिद्ध होतंय. त्यामध्ये भारतीय चित्रपटांकडून अपेक्षित असणारा तथाकथित बॉलिवूडी मसाला नसला तरी तो त्यातल्या आशयासाठी सर्वांना आवडेल हे स्पष्ट आहे. अर्थातच निदान माझ्या नजरेतून यंदा ऑस्कर स्पर्धेत पाठवण्यासाठी हा योग्य उमेदवार आहे. या प्रकारचा चित्रपट (उदाहरणार्थ चिल्ड्रन ऑफ हेवन) यापूर्वी ऑस्कर नामांकनात आलेला आहे आणि या प्रकारच्या ज्यूरीमध्ये दिसणारं छोटेखानी, मानवतेचा संदेश देणाऱ्या विषयांचं आणि जिवंत व्यक्तिरेखांचं प्रेम तर आपण जाणतोच. चतुर मांडणी अन् तंत्रचमत्कारांना विटलेल्या या मंडळींना हा वास्तवाचा तुकडा पकडून ठेवण्याची क्षमता ठेवून आहे. अर्थात आपल्याकडे चालणाऱ्या राजकारणापुढे अशी रास्त निवड होण्याची शक्यता कितपत आहे, हा प्रश्न विचार करण्याजोगा. पण असं घडलं तर आपण नामांकनात येण्याच्या शक्यतेत लक्षणीय वाढ होईलसं मात्र वाटतं. "टिंग्या' तांत्रिक बाजूंत थोडा अधिक सफाईदार होऊ शकला असता. छायाचित्रणात थोडी अधिक कारागिरी येऊ शकली असती. संगीताचा वापर थोडा अधिक संयत होऊ शकला असता. मात्र एकूण परिणाम पाहायचा, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मंगेश हाडवळेचा हा पहिलाच चित्रपट आहे. शिवाय तो दिग्दर्शक बनला आहे तो अनुभवातून; तंत्रशुद्ध शिक्षणातून नव्हे. त्यामुळे त्याला पारंगत होण्यासाठी काही काळ लागला तर समजण्यासारखं आहे. त्यामुळे तांत्रिक सफाई हा त्याच्यासाठी काळजीचा मुद्दा असण्याची गरज नाही. मात्र आपल्या पुढल्या प्रोजेक्टची निवड हा मात्र जरूर असायला हवा. पहिल्याच चित्रपटात या प्रकारचं यश आणि अमुक शैलीचा छाप बसणं, या दोन्ही गोष्टी एका परीनं धोकादायक आहेत, कारण त्या या दिग्दर्शकाकडून वारेमाप अपेक्षा तयार करतात, जे त्याची पुढल्या कामाची निवड आपसूकच कठीण बनवतं. त्याच्या दृष्टीनं पाहायचं, तर ते तितकंसं न्याय्य नाही. प्रेक्षकांनी त्याला उद्योगात सरावायला, चुका करायला, त्यापासून शिकायला वेळ द्यायला हवा. मात्र अनुभव सांगतो, की हा वेळ दिला जात नाही. प्रेक्षकांना आपल्या अपेक्षा पूर्ण होतीलशी खात्री असते, अन् कोणत्याही सबबी ते ऐकून घेत नाहीत. त्यामुळे सध्या आपण या तरुण दिग्दर्शकाचं अभिनंदन करू आणि त्याला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. त्यांची गरज त्याला पडेलच.
- गणेश मतकरी

6 comments:

Unknown June 17, 2008 at 12:29 PM  

This is simply a great post..!
Last 10-15 lines shows your maturity and hold onto this subject/media...Superb!!

आनंद पत्रे November 16, 2009 at 11:51 PM  

नेहमीप्रमाणे सुंदर विवेचन!
एक न एक मुद्दा पटला. संगीत माझ्या मते तर संयत होते. फक्त खटकणारी गोष्ट म्हणजे सीन बदलल्यावर एकदम संगीत थांबायचे अथवा दुसरे सुरु व्हायचे.
एका सीन मधून दुसर्या मध्ये मिसळणारे नव्हते. (बहुतेक तुम्ही तेच म्हणत असणार), ते मात्र मी बहुतेक समांतर/वास्तववादी सिनेमा मध्ये पाहिले आहे...

ganesh November 20, 2009 at 6:37 AM  

hi anand,
if u want to see a much worse ,in fact downright bad example of use of music, see jogwa. the music just doesnt stop .it fills entire soundtrack . music can be a powerful tool in the hands of a filmmaker. but he should know where to use it and how much to. i think tv industry shares a lot of blame in the music being used the way it is in our films.

yogik May 28, 2011 at 1:21 AM  

mi asech bolaycho lahanpani...ha chitrpat ghadto pan mahych panchkroshit...sagali lok nehmichya pahnyatali watata..aiklelee watatat..majhi boli mi takli(!)..ase movie pahtana sarke watat rahile..movie apratim ahech!!too nostalgic for me!! nice read!!

खेड्यान येडं November 10, 2011 at 4:22 AM  

the instruments the use for BG score makes this film more regional than valu which reminds us " Malgudi days"

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP